सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
गावोगावी सुरू असलेल्या अंगणवड्या म्हणजे चिमूरड्यांचे हक्काचे खेळण्याचे, शिकण्याचे व भरपेट खाण्याचे ठिकाण. गावासह अगदी वाडी-वस्तीवरही अंगणवाडी सुरू आहेत....
याच अंगणवाडीमध्ये काम करण्याऱ्या सेविका व मदतनीस यांनी आंदोलन केल्यावर अखेर त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकारने महत्वाची घोषणा केली आहे. मागील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Anganwadi Bharati कडे सर्वांचे लक्ष
एकात्मिक बाल विकास सेवेतील 13 हजार 11 मिनी अंगणवाडी यांना श्रेणीवर्धन करण्याचा हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्येकी एक मदतनीस म्हणजे 13 हजार 11 पदांची भरती या निर्णयामुळे होणार आहे. तसेच प्रत्येक 25 अंगणवाडी केंद्रासाठी 1 मुख्यसेविका आणि पर्यवेक्षक अशा पद्धतीने 520 पदांची भरती केली जाणार आहे. एकूणच यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. याद्वारे राज्यात तब्बल 13 हजार 531 पदांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हा श्रेणीवर्धन आणि नव्याने पदाची भरती करण्याचा निर्णय घेतानाच मदतनीस यांना साडी व गणवेश खर्च आणि औषधोपचार खर्च असेही सहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी तब्बल 116 कोटी 42 लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. यासाठी कधी आणि केंव्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.