Page

आधी मोठमोठ्या फेकून केले वशीकरण, आता मात्र जनतेला लुटून होतेय फसवीकरण - मारोती गौरकार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : केंद्र सरकारच्या योजनांच्या प्रचारासाठी भाजपाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकास योजनांचा गवगवा करणाऱ्या रथाला ठिकठिकाणी विरोध होत आहे. तालुक्यातील पिसगांव येथे हा रथ पोहोचला असता ग्रामस्थ संतप्त झाले. नागरिकांनी संकल्प रथ आणणाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत रथाला गावातून पिटाळून लावले. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
मारेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाला हमीभाव, बेरोजगारी, महागाई, खड्डेमय रस्ते अशा अनेक समस्या आहेत. त्यात पिकविमा भरपाईही मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच मोदी सरकारचा संकल्प रथ तालुक्यातील गावा गावात जाऊन 'अच्छे दिन' आणल्याचा बाबुलबुवा करत आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून रथ आणणाऱ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. आधी मोठमोठ्या फेकून वशीकरण केले, आता मात्र जनतेला लुटून फसवीकरण केले जात आहे. आम्ही वैतागलो या फेकू सरकार ला असा आरोप येथील शेतकरी मारोती गौरकार यांनी केला आहे.
तालुक्यातील समस्या सोडविण्याऐवजी मृगजळी विकास झाल्याचा भास जनते समोर ठेवत असल्याने पिसगांव व किन्हाळा येथील नागरिकांनी गावातून 'रथ यात्रा' पिटाळून लावले आहे. पिसगाव येथील शेतकरी मारोती गौरकार यांनी पुढाकार घेत रथ आणणाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. ही यात्रा भारत सरकारची की मोदी सरकारची आहे? असा सवाल त्यांनी केला. नागरिकांच्या प्रश्नांमुळे सैरभैर झालेल्या रथ आणणाऱ्यांनी अखेर गावातूनच पळ काढला. 


मारेगाव: पुन्हा कोळशाचा खुलेआम चोर बाजार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात वर्धा नदीच्या अलीकडे, कोसारा-खैरी मार्गांवर अवैध कोळशाचा चोर बाजार राजरोसपणे सुरु असून निडरपणे तस्कराकडून हा व्यवसाय जोमात आहे. हे प्रशासनाच्या लक्षात कसे येत नाही की 'कोयले के दलाली में इनके भी हात काले' तो नही ना अशी अर्थपूर्ण शंका निर्माण होणे सहाजिक आहे. ह्या संदर्भात नानाविध ई-पेपर आणि माध्यमातून बातम्या प्रकाशित होऊनही पोलीस प्रशासनाला जाग का? येत नाही हा संशोधनाचा विषय आहे. शासकीय मालमत्तेची अशी खुलेआम तस्करी करून शासनाच्या महसूलला चुना लावून काही मातब्बर स्वतःचा गल्ला भरत असल्याची चर्चा परिसरात रंगतांना दिसत आहे. 

मारेगाव तालुक्याच्या शेवट च्या टोकावरील कोसारा ते माढेळी मार्ग तसा अवैध तस्करीसाठी कुपरिचित आहेच. वर्धा नदी काठाजवळच वरोरा मार्गे येणाऱ्या कोलवाहू ट्रकमधून कोळसा चोरून किंवा कमी दरात विकत घेऊन काही मूठभर मंडळी गुन्हेगारीचे साम्राज्य निर्माण करत आहे. सोबतच परिसरात प्रदूषण निर्माण करत आहे व सामान्य जनतेला श्वसन संस्थेशी संबंधित आजाराच्या खाईत ढकलत आहे. एवढी हिंम्मत करतांना नक्कीच प्रशासनाचं पाठबळ आहे, अन्यथा ही हिम्मत सहजसोपी नाही. ह्या समस्येच्या मुळापर्यंत जावून कारवाई होईल का? की मुळापर्यंत जाण्याची इच्छाच नाही, यावर अंकुश लावण्यात प्रशासनाला यश येईल का? ह्या आशेने सामान्याच्या नजरा खिळलेल्या आहे.

कोल बाजार, खैरी मार्गाने जाताना कोसारा गावाच्या अगदी वर्धा नदीच्या अलीकडेच काही अंतरावर हा चोर बाजार असून मोठया प्रमाणात खुलेआम तस्करी केली जात आहे. तरीही प्रशासन मूग गिळून गप्प का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चोर बाजारात वणी, एकोणा क्षेत्रातील ट्रक कोळशाची चोरी करून खुल्या बाजारात विक्री करिता आणले जातात. किंबहुना येथून चोरीच्या कोळशाची हेरफेर केली जाते. ह्या अवैध वाहन चालकावर अजून पर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. तूर्तास येथील परिसर प्रदूषण युक्त झाला असून येथील कोल चोर बाजारावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

संताच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही - विजय अवताडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : राष्ट्रसंताचे नुसते भजन गाऊन चालणार नाही, तर त्यांचे विचार आपल्या आचरणात आणावे लागणार आहे. राष्ट्रसंताच्या विचाराने प्रेरित झालेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही, असे मनोगत कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक तथा ग्राम. सदस्य विजय अवताडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 55 वा पुण्यस्मरण सोहळ्यात कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकराव बेंडाळे, उदघाटक विजयाताई देहकर, प्रमुख पाहुणे श्री गंगाधर लोणसावळे महाराज, श्री विलासराव गोडे (सेवा अधिकारी केळापूर), श्री. प्रभाकर ठाकरे, श्री. झिबल भोयर, श्री.राजू सिडाम (ता. प्र. प्र.), श्री.सुभाष सप्रे (म. प्र.), श्री.कैलास बोन्डे, श्री.मनोहर वांढरे, श्री.देहाराज अडबाले, कुमार अमोल कुमरे (पत्रकार), श्री.मारोती उरकुडे (माजी सेवा अधिकारी), श्री. सुधाकर धानोरकर (म.प्र.), उमेश चव्हाण (गु. से. भ. मं वसंतनगर अध्यक्ष), आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री.अवताडे म्हणाले की, संतांनी कधी जातपात मानला नाही, अखिल भारतीय मानव कल्याण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे अवतरले. "याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा" आपल्याला ह्याच नरजन्मात सगळं भोगायचं आहे. आपण या 55 वा पुण्य सोहळ्यानिमित्ताने एकत्र जमलो आणि संताच्या विशाल विचारांचा प्रचार व प्रसार लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम आपल्या हातून घडत आहे,वसंत नगरवासी भाग्यवान आहेत आणि हेच वंदनीय राष्ट्रसंतांना अपेक्षित असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोकराव बेंडाळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यसनमुक्ती, स्पर्धा परीक्षा, आधुनिक साधन (मोबाईल), इव्हीएम मशीन (EVM), हुंडा प्रथा, शेतकऱ्यांची पिळवणूक, अशा अनेक सामाजिक विषयावर भाष्य केले. तसेच विचार पिठावर असलेल्या इतर मान्यवरांनीही आपले यथोचित मनोगत व्यक्त केले. तसेच सर्वांना नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व उत्तम आरोग्यासाठी राष्ट्रसंताकडे प्रार्थना केली. 
वसंत नगर येथील शुक्रवार व शनिवार अशा दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन दि.29 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5. वाजता घटस्थापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 6. वाजता श्री. सुधाकर धानोरकर यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम, सायंकाळी 8. वाजता हपभ डॉ. गजानन महाराज सुरकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवार दि.30 डिसेंबर 2023 ला पहाटे 5. वाजता ध्यान प्रार्थना, सकाळी 6. वाजता ग्रामसफाई, हपभ ज्ञानेश्वर ढप्पर महाराज यांचे सकाळी 9.वाजता काल्याचे किर्तन, त्यानंतर भव्य दिंडी मिरवणूक, कार्यकर्ता संमेलन, लगेचच महाप्रसाद चा कार्यक्रम, रात्री भजन संमेलन संपल्यानंतर राष्ट्र वंदनेने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप आत्राम यांनी केले. तर उमेश चव्हाण यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, महिला मंडळ तथा समस्त वसंत नगर ग्रामवासी यांनी केले असून या पुण्यस्मरण सोहळ्याला जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातील आमंत्रित सर्व उपासक, उपासिका तथा सर्व गुरुदेव प्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. 

