Page

विविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याची पायाभरणी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या 10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी गरीब, युवक, शेतकरी व महिला या घटकांच्या सशक्तीकरणासाठी व्यापक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासप्रक्रियेला गती मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रू. व महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे 6 हजार 900 कोटी रू. चे वितरण, तसेच राज्यातील सुमारे पाच हजार कोटी रू. निधीतून रस्ते, रेल्वे व सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन, तसेच यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भावना गवळी, खा.हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नीलय नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार,डॉ. संदीप धुर्वे, नामदेव ससाणे, इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, गत 10 वर्षातील योजनांच्या अंमलबजावणीने देशात पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला आहे. गरीब, नवयुवक, शेतकरी व महिला हे चार घटक सशक्त झाले तरच देश विकसित होईल. हे लक्षात घेऊन अनेक प्रकल्प व योजनांतून शेतक-यांसाठी सिंचन, गरीबांसाठी घरे, महिलांच्या स्वावलंबनासाठी अर्थसाह्य व युवकांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा निधी थेट हस्तांतरित करण्यात येत आहे. ग्रामीण विकासासाठी हर घर जल, पीएम किसान निधी, लखपती दीदी योजना, स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण आदी विविध योजनांचा त्यांनी उल्लेख केला.

प्रधानमंत्र्यांनी भाषणाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. मराठी व बंजारा भाषेतही त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मागील दशक देशासाठी सुवर्णकाळ ठरला असून त्याचे शिल्पकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. महिला, शेतकरी, गरीब आणि तरुण या समाजाच्या चार स्तंभांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी संपूर्ण जीवन देशाला समर्पित केले असून, ‘नेशन फर्स्ट’च्या माध्यमातून देशाला पुढे नेत आहेत. महाराष्ट्र संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्यासमवेत आहे, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शेतकरी सन्मान योजनेत 4 हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून, मोदी आवास योजनेत घरांमध्ये महिलांना घराचा संयुक्त मालकी हक्क मिळेल. साडेपाच लाख महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून दिला जात आहे. गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे लक्ष्य आहे. त्यानुसार राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरवर नेण्याचा आमचा निर्धार आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी झाल्यापासून महिलांसाठी अनेक महत्वाच्या योजना सुरू झाल्या. त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि कर्ज देण्यात आले आहे. पालकमंत्री श्री. राठोड, खा. गवळी, आमदार डॉ. धुर्वे यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना बंजारा समाजाची पगडी, तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.

रस्ते व महामार्गांचे लोकार्पण

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध रस्ते, महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ व लाभ वितरण झाले. त्यात वरोरा - वणी महामार्गावरील 18 कि.मी. चौपदरीकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस, वणी, तडाळी, पडोळी यांसारख्या विविध औद्योगिक क्षेत्रांना फायदा मिळेल. सुमारे 378 कोटी रू. निधीतून सलाईखुर्द - तिरोरा महामार्गावरील 42 कि.मी. काँक्रिटीकरणामुळे गोंदिया ते नागपूर प्रवासाच्या वेळेत एक तासाची कपात होऊन नागझिरा अभयारण्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. सुमारे 291 कोटी रू. निधीतून साकोली - भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या 55.80 कि.मी. दुपदरी रस्त्याचेही लोकार्पण झाले.

सिंचन प्रकल्प

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत 1 हजार 683 कोटी रू. निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील 6 प्रकल्पांचे लोकार्पण झाले. या प्रकल्पातून 2.41 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 1 हजार 180 कोटी रू. निधीतून विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांमुळे 51 हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.

रेल्वेसेवेचा शुभारंभ

अहमदनगर - बीड-परळी रेल्वे मार्गावर 645 कोटी रू. निधीतून न्यू आष्टी - अंमळनेर टप्प्याचे व अंमळनेर - न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ झाला. त्याचा लाभ बीड जिल्ह्यातील नागरिक व कामगार वर्गाला मिळेल. सुमारे 675 कोटी रू. निधीतून वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील वर्धा -कळंब या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ झाला. त्यामुळे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील दळणवळण गतिशील होईल. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच ब्रॉडगेज रेल्वे सेवा सुरू झाली आहे.

महिला सशक्तीकरण अभियान

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत 5.50 लाख महिला बचत गटांना 825 रू. कोटी फिरत्या निधीचे वितरण करण्यात आले. स्वयंसहाय्यता समूहांना अतिरिक्त खेळते भांडवल देण्यासाठी 913 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली. आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात 1 कोटी आयुष्मान कार्डचे वितरण होत असून, योजनेच्या 3 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कार्डचे वितरण करण्यात आले.

इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभही झाला. त्यात येत्या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यात येणार असून, 2.5 लाख लाभार्थ्यांना रु. 375 कोटींच्या पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.

पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हप्ता थेट बँक खात्यात

पीएम किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरित झाले. देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रुपयांचे, तसेच राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 1 हजार 969 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. आधार लिंक बँक खात्यात लाभांचे डिजिटल हस्तांतरण करण्यात आले. नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यात राज्यातील सुमारे 88 लाख शेतकरी कुटुंबांना 3 हजार 800 कोटी रुपयांचा लाभ मिळाला.

यवतमाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेस अलोट जनसागर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला अभूतपूर्व जनसागर लोटला होता. या सभेला जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधणारी होती.

यवतमाळ शहराजवळील डोरली येथे आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या सभेला जिल्ह्यातील अंदाजित तीन लाखहून अधिक महिला, शेतकरी, युवकांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
या कार्यक्रमात वर्धा - कळंब रेल्वे मार्ग या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ, न्यू आष्टी-अंमळनेर रेल्वे, अंमळनेर- न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ, पीएम किसान सन्मान निधीच्या 16 व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण, यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण, आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्डचे वितरण, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील सहा प्रकल्पांचे लोकार्पण, बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाड्यातील 45 सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण, रस्त्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रधानमंत्री मोदी या सभास्थळी पोहोचताच उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत होता. त्यांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण सभास्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रधानमंत्री मोदी यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी महिला अत्यंत शिस्तबद्ध रितीने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण कार्यक्रमाचे केलेले नियोजन उल्लेखनीय ठरले. या जाहीर कार्यक्रमात कुठलाही अनुचित प्रकारही घडला नाही ही बाब प्रामुख्याने लक्षवेधी ठरली.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भावना गवळी, खा.हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नीलय नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, डॉ. संदीप धुर्वे, नामदेव ससाणे, इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

कोसारा गावाजवळ डिझल टँकर पलटी, चालक गंभीर जखमी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
 
मारेगाव : तालुक्यातील शेवट च्या टोकाला असलेल्या कोसारा गावाजवळ बडनेरा अमरावती येथुन डीझल भरुन माढेळी वरोरा कडे जात असतांना खैरी ते कोसारा रोडवर कोसारा गावाजवळील वळणावर डिझल टँकर क्र. (J.U.12 BZ 8947 हा डिझेल टँकर पलटी झाला. ही घटना सकाळी 10 वाजता घडली असुन ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असे समजते, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, भरधाव डिझेल टँकर पलटी झाला अशी वार्ता कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी लोकांची तोबा गर्दी उसळली होती. मात्र, डिझेल उपयुक्त असल्याने विविध माध्यमातून डबकीत भरून घेण्यासाठी लोकांची झूबड उडाल्याचे दिसून आले. वृत्त लिहेपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल व्हायचे होते.

मच्छिन्द्रा येथील बस मोदींच्या कार्यक्रमाला यवतमाळ येथे रवाना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज दि.28 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील महिला मेळाव्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येणार असून ते आयोजित कार्यक्रमाला संबोधित करणार आहे. काल ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमस्थळाला भेट देऊन पाहणी केली व तेथेच तयारीचा आढावा घेतला. 

यावेळी आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.निलय नाईक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॅा.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्रिमहोदयांनी स्टेज, मंडप, बैठक व्यवस्था, सुरक्षा, स्क्रीन, साऊंड आदींची पाहणी केली. त्यानंतर येथेच सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला. जी कामे शिल्लक असतील ती आज सायंकाळपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंडपात उभारण्यात आलेल्या कक्षांमध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी, महिलांकरीता फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

प्रत्येक गावातून बसमध्ये कार्यक्रमस्थळी येणाऱ्या महिलांसाठी बसमध्येच खाद्य पदार्थ, पिण्याचे पाणी तसेच त्यांच्यासोबत समन्वयक असावे. महिलांची प्रवासादरम्यान गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. महिलांना सुरक्षित कार्यक्रमस्थळी आणण्यासोबतच त्यांचा परतीचा प्रवास देखील सुरक्षितपणे होईल, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या.

याच अनुषंगाने मच्छिन्द्रा येथील महिलांची बस यवतमाळकरिता रवाना झाली असून यात एकूण 52 महिला, समन्वयक दर्शना कुमरे, ग्रामसेवक तिरपुडे, ग्राम.चपराशी दिनेश जुमनाके यांचा समावेश आहे. तसेच तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीला 65 बसेस काल रात्रीच पोहचल्या. आज सकाळी बुधवारी हाऊसफुल होऊन त्या सुद्धा रवाना झाल्या. यवतमाळ येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयोजित कार्यक्रमाला विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यातून लाखों महिलांची उपस्थिती असणार आहे, असे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी सांगितले. तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व आजी माजी नेते मंडळी मोठ्या संख्येने येणार आहे.

