Page

चंद्रपूर-बल्हारपूर मार्गावरील रस्त्यालगतचे झुडपी जंगल साफ करण्याची वंचितने केली मागणी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : बल्लारपूर ते चंद्रपूर मार्गावर दररोज कामावर ये-जा करणारे कामगार व नोकरदार यांना रात्री-बेरात्री या मार्गावरून प्रवास करावा लागतो. सदरहु महामार्ग हा झुडपी जंगलाने व्यापलेला असून रस्त्यालगतच मोठे झुडपी जंगल तयार झाले आहे. चार दिवसांपुर्वी एका पाेलिस अधिकाऱ्याला हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जिव गमवावा लागला. या घटनेमुळे प्रवास करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्याला लागून असलेल्या झुडपी जंगलालगतचा आजूबाजूचा परिसर किमान पंचवीस मीटरपर्यंत स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांनी काल केली.
   
या महामार्गावर पेपर मिल, डब्ल्यूसीएल कर्मचारी, कामगार तसेच इतर प्रवासी रात्री बे-रात्री या मार्गाने प्रवास करीत असतात. सदरहु महामार्गालगतच झुडपी जंगल असल्यामुळे हिंस्त्र प्राण्यांचा वावर अधिक वाढलेला आहे. हिंस्त्र प्राण्यांचा कधीही हल्ला होऊ शकतो. तसा प्रकार अनेकदा येथून ये-जा करणांऱ्या सोबत घडलेला आहे. काल परवाच एका पोलिस अधिकाऱ्याला आपला जीव बिबट्याच्या हल्ल्यामुळे गमवावा लागला. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन महामार्ग लगतचे झुडपी जंगल साफ करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
    
उपरोक्त मागणी पूर्ण झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन झुडपी जंगल स्वतः स्वच्छ व साफ करेल व संपूर्ण कचरा संबंधित प्रशासनाच्या कार्यालयामध्ये आणून टाकेल असा इशारा प्रशासनाला एका निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे, संपत कोरडे, सचिन पावडे, नवीन डेविड, व स्नेहल साखरे उपस्थित होते.