Page

आदिवासी हा सृजनाचा धनी - प्रा. डॉ.नरेंद्र आरेकर



सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (११ ऑक्टो.) : विध्वंस करणा-यांच्या व या देशाच्या अन् सत्तेच्या नजरेत आदिवासी म्हणजे अजब प्राणी असे सांगून कुसुम ताई अलामची कविता रानातील जखमा अंगभर गोंदवून सारा आतंक थांबवण्यासाठी आपली पाऊलवाट राजपथावर नेण्यासाठी सज्ज झाली असल्याचे प्रतिपादन 'रान जखमांचे गोंदण' या कुसुम ताई अलाम यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रसंगी सुप्रसिद्ध वक्ता तथा आदिवासी अभ्यासक प्रा. डॉ.नरेंद्र आरेकर यांनी व्यक्त केले.

चंपा सोनकुफरा व सोनबत्ती करसाल,हरतीन घाटघुमर या दोन्ही निरक्षर आदिवासी महिलांच्या हस्ते कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले, यावरुन कुसुम ताई अलाम यांचे सामाजिक भान लक्षात येते. असेही ते या वेळी बाेलतांना पुढे म्हणाले. क्रांतीवीर सिताराम कंवर यांच्या शहिद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिवासी साहित्य व समाज संस्कृती यावर प्रबोधन करण्यात आले.

याप्रसंगी गावकरी मंडळीनी वाजत गाजत मिरवणूक काढून क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. नंतर शहिद सिताराम कंवर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव गावळ तथा वर्षाताई पडघन यांनी स्रीयांवर होणारे अत्याचार व कायदे यांची माहिती या वेळी दिली. कुरखेडा येथील नायब तहसीलदार ए.बी.मडावी यांनी आदिवासींच्या विकासाच्या विविध योजनांची माहिती सांगितली.

सुप्रसिद्ध कवयित्री कुसुम ताई अलाम यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, वर्तमानातील परिस्थिती पाहता आपणावर संकटांची टांगती तलवार आहे. आदिवासी महिलांवर समाजाची अधिक जबाबदारी आहे. यासाठी जागृत होऊन एकजुटीने सक्षमपणे सोबत राहा. आदिवासी संस्कृती ही सामुदायिक आहे. तिचे जतन करा त्यामुळे आपली सुरक्षा होते.

या वेळी धिसु खुणे, नंदकिशोर नैताम, अरुण सोयाम धरमदास ऊईके, विरेंद्र मोहुर्ले, संजय कोकोडे, पुंडलिक नैताम, मनोहर सोनवणी, गोविंद टेकाम यांची प्रामुख्याने उपस्थिती हाेती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.मेघराज कपूर, संचालन महेंद्र सोनकुफरा, तर उपस्थितांचे आभार निलकंठ बखर यांनी मानले. या कार्यक्रमाला बहुसंख्येने गावकरी व समाजबांधव उपस्थित होते.