मारेगाव महसूल विभागाची धडक कारवाई, रेती तस्करी करणारा हायवा मध्यरात्री जप्त



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात चोरट्या मार्गाने रेती तस्करांचा उच्छाद कायम असून, महसूल विभाग ऍक्शन मोडवर असतांना शनिवारीच्या मध्यरात्री आणखी छापा टाकण्यात आला. ते चारचाकी वाहन दांडात्मक कारवाई साठी जप्त करण्यात आले. या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. 
मारेगाव तालुक्यातील रेती तस्कर वर्धा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी करण्यात माहीर असल्याचे बोलले जात आहे. हे तस्कर संबंधित अधिकारी कधी कुठे जातात येतात, याची खबर घेत आपले हित साध्य करीत असतात. मात्र, यावेळी त्यांचा डाव फसला आणि कोसारा घाटातून रेतीची अवैध वाहतूक करणारा हायवा वाहन क्र. (MH-32 AK-4446) कुंभा येथे महसूल विभागाच्या गळाला लागला. 
ही कारवाई शनिवारच्या मध्यरात्री केली असून, हायवा दांडात्मक कारवाई साठी तहसील कार्यालयात जमा केला. एवढ्या मोठ्या वाहनावर तालुक्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे. 
तहसीलदार उत्तम निलावाड यांचे मार्गदर्शनात तलाठी कुडमेथे, सोयाम, कोतवाल गायकवाड, कोयचाडे यांनी ही कारवाई केली.

संजय देरकर यांच्या नेतृत्वात वेकोली वाहन चालकाच्या समस्या निकाली


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी नार्थ क्षेत्रामध्ये वेकोली च्या माध्यमातून टेंडर (निविदा) काढून खाजगी कंपनीना टेंडर देण्यात येते, वेकोली व खाजगी मालकाच्या संयुक्तरित्या कामकाज चालवतात. त्याच आधारावर वाहक भरती केल्या जाते. मात्र, ठेकेदारी पद्धतीने टेंडर मालक, खाजगी वाहन चालक शासकीय नियम धाब्यावर ठेवून वाहन चालकाची शारीरिक व मानसिक व आर्थिक पिळवणूक करतात. ह्या विरोधात एकता असोसिएशन मोटार वाहन मदतनीस वेलफेयर तर्फे दिनांक 28 डिसेंबर ला क्षेत्रीय प्रबंधक वेकोली वणी नॉर्थ व सर्व ट्रॅव्हल्स एजेन्सी च्या विरोधात कामबंध आंदोलन करण्यात आले.
त्याठिकाणी वाहनचालकांच्या नैतिक मागण्या प्रशासना समक्ष ठेवण्यात आल्या,त्यामधते प्रामुख्याने पूर्ण मागण्या अवघ्या दोन ते तीन तासात मान्य केल्या त्या पुढील प्रमाणे, 1) वाहन चालक यांना NIT च्या तत्वावर वाहन चालवीत फक्त 8/12 करण्यात येणार. 2) वर्क ऑर्डर प्रमाणे जे मिनिमम वेजेस प्रमाणे पगार देण्यात येईल. 3) मासिक वेतन प्रति महिना 10 तारखेलाच देण्यात येणार. 4) 26 दिवसाचे काम करण्यात येणार व मिनिमम वेजेस प्रमाणे पगार देण्यात येणार. 5) पि. एफ. व पगार पत्र प्रत्येक महिण्यात लिखित स्वरूपात देण्यात येणार. 
ह्या सर्व मागण्याबैठकी अंती वेकोली व ट्रॅव्हल्स एजन्सी मार्फत लेखी आश्वासन देऊन काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय देरकर, वेकोली क्षेत्रीय प्रबंधक यु. सी. गुप्ताजी, उदय कुमार नोडल अधिकारी वणी नॉर्थ, संजय देठे, डॉ.जगन जुनघरी, वसंता डुकरे, फैजल बशीर खान, प्रवीण खानझोडे यासह संघटनेचे पदाधिकारी विजय सिंग, आकाश गौतम, राकेश वरारकर, रजिक शेख, जतींदर सिंग, राजू चिंचोलकर, फारुख पठाण, राजू यादव, चंदन हिकरे, प्रशांत मिलमीले, विलास मंदे, विशाल राऊत, नवरतन भावरकर व शेकडो वाहन चालक तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

नॉन पेसा क्षेत्रातील १५९ पदांसाठी पदभरती करणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाइन परीक्षा आय. बी. पी. एस. कंपनीमार्फत १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शासनाच्या १८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्रातील या विभागातील जाहिरातीत नमूद एकूण १५९ पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे लातूर विभागाचे कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

कृषी विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरण्यासंदर्भातील सरळसेवा पेसा व नॉन पेसा पदभरतीसाठी जाहिराती ११.०८.२०२३ ते १४.०८.२०२३ या कालावधीत विभागस्तरावरुन प्रसिध्द करण्यात आल्या. या जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक १४.०९.२०२३ ते ०३.१०.२०२३ या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली असल्याचे श्री.दिवेकर यांनी सांगितले.

कृषी सेवक पदभरती संदर्भातील ऑनलाईन परीक्षा आय.बी.पी.एस. कंपनीमार्फत १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शासनाच्या १८ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या पत्रानुसार पेसा क्षेत्रातील पदभरतीस निर्बंध असल्याने फक्त नॉन-पेसा क्षेत्रातील या विभागातील जाहिरातीत नमूद एकूण १५९ पदांसाठी पदभरतीची कार्यवाही करण्यात येणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र यशावकाश आय.बी.पी.एस. संस्थेकडून संबंधितास उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असेही सहसंचालक श्री. दिवेकर यांनी म्हटले आहे.

नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात आली, या अनुषंगाने मार्डी येथील महादेव मंदिरात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी पक्षाचे जेष्ठ नेते मंगेश देशपांडे, यांच्या व माजी सरपंच भास्करराव धानफुले सर यांच्या हस्ते नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी देशपांडे यांनी पक्षातील अनुभव, भूमिका कथन करित असताना संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची राजकारणातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात ख्याती आहे, असे दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. अविनाशजी लांबट. असे म्हणत नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश लांबट यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी पक्षाचे नेते मंगेश देशपांडे, जेष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते भास्करराव धानफुले सर, सुधाकरजी बोबडे गुरुजी, विजय खिरटकर, शेखर काळे, पंकज आंबूळकर, संदीप झोटिंग, बाळू चौधरी, शंकर इनामे,यांच्या सह मित्र परिवारांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर काळे यांनी केले, तर नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष श्री लांबट यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांना एकत्र घेऊन पक्ष बळकट करणार, अशी ग्वाही दिली. 

तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अविनाश लांबट यांचं हार्दिक अभिनंदन!


मा. अविनाश लांबट यांची भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा...!

पुढील राजकीय वाटचालीस खुप खूप शुभेच्छा...
मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, मेहनत तर सगळेच करतात, पण सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण मेहनत करतात. मनःपूर्वक अभिनंदन 
 
तुमच्या या निवडीबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन, आज तुम्ही स्वतःला सिद्ध केलं.

शुभेच्छुक :- समस्त मित्र परिवार (मारेगाव तालुका)

सन्माननीय अविनाशजी लांबट यांची मारेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती बद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन!


हार्दिक अभिनंदन...

आमचे मार्गदर्शक तथा बंधुराज, सन्माननीय अविनाशजी लांबट, यांची भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

तालुक्यातील जनमानसात स्वच्छ प्रतिमा असल्याने पक्षाने त्याची निवड तालुका अध्यक्ष पदी केल्याने सर्व स्तरांतून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. आम्ही सुद्धा माझ्यासह खंडाळकर परिवारातर्फे आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो...
भाऊसाहेब आपणास पुढील वाटचालीस खुप खूप शुभेच्छा...!!

शुभेच्छुक :- आशिष खंडाळकर
      सामाजिक कार्यकर्ता 

करणवाडी शिवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील ओमराज सूर्यभान राजूरकर (45) हा 24 डिसेंबर रोजी रविवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास तो घरून निघुन गेला होता. त्याचे मानसिक संतुलन ठिक नसल्याचे समजते. याबाबत समाजमाध्यमावर वार्ता फिरत होती. त्याचा सर्वत्र शोधाशोध सुरु होता. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. आज गुरुवार (ता.28) ला ओमराज यांचा मृतदेह करणवाडी शिवारात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत निदर्शनास आला. सतत वाढत्या आत्महत्येने मारेगाव तालुका हादरला असून चिंता व्यक्त होत आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.

सन २०२४ मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : सन २०२४ मध्ये राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रम साजरे करण्याचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. यामध्ये दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत, असे परिपत्रकात नमूद आहे.

परिपत्रकामधील सर्व कार्यक्रम विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात आयोजित करण्याबाबत सूचना देऊन अंमलबजावणीबाबत कार्यवाही करावी, असेही परिपत्रकात नमूद आहे.

भाजपची धुरा जाणत्यांकडेच; मारेगाव तालुका अध्यक्ष पदी अविनाश लांबट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : भाजपात दाखल झालेले व कमी वेळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदावर झेप घेणारे अविनाश लांबट यांची भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. 

भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्ह्यातील मंडळ अध्यक्ष पदाची घोषणा पत्रकान्वये काल जाहीर करण्यात आली आहे. मारेगाव तालुक्याची भाजपची धुरा जाणत्यांकडेच दिल्याने आता पक्षाला मोठी संजीवनी मिळणार आहे.

विशेष म्हणजे तालुका अध्यक्ष पदाकरिता चार उमेदवारांनी आपली इच्छा जाहीर केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती, यात विद्यमान ता.अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शशिकांत आंबटकर (काका), गणेश झाडे, अविनाश लांबट यांनी अध्यक्ष पद पदरात पाडून घेण्यासाठी खटाटोप सुरु केला. परंतु पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार दोघांना माघार घ्यावी लागली,तर उरले दोन. दोन पैक श्री लांबट सोडले तर इतरांचा तालुक्यात पाहिजे तसा फारसा जमघट नसल्याने त्यांनाही अध्यक्ष पद मिळवता आले नाही असे समजते. त्यामुळे अल्पवाधित आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अगदी निकट मानले जाणारे, राजकीय, सामाजिक तथा सामान्यांच्या कार्यात, मदतीला एका हाकेला धावून जाणारे, मारेगाव तालुक्यात लोकप्रिय, मनमिळाऊ स्वभावाने ओळखले जाणारे अविनाश लांबट यांची भाजप च्या मारेगाव तालुका अध्यक्ष पदी अखेर वर्णी लागली. त्यांच्या कडे सर्वानुमते तालुक्याची जबाबदारी देण्यात आली.

या निवडीबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, सोशल च्या माध्यमातून राजकीय, सामाजिक क्षेत्रासह त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत अविनाश लांबट यांच्याशी संवाद साधला असता नवनिर्वाचित अध्यक्ष श्री लांबट म्हणाले, वणी मतदारसंघाचे आमदार संजीव रेड्डी बोदकुलवांर यांच्या विकासात्मक कामाला प्रेरीत होऊन आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या निवडीचे श्रेय त्यांनी सन्माननीय माजी मंत्री हंसराज भैय्या अहिर, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे असल्याचे 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले.

तालुक्यातील जनमानसात स्वच्छ प्रतिमा असल्याने पक्षाने त्याची निवड तालुका अध्यक्ष पदी केल्याने सर्व स्तरांतून त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे. त्यांची निवड आगामी काळात करिश्मा करणारी ठरणार आहेत.


चिंचाळा येथील ७० वर्षीय वृद्धाने घेतला विषाचा घोट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : दिवसागणिक आत्महत्येच्या घटनेत वाढ होत आहे. काल हटवांजरी येथील इसमाची आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील आणखी चिंचाळा येथील एका वृद्धाने आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. 

भाऊराव सदाशिव थेटे (70) असे वृद्धाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी साडे सात वाजता च्या दरम्यान त्यांनी राहत्या घरी विष प्राशन केले. वृद्धाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तपासणी अंती डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप तरी अस्पष्ट असून मृतकाच्या पाठीमागे एक मुलगा, एक मुलगी, स्नुषा, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

सिमा चोरडिया यांची श्री धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील नामांकित श्री धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वणीच्या अध्यक्ष पदी सीमा विजय चोरडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विद्यमान अध्यक्ष आरती चौधरी यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय वणी, यांच्या आदेशानुसार एस.डी. मडावी सहाय्यक सहकार अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. यामध्ये सीमा चोरडिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडीबाबत आरती संजय चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना नवनियुक्त अध्यक्ष सीमा चोरडिया यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत जी जबाबदारी दिली त्यामध्ये निश्चितच मी पतसंस्थेला प्रगती पथावर नेत पतसंस्थेच्या माध्यमातून तळागाळातील सर्व सामान्य लोकांना बचतीची सवय लावून कर्ज स्वरूपात कर्ज उपलब्ध करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न असणार आहे, अशा यावेळी त्या म्हणाल्या.

