शाळेला शिक्षक मिळवण्यासाठी अ.भा.स.प. चे धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 2023-24 या शैक्षणिक सत्राची सुरुवात होण्यापूर्वी 11 जिल्हा परिषद शाळेत तात्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीला घेऊन आज गुरुवारी मारेगाव पंचायत समितीच्या समोर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने "एक दिवशीय धरणे आंदोलन" करण्यात आले.

मारेगाव तालुक्याततील हिवरी, मेंडणी, कानडा, मुकटा, वेगांव, केगाव, महागांव, टाकळी, रामेश्वर, बामर्डा, मांगली प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या शून्या वर आहे.  विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांवाचून धोक्यात आहे. मागणी असलेल्या शाळेत एकही शिक्षक नाही.तर पुर्ण तालुक्यातील 129 शिक्षकांची कमतरता आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या बाबत शिक्षणाधिकार्‍यांनाही निवेदन देण्यात आले होते. पालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेने आज आंदोलनाचे हत्यार उपसलं. आज सकाळपासून मारेगाव पंचायत समिती समोर उपविभागीय क्षेत्रातील विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले समर्थन देत आंदोलन केले. आंदोलकांना संबोधित करित असतांना गीत घोष म्हणाले की,शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणे म्हणजे देशाच्या भावी पिढीच्या भविष्याशी हा खेळ असून लोकशाहीची ही विटंबना आहे. यासाठी शिक्षण विभाग, पंच्यायत समिती, जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुर्णतः दोषी असल्याने या विभागाच्या विभाग प्रमुखांना पदमुक्त (Dismiss) करुन फौजदारी गुन्हे दाखल करुन कारवाई होणे गरजेचे आहे तरच या अकार्यक्षम विभागावर अंकुश लागेल. पटसख्यावर आधारित शिक्षक नियुक्ती हे सरकाचे धोरणच मुळात शिक्षण हक्क विरोधी असून वर्ग जेव्हढे तेवव्हढेच शिक्षण हेच धोरण शिक्षण हिताचे आहे. शिक्षण केवळ नोकरी मर्यादित नसावे तर माणसाच्या समजेचा सखोल विकास तयार करुन स्वयंमपुर्ण नागरिक व प्रज्ञावंत माणूस तयार करणे आणि त्याला स्वत:चे जीवन जगण्याचे सामर्थ्य तयार करुन देणे हे खरी शिक्षणनिती असावी. त्यानंतर इतरही मान्यवरांनी आपापले मते मांडली.

तालुक्यातील 11 गावातील जिल्हा परिषद शाळेला शिक्षकच नसल्यामुळे येथील विद्यार्थ्याचा शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हि बाब अतिशय चिंताजनक आहे, संबंधित विभागाने या शाळांना शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी असतांना देखील शासन प्रशासन स्तरावरून कोणतीच उपाययोजना दिसून येत नसल्याने अखेर हे धरणे आंदोलन करावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. असे मत आंदोलनात सहभागी झालेल्या मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

या आंदोलनास विद्यमान आमदाराने भेट देत आंदोलनकर्त्यांच्या मागणी तथा समस्या जाणून घेतल्या, दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी आपला संताप व्यक्त करित शिक्षकांची मागणी चांगलीच रेटून धरली असतांना आमदार बोदकूरवार यांनी सी.ई.ओ यांचेशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करून आंदोलकांना सांगितले की, १० जुलैपर्यंत शाळांना शिक्षकांची नियुक्ती करून शाळा सुरु करु. नियुक्तकांना मानधन स्वरुपात त्यांना पगार देऊ, जेव्हा भरती प्रक्रीया सुरु होईल तेव्हाचे तेव्हा पाहू, परंतु शिक्षकांवाचून शाळा राहू देणार नाही,असे मौखिक आश्वासन दिले. यावेळी गट शिक्षण अधिकारी व गट विकास अधिकारी (बिडीओ) यांचीही उपस्थिती होती.

मात्र, असंतुष्ट अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने गट शिक्षण अधिकारी यांना ताकीत वजा ईशारा देण्यात आला की, जर का ही मागणी मार्गी लागली नाही तर,शाळकरी मुले मुली त्यांच्या कार्यालयात शिक्षणाचे धडे गिरवतील..या एक दिवशीय धरणे आंदोलनात प्रगतशील साहित्यिक तथा विचारवंत गीत घोष, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, सामाजिक कार्यकर्ता प्रवीण खानझोडे, अ‍ॅड. देवा पाचभाई, अ‍ॅड.रुपेश ठाकरे,वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे हे सुद्धा सहभागी झाले होते. व त्यांनी देखील आंदोलनाला मार्गदर्शन केले. या आंदोलनात अरविंद ठाकरे, अविनाश लांबट, सुरेशदादा लांडे, तुळशीराम कुमरे, प्रशांतकुमार भंडारी, दयानंद कुळमेथे, प्रवीण नान्हे, सचिन पचारे, रविराज चंदनखेडे, रामचंद्र जवादे, संजय गोहोकार, शुभम भोयर, उषा देरकर, प्रेमीला आदेवार, विमल उरकुडे, माला गौरकार, शीतल येरमे, संगीता कोवे, मयुरी धोबे, चंदन धोबे, जयनारायण बदकी, मारोती तुराणकर यांचेसह पालकवर्ग सहभागी झाले होते.