तहसीलदार निलावाड यांनी दिली 'खबऱ्या' विरुद्ध मारेगाव पोलिसात तक्रार

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्याच्या शेवट च्या टोकाला वाहत असलेल्या वर्धा नदी पात्रातील तसेच विविध घाटावरून वाळूचा अवैध उपसा होत असल्याची चर्चा मारेगाव तालुक्यात धुमाकूळ घालत आहे. यावर आळा घालण्यासाठी मारेगाव महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे. यापूर्वीही अवैध वाळू तस्करांकडून लाखो रुपये दंड वसूल केलेला आहे. मात्र तरीही रेतीचा उपसा काही थांबेना. याच अनुषंगाने तहसीलदार निलावाड यांनी तालुक्यातील विविध वाळू घाटावर धाड टाकण्याचे सत्र सुरू केले. त्यामुळे वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान मंगळवारी (ता. 26) रोजी मध्यरात्री अडीज वाजताच्यादरम्यान मारेगाव तालुक्यातील दापोरा घाटावर तहसीलदार उत्तम निलवाड यांनी आपले सहकारी सिंधी (महागांव) साजातील तलाठी विवेश भाऊराव सोयाम, चिंचाळा साजातील तलाठी विकास जनार्धन मडावी, साजातील डोलडोंगरगांव तलाठी संदवेल चंद्रभान कुडमेथे हे सगळे गोपनीय माहिती च्या आधारे दापोरा परिसराकडे निघाले होते. त्याच वेळी काल मध्यरात्री एक जेसीबी मशीन आणि एक ट्रॅक्टर अवैध उपसा करून वाळूची वाहतूक करताना आढळून येताच सदर जेसीबी आणि ट्रॅक्टरचा पंचनामा करून जप्त करून दोन्ही वाहने तहसील कार्यालयाला जमा करण्यात आली होती. तूर्तास तहसीलदार यांच्या आक्रमक पवित्र्याने वाळू तस्कर चांगलेच धास्तावले आहे.

मात्र, तहसीलदार निलावाड आणि यांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्याना अज्ञात इसमानी उभे करुन "इतक्या उशीरा तिकडे कुठे जाता" असे विचारुन अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तहसिलदार स्वतः यांनी मी मारेगाव तहसीलदार असल्याचे सांगितले आणि माझ्या सोबत मारेगांव तालुक्यातील तीन तलाठी आहेत असे सांगीतले असता, अडवून विचारपूस करणाऱ्यांनी तहसीलदार असल्याचा धसका घेत रोडलगत असलेल्या शेताकडे पोबारा केला. त्यामुळे इतर कारवाई करण्यात अडथळा निर्माण झाला आणि जेसीबी व ट्रॅक्टरचे मालकाचे दडून बसलेले इसम गवसले नाही. मात्र,या हेरगिरी गुप्तहेर खबऱ्यावर कारवाई करा अशी तक्रार तहसीलदार निलावाड यांनी आज मंगळवार ला मारेगाव पोलिसात दिली आहे.  

दरम्यान,दापोरा शिवारातील चिंचमंडळ ते खैरी या मुख्यरस्त्या पासुन दापोरा ते धानोरा कच्या रस्त्यावर रोडलगत दोन व्यक्ती मोटार सायकल घेवुन रोडच्या कडेला दडीमारुन दरम्यान, अवैध रेती उत्खनन करुन वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर, जे.सी.बी. मालक यांचे खबरे म्हणुन काम करण्यासाठी लपुन बसलेले होते. सदर ठिकाणाच्या पुढे अंदाजे 100 मीटर उपस्याच्या नाल्यामध्ये नविन पुलाचे बांधकाम चालु आहे त्या पुलाजवळील नाल्यात जे.सी.बी. मशीन क्रमांक MH-29 V-4345 व्दारे ट्रॅक्टर क्रमांक MH- 29 BVP- 2464 सोबत असलेल्या विना क्रमांकाच्या ट्रालीमध्ये रेती भरत असतांना पकडण्यात आले. तत्पूर्वी कारवाई करण्याअगोदर रस्त्यामधुन जात असतांना त्यांना अडवून विचारपूस केली. परंतु मी तहसीलदार आहे, असे सांगताच तेथील खबऱ्यांनी पळ काढला. मात्र, यात एका ट्रॅक्टर आणि जेसीबी मशीन वर जप्तीची कारवाई मंगळवारच्या मध्यरात्री 2.30 वाजता च्या दरम्यान दापोरा परिसरात करण्यात आली होती. 

त्यामुळे अनोळखी व्यक्ती (अवैधरित्या रेती उत्खनन करुन वाहतुक करणाऱ्या जे.सी.बी. मालक, ट्रॅक्टर मालक यांचे खबऱ्या) विरुध्द तहसीलदार उत्तम निलावाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करुन त्यांचे विरुध्द नियमाधिन कार्यवाही व्हावी, अशी तक्रार दिली. 

महसूल पथकांनी रेती तस्करांच्या आवळल्या मुसक्या

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यात रेती तस्करीचा उच्छाद मांडलेल्या महादापेठ येथील जेसीबी मशीन सह चिंचमंडळ येथील ट्रॅक्टर चालकाच्या मारेगाव तहसीलदार उत्तम निलावाड यांनी मुसक्या आवळत एक ट्रॅक्टर आणि जेसीबी जप्त केले. ही कारवाई आज (ता.26 फेब्रु.) सोमवारच्या मध्यरात्री 2.49 वाजताचे दरम्यान,केल्याने परिसरातील तस्करांचे पुरते धाबे दणाणले आहे.

तालुक्यातील कोसारा घाटावरील रेती तस्करी हा पाठशिवणीचा खेळ नित्याचाच आहे. यात चिंचमंडळ रेती तस्कर नियमित आपला रात्रीचा डाव चालवित शासनाच्या महसूलला लाखो रुपयांचा चुना लावण्याचा गोरखधंदा सर्वश्रुत आहे. मात्र कारवाईचा फास आवळण्यात प्रशासन नापास यापूर्वी होतांना दिसत होते. दरम्यान, तस्करांचा पर्दाफाश करण्यासाठी प्रशासकीय सेवेतील पारदर्शक अधिकारी तहसीलदार उत्तम निलावाड यांनी रात्रीचा खेळ उध्वस्त करण्यासाठी व्युव्हरचना आखत मध्यरात्री 2.49 वाजता जेसीबी मशीनने रेती उपसा करित असताना एक ट्रॅक्टर आणि जेसीबी वर कारवाईचा फास आवळत जप्त केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे तालुक्यात रेती तस्करीचा बोलबाला असलेल्या परिसरातील तस्करांना लगाम लावण्यासाठी महसूल विभाग एक्शन मोड वर येवून तहसीलदार सह पथकाने रात्रभर शिवारात ठाण मांडत चिंचमंडळ येथील वाळू भरलेले एक ट्रॅक्टर आणि महादापेठ येथील जेसीबी वर छापा टाकून वाहन जप्त केले.
तहसीलदार निलावाड यांच्या पारदर्शक भूमिकेने तालुक्यात बहुदा पहिल्यांदाच एखाद्या अधिकाऱ्याने रेती तस्करांवर थेट आणि प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारल्याने चांगलाच चाप बसणार आहे. शासनाकडून रेती घाट उपसा व लिलाव प्रक्रीयेला तूर्तास फुलस्टॉप असतांना तस्करांचे चांगलेच फावत आहे. तहसीलदार यांच्या धडाकेबाज कारवाईने तस्करांनी चांगलाच धसका घेतला असून आपण कारवाईचा बडगा कायम ठेवून तस्करांवर लगाम लावण्याचा आशावाद तहसीलदार उत्तम निलावाड यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलतांना व्यक्त केला.

सदरची कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड, तलाठी विवेश सोयाम, तलाठी विकास मडावी, तलाठी एस सी कुडमेथे, ड्रायव्हर विजय कनाके, शिपाई वेले यांनी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हजारो महिलांचा पक्ष प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

झरी : तालुक्यातील हजारों महिलांनी संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार व पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्षप्रवेश केला. 

यामध्ये विशेषतः महिलांचा बहुसंख्य समावेश होता. गोरगरिबांचे कैवारी व त्यांच्या मुलभूत अडीअडचणीची जाणीव असणारे मनसेचे नेते राजूभाऊ उंबरकर अशी ग्रामीण भागात उंबरकरांची ओळख आहे. तूर्तास लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकांचे पक्षप्रवेश सुरू आहेत. यातच वणी मतदार संघातील झरी (जामणी) तालुक्यातील हजारो महिलांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पक्षनेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.
          
यावेळी वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, महिला सेना मनसे जिल्हाध्यक्षा सौ. अर्चना बोदाडकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, झरी न.प. चे नगर उपाध्यक्ष नानु कोडापे, आरोग्य सभापती प्रवीण लेनगुळे, तालुकाध्यक्ष गजानन मिलमिले, गुलाब आवारी, फाल्गुन गोहोकार, मोहन अर्के, विलन बोदाडकर, विठ्ठल हेपट, काशिनाथ कुमरे, चेतन हेपट, शिवराज पेचे, पप्पू चुक्कलवार, मुस्ताख शेख, संगिता कोडापे, छाया रोयपाटे, शोभा तलांडे, वर्षा गोहणे, बेबीताई उईके आदींची उपस्थिती होती.

गर्दीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक : अखेरच्या दिवशी धावल्या शेकडोंच्या वर जोड्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : जत्रा मैदानावर गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता विदर्भ केसरी शंकरपटाची सांगता व बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. पटाच्या तिस-या दिवशी 100 जोड्या धावल्या. यात 'अ' गटात करोडी येथील मनोहर पाटील चव्हाण यांची लखन व जलवा ही जोडी पहिली ठरली. या जोडीने 6.54 सेकंदात अंतर कापत 1 लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. तर 'क' गटात दहिवड येथील कु. भव्या अमोल पवार यांची जलवा व सैराट ही जोडी विजेती ठरली. या जोडीने 6.79 सेकंदात अंतर कापत 41 हजारांचे रोख पारितोषिक पटकावले. बक्षिस वितरण कार्यक्रमाला आ. प्रतिभा धानोरकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. अखेरच्या दिवशी 40 हजार पेक्षा अधिक लोकांनी या शर्यतीचा थरार अनुभवला.

