Page

आज मारेगावात मनसेचा MSEB कंपनी विरोधात "झटका मोर्चा"


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज मारेगाव येथे महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने "झटका मोर्चा" तहसील कार्यालयावर हजारों शेतकऱ्यांना घेऊन पक्ष नेते राजू उंबरकर हे सकाळी 11 वाजता धडकणार आहे.

तालुक्यातील सध्यस्थितीत शेतकऱ्यांची रब्बी हंगामची पिके उभे असून सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी वीज पुरवठा अत्यंत गरजेचा आहे. त्याच बरोबर हा पुरवठा सुरळीत होण्यासाठी या भागात ट्रान्सफार्मर, विजेचे खांब आणि वाहिन्या असणे महत्वाचे आहे. परंतु अशी कुठलीही परिस्थिती तालुक्यात नाही. 2018 पासून ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले. त्यांची जोडणी अद्यापही झालेली नाही. याच बरोबर उच्चदाब आणि कमी दाबाच्या कारणाने अनेक ट्रान्सफार्मर जळालेले आहे. हे ट्रान्सफार्मर बदलून त्याऐवजी दुसरे ट्रान्सफार्मर बसवून देण्यासाठी शेतकरी वारंवार लेखी व मौखिक तक्रारी करतात. मात्र, यांना महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असतात. याच समस्येला घेऊन तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांनी मनसेचे नेते राजु उंबरकर यांची भेट घेतली होती. आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीला घेत आज 28 नोव्हेंबर रोजी मनसेच्या मारेगाव तालुक्याच्या वतीने झटका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते राजु उंबरकर करतील.

 महावितरण कंपनीकडून बऱ्याच समस्या असल्याने या सर्व बाबीचे परिणाम कृषी फिडर आणि गावठाण फिडर वर होत असून यामुळे अघोषित भारनियमन शेतकऱ्यांवर आणि जनतेवर लादले जात आहे. शेतकऱ्यांसाठी विद्युत पुरवठा करणारी स्वतंत्र महाराष्ट्र कृषी वीज वितरण कंपनी स्थापन करू अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना किंमान 8 तास विज पुरवठा सुद्धा होत नाही. महाराष्ट्र कृषी पंप वीज धोरण 2020 नुसार शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला 8 तास वीजपुरवठा करणे बंधनकारक आहे. मात्र, येथील अधिकारी व कर्मचारी आपला मनमानी कारभार चालवत वाटेल तेव्हा पुरवठा चालू आणि बंद करत आहे. जितका वेळ पुरवठा बंद करण्यात येते त्यावेळीचा शिल्लक पुरवठा उर्वरित वेळेत देणे बंधनकारक आहे. कधी कधी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विजेच्या जोडण्या उलट्या केल्या आहेत त्यामुळे मोटार पंप जळतात. असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ह्या सर्व बाबींमुळे शेतीतील सद्यस्थितीतील पिके जळून जात आहे. हीच परिस्थिती गावठाण फिडर वर सुद्धा आहे.

गावातील वीज पुरवठा वाट्टेल तेव्हा बंद करून सर्वसामन्यांना नाहक त्रास महावितरण कंपनी देत आहे, याचा परिणाम गाव खेड्यातील गावकऱ्यांच्या दैनदिन जीवनावर होत आहे. पिठाच्या गिरण्या, पाण्याच्या बोरवेल, शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास, विद्युत उपकरण, मोबाईल चार्जिंग यासारख्या सुविधांवर होत आहे. महावितरणच्या या मुजोर आणि ढेपाळलेल्या कारभाराविरोधात आज मंगळवार ला सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तहसिल कार्यालयावर झटका मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेचे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात मार्डी चौक ते तहसिल कार्यालयावर हजारों शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चास तालुक्यातील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी हजर राहावे असे, आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांनी केले आहे.