या निवडीच्या अनुषंगाने विजय चोरडिया यांनी सर्व महिला संचालकांचे आभार मानले. दरम्यान, संस्थेला प्रगतीपदावर नेण्याची हमी दिली. यावेळी आरती चौधरी, पूजा जुनगरी, वंदना राजूरकर, पल्लवी उदापूरकर, ताई मुठावार, सरोज कोनप्रतीवार, संगीता खुंगर, मंजू बिलोरिया, सविता राऊत, गीता तुराणकर, शुषमा येवले, सोनू मदान आदी संचालक उपस्थित होत्या.

या प्रसंगी एस.डी. मडावी सहायक सहकार अधिकारी यांचे स्वागत अतुल मुठ्ठावार यांनी तर कार्यक्रमाचे संचालन राजू तुराणकर यांनी केले.

आता शिर्डीत साईभक्तांना मास्क बंधनकारक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

शिर्डीच्या साई मंदिरात आता मास्क सक्ती करण्यात आलेली आहे. शिर्डीच्या साई मंदिरात 'नो मास्क, नो दर्शन'. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईसंस्थान सज्ज झालेलं आहे आणि तो निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. दर्शन रांगेत साई संस्थानने भक्तांना मास्क द्यावेत. JN.1 च्या पार्श्वभूमीवर या सूचना करण्यात आलेल्या आहेत.

शिर्डीत साई समाधी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीला येत असतात. मात्र, आता कोरोनाच्या जेएन. वन (JN.1) या नव्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. 

या पार्शवभूमीवर शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि ग्रामस्थांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही. 

तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेशद्वाराजवळ मास्क उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिल्या आहेत. महत्वाचं म्हणजे या सूचनेची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. त्यामुळे आता साईभक्तांना मास्क बंधनकारक असणार आहे.


दोन वेचण्यातच कपाशीच्या पऱ्हाट्या मोकळ्या?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात दुष्काळाने भयावह स्थिती निर्माण झाली असून अवकाळीने खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी अनेक भागात पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीतच कपाशीच्या पऱ्हाट्या मोकळ्या झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

मारेगाव तालुक्याला मागील काही वर्षांपासून लागलेले दुष्काळाचे ग्रहण अजूनही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. यंदाही वरुणराजाच्या वक्रदृष्टीने तालुका दुष्काळात होरपळत आहे. त्यात जेमतेम पावसावर आलेल्या सोयाबीन व कपाशीचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पावसाने थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या कपाशीसह इतर पिके हातची गेली आहेत.
ऐरवी फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी सुरू असते. परंतु यंदा हंगाम लवकरच आटोपण्यावर असून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कमी पाऊस, उन्हाचा तडाखा व ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे पांढरे सोने डिसेंबरच्या अखेरीस शेतातून हद्दपार होण्याची शक्यता आहे. अनेक शेतात पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीत कापसाच्या पऱ्हाट्या संपल्याचे दिसत आहेत. यंदाच्या दुष्काळात अनेकांचे हातचे सोयाबीन पिक गेले, कापूसही हद्दपार होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यावर्षी खरिपाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, पावसाने ऐनवेळी दगा दिला त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
शेतकऱ्यांसाठी सर्वपक्षीय नेते कधी एकवटणार?

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य तो हमीभाव भेटण्यासाठी नेते मंडळी एकत्र झटणार का? कापसाला भाव मिळवण्यासाठी सामान्य नागरिक रस्त्यावर कधी उतरणार? जबाबदार सामान्य नागरिक नेत्यावर दबाव टाकून शेतीविषयक प्रश्न सोडवून घेतील का?
मात्र, सद्यस्थिती पाहता कोणीकोणाचे वाली नसल्याचे चित्र दिसतेय. परिणामी येत्या आगामी (2024) निवडणुकीत आपलिया आपण करावी सोडवण... 

संताचे विचार आत्मसात करून सामान्यापर्यंत पोहचविले पाहिजे - विजय चोरडिया

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : संताची विचार आत्मसात करून सामन्य माणसा पर्यंत पोहचविण्याचे काम आपण सर्वानी मिळून केले पाहिजे असे, प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप राज्य कमेटीचे सदस्य विजय चोरडिया यांनी केले. ते श्री मल्हारगड दत्त देवस्थान कवडशी येथील दत्त जयंती निमित्ताने बोलत होते.

संस्थेच्या वतीने दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात धार्मिक, पुजा, भजन किर्तन व भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत श्री.चोरडिया यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून मंदिर समितीचे मनोज सरमोकदम, बोबडे सर, मनोज केळकर, पवन एकरे, राजु धावंजेवार ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर यात्रेला परिसरातील हजारो भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावली.

ग्रामीण भागातील खेळाडूंची प्रतिभा कौतुकास्पद - संजय खाडे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : ग्रामीण भागातील खेळाडू हे मजुरीचे काम करून
उरलेला वेळ आपला छंद जोपासण्यासाठी खेळ खेळत असतात, ही एक आनंदाची बाब आहे. अलिकडच्या काळात ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात खेळांच्या स्पर्धा होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंची प्रतिभा समोर येत आहे आणि कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड,चे अध्यक्ष संजय खाडे यांनी व्यक्त केले. बोरगाव प्रिमियर लीगच्या बक्षिस वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. रविवार 24 डिसेंबर रोजी बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मंडळ बोरगाव (मे) तर्फे या लीगचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे ग्रामीण भागात ठिकठिकाणी अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे,असे ही ते म्हणाले.

बजरंग वॉरिअर्स व 11 स्टार संघात अंतिम सामना बुधवारी दिनांक 20 डिसेंबर रोजी बोरगाव प्रिमियर लीगचे थाटात उद्घाटन झाले. या स्पर्धेत 6 संघ सहभागी झाले होते तसेच बोरगाव व परिसरातील 22 गावातील खेळाडू या संघात सहभागी झाले होते. अंतिम सामना हा बजरंग वॉरिअर्स व 11 स्टार संघात खेळला गेला. हा सामना शेवटच्या शटकापर्यंत रोमांचकारी ठरला.

प्रथम फलंदाजी करत 11 स्टार संघाने 10 ओव्हरमध्ये 99 रन्स काढले. या सामन्यात आशिष बोबडे यांने धडाकेबाज 64 रन्सची खेळी केली. 100 रन्सचे टारगेट बजरंग वॉरिअर्सने 9.3 ओव्हरमध्ये पूर्ण करीत 7 विकेट व 3 चेंडू राखून विजय मिळवला. बजरंग वॉरिअर्सतर्फे लोकेश पाचभाई यांनी 32 रन्स तर सूरज बोरसरे 23 रन्सची संयमी पण महत्त्वपूर्ण खेळी केली.

स्पर्धेतील विजेता संघाला 35 हजार रुपये रोख, तर
उपविजेत्या संघाला 25 हजार रुपये रोख बक्षिस देण्यात
आले. लीगमध्ये बेस्ट बॅस्टमन हा 11 स्टार संघाचा आशिष
बोबडे ठरला. बेस्ट बॉलर हा छत्रपति वॉरिअर्सचा प्रीतम
ढवस ठरला, बेस्ट फिल्डर तुकाराम वासेकर (माही योद्धा)
तर मॅन ऑफ दी सिरिज 11 स्टार संघाचा डॉ. दीपंकर बिस्वास ठरला.