'अ' गटात दुसरे बक्षिस हिवरा येथील साहेबराव पाटील यांच्या लक्ष्या व राणा या जोडीने, तिसरे बक्षिस धारफळ येथील अशोकराव पाटील यांच्या बजरंग व वंशी या जोडीने पटकावले. 'क' गटात दुसरे बक्षिस वडगाव येथील नवनाथ महाराज प्रसन्न यांच्या हिरा व शिवा जोडीने तर घोंगशी कांडा येथील राम चव्हाण यांच्या बलमा व नंद्या या जोडीने तिसरे बक्षिस पटकावले. या दोन्ही गटात पहिल्या येणा-या 13 शेतक-यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस देण्यात आले. 

बक्षिस वितरण समारंभात बोलताना आ. प्रतिभा धानोरकर यांनी शंकरपट हा शेतक-यांना आनंद देणारा खेळ असून अनेक वर्षांनंतर हा खेळ सुरु झाल्याने बळीराजाच्या चेह-यावर समाधान दिसून येत असल्याचे मनोगत व्यक्त केले. तर आयोजक संजय खाडे यांनी हजारोंच्या संख्येने लोकांनी उपस्थिती दर्शवल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानत यापुढेही कायम अशा स्पर्धा, खेळ भरवण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
  
परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार
या शंकरपटा दरम्यान वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, खेळ, कला, पत्रकारिता, उद्योजक्ता, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रातील कार्यातून समाजासाठी योगदान देणा-या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे सदस्य व संजय खाडे मित्र परिवारातील शेकडो कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना बी.एल.ओ. च्या कामातून वगळण्यात यावे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : नुकतेच मुंबई व उपनगर भागातील शिक्षकांना बिएलओ च्या अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा या कामातून मुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी २२ फेब्रुवारी च्या पत्रानुसार शिक्षक व विद्यार्थ्यांची बाजू समजून घेतली.याबद्दल महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे. बी एल ओ च्या कामामुळे राज्यभरातील शिक्षक विद्यार्थी व पालक त्रस्त आहेत, विद्यार्थ्यांना शिकवण्याचा बराचसा वेळ यामध्ये वाया जात आहे. ज्याप्रमाणे मुंबई व उपनगर भागातील शिक्षकांना या कामातून वगळून दिलासा दिला आहे त्याचप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा दिलासा द्यावा व बी एल ओ हँडबुक मध्ये नमूद अन्य बारा संवर्गातील कर्मचारी व नव्याने ऍड केलेले सेवानिवृत्त कर्मचारी यांना बी एल ओ चे काम देण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनावर राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, महिला राज्याध्यक्ष डॉ. अल्का ठाकरे, सचिव शारदा वाडकर, राज्य संघटक भुपेश वाघ,राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. असे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनिष राठोड, जिल्हा सरचिटणीस आनंदकुमार शेंडे जिल्हा यांनी यांनी कळविले आहे.

पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

केंद्र सरकार शिक्षण धोरणात बदल करत असून शिक्षण मंत्रालयाने पहिलीतील प्रवेशाचे वय बदलले आहे. केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी मुलाचे वय 6 वर्षे इतके निश्चित करण्याचे निर्देश दिले असून ही वयोमर्यादा NEP 2020 अंतर्गत प्रस्तावित आहे..

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता सहा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही. याआधी खाजगी शाळांमध्ये कमी वयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा यामुळे विद्यार्थ्यांवर कमी वयात अभ्यासाचा भार पडायचा. यामुळे अनेकांना बालपण अनुभवायला मिळत नव्हते. तसेस विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासावरही परिणाम व्हायचा.

दरम्यान, याआधी पहिलीत प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक राज्यात वेगवेगळी वयोमर्यादा होती. काही राज्यांमध्ये पाच वर्षांच्या मुलाला पहिलीत प्रवेश दिला जायचा. त्यामुळे या मुलांची पदवी इतर राज्यातील मुलांच्या तुलनेत एक वर्ष आधी पूर्ण व्हायची. त्यामुळे असे विद्यार्थी सरकारी नोकर भरतीसाठी इतरांच्या तुलनेत एक वर्ष आधी पात्र ठरायचे. याचा अर्थ या मुलांना सरकारी भरतीसाठी एक अटेंप्ट जास्त मिळायचा. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पहिलीच्या प्रवेशाची वयोमर्यादा संपूर्ण देशात एकसारखी असावी अशी मागणी अनेकांनी केली होती.


बोरी (गदाजी) येथे 19 दिवस रंगला क्रिकेट सामन्याचा थरार


यवतमाळ सत्ता | प्रतिनिधी 

मारेगाव : आज जमाना जरी मोबाईल, डिजिटल चा असला तरी खेळाडूनी खेळ खेळला पाहिजे, खेळाने व्यायाम होतो असे, प्रतिपादन कृ.उ. बा.समिती चे संचालक अविनाश लांबट यांनी केले, ते श्री संत गदाजी महाराज, बोरी क्रिकेट क्लब च्या वतीने भरविण्यात आलेल्या सामन्यात अंतिम विजयी संघाला प्रोत्साहित करित आपल्या भाषणात बोलत होते.

उदघाटक सरपंच अरविंद ठाकरे (कुंभा), कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण नान्हे (सरपंच बोरी), प्रमुख पाहुणे भाजपचे तालुका अध्यक्ष तथा संचालक अविनाश लांबट, पारस गंधर्व ब्रिक्स चे संचालक प्रवीणभाऊ बोथले, तसेच विशेष उपस्थिती सुरेशदादा लांडे (देवाळा उपसरपंच), उपसरपंच प्रदीप साबरे, सुनील पिंपळकर यांची उपस्थिती होती.

दि.11 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत क्रिकेट चे सामने खेळीमेळीच्या वातावरणात चालले होते. जिल्ह्याभरातून या सामन्यात संघांनी सहभाग घेतला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, पहिल्यांदाच बोरी क्रिकेट क्लब च्या वतीने उत्कृष्ट नियोजन करून सामान्यांचे आयोजन केले आणि खेळाडूंना एक प्रकारचे माध्यम उभारून जे कार्य केले आहे, हे असेच पुढेही चालू राहोत त्यासाठी आमचे सहकार्य आपल्या मंडळाकरिता असणार आहे असेही ते म्हणाले. तसेच या प्रसंगी इतर मान्यवारांनी सुद्धा आपापले मनोगत व्यक्त करून विजयी संघांचे कौतुक करित अभिनंदन केले.

तब्बल एकोणीस दिवस चाललेल्या सामन्यात प्रथम बक्षीस वडकी येथील संघांनी पटकावला, द्वितीय बक्षीस गोंडबुरांडा संघांनी तर, तृतीय बक्षीस रामनगर संघांनी मिळवले. चौथे बक्षीस बोरी (गदाजी) संघांनी ठेवले. विजयी संघांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी श्री संत गदाजी महाराज क्रिकेट क्लब बोरी चे अध्यक्ष राहुल खंडाळकर, उपाध्यक्ष गणेश नान्हे, सचिव नितेश खंडाळकर, सह सचिव प्रतिक राऊत, कोषाध्यक्ष सुमिन दास, क्रिडा प्रमुख प्रवीण बाबरे, या सर्व मंडळाच्या तसेच गावातील युवा वर्ग व नागरिकांच्या उपस्थितीत तब्ब्ल 19 दिवस चाललेल्या सामन्याचे शनिवार दि.24 फेब्रुवारी ला सायंकाळपर्यंत अंतिम सामना वडकी आणि गोंडबुरांडा यांच्या पार पडला असून वडकी संघाने प्रथम बक्षीस मिळवले.

दरम्यान,सर्व संघांचे मंडळाच्या वतीने कौतुक तथा आभार मानण्यात आले. या सामन्यात उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपल्या कलागुणांना उजाळा देत खेळाडूंच्या समवेत चौकार, षटकार मारून क्रिकेट चा आनंद लुटला, यावेळी प्रेक्षक तसेच गावातील युवा मंडळीं बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

मारेगावचे ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची वाशिम येथे बदली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांची बदली झाली असून, त्यांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे तालुका वासियांचे आता लक्ष लागले आहे.

अमरावती पोलीस महानिरीक्ष कार्यालय अमरावती परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया नुकतीच  करण्यात आली आहे. मारेगाव येथील ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची काल रात्री यांच्या बदलीचे आदेश निघाले.

लोकसभा निवडणुक-२०२४ च्या अनुषंगाने मा. केंद्रीय निवडणुक आयोग, मा. मुख्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य, मुंबई व पोलीस महासंचालक म.रा. मुंबई यांनी संदर्भीय निर्देशानुसार आणि निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे अमरावती परीक्षेत्रांतर्गत सहा. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा निर्णय घेणेकामी दि.२४/०२/२०२४ रोजी परीक्षेत्रीय आस्थापना मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकित महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ मधील कलम-२२ न, पोट कलम (२) अन्वये परीक्षेत्र स्तरावतील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन अमरावती परीक्षेत्र पोलीस आस्थापना मंडळ यांनी सहा. पोलीस निरीक्षकांच्या बदलीस मान्यता दिली आहे. त्यामुळे मारेगाव पोलीस ठाण्यात नवा गडी नवा राज सुरू होणार आहे.

