सह्याद्री न्यूज | राजविलास
यवतमाळ, (१५ जुलै) : यवतमाळच्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर आर्णी बायपास परिसरात कार आणि दुचाकीमध्ये एक भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. मृत तिघेही आर्णीहून यवतमाळच्या दिशेने निघाले होते. यावेळी समोरून येणाऱ्या कारने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वारांची नावं दीपक मेश्राम, नथ्थू कुमरे आणि संदिप आत्राम अशी आहेत. हे तिघेही दुचाकीवर बसून यवतमाळच्या दिशेने जात होते. नागपूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरुन जात असताना हे तिघेही आर्णी बायपासजवळ आले. मात्र, समोरुन अचानकपणे एक कार आली. अचानकपणे आलेल्या या कारने तीन दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. कारचा वेग जास्त असल्यामुळे हे तिघेही रस्त्याच्या दूर फेकले गेले. तसेच अपघात गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे तिघेही जागीच ठार झाले.
दरम्यान, नव्यानेच तयार झालेल्या या मार्गावर अनेक जण बायपास मार्गे आर्णीला ये-जा करतात. यावेळी प्रवासादरम्यान चुकीच्या दिशेने आल्यामुळे येथे भीषण अपघात घडतात. यापूर्वीसुद्धा या ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. या ताज्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाल्यामुळे आता आर्णी बायपासवर काहीतरी ठोस उपायोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.