बक्षिस वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून महेश सोमलकर, धनंजय खाडे, प्रतिक गेडाम, ईश्वर खाडे, पद्माकर देरकर, सुधाकर तुराणकर, प्रकाश आसुटकर, देविश काळे, आनंदराव बलकी, बंडू बलकी, श्रीकृष्ण महाकुलकर, दीपक ताजणे, शंकर महाकुलकर, रंगनाथ कोवे, देवराव कोल्हे, शत्रुघ्न मालेकर, विजय आसुटकर, विठ्ठल चिंचोलकर, नीलेश चिंचोलकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राहुल घुगुल यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे शिवराम चिडे, उमेश शेंडे, गणेश बलकी, लखन गेडाम, गौरव महाकुलकुर यांच्यासह बोरगाव येथील खेळाडू व समस्त गावक-यांनी परिश्रम घेतले.

गुणवंत विद्यार्थी सत्कार, जेष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा व समाज प्रबोधन मेळावा संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगांव च्या वतीने अमृत महोत्सवी आयोजीत करण्यात आलेल्या समाज प्रबोधन मेळाव्यात वणी,मारेगांव व झरी (जामणी) तालूक्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, जेष्ठ नागरिकांचा सत्कार, स्पर्धा परिक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार येथील स्थानिक त्रिमूर्ती मंगल कार्यालयात सोमवार दिनांक २५ डिसेंबर,२०२३ रोजी उत्साहात संपन्न झाला.

मा.दादाजी कालर सेवानिवृत मुख्याधापक यांचे अध्यक्षतेखाली मा. रमेश जारंडे, मा.प्रा संजय बोधे वरोरा, मा कैलास उराडे राजूरा, मा. डॉ. प्रा. गजानन सोडनर, मा. प्रा. रमेश बुच्चे, मा. अविनाश जानकर, मा विठ्ठलराव बुच्चे, यवतमाळ मा राजेंद्र कोरडे, मा. पांडूरंग पंडिले, मा. देविदास बोबडे, मा.डॉ मधुकर आस्कर वणी, मा. विठल काळे, मा.अरविंद वखनोर, मा रविराज चंदनखेडे, मा. माणिकराव पांगुळ, मा.लक्ष्मण झिले, मा.रामचंद्र अडते, मा.मंगेश चामाटे, निरे सर, अडते सर, चिव्हाणे सर, खुजे सर, मा. सौ.सुनिता पचकटे, मा. सौ. वनिता उराडे यांचे प्रमुख उपस्थीतीत संपन्न झाला.

ज्ञान हीच संपत्ती आहे हे अधोरेखीत करून समाजाने आधुनिक तंत्रयुक्त ज्ञानाची कास धरावी असे आवाहन मा.प्रा. संजय बोधे यांनी केले. समाजाच्या अनुसुचीत जमातीच्या आरक्षणाबाबत व न्यायालयीन लढाई बाबत सविस्तर मार्गदर्शन मा. रमेश जारंडे, मा. कैलास उराडे, मा. अविनाश जानकर यांनी केले. या सोहळ्यात ४० गुणवंत विद्यार्थी, ३० जेष्ठांचा अमृत महोत्सवी सत्कार, विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविणाऱ्या २५ समाजभुषणाचा विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचे सुत्रसंचालन मा. प्रा. आशिष साबरे सर, प्रास्ताविक मा.रघुनाथ कांडरकर सर, अहिल्यावंदना मा. विकास चिडे सर आभार मा. राजकुमार बोबडे यांनी केले.

या सामाजिक सोहळ्याला वणी, मारेगांव व झरी (जामणी) तालुक्यातील मोठ्या संख्येने समाज बंधूभगीनी उपस्थीत होत्या. या सोहळ्याचा यशस्वीतेसाठी वणी, मारेगांव व झरी (जामणी) तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच वणी मारेगांव झरी-जामणी तालूका, खंडोबा- वाघोबा देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट वणी, महाराजा यशवंतराव होळकर सार्वजनिक वाचनालय वणीच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.

गाडीचा रिव्हर्स ठरला चिमुकलीचा काळ, अडीच वर्षीय मुलगी अपघातात ठार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणीशुक्रवारी तालुक्यातील नांदेपेरा येथे घरासमोर खेळत असलेल्या एका अडीच वर्षीय चिमुकली चारचाकी वाहणाखाली आली.या दुर्दैवी अपघातात त्या चिमुकलीचा मृत्यू झाल्या प्रकरणी वणी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी चालकाविरोधात विविध कलमान्वये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रकाश मारोती केमेकर यांची लडकी लेक देविका (अंदाजे वय 2/3) व 3 वर्षाचा एक मुलगा हे दोघेही घराजवळ खेळत  होते. दरम्यान, येथीलच प्रज्ज्वल प्रमोद कोल्हे हा महिंद्रा बोलेरो आपले मालवाहू वाहन क्र. (MH 29 T6753) मागे घेत होता. मात्र, वाहन रिव्हर्स घेताना बोलेरोच्या मागच्या चक्याखाली ती बालिका आल्याने या अपघातात तीच्या डोक्याला जबर मार लागला. तिच्या घरच्यांनी तिला तत्काळ वणी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले होते.

शुक्रवारी देविका एकाएकी अपघातात मृत्यू पावल्याने केमेकर परिवाराला मोठा धक्का बसला. अखेर मुलीचे वडील प्रकाश याचे भाऊ शंकर यांनी सोमवार दि.25 डिसेंबर ला वणी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वाहन चालक प्रज्ज्वल कोल्हे याच्या विरोधात भांदविच्या कलम 279, 304 अ, 134 (अ), 134 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोउनि धिरज गुल्हाने करीत आहे. 

आणखी एका शेतकरी पुत्राने घेतला जगाचा निरोप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्यात सतत आत्महत्याच्या घटना घडत आहे. हि आत्महत्येची धग कायम असताना आणखी एका शेतकरी पुत्राने (ता.17) डिसेंबर रोजी राहत्या घरी विष प्राशन केले होते. मात्र, आज मध्यरात्री त्याची प्राणजोत मालवली. त्याच्या अशा अकाली निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

महेश मारोती ढोके (31) रा.शिवणी (धोबे) असे निधन झालेल्या अविवाहित तरुणाचे नाव आहे. महेशने आठ दिवसापूर्वी आपल्या राहत्या घरी घरात कोणीच नसतांना सायंकाळी 6 वाजता विषारी द्रव्य प्राशन केले होते, हि दुःखदायक बाब घरच्यांना निदर्शनास येताच त्याला तातडीने आधी वणी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला चंद्रपूर येथे शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. महेश याच्यावर मागील आठ दिवसापासून उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा काल रविवारच्या मध्यरात्री 1 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला असल्याची माहिती आहे. वडिलांच्या शेत कामात हातभार लावणारा महेश त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप ही अस्पष्ट आहे. मात्र तालुक्यात सतत होणाऱ्या आत्महत्येच्या घटनेत वाढता आलेख पाहता चिंता व्यक्त केली जात आहे.

