सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील जळका येथील आनंद बाल सदनातील नवव्या वर्गातील विद्यार्थी अचानकपणे गायब झाल्याची घटना घडल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. परंतु दि.14 फेब्रुवारीला राळेगाव तालुक्यातील खैरी येथे 'तो' आढळून आल्याने तालुक्यात विद्यार्थ्यांच्या अपहरणाच्या चर्चेला पूर्णविराम विराम मिळाला आहे. मात्र, यामुळे शिक्षण संस्थेने सुटकेचा निःश्वास सोडला.
जळका (ता. मारेगाव) येथील आनंद बाल सदनात नवव्या वर्गात श्लोक विनोद कडुकर शिक्षण घेत असताना दि.13 तारखेला बालगृहातून अचानकपणे लापता झाला. अचानक शालेय परिसरातून विद्यार्थी गायब झाल्याने शिक्षण संस्थेची पुरती भंबेरी उडाली. परिसरात शोधाशोध घेण्यात आला मात्र, हरवलेला 'श्लोक' हा कुठेच मिळाला नाही. याबाबतची मारेगाव पोलिसात फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, संस्थेकडून इतरत्र शोध सत्र सुरु असतांना राळेगाव तालुक्यातील खैरी येथे नातेवाईकांना बुधवार ला सायंकाळ च्या सुमारास श्लोक निदर्शनास आला.
मामाने दिलेल्या माहितीनुसार राज्यमार्गांवरील जळका फाट्यावरून करंजी पोहचला तेथून वडकी व त्यानंतर वरोरा गाठले. परंतु अनोळखी शहरात एका लग्नसमारंभात पोटाची खळगी भागवत कशीबसी रात्र घालवली. त्यास पश्चाताप झाल्याने त्याने मामाचे गाव चिंचमंडळ गाठायचे ठरविले, परंतु जवळ पैसे नसल्याने मिळेल ते वाहन पकडत श्लोक खैरीला आला. खैरी वरून चिंचमंडळ ला पायी जात असताना निकटवरतीयांना तो दिसून आला. त्यांनी मामाशी संपर्क साधून त्याची माहिती दिली. मामाने तातडीने खैरी गाठत श्लोक ला चिंचमंडळ ला परत आणले व याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशन व जळका बाल सदनाला देण्यात आली.