वणी : वणी तालुक्यात सुरु असलेले अवैध धंदे तसेच अवैध वाहतुक बंद करण्याबाबत प्रभु श्रीराम नवमी उत्सव समिती, वणी च्या वतीने वणी शहरात स्वाक्षरी मोहीम राबवत आज गुरुवारी थेट पोलीस अधीक्षक यवतमाळ यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्ष रवि बेलूरकर, प्रणव पिंपळे, नितीन बिहारी, मयूर मेहता, बालाजी भेदोडकर, प्रणित महाकारकर, तुषार घाटोळे, नितीन भटगरे, राजेंद्र सिडाम, ॲड. प्रवीण पाठक, सुमित शिखरे, आदींची उपस्थिती होती.
वणी तालुक्यात तसेच वणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे (मटका, जुगार, कोंबडबाजार, झंडीमुंडी, चेंगळ, कोळसा तस्करी, रेती तस्करी, ड्रग्स, सुगंधीत तंबाखु गुटखा, गांजा) या सारखे अवैध धंदे त्याच प्रमाणे घरफोडी चोरी सर्रास सुरु असल्यामुळे वणी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच शहरात अवैध वाहतुक, बेधुंद टुव्हिलर गाडी अल्पवयीन मुले चालवित असून वणी शहरामध्ये अॅटोचा थैमान मुख्य मार्गाने दिसून येत आहे. यावर वाहतुक शाखेचे नियंत्रण नसल्यामुळे अवैध अॅटोचालकांची अरेरावी प्रत्यक्ष नागरीकांना पहावयास मिळत असल्याचे निवेदनातून कळविण्यात आले.
वणी शहर हे शांतताप्रिय असून जातीय धर्माचा कुठलाही वाद नसून सर्व नागरीक सलोख्याने राहतात परंतू वणी पोलीस प्रशासनाच्या तसेच वाहतुक शाखेच्या पोलीस विभागाचा वणी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण नसून वणी शहरात अवैध धंद्याला पुर्णतः मोकळीक पोलीस प्रशासनाने दिली असून अनेक अवैध धंद्यांना उत आलेला दिसत आहे. यामुळे वणी तालुक्यात एक भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पोलीस प्रशासनाचा ज्या प्रमाणे धाक निर्माण असायला पाहीजे तो नाहीसा झालेला दिसत आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचे डोके वर आल्याचा थेट असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
सर्व बाबीवर विचार करून येथील रामनवमी उत्सव समिती तसेच समाजातील विवीध संघटनांनी व सुज्ञ नागरीकांनी या निवेदनाव्दारे निषेध नोंदविला आहे. या अधिकाऱ्यांवर आपण तत्काळ कारवाई करावी किंवा त्यांची बदली करुन एक कडक प्रशासन निर्माण करणारे पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी आणि वणी तालुक्यातील होणाऱ्या दुर्घटना किंवा दुष्परिणाम टाळावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली असून दिलेल्या निवेदनावर तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा रामनवमी उत्सव समितीचे सदस्य व सामान्य नागरिक आणि विविध संघटनेच्या वतीने पुढील एक दिवसीय धरणे आंदोलन उभारेल व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना निवेदन देवून पुढील आक्रमक आंदोलनाची दिशा ठरविली जातील अशा गर्भीत ईशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावर वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.