महेश यांच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, दोन विवाहित बहिणी असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्याची मृत्यूशी झुंज संपताच ढोके परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून शिवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


29 वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांना सहवासातून मिळाला नवचैत्यनाचा अविस्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मित्रांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि बालपणीचे मित्र एकत्रित आल्यानंतर कोणती नवउर्जा देऊन जातात व नवचैतन्याचा अविष्कार कसा होतो, याचा प्रत्यय 29 वर्षांनंतर मारेगाव येथील बदकी भवन सभागृहात काल रविवारी एकत्रित आलेल्या मित्रांना झाला, या स्नेहमिलनातून मित्र वर्गांना मिळाला एक सुखद अनुभव जो सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.

आजच्या धकाधकीच्या जीवनात एक समाधानकारक
सहवास देण्याची संधी उपलब्ध करून देतात ते मित्र म्हणूनच म्हणावं लागतं 'दोस्ती खून के रिश्ते से भी काफी गहरी होती है' कारण दोन दशकांपूर्वी एकत्रित शिक्षण घेणारे किशोर वयीन मित्र व्यवहाराच्या व कौटुंबिक जगात आज रोजी पुर्णतः गुंतले आणि एवढया प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा 29 वर्षांपूर्वीचे मित्र भेटलेत तेव्हा सर्वांना प्रत्यय आला की, मित्र हा रखरखत्या वणव्यामध्ये गार गारव्याचा सुखद अनुभव देणारा असतो. उपरोक्त ठिकाणी मित्रांनी एकत्र येऊन उपस्थित मान्यवरांचा सहृदय सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.महेश बदकी, मा. बंडुजी देरकर (चंद्रपूर), मा. अमोल कुमरे, मा.सुरेंद्र भालेराव (झरी जामणी), मा, चेतन बोढाले, मा. मारोती पाचभाई, मा. युगल नागरकर, यशराज भंडारी, समारंभाला उपस्थित होते.

उपस्थित सर्व मित्र वर्गांच्या परिचय सत्राचा आवर्जून उल्लेख करतांना आज जे आपण आहात किंवा जे आपण कमावलं आहे ते आमच्या करिता गौरवास्पद आहे. आयोजकांनी सत्कार अधोरेखित करून मैत्री भाव वाढविण्याचे आवाहन केले तर संचालन करतांना प्रशांतकुमार भंडारी, व कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंदा आसुटकर (गुरुजी) यांनी मित्र हे जीवनाची संजीवनी आहे, आपण त्यांना जपले पाहिजे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्यात तसेच सहभागी मित्रांनी हा आदर्शवत व अविस्मरणीय असा स्नेहमिलनाचा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल आभार व्यक्त केले.

याप्रसंगी भंडारी याने मित्रत्व कायम असावे या यासाठी व्हाट्सअप ग्रुप तयार करून सर्वांची एकत्र मोट बांधली. या वेळी प्रांजली बदकी, दमयंती देरकर, अनामिका बेगानी, गजानन दुमोरे यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना नवीन वर्षाच्या आनंददायी शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी जगन सुरशे, प्रविण बलकी, रुदा सातपुते,  आकाश भोसले, प्रांजली बदकी, शाबान शेख, शाम ठावरी, नंदकिशोर चव्हाण, प्रवीण मिलमिले, मीना चरडे, अनामिका दुग्गड, गजानन दुमोरे, विलास वाटेकर, कमलाकर परचाके, कंचना चहानकर, नरेश निखाडे, गोविंदा आसुटकर, प्रशांतकुमार भंडारी, संगीता ठेंगणे, वंदना टोंगे, नलिनी बदखल, सुनील कुचनकर, तुकाराम माथनकर, दमयंती चिकटे, संगीता खंडाळकर अरविंद आसेकर, चिंतामण भोसले, मंगेश खारकर, यांनी हजेरी लावली. समारोपीय कार्यक्रमात मनोगत, कथाकथानक इत्यादी मधून 29 वर्षांपूर्वीच्या आठवणीना उजाळा देण्यात आला.

याप्रसंगी नागपूर, खामगाव, चंद्रपूर, वर्धा, पांढरकवडा, समुद्रपूर, वरोरा, झरी जामणी, मारेगाव, पुरड (पुनवट), एकार्जुना, वणी, डोलडोंगर गाव, लाखापूर, वांजरी, वनोजा, नांदेपेरा आदी गाव शहरांमधून अनेक वर्ग मित्र-मैत्रिणी सहभागी झाले होते.

वणी येथे मुस्लिम जोडप्यांचा निकाहचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येथील आशियाना हॉल मध्ये 30 डिसेंबर रोज शनिवार ला शहरातील सुपरिचित आमेर बिल्डर अँड डेव्हलपर व्यावसायिक जमीर खान उर्फ जम्मूभाई यांच्या पुढाकारातून मुस्लिम जोडप्यांचा सामूहिक निकाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात एकूण 21 तरुण-तरुणींचे जोडपे विवाहबध्द होणार आहे.

या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी जमीर खान, हाजी रफिक शेख इब्राहीम, रज्जाकभाई पठाण, हाजी असलम चिनी, मो.एजाज, बबलू दिवाण, हाजी निसार अहेमद, हाजी ईसराईल खॉ शाबान खॉ, अकरमभाई, सुलेमान खान, हबीबभाई, शमशेर खॉन, सैय्यद अतिक, अशफाक खॉ मेहबूब खॉ, अन्वर अयाती, मुन्ना खॉन, साकीब इकबाल यांच्या सह मुस्लिम समाज बांधव परिश्रम घेत आहे.

दबावात शांततेत निर्णय घेणे हे बुद्धीबळ शिकवते - संजय खाडे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बुद्धीबळ हा प्राचिन आणि अस्सल भारतीय खेळ आहे. बुद्धीबळ एकाग्रता, सर्जनशीलता, आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. दबावात देखील शांतपणे नियोजन करणे आणि निर्णय घेणे हे बुद्धीबळ शिकवते. असे प्रतिपादन रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमीटेड,चे अध्यक्ष संजय खाडे यांनी केले. ते विदर्भस्तरीय बुद्धीबळ 2023 या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

मानवी जीवनात बळासोबत बुद्धीला देखील तेवढेच महत्त्व दिले आहे. मैदानी खेळ बळ वाढवते तर बुद्धीबळ हे मानसिक स्वास्थ उत्तम ठेवतं. कोणत्याही वयाचा मनुष्य हा खेळ खेळू शकतो. त्यामुळे बुद्धीबळ सारख्या खेळांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

रविवारी येथील शेतकरी मंदिरात सकाळी 10 वाजता मास्टर चेस अकादमी, वणी द्वारे विदर्भस्तरीय बुद्धीबळ 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होतं, या स्पर्धेचे उद्घाटन संजय खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. खाडे म्हणाले की, वणीत विदर्भस्तरीय स्पर्धा होणे ही एक अभिमानाची बाब आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आवारी, वासेकर, राजेंद्र कोरडे, अशोक नागभीडकर, रामदास कांबळे, महादेव सोनटक्के, भास्कर ढवस यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. 

