अतिवृष्टीचा दराटी गावाला तडाखा: ७५ घरे पाण्याच्या विळख्यात

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (१९ ऑगस्ट) : दिनांक १६ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या दमदार पावसाने सुरुवातीला जीवदान मिळाल्यामुळे शेतकरी सुखावला असतानाच अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेली पिके पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली. मोठ्या प्रमाणात जमीनी खरडल्याअसून एवढेच नाही तर पुराच्या पाण्याने गावामध्ये धुमाकूळ घातला असून ७५ घरे पाण्याखालील गेली असून कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यावर्षी जूनच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडल्यामुळे पिकांची स्थिती चांगली होती. परंतु मध्ये पडलेल्या २२ दिवसाच्या कोरड्या वातावरणामुळे पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली होती. परंतु दिनांक १६ पासून आलेल्या पावसाने पिकांना जीवदान दिले.परंतु पाऊस अतिवृष्टीत बदलल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, उडीद, मूग या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीशिवाय जगणे अवघड झाले आहे.

सध्या परिस्थिती मध्ये गावातील घरांच्या झालेल्या नुकसानीचा सर्वे सुरू असून तातडीने घटनास्थळी तलाठी विनोद भालेराव पोहचले असून सर्वेचे काम सुरू असून त्यांच्यासमवेत पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक सर्व सहकार्य करीत आहेत.