विशेष उल्लेखनीय की, निष्क्रिय ठाणेदाराची बदली करिता सामाजिक,राजकीय लोकांची आग्रही मागणी होती. तालुक्यात मटका, जुगार, कोंबड बाजार, अवैध दारू, अवैध कोल डेपो, रेती तक्सरी यासह कौटुंबिक तंटे जसे च्या तसे असल्याचे नागरिकांनी अनुभवले त्यामुळे त्यांची बदली व्हावी अशी आग्रही मागणी होती. किंबहुना त्यांची या अगोदर बदली होणार होती असे समजते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे बदली थांबल्याचे बोलल्या जात असताना अखेर ठाणेदार जनार्धन खंडेराव यांची 24/02/2024 रोजी बदलीचे आदेश धडकले आणि त्यांची वाशिम येथे बदली झाल्याचा आदेश जिल्हा पोलीस यवतमाळ कार्यालय यांना धडकला.

संबंधीत घटक प्रमुखांनी या बदली आदेशाची प्रत संबंधीत पोलीस अधिकारी यांना तत्काळ बजावुन त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे. बदली झालेल्या पोलीस अधिका-यांना कार्यमुक्त करतांना पर्यायी/बदलीवर येणा-या पोलीस अधिका-यांची वाट पाहु नये. तसेच भारतीय निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनांचे काटोकोरणे पालन करावे, कोणत्याही घटकात निवडणुकिची प्रक्रीया किंवा त्या अनुषंगाने आचार संहिता सुरु असल्यास घटक प्रमुखांनी संबंधीत निवडणूक अधिका-यांशी संपर्क साधून आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेवुन संबंधीत अधिका-यास कार्यमुक्त करावे व तसा अनुपालन अहवाल सादर करावा असं पत्रात म्हटलं आहे.

नमुद बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर न होता रुग्णनिवेदन करतील किंवा गैरहजर रहातील ते पोलीस अधिकारी शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र ठरतील याबाबतची समज त्यांना दयावी आणि भारतीय निवडणुक आयोगाने निर्धारीत केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केल्या जाईल, कोणत्याही प्रकारचे उल्लंघण होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आदेश पत्रात नमूद आहे. 

मराठवाड्यासह विदर्भात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्यात सध्या ऊन आणि गारव्याचा खेळ पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस तर जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु आहे. तर राज्यात देखील आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे विदर्भ, आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहेत. 

त्यामुळेच पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका किंवा मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यात पावसाचा शक्यता? :
मराठवाड्यात - हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.
विदर्भात - बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे.

राज्यात कोकण वगळता काही भागात तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.


तुम्हालाही सतत 'रील्स' बघण्याची सवय आहे? ५ गोष्टी लक्षात ठेवा, मोबाईलपासून राहाल दूर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सध्या सोशल मिडीयावर रील्सचा जमाना आहे. प्रवासाच्या वेळी किंवा रिकाम्या वेळी विरंगुळा म्हणून इन्स्टाग्रामवर रील्स हमखास पाहिले जातात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकजण फोन चाळत बसतात. 

लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत अनेकांना रील्स पाहाण्याची आवड असते. कोणत्याही ठिकाणी व्हिडिओ स्क्रोल करण्याची सवय आहे का? त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतो. ही सवय अधिक प्रमाणात वाढत असेल तर यापासून दूर कसे राहाल त्यासाठी या ५ गोष्टी लक्षात ठेवा.

स्क्रोलिंग करण्यावर मात कशी कराल?
1. जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि स्क्रोल करत असाल तर त्याऐवजी संगीत ऐका, फिरायला जा, तसेच तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करु शकता. पुस्तक वाचू शकता.
2. तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलू शकता. मित्रांना किंवा नातेवाईकांना कॉल (Call) करा. वर्कआउट किंवा योगा क्लास लावा.
3. टाइमपास म्हणून स्क्रोल करत असाल तर लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये जाण्याचा प्रयत्न करा, बागकाम करा किंवा वॉकला जा.
4. सततच्या स्क्रोलिंगमुळे तुमच्या मनावर ताण येतो. तुम्ही अतिविचार करु लागता. तुमचा फोकस कमी होतो.
5. सतत फोन पकडल्याने मान आणि बोटे दुख लागतात. तसेच इतर अनेक प्रकारच्या समस्या देखील उद्भवतात. त्यासाठी फोन स्क्रोलिंग करण्याचा टाइम सेट करा.


अखंड नाभिक बहुउद्देशीय संस्थेने केले वारकऱ्यांना सन्मानित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील कोसारा (सोईट) येथे श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, काल शनिवार ला सप्ताहाची सांगता झाली.या प्रसंगी अखंड नाभिक बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र प्रदेश यवतमाळ जिल्हा च्या वतीने वारकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मारेगाव तालुक्यातील कोसारा गावात दरवर्षी होत असलेल्या श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह हनुमान मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री संत नगाजी महाराज मंदिर, तसेच श्री संत नानाजी महाराज यांच्या भव्य पटांगणात ह.भ.प. भागवतचार्य अविनाशजी महाराज भोयर व त्यांचा संच आळंदीकर यांचे भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन केले होते. यात महाराज व त्यांचा संचाचे शाल श्रीफळ, व सन्मानचिन्न देऊन सन्मानित करण्यात आले.

सर्व अखंड नाभिक समाजाने या भागवत सप्ताह मध्ये उपस्थिती दर्शवली. मा. श्री. गणेश भाऊ वनकर कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य बल्लारपूर (चंद्रपूर), अखंड नाभिक समाज यवतमाळ जिल्हा मा. श्री.अध्यक्ष साहेब निरंजन भाऊ ऐसेकर, यवतमाळ जिल्हा मा. श्री.उपाध्यक्ष साहेब मनोज भाऊ चौधरी, यवतमाळ जिल्हा मा.श्री.सचिव साहेब नगाजी भाऊ वाटेकर, मा. श्री. महादेवराव वनकर कोसारा (सोईट) आणि सर्व अखंड परिवार यवतमाळ हा, ज्ञानयज्ञात सहभागी झाला होता. 

मारेगाव येथील बस स्थानकाचा प्रश्न लागला मार्गी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मागील अनेक वर्षांपासून मारेगाव बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. इमारत बांधकामासाठी कर्तव्यदक्ष आमदार यांच्या विशेष प्रयत्नातून दोन कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूरी मिळाली असून कोटी रुपयांचा खर्च करून या ठिकाणी बसस्थानकाची टोलेजंग इमारत उभी राहणार आहे.

मारेगावात बसस्थानकाची इमारत व्हावी अशी मारेगाव तालुका वाशियांची आग्रही मागणी होती. त्या मागणीला मोठं यश आले, त्यामुळे शहरात नवीन सुसज्ज इमारत बांधकाम केले जाणार आहे. गेल्या अनेक पासून नवीन बसस्थानक इमारतीकरिता येथील सामाजिक राजकीय कार्यकर्ते यासह सामान्य नागरिकांची मागणी होती. परंतु उशिराने का होईना आता, नवीन इमारत बांधकामाचा प्रश्न मार्गी लागला आहेत. याबाबत वणी विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी माहिती दिली. लगेचच शहरात नियोजित ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत उभी राहण्यास प्रारंभ होणार आहे.

त्यामुळे आता मारेगावकरांना आगारातील विविध सुविधांचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे. विविध तांत्रिक अडचणी व जागेच्या प्रश्नामुळे मारेगाव येथील नवीन इमारतीच्या बांधकामाचा मागील अनेक वर्षांपासून गुलदस्त्यातच होता. यासाठी मोठा संघर्ष नागरिकांचा चालूच होता,त्यानंतर देखील नवीन बस स्थानकाची निर्मिती व्हावी अशी जोरकस मागणी शहरवासी करित होते, यासाठी उपोषण, आंदोलन सुद्धा करण्यात आले होते.परंतु नवीन इमारतीचा प्रश्न काही मार्गी लागत नव्हता. मात्र, आमदार संजीव रेड्डी बोकुरवार यांचे कुशल नेतृत्वातून त्यांनी मारेगाव येथील बसस्थानकासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर करून आणला.

विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसात मारेगाव शहरात नवीन सुसज्य बसस्थानकाचे निर्माण होणार आहे. व याचे श्रेय आमदार श्री.बोदकुरवार यांना देत त्यांचे यासाठी भाजपा तालुका पदाधिकारी माजी ज्ञानेश्वर चिकटे, तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, किसान मोर्चाचे शंकर लालसरे, सरचिटणीस प्रशांत नांदे, शशिकांत काका आंबटकर, मंगेश देशपांडे, माधव कोहळे, शालिनीताई दारुंडे, मालाताई गौरकार, सुनीता वांढरे, नंदाताई थेरे, शोभाताई नक्षणे, वैभव पवार, डोमाजी भादिकर, रवी टोंगे, गणेश झाडे, अनुप महाकुलकर, राहुल राठोड, प्रसाद ढवस, पवन ढवस, प्रवीण बोथले, मारोती तुराणकर,आनंद पचारे, चंद्रकांत धोबे, जयंत ठेपाले, सुनील देऊळकर, गणेश खडसे, आदींनी मनस्वी अभिनंदनसह आभार मानले.

कोसारा (सोईट) येथे श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळ्याची सांगता

सह्याद्री चौफेर | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील कोसारा (सोईट) येथे श्री.हनुमान मंदिर , विठ्ठल रुक्मिणी मंदिर व नानाजी महाराज मंदिरच्या भव्य प्रांगणात श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह सोहळा संपन्न झाला. दिनांक 17 फेब्रुवारी 2024 ते 24 फेब्रुवारी 2024 पर्यंत ह.भ.प.अविनाश महाराज भोयर मी.आळंदी उपाध्यक्ष श्री.पुडलिकराव अध्यात्मिक ट्रस्ट यांच्या संगीतमय मधुन वाणीतुन श्रीमद् भागवत कथा श्रवण केली जात आहे.

