Page

नॅचरल शुगरचे साडेसहा लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट


नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर 

महागाव : नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज युनिट दोन गुंज च्या सातव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ मागील वर्षीच्या हंगामात सर्वाधिक ऊस तोडणी करणारे कंत्राटदार श्री शेषराव वाबनाजी कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.माधवीताई यांच्या शुभहस्ते व कृषिरत्न श्री. बी. बी. ठोंबरे चेअरमन तथा कार्यकारी संचालक नॅचरल उद्योग समूह यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गा अष्टमीच्या मुहूर्तावर सोमवार दिनांक 3 रोजी संपन्न झाला.

मागील वर्षी नॅचरल शुगरने 5.88 लाख मॅट्रिक् टनाचे गाळप करून 11.58 इतका उच्चांकी साखर उतारा मिळविला असून शेतकऱ्यांच्या उसाला 2560 रुपये याप्रमाणे विदर्भात उच्चांकी दर दिला. यावर्षी कारखान्याकडे शेतकऱ्यांनी 8061 हेक्टरच्या ऊस नोंदणी केल्या असून एकूण साडेसहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे . यावर्षी नोंदीचा संपूर्ण ऊस 31 मार्च 2023 पर्यंत गाळप करण्यासाठी सक्षम ऊसतोड व वाहतूक यंत्रणेचा भरणा केला आहे. कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ 11 ऑक्टोबर रोजी मोळी पूजन करून होणार आहे प्रत्यक्ष गाळप हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे कारखान्याच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी कितीही उसाची लागवड केली तरी सर्व उसाचे गाळप होण्याकरिता कारखान्याची कार्यक्षमता वाढविण्यात येणार असल्याचे चेअरमन बी.बी. ठोंबरे यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र वाढविण्यापेक्षा कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल असेही ते म्हणाले. यावर्षी सॅटॅलाइट मॅपिंग द्वारे ऊस नोंदणीचे काम विदर्भात प्रथम नॅचरल शुगर ने सुरू केले असून ऊस नोंदणीच्या कामात पारदर्शकता येणार आहे. विदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चे ऊस संशोधन केंद्र स्थापित करण्यात येणार असून त्या माध्यमातून वातावरणानुसार उसाच्या विविध जाती ची निर्मिती करण्यात येईल व त्याचा लाभ शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाकरिता घेता येईल. यावेळी मागील हंगामात बैलजोडी दगावलेल्या ऊसतोड करणाऱ्या मजुरांना धनादेश देऊन आर्थिक मदत करण्यात आली. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी विक्रमी ऊस गाळप करण्याकरिता शेतकऱ्यांनी ऊसतोड कामगार व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री.बी.बी.ठोंबरे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी केले व बहुसंख्येने उपस्थित शेतकऱ्यांचे आभार दिलीप भिसे प्रवर्तक यांनी मानले याप्रसंगी कारखान्याचे संचालक बिभीषण भातलवंडे,बालाजी तट, डॉक्टर सर्जेराव साळुंके,जीएम दिवेकर, पंचायत समिती सदस्य शिवाजीराव देशमुख,लक्ष्मण दादा जाधव,रतीराव राऊत,गोविंदराव शिंदे,गोविंदराव देशमुख,पंजाबराव गावंडे राजेश पाटील,अजय माहेश्वरी, देवानंद मोरे तसेच कारखाना परिसरातील शेतकरी आणि कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.