विदर्भस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा 2023 ही खुल्या गटात होत आहे. या स्पर्धेतील सर्वात वयोवृद्ध स्पर्धक हा 85 वर्षाचा असून सर्वात लहान स्पर्धक हा अवघ्या 5 वर्षांचा आहे. या स्पर्धेत विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यातील एकूण 190 स्पर्धक सहभागी झाले आहे. 8 राउंड मध्ये ही स्पर्धा होणार असून आंतरराष्ट्रीय नियम या स्पर्धेला लागू राहणार आहे. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश ठावरी यांनी केले, तर संचालन संतोष बेलेकर यांनी केले. मास्टर चेस अकाडमीचे संचालक मारोती कांडागुर्ले यांच्या पुढाकारातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अकाडमीची टीम परिश्रम घेत आहे.

समाज जोडायचा असेल, तर समाजात जात नसली पाहिजे - डॉ. राजरत्न आंबेडकर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : समाज जोडायचा असेल, समाज म्हणून निर्माण व्हायचं असेल तर, पहिली गोष्ट समाजात जात नसली पाहिजे असे प्रतिपादन दी बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले, ते मारेगावातील धम्मक्रांती मेळावा आयोजित कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या विदर्भ मराठवाड्यात अजूनही पोटजातींचे राजकारण चालतं,असेही ते म्हणाले. 

परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त मारेगाव येथील बदकी भवन मध्ये धम्म क्रांती मेळाव्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी अभिवादन केले.

यावेळी बोलताना पणतू डॉ. आंबेडकर म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जात नष्ट करायला सांगितली, जात हिंदू धर्मात राहून नष्ट होणार नाही हे बाबासाहेबांना माहित होतं, त्यामुळे त्यांनी तो धर्म त्याग केला. आणि असा धर्म शोधून काढला ज्यात जात येत नाही. देशातील इतर धर्म बाबासाहेब यांना विनंत्या करित होते, सर्व काही द्यायला तयार होती, मात्र त्यांनी सर्व काही नाकारले. आणि बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भन्ते धम्मजोती, प्रमुख अतिथी राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव धबडगे, राज्य सचिव सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा अध्यक्ष सतीश इंगोले यांचेसह विजय भरणे, विजय लेले, विशाल इंगोले, अर्जुन बरडे तसेच मारेगाव तालुक्यातील बौद्धजन उपस्थित होते.

धम्म मेळाव्याचे संचालन संगीता कयापाक यांनी केले. प्रास्ताविक स्मिता पुनवटकर तर उपस्थितांचे आभार तेजस्विनी शंभरकर यांनी मानले.

धक्कादायक..जिवंत तारेचा स्पर्श होताच तरुण कामगाराचा मृत्यू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये मिस्त्री चे काम करत असताना एका 32 वर्षीय विवाहित कामगारांचा हाय होल्टेज च्या विद्युत प्रवाहाशी संपर्क आल्याने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दि.23 डिसेंबर ला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रफुल्ल विठ्ठल तिवाडे (वय 32) रा. मांगरुळ असे मृतकाचे नाव आहे. वाहिद शेख यांचे घरी संडास आणि बाथरूम चा स्लॅब टाकण्यासाठी काही मजूर कार्यरत होते.त्यात प्रफुल्ल हा संडास वर सळाख टाकत असतांना वरती असलेल्या 11 केव्हीच्या विद्युत पुरवठा होत असलेल्या जिवंत तारांना स्पर्श होताच विजेचा धक्का लागून प्रफुल्ल याला झटका लागला. दरम्यान, त्याला ताबडतोब मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी अंती प्रफुल यास मृत घोषित करण्यात आले.

मृतक प्रफुल याच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.घरावरील जिवंत विद्युत तारा प्रफुल च्या आयुष्याच्या कर्दनकाळ ठरला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

धनगर समाज गुण गौरव व समाज प्रबोधन मेळावा मार्डी येथे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मार्डी येथे दिनांक 25 डिसेंबर ला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगाव चे वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव,ज्येष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सत्कार आणि समाज प्रबोधन मेळावा तिरुपती मंगल कार्यालय मार्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. 
         
मार्डी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाजी कालर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित मेळाव्याचे उदघाटन राजमाता अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय संस्था यवतमाळ चे अध्यक्ष पांडुरंग खांदवे यांचे हस्ते होणार असून मार्गदर्शक म्हणून धनगर अधिकारी कर्मचारी संघ चंद्रपूर चे कार्याध्यक्ष प्रा.संजय बोधे, अहिल्यादेवी प्रबोधन मंच अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष अविनाश जानकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष कैलास उराडे आदी मान्यवरांचे उपस्थित राहणार आहेत.

वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील समस्त समाज बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे असे, आवाहन कार्यक्रमाचे आयोजक महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच मारेगाव,वणी,झरी जामनी,आणि राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फाउंडेशन मारेगाव या तालुका अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.

खेळासोबतच उद्योग धंद्याची कास धरा- माधव कोहळे

सह्याद्री चौफेर | वृत्सनाथा 

मारेगाव : मानवी जीवनात निरोगी शरीर निर्मिती साठी खेळाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे युवक- विद्यार्थ्यांनी खेळाला जीवनातला अविभाज्य घटक बानवावा सोबतच आर्थिक विकासासाठी सध्या सरकार औद्योगीकरणाला विशेष महत्व देत असुन शेतकरी भुमीपुञ युवकांनी शेतकरी उत्पादन कंपनी सारख्या कंपन्यांची स्थापना करून खेळासोबतच शेतीपुरक उद्योग निर्माण करुन आपल्या आर्थिक उन्नती साठी उद्योग धंद्याची कास धरावी असे प्रतिपादन जय जीजाऊ स्पोर्टींग क्लब वेगाव द्वारा आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना सामाजिक कार्यकर्ते माधव कोहळे यांनी केले.
       
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वेगावच्या सरपंच सौ.उषाताई देरकर ह्या होत्या.यावेळी मंचावर माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील देरकर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे,मालाताई गौरकर,विठ्ठलराव झाडे,मधुकर टोंगे,हुकेश नांदे,विकास सोनटक्के,भाऊ आसुटकर,भारत गौरकर,आविनाश काकडे इत्यादी उपस्थित होते.
    
कार्यक्रमाचे सुञसंचालन सुनिल किंगरे व आभार प्रदर्शन निखिल काकडे यांनी केले.स्पर्धेच्या आयोजनासाठी जितेंद्र गौरकार, संदीप फटाले,प्रशांत गौरकार,सचिन देवाळकर,वैभव देवाळकर,संतोष पिपराडे,साहील बदकी,संतोष फटाले,प्रविण मेश्राम ,प्रतिक टिकले,गिरीश जिवतोडे ,राहुल काकडे,रवि निखाडे,कौशिक गौरकार इत्यादींनी परिश्रम घेतले.

शिंदोला येथे भव्य यात्रा महोत्सवी रक्तदान शिबीराचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा रक्तदान शिबीर घेवून अनेक गरीब गरजवंत लोकांना जीवनदान देण्याचं आयोजन शिव बहुउद्देशीय संस्था व संजय निखाडे मित्र परिवार, शिंदोला करित आहे. भव्य यात्रा महोत्सव निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी (2024) मध्ये सुद्धा भव्य रक्तदान शिबीर सोमवार दि. 1 जानेवारी ला सकाळी 10 ते 4 वाजे पर्यंत शिवेचा मारोती देवस्थान, शिंदोला येथे होणार आहे.