दिनांक 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता ह.भ.प. रमेश महाराज पुरी यांच्या हस्ते कलशस्थापना व हनुमंतरायांचा अभिषेक करण्यात आला नंतर श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला सुरवात करण्यात आली. साथसंगत तबलाविशारद व मृदंगमणी ह.भ.प.दिलीप महाराज मडावी मनसावळी,संगीत विशारद व आर्गनवादक ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वानखेडे डवलापुर, संगीत गायक ह.भ.प.सोमेश्वर महाराज गौरकर भुगाव, ह.भ.प.पंढरीनाथ महाराज उरकुडे सावंगी. झाकिकार ह.भ.प.दिनेश महाराज ढेंगणे पहापळ, यांच्या संगीतमय मधुन वाणीतुन श्रीमद् भागवत कथा श्रवण केली जात आहे.

श्रीमद् भागवत कथा श्रवण करण्यासाठी कोसारा सोईट येथील महिला पुरुष युवक, युवती व बाल गोपाळ मोठ्या संख्येने भक्तिमय वातावरणात श्रवण केली दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी कोसारा तसेच बाहेर गावावरुन महिला पुरुष भजनी मंडळांनी कोसारा गावातील प्रमुख मार्गानी टाळमृदगाच्या निनादात भक्तीमय वातावरणात नानाजी महाराज व जगन्नाथ महाराज, विठ्ठल रुक्मिणी यांच्या पालखीची भक्तीमय वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली.

गावातील महिलांनी आपआपल्या घरासमोर रांगोळ्या काढुन शोभायात्राचे स्वागत करण्यात आले व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाची मंडपात ह.भ.प. अविनाश महाराज यांचे काल्याचे किर्तन करण्यात आले व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.त्यामुळे कोसारा सोईट गावाला पंढरपूरचे स्वरुप प्राप्त झाल्यासारखे दिसुन येत होते.

कर्तव्यात कसूर, कोसारा साजातील तलाठी 'शेख' निलंबित

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : रेती तस्करांना अभय तर देणं एका पटवाऱ्याच्या चांगलंच अलंगट आले असून त्याला निलंबित केल्याच्या कारवाईनं मारेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मारेगाव तालुक्यातील कोसारा साजातील रेती चोरट्यांना मुभा,अभय देणं 'त्या' तलाठ्याला भोवलं आहे. या प्रकरणात एक तलाठी निलंबित करण्यात आले आहे,तर अशाच कारवाईत एक जन आणखी गळाला लागणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

कोसारा भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा रेती उपसा होत असल्याबाबतच्या वारंवार बातम्या प्रकाशित होत होत्या, त्या पार्श्वभूमीवर कारवाई सुद्धा होत होत्या. मारेगाव तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या मात्र,कोसारा भागात कोणतीही बेकायदा रेती वाहतूक होत नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, एका कारवाई दरम्यान कोसारा साजातील पटवारी यांना तहसीलदार व त्यांच्या पथकातील कर्मचारी यांनी कोसारा गावालगत अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करीत असतांना पकडून जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाला जमा करावयाची आहेत सदरची कार्यवाही सबंधीत तलाठी,कोतवाल यांना बोलविले असता त्यांनी तहसीलदार ह्यांचा आदेश धुडकावून लावत कर्तव्यात कसूर केल्याचा कारणाने कारणे दाखवा नोटीस देऊन उपविभागीय अधिकारी यांनी एका तलाठ्याचे निलंबन केले आहे. 

रेती वाहतूक आणि तलाठी प्रकरण आहे तरी काय ?

मारेगाव तालुक्यातील कोसारा घाटातील बेकायदा रेती उपसा होत असल्याबाबतचे मारेगाव तहसीलदार यांना समजल्यानंतर त्यांनी पटवारी यांना अलर्ट केले होते. 31 जानेवारी रोजीच्या सायंकाळी याच भागात रेती उपसा होत असल्याचे तहसीलदार उत्तम निलावाड यांना समजल्यानंतर त्यांनी आपली टीम आटो सारख्या खाजगी वाहन घेऊन तत्काळ ठिकाण गाठले होते. त्यावेळी 2 ट्रॅक्टर अवैधरित्या रेती भरून वाहतूक करत होते. त्यानुसार तहसीलदार निलावाड यांनी कोतवाल आणि तलाठी यांना जप्त केलेली वाहने कार्यालयात जमा करण्याबाबत सांगण्यात आले होते.मात्र, त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत "मी काय करायचं बघतो तू जा.. असं कोतवालाना म्हटल्यावर कारवाई च्या हालचाली ला वरिष्ठाकडे सुरुवात झाली. कर्तव्यात कसूर,हे स्पष्ट झाल्यानंतर कोसारा साजातील तलाठी नझरूल इस्लाम अब्दुल कय्युम (शेख पटवारी) यांना निलंबित केले आहे. 

त्या तलाठ्यावर नेमका काय ठपका ?

तालुक्यातील कोसारा लगत वर्धा नदी पात्रात रेती घाट असून शासनाकडून हा घाट लिलाव करण्यापूर्वी वाळू तस्करांना मुभा देण्याचा ठपका सदर तलाठ्यावर होता. बेभान झालेल्या वाळू तस्करांनी चोरटी वाहतूक करीत करोडो रुपयांचा शासनाचा महसूल घशात घातला. मात्र, साजातील कारवाईला भोपळा दाखविण्यात येत होता. दरम्यान, नायब तहसीलदार व मंडल अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गौण खनिज उत्खनन कारवाईसाठी सहाय्यक म्हणून सदरील तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र, येथेही ठेंगा दाखविण्यात येत होता. गौण खनिज सारख्या महसूल मिळवून देणाऱ्या व पर्यावरणाचा समतोल साधणाऱ्या संवेदनशील प्रकरणात कसूर व बेजबाबदारपणा दाखविल्याने त्यांनी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणे असे दोषारोपपत्र उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांचे कडे केले होते. त्यामुळे बहुचर्चित पटवारी 'शेख' यांना निलंबित करण्यात आले, असून शिवाय अशाच कारवाईत आणखी एक जन या गळाला लागणार आहे,अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. 

मागील वर्षी आणि आतापर्यंत केलेल्या कारवाईचा लेखाजोखा, तर नागरिकात खमंग चर्चा...

तालुक्यात माहे एप्रिल 2023 पासून ते आज पर्यंत चालू वर्षात एकूण 24 अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असतांनाच्या कार्यवाह्या कोण किती केल्यात यांचाही वरिष्ठ पातळीवर लेखाजोखा होणे अत्यंत गरजेचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार्यरत असलेल्या क्षेत्रीय स्तरावरील 55 ते 60 अधिकारी, कर्मचारी यांच्या पैकी बोटावर मोजण्याइतके फक्त 6 ते 7 कर्मचारी यांनी कारवाई केली आहे असे समजते. इतर अधिकारी, कर्मचारी यांना रोडवर वाहने दिसतच नाहीत काय, अशी खमंग चर्चा नागरिकांतून ऐकायला मिळते.

महागांव येथे तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अखिल विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात मारेगाव तालुक्यातील महागांव येथे साजरा करण्यात आला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच, महागांव यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आलेल्या सोहळ्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने भजन किर्तन व जयघोषाणे अख्ख गाव दुमदूमले होते.

भल्या पहाटे पासून जय्यत तयारी सुरु झाल्यागत गावातील प्रत्येक घरी रंगीबेरंगी रांगोळी ने अंगण सजावट करण्यात आले होते. गावातील शेकडो महिला पुरुष आबाल वृद्ध, बालक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयघोषाणे अवघी महागांव नगरी दुमदुमली.

या पुण्यस्मरण निमित्ताने ग्रामसफाई, सामूहिक ध्यानपाठ, घटस्थापना, ग्रामगीता वाचन, किर्तन, जि प शाळा महागांव यांचे शालेय कार्यक्रम, सामूहिक प्रार्थना, भजन संध्या व किर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात होवून आज शुक्रवार दि.23 फेब्रुवारी ला सन्माननीय श्री.उत्तम निलावाड मारेगाव तहसीलदार साहेब यांच्या हस्ते काल्याच्या किर्तनाची दहीहंडी फोडून राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे प्रबोधनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी भीमराव बी. व्हनखंडे, ठाणेदार जनार्धन खंडेराव, विस्तार अधिकारी माने, उपसरपंच अविनाश लांबट, माजी उपसभापती गजानन खापणे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली, या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचचे अध्यक्ष भास्कर आत्राम, सचिव प्रदीप पिंपळशेंडे, उपाध्यक्ष आशिष दर्वे, सह उपाध्यक्ष लखन लांबट, कोषाध्यक्ष रुपेश नेहारे, सदस्य अतुल बलकी, गौरव लांबट, योगेश बलकी, मोहन बलकी, मोहन नेहारे, राहुल मेश्राम, निखिल मिलमिले,हिमांशू काकडे, रोशन आत्राम, दिपक नेहारे, तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ, तथा समस्त महागांव ग्रामवासी मनोहर नेहारे, देविदास लांबट, गणेश खुसपुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुरलीधर बलकी, संजय तुराणकर, मनोज लांबट विशाल कसाडे, वैभव पिंपळशेंडे, यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ ढवस तर आभार पवन मिलमिले यांनी मानले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौरा तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.28 फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर गटाच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी आज तयारीचा आढावा घेतला. मेळावा उत्तमपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

महसूल भवन येथे आयोजित बैठकीला खा.भावना गवळी, आ.डॉ. अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या तयारीसाठी प्रशासनाच्यावतीने विविध प्रकारच्या 30 समित्या तयार करण्यात आल्या आहे. या समितीच्या प्रमुखांकडून पालकमंत्र्यांनी तयारीचा आढावा घेतला. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांची प्रवास, बैठक, पाणी व्यवस्था उत्तमपणे होणे आवश्यक आहे. परिसरात स्वच्छतागृह पुरेशा प्रमाणात उभारण्यात यावे. येथे येणाऱ्या महिलांच्या गर्दी व्यवस्थापनासह स्टेज, मंडप, वाहनतळ, सुरक्षा आदींचा देखील पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.

