वाघाचा बंदोबस्त केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा गावकऱ्यांचा इशारा

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (१० जुलै) : झरी तालुक्यातील पिवरडोल गावालगतच्या शेतशिवारात वाघाने हल्ला करून तरुणाला ठार केल्याची धक्कादायक घटना काल ९ जुलैला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेचे तीव्र पडसाद गावात उमटले असून वाघाला पकडल्याशिवाय तरुणावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबासह गावकऱ्यांनी घेतल्याने या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पांढरकवडा वनविभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी ठेवण्यात आला आहे.

पिवरडोल या गावातील १८ वर्षीय तरुण रात्री गावालगतच्या शेतशिवारात शौचास गेला होता. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. मुलगा बराच वेळ घरी न आल्याने कुटुंबीयांनी गावातील काही लोकांना घेऊन शेतशिवारात पाहणी केली असता त्यांना वाघाच्या पायाचे ठस्से व मुलाचे साहित्य तसेच रक्ताचे डाग दिसून आल्याने त्यांनी त्यादिशेने जाऊन बघितले असता झुडपात त्यांना वाघ दिसून आला. तो मुलाचे लचके तोडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी गावातील इतर लोकांना याबाबत माहिती दिली, व मोठ्या संख्येने लोकं घटनास्थळाकडे आले.
 लोकांनी वाघाला पिटाळून लावण्याचा कसोशीने प्रयत्न केला पण वाघ मुलाच्या पार्थिवापासून हटण्याचे नाव घेत नव्हता. सकाळपर्यंत वाघ मुलाच्या शरीराचे लचके तोडत होता. या घटनेने गावकऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली असून वाघाचा बंदोबस्त केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे कुटुंबियांसह गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

झरी जामणी तालुक्यात बहुतांश गावे ही आदिवासी बहुल असून त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतशिवार व जंगल शिवारात त्यांचे नेहमी जाणे येणे असते. सद्या शेतीचा हंगाम सुरु असल्याने गावातील लोकांचे शेतशिवारात जाणे येणे सुरु आहे. तसेच या भागातील बहुतांश लोकांच्या उदर्निवाहाचे सादन जंगलातील उपयोगी वस्तू गोळा करणे असल्याने त्यांची जंगल भागातही भटकंती सुरु असते. सरपण गोळा करणे व गुरे ढोरे चारण्याकरिता त्यांना नेहमी जंगल शिवारात जावे लागते.
मागील काही वर्षांपासून वाघाचे या परिसरात वास्तव्य असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. वाघाने कित्येक जनावरांची शिकार केल्याचेही समोर आले आहे. यातून वन्यप्राणी व मानवी संघर्ष वाढीस लागण्याचा धोका आहे. वाघ चवताळल्यागत मानवांवर तुटून पडत आहे. वाघांना गावाच्या वेशीपासून जंगलाकडे वळविणे आता आवश्यक झाले आहे.

वाघाचा बंदोबस्तच नाही तर त्यांना शेतशिवारापासून जंगलाकडे वाळविण्याकरिता सर्च ऑपरेशन करणे गरजेचे झाले आहे. वनविभागाने तशी पथके तयार करून शिकारी प्राण्यांना घनदाट जंगलांकडे वळविण्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे. वाघांच्या नेहमी होणाऱ्या हल्ल्यांमुळे आता जनता भयभीत झाली आहे. त्यांना शेतीतील कामे करण्यासही भीती वाटू लागली आहे. त्यामुळे वन्यविभागाने या गंभीर विषयाकडे लक्ष देणं गरजेचं झालं आहे.

 घरापासून काही अंतरावर शौचास गेलेल्या अविनाश पवन लेनगुरे या १८ वर्षीय तरुणाचा वाघाने बळी घेतल्याने कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. अविनाश हा कुटुंबाचा एकमेव आधार होता. तो ऑटो चालवुन कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. आई वडील व बहिणीचा आधारच त्याच्या जाण्याने हिरावला आहे.

या घटनेनचे तीव्र पडसाद गावात उमटले असून, या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशाराच गावकऱ्यांनी दिला असून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासही नकार दिला आहे.