कृषिप्रधान देशात शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळत नाही ही शोकांतिका : अभिजित कुडे


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : कृषिप्रधान देशात शेतकर्‍याला शेतात ओलित करण्यासाठी रात्री स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतात जावे लागते ही शोकांतिका आहे. एकनाथ शिंदे साहेब माझ्या शेतकरी बापाला शेतात दिवसा वीज द्या, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा प्रमुख रविन्द्र शिंदे, उप-जिल्हा प्रमुख भास्कर ताजणे व तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना शिष्टमंडळासह शेतकरी पुत्र अभिजित कुडे यांनी मुख्यमंत्री यांना तहसीलदार वरोरा यांच्या मार्फत निवेदन दिले.
     
आपला देश चंद्रावर गेला याचा आम्हाला अभिमान आहे, मात्र या कृषिप्रधान देशात माझ्या शेतकरी बापाला जीव धोक्यात घालून रात्री शेतात जावे लागते ही शोकांतिका आहे. आम्हाला 12 तास नको 8 तासच हवीत पण दिवसा वीज द्या. ज्या कडाक्याच्या थंडीत लोक घराच्या बाहेर निघू शकत नाही त्या थंडीत शेतकर्‍याला शेतात जाव लागते अनवाणी पायांनी फिरावे लागते. जंगली जनावर, रानटी डुक्कर, साप विंचू यांच्या पासून जिवाला धोका असतो. दिवसभर राबराब राबून माझा शेतकरी बाप थकून जाते तरी त्याला रात्रीला ओलीत करण्यासाठी शेतात जावे लागते. या देशात उद्योगाला 24 तास वीज देता पण शेतकर्‍याला 8 तास दिवसा वीज पुरवठा करू शकत नाही ही लाजिरवाणी बाब आहे. आधी अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यात सरकार शेतकर्‍याला वीज ही रात्रीच्या वेळी देते.  हिवाळ्यात कापूस गहु, चणा असतो त्यांना पाणी देणे गरजेचे आहे पण शेतकर्‍याला दिवसा 3 दिवस व रात्री 4 दिवस अशी वीज पुरवठा केला जातो हा अन्याय आहे. शेतकर्‍यांचा जीव जीव नाही का ? त्याला थंडी लागत नाही काय ?  शेतकर्‍यांना दिवसा वीज पुरवठा करा अन्यथा शेतकर्‍यांना घेवून रस्तावर उतरू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला.  
   
सदर निवेदन तहसीलदार वरोरा मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले. यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख अनिल सिंह, शुभम येलेकर, सौरभ देठे व शेतकरी उपस्थित होते.