Page

युवक व विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चा

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (ता.३०) : मराठा समाजाला गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर मिळालेले आरक्षण राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रद्द झाल्याने मराठा समाजातील गोरगरीब, मोलमजुरी, करणाऱ्या मराठा समाज बांधवांचे तसेच विद्यार्थी व युवकांचे शैक्षणिक व आर्थिक (नोकरी) नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यातूनच मराठा समाजामध्ये सरकारच्या विरोधात एक असंतोषाची लाट पसरलेली आहे. 
मराठा समाज आरक्षणप्रश्नी अनेक वर्षांपासून सरकार दरबारी व कायदेशीर लढाई लढणारे, गोरगरीब, वाडी-वस्तीवरील समाजाला मुख्य प्रवाहात त्यांच्या विविध अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणारे आ. विनायकरावजी मेटे साहेब यांनी राज्यसरकारला वेळोवेळी जागे करण्याच्या प्रयत्न केला. परंत्तू सरकारच्या आडमुठे धोरणाचा व दिरंगाईचा फटका सर्वसामान्य कष्टकरी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या विरोधाभासी भूमिकेमुळे रद्द झालेले आरक्षण पुन्हा देण्यात यावे व अन्य काही मागण्यांसाठी मा.आ. विनायकारावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली दिनांक ५ जून रोजी बीड मध्ये होणाऱ्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसंग्राम युवक आघाडी शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
मागील सरकारच्या काळात निघालेल्या ५८ क्रांती मूक मोर्चा व ४२ युवकांच्या बलिदानातून मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्यात आले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या वतीने या आरक्षणाची नीट मांडणी न होऊ शकल्याने २६ मार्च रोजी सर्वोच्य न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. या आरक्षणातून मिळणारे सर्वच लाभातून होतकरू, प्रामाणिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थी व युवकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. ओबीसी व मुस्लिम समाज हा मराठा समाजाला आपला मोठा भाऊ मानत असून मोठ्या भावांचे हेच शैक्षणिक नुकसान येत्या महाविद्यालयीन प्रवेशाच्या काळात होऊ नये, यासाठी बीड जिल्ह्यातून आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व समाज बांधवांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चात ओबीसी समाजातील युवक ही सहभागी होणार असल्याचे यावेळी प्रशांत डोरले यांनी कळवले आहे. यावेळी सुमित झाडीवाले, सलमान अली, अर्जुन यादव, प्रेम धायजे, ज्ञानेश्वर सालपे सह अन्य युवक उपस्थित होते.