सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
चंद्रपूर, (१२ जुलै) : जिल्ह्यातील जिवती -तालुका निर्मितीला दोन दशके लोटली पण तालुक्याचा पाहिजे तेवढा विकास झाला नाही. आजच्या घडीला पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे अखे शहरच चिखलमय पाहायला मिळत आहे. जिवती तालुका चंद्रपूर जिल्ह्याचा एक भाग असला तरी येथे विकास मात्र, शून्यातच दिसतो आहे.
तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, पोलीस स्टेशन, नगरपंचायत कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय असे अनेक विभागाचे कार्यालय आहेत परंतु जिवती शहर हे विकासापासून दूरच दिसते. येथील मुख्य रस्ते हे रिमझिम पावसातही चिखलाने माखलेले असतात. बस स्टॅन्ड चौक ते शेडमाके चौकापर्यंत मुख्य रस्त्याच्या दोन्ही कडेला नागरपंचायतींने नाल्या बांधल्या असल्या तरी रस्त्याचे काम न झाल्याने पावसात हा रस्ता चिखलमय होत असते.
शेडमाके चौक ते तहसील कार्यालयाकडे जाणार रस्त्याचीही तीच दुर्दशा आहे चिखल आणि रस्त्यावर पाणी साचून असल्यामुळे गाडीवर ये जा करणारे बरेच लोक पडत असतात. मात्र जिवती नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत असल्यामुळे नागरिकांत चीड निर्माण होत आहे.
शहरातील अनेक वार्डाचीही तीच गत आहे,अनेक ठिकाणी नाल्या नसल्याने दुर्गंधी पसरल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून आलेले आहे.