सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
भालेवाडी 500 लोकवस्तीचे कोलाम गोंड आदिवासी जमातीचे गाव मूलभूत गरजे पासून कोसो दूर असलेल्या गावात समस्यांचा डोंगर आवासून उभा आहे. येथे जुन्या जलकुंभाची पूर्वी निर्मिती करण्यात आली, मात्र जलवाहिणीचे काम तोडक्या पद्धतीने करण्यात आल्याने पाणी समस्यांनी तोंड वर काढले आहे. मागील अनेक महिन्यापासून जवळपास 50 घरांना पाणी समस्यांचा फटका बसत आहे. ऐने उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहन करीत येथील बहुतांश नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. मात्र ग्रामपंचायतीचे येथे सपशेल दुर्लक्ष होत असून तोंडी सूचना करूनही मूग गिळूण बसून आहे. नव्याने जलकुंभाची निर्मितीचे नियोजन अतिशय संथ गतीने होत असतांना पाण्याचा फटका बसण्याचे कारण हे जलकुंभ ठरत आहे. एकूणच पाण्याच्या भीषण कृत्रिम टंचाईने जलकुंभ बांधकाम येथे वांझोटे ठरत आहे.
गावातील अर्ध्या लोकांना पाणी मुबलक मिळत असतांना अकार्यक्षम ग्रामपंचायत सचिव, सरपंच, कर्मचारी व इतर सदस्यांच्या हेकेखोर प्रवृत्तीने पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. तूर्तास रखरखत्या उन्हात येथील पाणी पेटले असून नागरिकांच्या घशाला कोरड निर्माण झाली आहे. ही गंभीर समस्या तत्काळ निकालात काढून नागरिकांचा घसा ओला करावा,अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा येथील नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे.