Page

सचिव-सरपंचाची तक्रार मारेगाव गटविकास अधिकारी यांच्या दालनात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या डोलडोंगरगाव गटग्रामपंचायत कडून मनमानी कारभार व अन्य सदस्यांना डावलून कामे करित असल्याबाबत चे निवेदन तालुक्यातील पंचायत समिती, तहसील कार्यालय यांना दीडशे नागरिकांच्या स्वाक्षरीचे देण्यात आले.
सचिव-सरपंच हे कामे योग्यरित्या करीत नाहीत, शिवाय ग्रामपंचायतचे उपसरपंच व अन्य सदस्य यांना विश्वासात न घेता आपल्याच मताने मनमानी कारभार करित असल्याचे त्यांची तक्रार आहे. निवेदनातून त्यांची तक्रार अशी आहे की, 
आमदार फंडातील पाण्याची १०० कॅन लिलाव न करता परस्पर सरपंच सचिव व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विकल्या, उपसरपंच यांना शिक्का बनवण्यास टाळाटाळ केल्या जात आहे, आमदार फंडातील फिल्टर पाण्याची वसुली दर महिन्याला जमा वसुलीचा हिशोब देत नाही, जल मिशन योजनेंतर्गत कामे पाईप बोरवेल ट्यूबवेल न करता साधे बोरवेल केले, लाखापूर येथील जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीचे काम अपुरे, मात्र काम पूर्ण केल्याचे बिल काढण्यात आले, ग्रामसभेचा ठराव न घेता शबरी घरकुल योजनेमध्ये समाविष्ट यादी तयार न करता लाभार्थ्यांची परस्पर निवड करण्यात आली, व ग्रामसभेमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, तलाठी, आरोग्य सेविका, कृषीसहाय्यक, महावितरण, कर्मचारी, शिक्षक वर्ग, पोलीस पाटील, या कर्मचाऱ्यांना हजर राहण्याबाबतच्या नोटीस दिल्या जात नाहीत. 
त्यामुळे गट ग्रामपंचायत सचिव-सरपंच व कर्मचारी यांनी गावातील कामे योग्यरीत्या न करता व सदस्यांना विचारात न घेता योग्यरित्या कामे करीत नसून ग्रामपंचायत हद्दीतील कामाची चौकशी करून संबंधितावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मडावी यांना व तहसीलदार निलावाड यांना देण्यात आले आहे.
यावेळी उपसरपंच शोभा बलकी, ग्रामपंचायत सदस्य आकाश भोसले, बेबीबाई पवार, अरुण बट्टे, यांचेसह योगीराज बलकी, पंकज बलकी, अमोल डावे, विनोद मेश्राम, स्थानिक बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, सभासद व गावातील असंख्य महिला, पुरुष उपस्थित होते.