सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरातील भीषण पाणी समस्या, वणी शहरात वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा, शेतक-यांचे विविध प्रश्न इत्यादींवर वणीत गुरुवारी दिनांक 13 जून रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवशीय धरणे आंदोलन झाले. संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला. एका आठवड्यात प्रशासनाने या समस्येवर योग्य ती कार्यवाही केली नाही, तर काँग्रेसतर्फे उपोषण केले जाईल, असा इशारा संजय खाडे यांनी दिला.
दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन मंडपी काँग्रेसच्या विविध स्थानिक नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली. त्यानंतर कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
वणी शहराची पाणी समस्या सोडवण्यासाठी रांगणा भुरकी येथे वर्धा नदीवर पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र ही योजना कुचकामी ठरली. याठिकाणी कायम स्वरूपी विहिरीचे बांधकाम करावे, या योजनेला एक्सप्रेस विद्युत फिडर जोडण्यात यावा, वणी शहरात व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होत असलेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. इत्यादी मागणी निवेदनातून करण्यात आल्या.
आंदोलनात अॅड. देविदास काळे, राजाभाऊ पाथ्रडकर, पुरुषोत्तम आवारी, प्रशांत गोहोकर, प्रमोद वासेकर, प्रकाश मॅकलवार, वंदना आवारी, संगिता खाडे, साधना गोहोकर, निलिमा काळे, सुनिल वरारकर, प्रवीण बद्दमवार, अशोक चिकटे, तेजराज बोढे, जयसिंग गोहोकर, राजाभाऊ बिलोरिया, उत्तमराव गेडाम, सईद सपाट, बाबाराव गेडाम, प्रफुल्ल उपरे, सुरेश बनसोड, वामनराव कुचनकर, राकेश खुराणा, इजहार शेख, अमित सांगे, अलका महाकुलकर, आशा टोंगे, सविता रासेकर, किरण कुत्तरमारे, मंदा सोनारकर, प्रेमनाथ मंगाम, सुरेश रायपुरे, विकेश पानघाटे, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक, वणी शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी, वीज, शेतक-यांच्या समस्या यावर प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र या मागण्यांना केराची टोपरी दाखवण्यात आली. यावेळी प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टीमेटम दिला जात आहे. आमच्या मागण्यांवर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही केली नाही तर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसणार.-संजय खाडे