Page

खदखद मास्तर प्रा.कराळे यांची एन्ट्री मारेगावात पर्वणी ठरली..

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : सुदृढ लोकशाहीत प्रश्न विचारण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रगल्भ व सर्वसमावेशक लोकशाहीसाठी प्रश्न उपस्थित करणे ही नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत प्रा नितेश कराळे फिनिक्स अकॅडमीचे संचालक यांनी व्यक्त केले.

मारेगाव तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर ते बोलत होते. संविधानिक अधिकार आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. खद खद मास्तर,फिनिक्स अकॅडमीचे संचालक प्रा नितेश कराळे सर यांच्या भरगच्च व्याख्यानासाठी तालुक्यातील हजारों विद्यार्थी विद्यार्थीनी व नागरिक उपस्थित होते.
अभ्यास कसा करावा याबाबत माहिती देताना श्री. कराळे यांनी पुढे सांगितले की, अभ्यास करताना "अजिबात टेंशन घ्यायचं नाही. जसं जमेल तसं अभ्यास करायचं". स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करतांना तीन गोष्टी कडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. अनावश्यक न सांगितलेलंच बरं...दरम्यान,विद्यार्थी व नागरिकांना हसू आवरता आले नाही. त्यांनी त्यांच्या खास अस्सल वऱ्हाडी भाषेत स्पर्धा परीक्षेत कसं यश मिळवायचं हे खद खद खदून सांगितले. महागाई, आर्थिक, बेरोजगारी भरकटलेला विद्यार्थी यावर प्रामुख्याने सांगताना नागरिक व विद्यार्थ्यांनी पोट धरून हसण्याचा मनमुराद आनंद लुटला. या प्रसंगी बोलतांना कुणाचे समर्थन न करता सडेतोड बोलून विद्यार्थ्यामध्ये पॉजिटीव्ह वातावरण निर्माण करून व वडिलांना शेत कामात मदत करा, काम काम असते, मग छोटं मोठं कोणतंही असो कामाची लाज नसावी असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला मंचावर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्रा डॉ अविनाश घरडे सर, हे अध्यक्षस्थानी होते, श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. देविदासजी काळे, लोढा मल्टीस्पेशालिटीचे संचालक डॉ महेंद्र लोढा हे स्वागतध्यक्ष होते, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ विदर्भ प्रदेश अध्यक्ष केशवजी सवळकर, जिल्हाअध्यक्ष अनिल राठोड, सामाजिक कार्यकर्ते विजय बोथले, अविनाशजी लांबट (उपसरपंच), शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन कापसे, ठाणेदार राजेश पुरी,कार्याध्यक्ष दीपक डोहणे, यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

खदखद मास्तर यांची एन्ट्री मारेगावात पर्वणी ठरली. अलीकडच्या स्पर्धा परीक्षा, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या व विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी आपल्या अभिनव शैलीतून प्रा कराळे सरांनी मार्गदर्शन केले. यावेळी वणी,मारेगाव तालुक्यातील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व नागरिकांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजेश चवरे, पत्रकार संघाचे रोहन आदेवर यांनी प्रास्ताविक तर प्रा.गजानन सोडनर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गोवर्धन, तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम, उपाध्यक्ष कुमार अमोल कुमरे यासह प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ व महाविद्यालय कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.