Page

समाज जोडायचा असेल, तर समाजात जात नसली पाहिजे - डॉ. राजरत्न आंबेडकर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : समाज जोडायचा असेल, समाज म्हणून निर्माण व्हायचं असेल तर, पहिली गोष्ट समाजात जात नसली पाहिजे असे प्रतिपादन दी बुद्धीष्ट सोसायटी ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले, ते मारेगावातील धम्मक्रांती मेळावा आयोजित कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या विदर्भ मराठवाड्यात अजूनही पोटजातींचे राजकारण चालतं,असेही ते म्हणाले. 

परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त मारेगाव येथील बदकी भवन मध्ये धम्म क्रांती मेळाव्यात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी अभिवादन केले.

यावेळी बोलताना पणतू डॉ. आंबेडकर म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जात नष्ट करायला सांगितली, जात हिंदू धर्मात राहून नष्ट होणार नाही हे बाबासाहेबांना माहित होतं, त्यामुळे त्यांनी तो धर्म त्याग केला. आणि असा धर्म शोधून काढला ज्यात जात येत नाही. देशातील इतर धर्म बाबासाहेब यांना विनंत्या करित होते, सर्व काही द्यायला तयार होती, मात्र त्यांनी सर्व काही नाकारले. आणि बौद्ध धर्म स्वीकारला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भन्ते धम्मजोती, प्रमुख अतिथी राज्य अध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव धबडगे, राज्य सचिव सिद्धार्थ गायकवाड, जिल्हा अध्यक्ष सतीश इंगोले यांचेसह विजय भरणे, विजय लेले, विशाल इंगोले, अर्जुन बरडे तसेच मारेगाव तालुक्यातील बौद्धजन उपस्थित होते.

धम्म मेळाव्याचे संचालन संगीता कयापाक यांनी केले. प्रास्ताविक स्मिता पुनवटकर तर उपस्थितांचे आभार तेजस्विनी शंभरकर यांनी मानले.