भाजपचा आठ दिवसाचा अल्टीमेटम!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगांव : सध्या कडक उन्हाळा सुरु असल्यामुळे विज पुरवठा अखंडीत सुरु ठेवुन मारेगांव तालुक्यात १३२ के. वी. विद्युत उपकेंद्राचे काम तत्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात विद्युत वितरण कंपनी कार्यालय मारेगांव यांना करण्यात आली.

मारेगांव तालुक्यात अनेक दिवसापासुन विजेचा खेळखंडोबा चालू आहे. दिवसातुन ५० ते ६० वेळा विद्युत पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक विद्युत बद्दल संपर्क साधून विचारपूस केली असता कर्मचारी फोन उचलण्यास तयार राहात नाही. तसेच वणीवरून लाईन गेली, पांढरकवढ्या वरून लाईन गेली असे उडवाउडवीचे उत्तर देतात. असा आरोप नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आला. 

मागील २ वर्षापासुन १३२ केवी उपकेंद्र मंजुर होऊन सुध्दा मारेगाव स्तरावरून स्तरावरून कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा झाला नसल्यामुळे जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे, असे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. 

येत्या ८ दिवसात मारेगांव तालुक्यातील विज पुरवठा अखंडीत सुरु ठेवण्यात यावी व १३२ केवी विद्युत उपकेंद्राचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, जर हे दोन्ही प्रश्न मार्गी लागले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा गुरुवार दि. 24 एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. 

यावेळी अध्यक्ष अविनाश लांबट, सरचिटणीस प्रशांत नांदे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व मारेगाव तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.