रस्त्याची दुर्दशा थांबवा, कामाला जलद गतीने सुरुवात करा - प्रहारने केले आंदोलन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (५ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या भोयगाव, गडचांदूर, जिवती रस्त्याची परिस्थिती सध्या अतिशय गंभीर असुन हा रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे. शिवाय गडचांदूर, पाटण, वणी या राज्यमार्ग रस्त्याचे लांबीत सुधारणा करण्यासाठी २९ जूलै २०१९ रोजी भूमिपूजन होवून कामाला सुरूवात झाली.

५ ते ६ महिन्यांपूर्वी गडचांदूर येथील स्व.राजीव गांधी चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी गेट पर्यंतचा रस्ता खोदण्यात आला. असे असताना आता हे काम बंद अवस्थेत आहे. याच कारणास्तव जनतेला अताेनात त्रास सहन करावा लागत आहे. याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून एकाने आपला प्राण देखील गमावला आहे. बंद पडलेल्या सदरहु रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पुर्ण करावे, अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आला होता. मात्र, या बाबतीत अजुनही काहीच हालचाली दिसत नसल्याने शेवटी दिलेल्या इशारा प्रमाणे दि.४ आक्टोंबर रोजी नियोजित ठिकाणी प्रहारच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
   
हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून २४ही तास याठिकाणी वाहतूक सुरू असते. उपराेक्त रस्त्याचे काम बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.माणिकगड सिमेंट कंपनीत ये-जा करणारे वाहन चालक आणि शहरातील नागरिक याच रस्त्याचा वापर नेहमी करतात. रस्ता खोदून ठेवल्याने या ठिकाणी व परिसरात अक्षरशः धुळीचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित विभाग व कंत्राटदारने नागरिकांना वेठीस धरल्याचे आरोप करत या रस्त्याच्या कामाला सुरूवात करून ताे तातडीने पुर्ण करावा अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली.

या बाबत एक लेखी निवेदन देऊन आंदोलन संपविण्यांत आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे सतीश बिडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात पंकज माणूसमारे सह इत्तर अनेक कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.