कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षपासून सण उत्सव साजरे होत नव्हते, परंतु नुकतेच राज्य शासनाने सर्व निर्बंध हटवले आणि सण उत्सव साजरे होऊ लागले आहे. राज्य शासनाकडून बाबासाहेबांची जयंती मोठया उत्सहात साजरी होणार असे जाहीर केल्यानंतर जसजशी १४ एप्रिल आता जवळ येऊ लागली तसे तसे आंबेडकरी अनुयायी जयंती च्या तयारीला लागली. मात्र,सावर्ला येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी अडथळा निर्माण होणार असल्याचे येथील सम्यक बौद्ध मंडळाने दिलेल्या निवेदनातून म्हटलं आहे.
गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम चालू आहे. खोदकामातून निघालेली माती ही इतर ठिकाणी न टाकता चक्क पंचशील झेंडा लगत टाकून सावर्ला ग्रामपंचायतने सामाजिक वादाला तोंड फोडल्याचे बोलल्या जात आहे. किंबहुना येथील पंचशील झेंड्याला अभिवादन करण्यास आंबेडकरी अनुयायांना मोठा अडथळा निर्माण झाला असून याबाबत मंडळाच्या वतीने वारंवार सूचना केली असता त्यांचेकडून टोलवाटोलवी व उद्धटपणाचे उत्तर दिल्या जात असल्याचे बाब येथील नागरिकांनी मौखिकरित्या आमच्या प्रतिनिधीला बोलून दाखविली असून, असा प्रकार घडल्यास निश्चितच भविष्यात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे येत्या १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायत, प्रशासनाने घेणे अत्यंत गरजेचे असून येथील पंचशील झेंडा लगत टाकलेला मातीचा ढिगारा तात्काळ उचलून संबंधित जागा मोकळी करून द्यावी अशा मागणीची निवेदन प्रत सम्यक बौद्ध मंडळ यांचे वतीने वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना देण्यात आले आहे.