नरसाळ्यातील पावसामुळे घराचे छत कोसळले


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१८ ऑक्टो.) : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले आहे. परतीच्या पावसामुळे तालुक्यातील नरसाळा गावात एका घराचे छत कोसळून मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हाणी झाली नसल्याचे कळतेय. मुरलीधर किसन सुरतेकर यांच्या घराचे छत १७ ऑक्टोबर रोजी पावसामुळे कोसळले. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर सुरतेकर कुटुंब उघड्यावर आले आहे. १६ ऑक्टोबरपासून तालुक्यात पावसाची जोरदार तर कुठे कुठे रिपरीप सुरू होती. सकाळपासून ढगाळ वातावरण व पाऊस येत असल्याने सोयाबीन कापणी थांबली आहे, तर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी करून शेतातच गंजी लावून ठेवली आहे. पावसाच्या रिपरिपीमुळे शेतकरी अधिकच चिंतेत सापडला आहे. पावसामुळे शेतमजूरदेखील घरीच असल्याचे वास्तव आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी सोयाबीन विकून शेतकऱ्यांची दिवाळी साजरी होत असते. मात्र, ढगाळ वातावरण व पावसामुळे मारेगाव तालुक्यात सोयाबीन शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतमजूरदेखील घरीच आहेत. परिणामी शेतकऱ्यांची व शेतमजुरांची दिवाळी अंधारात जाणार आहे. सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली.