Page

सासरच्यांचा राग जावयाने निष्पाप बैलांवर काढला

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील पेटूर येथे बैलांना विष पाजून ठार केल्याची घटना 22 डिसेंबरला उघडकीस आली. गणपत रामाजी ठावरी (61) यांच्या मालकीचे हे बैल होते. अज्ञात व्यक्तीने निष्पाप बैलांचा बळी घेतल्याने गणपत ठावरी हे अतिशय दुखावले. शेती कसण्याचा आधार असलेले बैल जीवे मारल्याने गणपत ठावरी यांचं मोठं नुकसान झालं. त्यांनी याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
शहरालगत असलेल्या पेटूर येथील घटनेला अंजाम देण्यासाठी पोलिसांनी तपासाची दिशा ठरवतांना आधी फिर्यादीच्या नातेवाईकांवर लक्ष केंद्रित केले. तपासादरम्यान पोलिसांच्या लक्षात आले की, जावई व सासरच्या मंडळींमध्ये खटके उडाले असून त्यांच्यात आपसी मतभेद सुरु आहेत. पोलिसांनी जावयावर फोकस करीत तपास केला असता जनावरांच्या हत्येचा सूत्रधारच तो निघाला. जावयानेच थीमर हे विषारी द्रव्य पाजून 3 बैलांचा जीव घेतल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी आज 25 डिसेंबरला दुपारी 2.15 वाजता संदीप बंडू वाढई रा. वडजापूर या आरोपीला अटक केली. सासरच्यांनी बायकोला (मुलीला) माहेरी नेल्याच्या रागातून जावयाने बैलांना विषारी द्रव्य पाजून ठार मारल्याची कबुली दिली. कौटुंबिक वादातून निष्पाप बैलांचा जीव घेतल्याने संदीप वाढई या आरोपी विषयी जन माणसातून संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी  आरोपी जावयाला अटक केली असून, त्याच्यावर भादंवि च्या कलम 429 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. परंतु त्यानंतरही त्याने पोलिस स्टेशनला तक्रार का? केली म्हणून सासरच्या मंडळीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अमोल गणपत ठावरी या त्याच्या साळ्याने पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी परत आरोपी जावयावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलिस करीत आहे.