या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय, रक्तपेढी चंद्रपूर यांच्या उपस्थितीत पार पडणार असून या महोत्सवी समाज प्रबोधनात्मक किर्तन दुपारी 12 वाजता ह.प.भ.कांचनाताई शेळके यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
धार्मिक तथा विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून येत्या 1 जाने. ते 5 जानेवारी 2024 या पाच दिवसाच्या महोत्सवी भव्य रक्तदान शिबिरास, भव्य यात्रा महोत्सव यात्रेत तालुक्यातील जनतेनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान, महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन माजी सदस्य संजयभाऊ निखाडे व संजय निखाडे मित्र परिवार यांचे वतीने करण्यात आले आहे.

विशेष उल्लेखनीय की, या शिबिरात प्रथम 100 रक्तदात्यांना 20 लि. पाण्याची कॅन उपहार स्वरूपात येणार आहे. तसेच  ज्यांना या यात्रेत आपल्या प्रतिष्ठान, दुकाने थाटायची असतील त्यांनी समितीच्या सदस्यांकडे संपर्क साधावा अशी माहिती आयोजन समिती कडून देण्यात आली आहे. 

पोलिस स्टेशनला न जाता घरबसल्या मोबाईलवरून करा ऑनलाईन तक्रार..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पोलिस स्टेशनमध्ये न जाताही तुम्ही तुमची फिर्याद करु शकता. कारण तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज पडत नाही, तुम्ही घरी बसूनही सहज तक्रार सहज नोंदवू शकता. यालाच ऑनलाईन तक्रार करणे म्हणतात. ऑनलाइन तक्रार कश्या प्रकारे करायची जाणून घ्या..

 गुन्ह्यांचे वर्गीकरण साधारण दोन प्रकारात केले जाते
१) अदखलपात्र गुन्हा 
२) दखलपात्र गुन्हा 

अदखलपात्र गुन्हा - म्हणजेच फारसे गंभीर नसलेले गुन्हे, हे खाजगी स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ फसवणूक, त्रास देणे, सार्वजनिक उपद्रव इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात कोणताही पोलिस अधिकारी न्यायदंडाधिकारी यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करू शकत नाही.

दखलपात्र गुन्हा – म्हणजे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उदाहरणार्थ चोरी, बलात्कार, हत्या, खंडणी, इत्यादी. या स्वरूपाच्या गुन्ह्यात एफआयआर दाखल करणं गरजेचं असतं.

आपल्याकडे अशी उदाहरणे समोर आहेत, जिथे पोलिस अधिकारी तक्रार घेण्यास नकार देतात. अशा प्रथा टाळण्यासाठी, ऑनलाइन तक्रार नोंदवणे चांगले आहे, कारण ते नेहमीच रेकॉर्डवर असते. ते पोलिस हटवू शकत नाहीत. जे पोलीस अधिकारी आपली कर्तव्य बजावत नाहीत त्यांना काम करण्यास ऑनलाइन तक्रार भाग पाडू शकते. आणि तक्रारदारास यावर त्वरित उपाय मिळतो.

ऑनलाइन तक्रार कशी केली जाते?
ऑनलाइन तक्रार करण्यासाठी राज्य पोलीस वेबसाईटवर जावे लागते आणि वेबसाईट वरील दाखवलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन तक्रारची वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/Login.aspx

हरवलेल्या मोबाईलची तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा https://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/MobileMissingForm.aspx

एफआयआर नोंदवताना, गुन्हा घडलेली नेमकी जागा, नेमका हा गुन्हा कधी घडला ती नेमकी वेळ, माहिती असल्यास गुन्हेगाराचे नाव, नाव माहिती नसल्यास त्याचे अचूक वर्णन, गुन्हा घडताना आजूबाजूला कोण व किती माणसे होती, त्याचा तपशीलवार व अचूक वर्णन, हा गुन्हा कोणत्या स्वरूपाचा होता इत्यादी. हे तपशीलवार लिहिणे आवश्यक आहे. प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र पोलीस वेबसाईट आहे. सध्या गुन्हा नोंदवण्याची ऑनलाइन पद्धतीत ही सर्वात सुरक्षित आणि सोयीची आहे.


मुलांची निवासी शाळा दुराव्यस्थेत, दुरुस्ती व चौकशीची मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाअंतर्गत परसोडा (वणी) येथील शासकिय अनुसुचीत जाती मुलांची निवासी शाळेची इमारत (वसतीगृहाची) येत्या फक्त १२ वर्षात पडण्याच्या अवस्थेत आलेली आहे, त्यामुळे या बांधकामाची चौकशी करुन संबंधित प्रशासनावर कार्यवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मा. सहाय्यक आयुक्त साहेब समाज कल्याण विभाग, यवतमाळ यांना देण्यात आले. 

वणी तालुक्यातील परसोडा रोड येथे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग अंतर्गत शासकीय अनुसुचीत जाती करिता निवासी शाळा बांधण्यात आली. सदर मुलांची निवासी शाळेचा लोकार्पण सोहळा दि. १०/११/२०१२ रोजी पार पडला. तेव्हापासुन त्या इमारतीकडे सामाजिक न्याय विभागाने पुर्णत: दुर्लक्ष केले. आज त्या पडक्या इमारतीमुळे सर्व विद्यार्थ्यांना मारेगांव येथे स्थलांतरीत करण्यात आल्यामुळे त्यांचा विनाकारण भ्रूदंड आज शासनास पडत आहे. या गंभीर विषयाकडे सामाजिक विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून येथील निवासी शाळा अत्यन्त दुराव्यस्थेत असल्याने त्या इमारतीची दुरुस्ती व बांधकामच्या चौकशीची मागणी होणे आवश्यक आहे. 

त्या वसतीगृहात खालील सुविधांचा अभाव आहे.

१) पिण्याच्या पाण्याची बोअर नादुरुस्त आहे. तसेच लाखो रुपयाचे वृक्षारोपण करुन ते झाडे पाण्याअभावी सुकत आहे.
२) बिल्डींगचे पूर्ण पिल्लर, वॉल कंपाऊंड, भिंती पडक्या अवस्थेत आहे.
३) डोमच्या टिना सुद्धा पुर्णत: नाहीशा झाल्या आहेत.
४) वसतीगृहाकडे जाणारा डांबरीकरणाचा रोड सुद्धा पुर्णता उखडलेला आहे.

त्यामुळे शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्यांना दुसऱ्या तालुक्यात स्थलांतरित केले. परिणामी या बिल्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करुन संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी. २०१२ पासुन ते आजपर्यंत देखभाल दुरुस्तीवर झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आली आहे. दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन विद्याथ्यांना होणारी गैरसाय टाळून न्याय द्यावा, असे लढा संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण खानझोडे, अ‍ॅड. रुपेश ठाकरे, राहुल क्षीरसागर, शरद सुरपाम, मंगेश येटे, राजू मडावी, संगीता पेंदोर, किरण मडावी, सुवर्णा चांदेकर आदी उपस्थित होते.