कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : आयव्हीआरसीएल कंपनीने अगदी शहरालगतच टोल नाका उभारला असून मागील पाच वर्षांपासून हा टोल नाका पथकर वसुलीचे कार्य करीत आहे. हा टोल नाका आता अपघाताचे कारण ठरू लागला असून, या टोल नाक्याजवळ छोटेमोठे अपघात होणं नित्याचीच बाब झाली आहे.
टोल नाक्यापासून काही मिटर अंतरावरच रेल्वे गेट आहे. मालवाहू रेल्वे वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने सातत्याने हा रेल्वे गेट बंद राहतो, त्यामुळे रेल्वे गेट पासून तर टोल नाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. टोल नाक्याच्या जवळच दोन वजन कांटे आहे. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांची नेमही वर्दळ व रांगा लागलेली असते. टोल नाक्याचे नेहमी एकच टोल काऊंटर सुरु असते. त्यामुळे पथकर फाडण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. सुरक्षेच्या उपाययोजनांचाही या टोल नाक्यावर अभाव दिसून येतो. रुग्णवाहिकाही नेहमी नादुरुस्त असते. रुग्णवाहिकांचे इन्शुरन्सही लॅप्स झालेले आहेत. टोल नाक्याच्या आजूबाजूचा परिसर कोळसा वाहतुकीची वाहने उभी करण्याचे ठिकाण बनला आहे. टोल नाक्याजवळ नेहमी कोळसा वाहतुकीची वाहने उभी असतात. कोळसा खाणीतून रेल्वे साईडींगवर होणाऱ्या अंतर्गत कोळसा वाहतुकीचा टोल नाक्याला लाभ मिळावा, याकरिता हेतुपुरस्सरपणे हा टोल नाका शहराजवळ उभारण्यात आला. पण या टोल नाक्यामुळे कास्तकारांची मोठी गोची झाली.
कास्तकारांचा शेतमाल विक्रीकरिता घेऊन येणारी वाहने टोल नाक्याचा भुर्दंड बसू नये म्हणून शहरातील अरुंद रस्त्यांवरून जाणे येणे करतांना दिसतात. टोल नाक्याच्या जवळपासच्या परिसराची साफसफाई देखील केली जात नाही. टोल नाका परिसरात धुळीचे थर जमा झाले आहेत. वाहनांच्या जाण्यायेण्याने सारखी धूळ उडत असते परिणामी टोल नाक्याजवळ नेहमी काळं धुकं पसरलेलं असतं. नेहमी याठिकाणी वाहतुकीचा जाम लागतो. कित्येक छोटे मोठे अपघात या टोल नाक्याजवळ झाले आहेत. त्यामुळे हा टोल नाका आता वाहतुकीसाठी व मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. तेंव्हा हा टोल नाका अन्य ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे झाले आहे. केवळ कोळसा वाहतुकीच्या वाहनांचा टोल फाडता यावा याकरिताच हा टोल नाका शहराजवळ उभारण्यात आला आहे.
अन्य वाहने मात्र पळवाटा शोधून टोल वाचविण्याकरिता शहरातून जातांना दिसतात. तेंव्हा हा टोल नाका जेथून कोणत्याही वाहनाला पळवाटा शोधात येणार नाही, अशा ठिकाणी शहरापासून दूर स्थलांतरित करण्यात यावा, ही नम्र विनंती करण्यात आली. टोल नाका स्थलांतरावर उचित तोडगा न निघाल्यास नाईलाजास्तव टोल नाका हटविण्याकरिता युवासेनेला टोल नाक्याजवळ आंदोलन करावे लागेल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी असा आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अभियंता,उपविभागीय कार्यालय पांढरकवडा, मा.उपविभागीय अधिकारी वणी, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, मा. ठाणेदार पोलीस स्टेशन वणी यांना देण्यात आले.
यावेळी अजिंक्य शेंडे युवासेना यवतमाळ उपजिल्हा प्रमुख, मंगल भोंगळे, प्रफुल बोरडे, गजानन बदखल, राजु इड्डे
जनार्धन थेटे, राजु अर्पेल्लिवार, रितिक पचकते, अमोल मडावी, सुमित ओम आगुलवार, स्वप्नील मंदे, निखिल गट्टेवार, सुमित सिरसाट, यश सोनकर, सत्य तिस्कतकार, उमेश आसुटकर, वैभव डंभारे, संदीप बुरान, राहुल चिडे हे युवा शिवसैनिक उपस्थित होते.