Page

वणीचे शाखा कार्यालय बंद करून सहारा इंडियाने गुंडाळला गाशा, गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यात जमा

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्या ग्राहकांचे पैसे परत मिळण्याची आशा आता मावळू लागली आहे. सहाराची वणी येथील शाखा मागील काही दिवसांपासून बंद झाल्याने ग्राहकांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटू लागली आहे. नागरिकांना विविध आमिषे दाखवून गुंतवणूक क्षेत्रात उतरलेली सहारा इंडिया ही दिवाळखोरीत निघाल्याने नागरिकांनी सहारामध्ये गुंतवलेले कोट्यावधी रुपये परत मिळतील की नाही, ही भीती गुंतवणूकदारांना वाटू लागली आहे. मागील दहा ते बारा वर्षांपासून ग्राहकांना सहाराने पैशाची परतफेड केलेली नाही. सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा कालावधी भरल्यानंतरही ग्राहकांना भूलथापा व प्रलोभने देऊन आणखी कालावधी वाढविण्यास अधिकाऱ्यांनी भाग पाडले. त्यानंतर एक एक महिना मुदतवाढ देत वेळ मारून नेली. ग्राहक सहारा कार्यालयाचे उंबरठे झिजवून मेटाकुटीस आले. पण सहाराकडून ग्राहकांना नुसते महिनेच वाढवून मिळाले. त्यापलीकडे आणखी काहीही मिळाले नाही. वाढीव व्याजदर देण्याचे गाजर दाखवून ग्राहकांची पूर्ती फसवणूक करण्यात आली. सेबीकडे सहाराचे पैसे जमा असून सेबी लवकरच गुंतवणूकदारांचे पैसे देणार असल्याचा बनाव करण्यात आला. जोपर्यंत सहाराची वणीत शाखा सुरु होती, तोपर्यंत पैसे परत मिळण्याची ग्राहकांना एक आस होती. पण आता सहाराची वणीतील शाखाच बंद झाल्याने ग्राहक चिंतेत आले आहेत. पैशाची परतफेड होईल की नाही, या काळजीने ते ग्रासले आहेत. ग्राहकांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहाराविरुद्ध येथील एका राजकीय नेत्याने दंड थोपटले होते. सहारा अधिकाऱ्याच्या कानशीलातही लगावली होती. राजकीय नेत्याच्या पुढाकाराने पैसे परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण नंतर त्याचा पाठपुरावाचं झाला नाही. परिणामी गोरगरिबांनी सहारावर विश्वास ठेऊन गुंतवलेला घामाचा पैसा आता बुडल्यात जमा झाला आहे. 

सहारा इंडियाने संपूर्ण भारतात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. सहारा एअरवेज, सहारा एंटरटेनमेंट व न्यूज चॅनल, सहारा क्रिकेट, सहारा सिटीज यामुळे सहारा इंडियाचं देशाबरोबरच विदेशातही नाव लौकिकस आलं होतं. आर्थिक समृद्धता ही सहाराची ओळख बनली होती. त्यामुळे गुंतवणूकदारही सहारा इंडियाकडे आकर्षित झाले. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत रक्कम दुप्पट होण्याचा सहारा इंडियाचा कालावधी कमी असल्याने सामान्य वर्गाने मोठ्या प्रमाणात सहारामध्ये गुंतवणूक केली. सुरुवातीचे काही वर्ष ग्राहकांना पैसाही बरोबर मिळाला. पण २०११ नंतर सहाराचं गणित बिघडलं. गुंतवणूकदारांना पैसे देतांना टाळाटाळ होऊ लागली. फिक्स बॉण्डची मुद्दत भरल्यानंतरही पैसे न देता कालावधी वाढवून देण्यात येऊ लागला. नागरिकांनी काही काळ त्यांची टोलवाटोलवी सहन केल्यानंतर नागरिक पैशासाठी आक्रमक होऊ लागले. पण तरीही पैसे न मिळाल्याने ग्राहकांच्या चिंता वाढू लागल्या. आता तर सहाराची वणीतील शाखाच बंद झाल्याने गुंतवणूकदारांच्या उरात धडकी भरली आहे. कष्टातून पै पै जमा करून गुंतवलेला पैसा सहारा बुडवणार तर नाही ना, या काळजीने ग्राहकांची झोप उडाली आहे. कुणी मुलांच्या लग्नासाठी गुंतवणूक केली होती. तर कुणी घराचे स्वप्न पहिले होते. कुणी शिक्षणासाठी तर कुणी भविष्याच्या नियोजनासाठी गुंतवणूक केली होती. पण सहारा इंडियाने ग्राहकांची फसवणूक करून त्यांचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. गोरगरिबांनी गुंतवणूक केलेले कोट्यावधी रुपये सहाराच्या घशात जाण्याची चिन्हे दिसत आहे. सेबीकडे पैसे जमा असल्याची बतावणी करून ग्राहकांची आजवर बोळवण करणाऱ्या सहाराने आता सेबी पैसा देत नसल्याचे सांगत हात वर केल्याने गुंतवणूकदार कमालीचे संकटात आले आहेत. सहारा इंडिया या नामांकित खाजगी बँकेने ग्राहकांची फसवणूक केल्यानंतर नागरिकांचा आता खाजगी बँकांवरील विश्वास उडू लागला आहे. आता सहाराने बोट दाखविलेल्या सेबीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असून गोरगरीब गुंतवणूकदारांचा पैसा परत मिळवून देण्याकरिता शासनाने मध्यस्थी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.