मोठी बातमी: खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर आपली अमीट छाप उमटविणारे व अगदी कमी कालावधीत सर्वोच्य राजकीय कामगिरी करणारे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे आज दिनांक 30 मे रोज मंगळवार ला दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये रात्री 2.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

आज दिनांक 30/05/2023 ला मंगळवार ला त्यांचा मृतदेह एअर एम्बुलन्स न्यू नागपूर ला व नंतर वरोरा येथे आणण्यात येणार आहे व त्यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी 2.00 वाजेपासून ते 4.00 वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे.

त्यांच्या पश्चात आ.पत्नी, आई, भाऊ, दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे. या दुःखद घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात शोककळा पसरली.

खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा राजकीय प्रवास 
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्का करणारा प्रवास होता.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.

2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.