भारी येथे 42 एकरच्या खुल्या जागेत हा मेळावा होणार आहे. त्यासाठी मैदानात 26 एकर जागेवर भव्य मंडप उभारण्यात येत असून उभारणीच्या कामाला गती आली आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांसाठी बसेसची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. त्यासाठी बसनिहाय समन्वयक व तालुका स्तरावर संपर्क अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सांगितले.

यावेळी सर्व समिती प्रमुख अधिकारी यांनी आपल्याकडे सोपविलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संबंधित अधिकारी यांनी आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडून मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना गृहोपयोगी संचांचे वाटप करणार – पालकमंत्री संजय राठोड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत राज्यभर गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना या साहित्याचा संप वाटप करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

नेर येथे साहित्य वाटपाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्र्यांहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, पराग पिंगळे, सुभाष भोयर, नामदेवराव खोब्रागडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात १ लाख ४१ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. त्यापैकी ८६ हजार कामगारांची नोंदणी जिवीत असल्याने त्यांना संचाचे वाटप केले जात आहे. उर्वरीत कामगारांनी आपल्या नोंदणीचे नुतनीकरण केल्यास अशा कामगारांसह नवीन नोंदणी केलेल्या कामगारांना देखील गृहोपयोगी साहित्य संचाचा लाभ देऊ, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.

वर्षात ९० दिवस कामगार म्हणून काम केल्यास त्यांची कामगार म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा कामगारांनी त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करुन घ्यावे व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.राठोड यांनी केले. जिल्ह्यात जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आजच्या साहित्य संच वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे तालुकास्तरावरच कामगारांना संच उपलब्ध झाले असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

जिल्हास्तरीय शुभारंभाला नेर तालुक्यातील २ हजार १४६ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्याहस्ते संचाचे वाटप करण्यात आले. या संचात १७ प्रकारच्या एकून ३० गृहोपयोगी साहित्याचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्वच तालुका ठिकाणी साहित्य संच वाटपाचे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पराग पिंगळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी केले. कार्यक्रमास नेर तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विविध प्रवेश परीक्षार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणीस्माईल फाउंडेशन विविध उपक्रम नेहमीच राबवित असते. याचाच एक भाग म्हणून जेईई, नीट, सीईटी आदी परीक्षार्थ्यांना उपयुक्त पुस्तकांचे वितरण स्माईल फाउंडेशनने केले. यासाठी प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर किरण दिकुंडवार यांनी ही जबाबदारी उचलली. त्यांनी स्वखर्चाने ही सर्व पुस्तकं उपलब्ध करून दिलीत.

पुस्तक वितरण सोहळा एस.पी.एम. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण दिकुंडवार होते. प्रमुख अतिथी म्हणून आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी स्माईल फाउंडेशनचे आभार मानले. या सोहळ्यात जवळपास 20 निवडक विद्यार्थ्यांना जवळपास 31 हजार रूपयांची पुस्तके वर्षभराकरिता वितरीत झालीत. त्यानंतर ही पुस्तके नवीन विद्यार्थ्यांना दिली जातील. किरण दिकुंडवार हे नेहमीच स्माईल फाउंडेशनला विविध स्वरूपांत सहकार्य करत असतात. भविष्यातही विविध उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांच्याच सहकार्यामुळं हा छोटेखानी सोहळा उत्साहात झाला.

विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ही पुस्तके खरेदी करण्याची क्षमता नाही, अशांना यात प्राधान्य देण्यात आलं. स्माईल फाउंडेशनची स्वतःची बूक बँक आहे. या योजनेअंतर्गत पुस्तकांची देवाण-घेवाण होते. गरजूंना कपडे वाटप, पुस्तक वाटप, सायकल वाटप, ज्येष्ठांना काठी वाटप असे संस्थेचे उपक्रम सुरूच असतात. संस्थेचे अध्यक्ष सागर जाधव यांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी जी मदत करता येईल ती करण्याची विनंती केली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल आत्राम, आदर्श दाढे, गौरव कोरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

नवरगाव येथील शेकडो भोई बांधवानी भाजपात केला पक्ष प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात काल बुधवार ला मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील भोई समाजातील शेकडो बांधवांनी भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला तसेच हिवरी येथील आमदार विशेष निधी अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन श्री. बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले.

देशाचे नेते प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व मान्य करत राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात गाव चलो अभियान, नमो अँप सह नमो चषक नोंदणी तसेच मा. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या विशेष प्रयत्नाने वणी विधानसभा क्षेत्रात 2022 ते 2024 पर्यंत झालेली प्रमुख विकास कामे पोहचवण्याकरिता युद्ध पातळीवर काम सुरु आहेत.

या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा दिनकर पावडे (वणी), भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, भाजपा यु.मो.तालुकाध्यक्ष गणेश झाडे, महिला तालुका सरचिटणीस शालिनीताई दारुंडे, रवींद्र गारघाटे व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी व कष्टकऱ्यांची सत्ता प्रस्थापित झाल्या शिवाय कॉ. शंकरराव दानव यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही- कॉ. किसन गुजर


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : "कॉ. शंकरराव दानव हे जीवनातील ६० वर्षे शेतकरी व कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी खांद्यावर लाल झेंडा घेऊन सातत्याने संघर्ष करीत राहिले. भांडवलदारी व्यवस्थेमध्ये शेतकरी व श्रमजीवी वर्गाला संपूर्ण न्याय मिळणे कठीण आहे. म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेतृत्वात शेतकरी व श्रमिकांना एकत्र करीत हा संघर्ष गतिमान करीत राहिले. शेतकरी, श्रमिकांच्या हातात सत्तेची सूत्र यावे व समाजवादी व्यवस्थेची सत्ता प्रस्थापित व्हावी हेच स्वप्न उराशी बाळगून ते आंदोलनरत होते, आता त्यांचा पश्चात ते स्वप्न पूर्ण करण्याची जवाबदारी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांची आहे व ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी सातत्याने संघर्षासाठी सज्ज राहावे." असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉ. किसन गुजर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतलेल्या श्रद्धांजली सभेत केले.

३१ जानेवारी ला कॉ. शंकरराव दानव यांचे अकस्मात हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले होते. त्या अनुषंगाने दि. २१ ला वणी येथील वसंत जिनिग सभागृहात सर्वपक्षीय श्रद्धांजली घेण्यात आली. या सभेला काँगेस चे ॲड. देविदास काळे, जयसिंग गोहोकर, संभाजी ब्रिगेड चे अजय धोबे, वसंत जिनिंगचे संचालक प्रमोद वासेकर, माजी नगराध्यक्ष पी.के. टोंगे, प्रा. मोहितकर, संयुक्त किसान मोर्चाचे आनंदराव पानघाटे, शिक्षक संघटनेचे व्ही.बी. टोंगे,भाकपचे कॉ. अनिल घाटे,माकपचे राज्य कमिटी सदस्य कॉ. रमेशचंद्र दहीवडे ( चंद्रपूर), कॉ. सुभाष पांडे(अमरावती), कॉ. अरुण लाटकर, कॉ. मनोहर मुळे(नागपूर), कॉ. यशवंत झाडे( वर्धा), ॲड डी.बी.नाईक आदी प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा यावेळेस मार्गदर्शन केले. 

कॉ. अरुण लाटकर यांनी "भांडवलदारी पक्षात व्ययक्तिक लाभासाठी व सत्तेसाठी सकाळी एका पक्षात तर सायंकाळी दुसऱ्या पक्षात अशी कोलांटउडी मारत असताना कॉ . दानव यांनी संपूर्ण जीवन एका पक्षात घालविणे हे एक आश्चर्यच आहे", असे सांगत " कॉ. दानव यांनी तीन पिढ्यांचे नेतृत्व केलेले आहे" असे सांगितले. तर कॉ. रमेशचंद्र दहीवडे यांनी सांगितले की," कॉ. दानव हे मार्क्सवादी विचाराने प्रेरित होते, त्यामुळे त्यांना हे सर्व करण्याची प्रेरणा मिळाली, कार्ल मार्क्स यांनी कष्टकऱ्यांचा शोषणाचे मूळ व त्या शोषणातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितल्याने कार्ल मार्क्स यांना अनेक देशातून हद्दपार करण्यात आले होते, ह्या ओढवलेल्या परिस्थीत मार्क्स ची दोन मुले वारली असतानाही त्यांनी आपला मार्ग सोडला नाही, हाच मार्ग कॉ.दानव यांनी स्वीकारला होता." ॲड. देविदास काळे यांनी कॉ. दानव यांच्या जुन्या आंदोलनातील आठवणींना उजाळा दिला तर अजय धोबे यांनी कॉ. दानव यांचा आंदोलनातील वेळेला किंमत व प्रामाणिकपणा सांगितला, कॉ. यशवंत झाडे यांनी खरा नेता कधीच मरत नसतो तर तो चळवळीत अजरामर असतो , हे सांगितले. कॉ. अनिल घाटे यांनी," देशाची राजकीय व्यवस्था ही हुकूमशाही कडे झुकली असून व्यक्तीचे राजकीय,आर्थिक व सामाजिक अधिकार संपुष्टात येत आहे, त्यासाठी संघर्ष वाढविणे गरजेचे आहे", हे मांडले. 

या श्रद्धांजली सभेत कॉ.अरुण भेलके यांनी क्रांतिकारी गीत सादर करून उपस्थितांमध्ये जोश जागविला तर संचालन कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी केले व कॉम्रेड शंकरराव दानव हे ध्येयवेडे होते, त्यांनी या परिसरात कृतीतून मार्क्सवाद रुजवीला, शोषण विरहित समाजव्यवस्था स्थापित व्हावी हेचं त्यांचे ध्येय होते. असे ऍड दिलीप परचाके यांनी प्रस्थाविकपर भाषणात सांगितले.
या कार्यक्रमाला कॉ.शंकरराव दानव यांची पत्नी कलावती, मुले ॲड.राहुल, मिलिंद व सरिता हे उपस्थित राहून त्यांनी पक्षाला २१ हजाराचा निधी दिला. 

