मनसेचे तहसीलदारांना निवेदन: अन्यथा तीव्र आंदोलन करणार...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : निराधार लाभार्थ्यांना मानधन महिन्याला मिळत नाही. याकडे शासन लक्ष न देता,पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. मात्र, उत्पन्नाचे दाखले बंधनकारक असल्याची जाचक अट टाकून नाहक निराधारांचा आधार हिरावून घेतला जात असून, अनेक वेळा उत्पन्नाचे दाखल्याची बंधनकारक अटीतून मुक्त करा अशी मागणी करण्यात आली. परंतु निराधारांच्या मागणी कडे लक्ष देण्याची गरज सरकारला वाटत नाही. शेतकरी हवालदिल झाला, त्यालाही काही मदत नाही. आता किमान निराधारांचा हक्क तरी हिरावू नका. दुर्लक्षित धोरण तथा बंधनकारक जाचक अटी कायम राहिल्यास रस्त्यावर उतरून त्यांचा हक्क हिसकावून घेऊ, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी निवेदनातून दिला आहे.

येत्या 30 जून पर्यंत हयात दाखल्यासोबत उत्पन्नाचे दाखले सादर करणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे आयुष्याच्या शेवटचे दिवस मोजणाऱ्या निराधारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसापासून उत्पन्नाच्या दाखल्यासाठी निराधारांना संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असून त्यांना आगाऊ आर्थिक भ्रूदंड सहन करावा लागत आहे. जगण्याचा आधार नसणाऱ्या निराधाराकडे कुठलेच उत्पन्नाचे साधन नाही त्यामुळे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्यांची मागणी करणे गैरसोयीचे आहे. वृद्धापकाळातील ही गैरसोय टाळण्यासाठी "शासन आपल्या दारी" या उपक्रमातून माहिती उपलब्ध करून घ्यावी, अन्यथा येत्या 1 जुलै ला नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या अभिष्टचिंतन दिनी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन सादर करतांना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शेख नबी, अनंता जुमळे, आदित्य बुचे, सुरज नागोसे,गजानन चंदनखेडे, चांद बहादे, सौ प्रतिभाताई तातेड, सौ सिंधुताई बेसेकर, सौ संगीता सोनुले, सौ बेबीताई आत्राम, यांचे सह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.