विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : रासायनिक खतांच्या किंमतीत अधिक प्रमाणात झाली वाढ असून शेत मजूर त्यांच्या कामाचे प्रती दिन ३०० रूपये तर महिला शेतमजूर प्रतिदिन १५० रूपये त्याचप्रमाणे, सालगडी यांचे एक वर्ष कामाची मजुरी सरासरी एक लाख रूपये इतकी आहे, त्यामुळे या सर्व महागाईच्या काळात शेतकऱ्यांनी शेती करायची कशी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
इंधन दर वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांना यंत्राच्या साहाय्याने पेरणी पूर्वी मशागत करण्यासाठी ज्यादा दर द्यावे लागत आहे, या सर्व महागाईच्या वणव्यात शेतकरी पेटत आहे. वाढलेल्या महागाई सोबत निसर्गाच्या लहरीपणामुळे
शेतकऱ्यांचा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.
मारेगाव तालुक्यात सिंचनाची सुविधा अत्यंत अल्प प्रमाणात आहे. शेती पूर्णपणे वरूणराजा वर अवलंबून आहे. गेल्या हंगामात कपाशी या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस उत्पादन होईल की नाही, या विवंचनेत शेतकरी असताना कापसाला दर प्रती क्विंटल 10 हजार रुपये भाव मिळाला, त्यामुळे आर्थिक समतोल साधता आला. यावर्षीच्या तुलनेत रासायनिक खतांचे दर मागच्या वर्षी कमी होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले नाही. आता या महागाईच्या काळात शेतमालाला चांगला भाव मिळेल या नव्या आशेने बळीराजा कामाला लागला आहे. मात्र, महागाईने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. यावर्षी शेती करणे अवघड झाले.
रासायनिक खते, कपाशी बियाणे, शेती संबंधित सर्व वस्तूंची दरवाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. पीक कर्ज देण्यास बँक विलंब करत आहे. शेतकरी सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांना पीक कर्ज यावर्षी उशिरा वाटप करत असल्याने पेरणीपूर्वी बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांना खरेदी करण्यास समस्या जाणवत आहे.