ही श्रद्धांजली सभेत कॉ. मनोज काळे, देविदास मोहकर, चंद्रशेखर सिडाम, कवडु चांदेकर, नंदू बोबडे, अनिता खूनकर, मनीषा परचाके, मनीष इसाळकर, निरंजन गोंधळेकर, सुधाकर सोनटक्के, गजानन ताकसांडे, सदाशिव आत्राम, रामभाऊ जिद्देवार, किसन मोहुरले, प्रकाश घोसले, संजय वालकोंडे, सुरेखा बिरकुरवार, अनिल सातपुते, स्मिता गेडाम आदी व असंख्य जिल्हाभरातून स्त्री-पुरूष काम्रेड्स उपस्थित होते. त्याच सोबत एके काळी एस एफ आय विद्यार्थी संघटनेत कार्य करणाऱ्या व आज नोकरी वर असणारे मिलिंद साव, कोल्हे, मेश्राम आदी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. या सभेत लीलाधर आरमोरिकर यांनी लावलेल्या पुस्तकांचा स्टॉल मध्ये मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचां खप झाला. तर असंख्य कार्यकर्त्यांनी कॉ. शंकरराव दानव यांची प्रतिमा विकत घेऊन जनतेसाठी झटणाऱ्या खऱ्या नेत्याची कदर होते हे दाखवून दिले आहे.

मारेगाव नगरपंचायतीत विषय समिती निवडीत महाविकास आघाडी व मनसे एकत्र

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : काल बुधवार (ता.21) ला नगरपंचायत निवडणुकीत मनसेसह महाविकास आघाडीच्या पक्षाने एकत्र येत सभापतीची सर्व पदे काबीज केली, तर नुकतेच नगरसेवक हेमंत नरांजे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश करीत सभापतिपद मिळविले.
   
मारेगाव येथील 17 सदस्य असलेल्या नगरपंचायत मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. यावेळी भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढण्याची तयारी केली होती. त्यामुळे अल्प मतात असलेला भाजप एकटा पडल्याने त्यांनी निवडणुकीत भाग घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक अविरोध झाली.
आठ दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपत गेलेले हेमंत नरांजे यांनी भाजप सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश करीत पाणी पुरवठा सभापतिपद मिळविले. तर मनसेच्या नगरसेविका शेख अंजुम शेख नबी यांची बांधकाम सभापतिपदी, तर शिवसेनेच्या वर्षा किंगरे यांची आरोग्य सभापती म्हणून निवड झाली. काँग्रेसच्या नगरसेविका थारांगना पटेल यांची महिला व बांधकाम उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल सर्व एकत्र आलेल्या पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव करित पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कृषी निविष्ठा सुधारणा विधेयक सर्वसामान्य शेतकरी व प्रामाणिक निविष्ठा विक्रेत्यांना जाचक नाही – कृषिमंत्री धनंजय मुंडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : कृषी निविष्ठा सुधारणा विधेयकाबाबत 2000 पेक्षा जास्त हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत. हे सुधारणा विधेयक शेतकरी तसेच प्रामाणिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी जाचक असणार नाही, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

अप्रमाणित, भेसळयुक्त व बनावट बियाणे, कीटकनाशके पासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कायद्याच्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी नियुक्त संयुक्त समितीची तिसरी बैठक आज मंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झाली.

या बैठकीस संयुक्त समितीचे सदस्य आमदार अमोल मिटकरी, डॉ. मनीषा कायंदे, समीर कुणावर, संजय रायमुलकर, कैलास पाटील, बाबासाहेब पाटील, दिलीप बनकर, प्रकाश आबिटकर, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, विधान भवन सहसचिव मेघना तळेकर व अधिकारी उपस्थित होते.

या समितीच्या मागील बैठकीत झालेल्या निर्णयानुसार मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करण्यात आला. गैरप्रकार करणाऱ्यांना कायद्याचा धाक वाटला पाहिजे, त्याचवेळी सर्वसामान्य शेतकरी आणि प्रामाणिक निवीष्ठा विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेतली जाईल. समितीचे आजपर्यंत झालेले कामकाज विधिमंडळाच्या निदर्शनास आणणार असल्याचे सुद्धा यावेळी कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

बोगस व बनावट बियाण्यांना आळा घालण्यासाठी पावसाळी अधिवेशन 2023 मध्ये कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी अत्यावश्यक वस्तू, बियाणे, कीटकनाशके आणि महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम या 4 कायद्यांमध्ये विविध सुधारणा सुचवणारी विधेयके सादर केली होती. तसेच अप्रमाणित व भेसळयुक्त निविष्ठांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण विधेयक 2023 सुद्धा मांडले होते.

वणीत विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचे उदघाटन थाटात पार पडले

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : काल 20 फेब्रुवारी रोजी विदर्भ केसरी या शंकरपटाचे थाटात उद्घाटन पार पडले. पहिल्या दिवशी 30 जोड्या हाकण्यात आल्या. शंकरपटाचा हा थरार पाहण्यासाठी केवळ वणीतूनच नाही तर परिसरातील अनेक गावातील प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संजय खाडे व मित्र परिवारातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार वामनराव कासावार होते. तर अध्यक्ष हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे होते. राजेंद्र गायकवाड, नरेंद्र पाटील ठाकरे, अरुणाताई खंडाळकर, प्रा. शंकर व-हाटे, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद वासेकर, संजय निखाडे, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, मारोती गौरकार, यांची कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या हस्ते पटाच्या मैदानाची पूजा करण्यात आली. त्यानंतर रितसर फित कापून पटाचे उद्घाटन करण्यात आले. पहिली उद्घाटनपर जोडी ही श्रुती वाळगे या 18 वर्षीय तरुणीने हाकली. त्यानंतर वणी विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित गावगाडा या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील 30 बैलजोड्या हाकण्यात आल्या.

राधाने गाजवले मैदान गावगाडा स्पर्धेत रांगणा येथील शेतकरी गुणवंत वांढरे यांच्या तेजा व वायफर या जोडीने अवघ्या 8.1 सेकंदात अंतर कापत पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेचे राजूर इजारा येथील भाविका मिलमिले व गणेशपूर (वणी) येथील कु. राधा बोबडे या दोन तरुणींनी सहभाग घेतला होता. राधा हिने मैदान गाजवत अवघ्या 8.33 सेकंदात अंतर कापत पाचवा क्रमांक पटकावला. या दोन्ही तरुणीच्या जिद्दीचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. बुधवारी मुख्य विदर्भ केसरी शंकरपटाला सुरुवात झाली. दुस-या दिवशी 40 पेक्षा अधिक जोड्या हाकण्यात आल्या. गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कार्यक्रमाची सांगता व बक्षिस वितरण होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे यांच्या मार्गदर्शनात संजय खाडे मित्र परिवार परिश्रम घेत आहे.

नगरसेवक हेमंत नरांजे यांची पाणी पुरवठा सभापती पदी निवड


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील वार्ड क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक हेमंत नरांजे यांनी राजकीय गणित बिघडवत भाजपात प्रवेश केला होता, मात्र अवघ्या काही दिवसातच त्यांनी कमळा'ला सोडून 'पंजा' ला हातमिळवणी केल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

आगामी लोकसभा,विधानसभा निवडणूकीची चाहूल लागताच सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष प्रवेश व पक्षाची मोट बांधण्यासाठी नुसती उठाठेव सुरु आहे. अशातच मारेगाव येथील आधी राष्ट्रवादी पक्षाचे, नंतर भाजपात प्रवेश केलेले नगरसेवक हेमंत नरांजे हे आता काँग्रेस मध्ये गेले.
नगरसेवक हेमंत नरांजे हे दिसतात साधेभोळे. मात्र,यांनी आपल्या राजकीय डावपेचातून सभापती पद खेचून आणण्यासाठी राजकीय लोकांशी समन्व्यय करून काँग्रेसशी सांगड जमवून घेतली असल्याने त्यांना खेळीमेळीच्या राजकीय समतोलामुळे अखेर नगर पंचायत मधील पाणी पुरवठा सभापती पद मिळवता आले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

यामुळे त्यांच्या कणखर भूमिकेची आणि चाणक्य नितीची जनतेमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

आठ महिन्यापासून पोलिसांच्या हातावर तुरी देणारा फरार 'आजम' अखेर अटकेत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : गेल्या 8 महिन्यापासून पोलिसांना सतत गुंगारा देऊन फरार असलेल्या आरोपीच्या वणी पोलिसांनी अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर येथून मोठ्या सीताफिने अटक केली आहे.

सोमवार ला महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त साजरी होत असताना वणी पोलीस दलाचे जवान शहरातील बंदोबस्तात होते. जयंती चा बंदोबस्त आटोपून पोलीस पथक दुर्गापूर (चंद्रपूर) च्या दिशेने तत्काळ रवाना झाले. आठ महिन्यापासून फरार असलेला आरोपी आजम शेख बाबा शेख (27) रा. वार्ड क्र. 3 यास ताब्यात घेतले. बाबा शेखवर 11 जुलै 2023 ला अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार,तसेच अनु.जाती,जमाती कायदा व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. अखेर आठ महिन्यांनी वणी पोलिसांनी दुर्गापूर पोलिसांच्या मदतीने आरोपी आजम शेख बाबा शेख ला अटक केली.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी, सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक झोडेकर, विजय वानखडे, शुभम सोनूले, गजानन कुळमेथे आदींनी केली आहे.

