Page

शेत रखवालदार कुटुंबातील महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी दोन आरोपीना अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१३) : शेत मजुरी करून शेतातीलच बंड्यात राहणाऱ्या रखवालदार कुटुंबातील महिलेचा हात पकडून विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. महिलेवर पाळत ठेऊन असलेल्या दोघाजणांनी वाईट उद्देशाने तिचा हात धरून तिला ओढत नेण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने ताकतीनिशी आरोपींच्या हाताला झटका देऊन पतीकडे धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकाराने घाबरलेल्या पती पत्नीने पोलिस स्टेशन गाठून रीतसर तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल १२ जूनला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मजरा येथील एका शेतात घडली. 
तालुक्यातील मजरा या गावा लगत नागराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचं शेत असून शेतातील बंड्यात शेत रखवालदार म्हणून एक कुटुंबं राहतं. दिवसभर शेतात मजुरी करून रात्री शेताची रखवाली करण्याचं काम ते करतात. नेहमी प्रमाणे रखवालदार कुटुंबातील ३० वर्षीय महिला शेतातील कामे करीत असतांना तिच्या पाळतीवर असलेल्या दोघाजणांनी शेतात प्रवेश करून काही कळायच्या आत तिचा हात धरून ओढाताण करण्याचा प्रयत्न केला. तिने ताकदीनीशी आरोपींच्या हाताला झटका मारून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला. या प्रकाराने घाबरलेल्या पती पत्नीने पोलिस स्टेशनला येऊन घडलेल्या घटने बाबत तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक केली. विनोद संभाजी गेडाम (४५) रा. नांदेपेरा व आकाश अशोक किनाके (१९) रा. पोहणा अशी या आरोपींची नावे आहेत. संभाजी गेडाम हा काही दिवसांपूर्वी याच शेतात काम करीत असल्याचे समजते. नंतर तो काम सोडून नांदेपेरा येथे राहू लागला. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि च्या कलम ३५४(ड)(अ), ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार जगदीश बोरनारे करीत आहे.