विदर्भ एस.पी.न्यूज डिजिटल चा वर्धापन दिन उत्सहात साजरा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : काल सोमवार (ता.19 फेब्रु.) ला विदर्भ एस.पी.न्यूज डिजिटल पोर्टलचा द्वितीय 'वर्धापन दिन' मोठ्या उत्सहात स्थानिक बदकी भवन येथे साजरा करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक भास्करराव धानफुले, उदघाटक नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की, प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार ओसीन मडकाम, गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, महावितरण उपविभागीय अभियंता शैलेंद्रकुमार पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी शंकर हटकर, पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, प्रेस संपादक तथा पत्रकार सेवा संघांचे जिल्हाउपाध्यक्ष अनंतराव गोवर्धन,ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर ठाकरे, यांची उपस्थिती होती.

या 'वर्धापन दिनी' तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. यात मारेगाव तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. तसेच स्केटिंगमध्ये विश्वविक्रम नोंदवून भारताचा मान उंचावणाऱ्या मनस्वी पिंपरे, हिचा सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाला संबोधताना विचारपीठावर आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन भास्कर राऊत, प्रास्ताविक चिफ एडिटर सुरेश पाचभाई, तर आभार गजानन देवाळकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठया प्रमाणात उपविभागातील मान्यवरांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विदर्भ एस.पी.पोर्टल न्यूजचे प्रमुख सुरेश पाचभाई, गजानन देवाळकर, गजानन आसूटकर, ज्ञानेश्वर आवारी, दशरथ चिकणकर, शंतनु पाचभाई, रोशन गुंजेकार, यांनी परिश्रम घेतले.


राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर


सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.

ओबीसी अथवा इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतल्यानंतर शासनाने तीन महिन्यात आरक्षणाचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.  

मराठा समाज बांधवांनी केलेल्या आंदोलनाबाबत उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले, लाखो मराठा बांधवांनी आपल्या हक्कांसाठी लढा देताना आजवर संयम सोडलेला नाही. शिस्त मोडली नाही. याबद्दल मी संपूर्ण मराठा समाजाचे, तरुण-तरुणींचे आभार व्यक्त करतो. आजचा निर्णय हा मराठा समाजाचा, मराठा ऐक्याचा विजय आहे आणि हा चिकाटीने दिलेल्या लढ्याचा विजय आहे. मी एका सर्वसामान्य मराठा शेतकऱ्याचा मुलगा आहे. समाजाच्या वेदना, दुःखाची मला जाणीव आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर हे दुःख, वेदना कमी करण्यासाठी अनेक आघाड्यांवर सकारात्मक प्रयत्न केले, करत असल्याचे त्यांनी सांगितले. समाजबांधवांनी शासनावर विश्वास ठेवावा, कुठलाही दूजाभाव ठेवला जाणार नाही, असे सांगून आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, एकेकाळी प्रगत असलेला मराठा समाज आता काळाच्या ओघात मागे पडला आहे. शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्‍याही तो मागे लोटला जातोय. त्यामुळे या समाजाच मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण मिळवून देणे हा पर्याय होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवून द्यायचा निर्धार शासनाने केला होता. नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाच्या सर्व सदस्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे तीन दिवसाच्या चर्चेत मांडले होते. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहाची मराठा आरक्षणास संमती मिळाल्याने फेब्रुवारी 2024 मध्ये विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवून या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल, हे मी जाहीर केले होते. त्यानुसार आजचा दिवस अमृत पहाट घेऊन आला आहे. माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ गेले 150 दिवस अहोरात्र मेहनत घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही
ओबीसी किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण मिळायला पाहिजे, हीच आमची भावना असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले. मागील पावणेदोन वर्षांपूर्वी सत्ता हाती घेतलेल्या महायुती सरकारने ठरवल्यानुसार आज मराठा समाजाला आरक्षण जाहीर करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री झाल्यावर मराठा समाजासाठी ठोस करून दाखविण्याची संधी मिळाली. हे मी माझे अहोभाग्य समजतो, असे ते म्हणाले. स्व.अण्णासाहेब पाटील यांनी दिलेले बलिदान आमच्या सरकारने व्यर्थ जाऊ दिले नाही, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि मुख्यमंत्री म्हणून पहिल्या दिवसापासूनच ही इच्छा मी व्यक्त केलेली आहे. राज्य शासन पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. फक्त कायदेशीर मार्गाने त्यातल्या अडचणी दूर करायच्या होत्या. त्या अडचणी दूर करून दिलेला शब्द पूर्ण करतोय असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी अभिमानाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निष्कर्षांवर लक्ष्य केंद्रित करुन आरक्षणाची कार्यवाही
मुख्यमंत्री म्हणाले, आमचे युतीचे सरकार आल्यावर मराठा आरक्षण हे शासनाचे प्राधान्य होते. यासाठीच सप्टेंबर 2022 मध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांना उपसमितीचे अध्यक्ष केले. सत्तेवर आल्यानंतर लगेचच म्हणजे ऑगस्ट 2022 मध्ये अधिसंख्य पदांची निर्मिती केली. तसा कायदा केला. 21 सप्टेंबर 2022 रोजी शासन निर्णय काढून त्याची अमलबजावणी देखील सुरू केली. 2014 ते 2022-23 या कालावधीतील रखडलेली नोकरभरती आम्ही पूर्ण केली. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल करताना जे निष्कर्ष नोंदविले होते त्यावर आम्ही पूर्ण लक्ष्य केंद्रित केले. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशनवर आता सुनावणी सुरु झाली आहे. त्यात देखील राज्य सरकारच्या बाजूने भक्कमपणे बाजू मांडण्यात येत आहे. तेथे निश्चित यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने विधीज्ञांची फौज उभी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या विधीज्ञांचीही या कामी मदत घेतली जात आहे. कार्य दल देखील स्थापन केला असल्याचे ते म्हणाले. 

युद्धपातळीवर सर्वेक्षण
मुख्यमंत्री म्हणाले, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचे आरक्षण कसे टिकून राहील याबाबत शासन आणि आयोगात समन्वय राखण्यासाठी निवृत्त न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी तसेच मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमिती, मुख्य सचिव तसेच मा. मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार मंडळाच्या सुमारे 50 बैठका झाल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी 13 नोव्हेंबर 2023 रोजी राज्य मागासवर्ग आयोगाला संदर्भ अटी निश्चित करुन देण्यात आल्या. तसेच राज्य मागासवर्ग आयोगास तातडीने 367 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. नमुना सर्वेक्षण न करता सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे विस्तृत सर्वेक्षण (इम्पेरीकल डेटा) गोळा करण्याचे शिवधनुष्य उचलायचे होते. यासाठी तीन ते साडेतीन लाख प्रगणक नेमण्यात आले. त्यांचे मास्टर्स ट्रेनिंग झाले. 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण सुरु झाले. हे सर्वेक्षण अचूक तर करायचे होतेच पण वेळेत पूर्ण करायचे होते. 2 फेब्रुवारी 2024 म्हणजे नऊ दिवसांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. सुरुवातीच्या काही तांत्रिक अडचणी दूर केल्या गेल्या. हे काम निश्चितच जबाबदारीचे आणि आव्हानात्मक होते, एखाद्या समाजाला न्याय देण्याचे काम होते. 16 फेब्रुवारी रोजी मा. न्या. सुनील शुक्रे यांनी हा अहवाल शासनाला सुपूर्द केला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी निदर्शनात आणून दिल्या त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर भर दिला जात आहे. आम्ही अत्यंत वेगाने ताकदीने काम करुन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत अशा पद्धतीने टप्प्याटप्याने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. आता ते टिकून राहावे म्हणून राज्य सरकार आपली सर्व शक्ती पणाला लावणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

आजच्या निर्णयामध्ये प्रशासनातील विशेषतः सामान्य प्रशासन विभाग, राज्य मागासवर्ग आयोग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महसूल विभाग, विधी व न्याय विभाग तसेच वित्त विभागातील आणि गृह विभागातील अधिकाऱ्यांपासून ते अगदी शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी घेतलेली अपार मेहनत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे, मागासवर्ग आयोगाचे सर्व सदस्य, गोखले इन्स्टिट्यूट आणि ज्यांनी हा गोवर्धन पर्वत उचलला ते सर्व प्रगणक, महसूल यंत्रणा, अगदी थेट सरपंच, तलाठी यांच्यापर्यंत सर्वांचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आभार मानले. 

मार्डी येथे शिवजन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्रभर सण १९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. याच शिवजयंती पर्वावर मार्डी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती काल सोमवार ला मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटक डॉ.प्रशांतजी पाटील (पोलीस पाटील) यांच्या हस्ते दीपप्रज्वनल करण्यात आले, त्यानंतर सायंकाळी सहा वाजता प्रखर व्याख्याती कु.मृदून रविंद्र पांगुळ वर्धा, यांचे जाहीर व्याख्यान झाले, कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करून छत्रपतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व मार्डीकर उपस्थित होते.

हा उत्सव साजरा होत असताना सायंकाळी साडेसात वाजता शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली, या रॅली मध्ये 
विशेष आकर्षण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत श्री रविंद्र पांगुळ सर शिंदीना माईन्स तसेच कलरफूल हायफाय डीजेचा आवाज, त्यात छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान समिती चे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील समस्त महिला पुरुष व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गावातील मुख्य मार्गाने ही भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभूराजे यांचा जयघोष एकमुखी निनादला, दरम्यान अवघी मार्डी नगरी शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाली. या निमित्ताने आकर्षित डीजे च्या तालावर तरुणांई थिरकली होती. मिरवणूकीनंतर शिवजन्मोत्सवाच्या शिव भक्तांनी एकमेकांना शिवजयंती च्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.