सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष म्हणा अथवा मारेगावचा भूमीपुत्र लोकप्रतिनिधी नाही, यामुळे म्हणा 'पण मारेगावकरांना कायम सापत्न वागणूक मिळाली आहे. मग सत्ता कोणाचीही असो, येथील लोकांचे प्रश्न, समस्या, अडचणी, विकासकामे याविषयी पक्ष कोणताही असला, सत्ता कोणाचीही असली तरी मारेगावला न्याय मिळत नाही, ही वास्तव परिस्थिती आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मारेगाव नगरपंचायत मध्ये मुख्याधिकाऱ्याचे प्रभारीराज सुरू आहे. कधी नायब तहसीलदार प्रभारी असतात, तर कधी इतर नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्याकडे प्रभार दिला जातो, मारेगाव नगरपंचायतमध्ये प्रभारींची मालिकाच सुरू झाली आहे. एखाद्या प्रभारी अधिकाऱ्याची बदली झाली तरी पुन्हा येणारा प्रभारीच लादला जातो,हे या नगर पंचायतचे वैशिष्ट्य असल्याचे बोलल्या जातं.
घरकुल धारकांच्या प्रलंबीत समस्या, स्वच्छता, रस्ते, नाल्या इमारती असे सारेच प्रश्न प्रलंबित आहेत. मारेगाव नगर पंचायततील प्रभारींचे दुष्टचक्र कधी संपणार? असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथे प्रभारीच मुख्याधिकारी असल्याने आता तरी पूर्णवेळ अधिकारी मिळतील असे वाटत होते. परंतु पुन्हा एकदा प्रभारी मुख्याधिकारी मारेगावच्याच नायब तहसीलदाराला बसवले आहे. मुळ पदाचीच कामे होत नाहीत तर मारेगाव नगर पंचायतला कसा वेळ देणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
नगरपंचायत ही अशी संस्था आहे, जिथे लोकांची रोज कामे पडतात. मुख्याधिकारी कार्यालयात असल्याशिवाय ही कामे होत नाहीत. प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पदाचा कारभार हाकत पदभाराची कामे करावी लागतात. यामुळे ते कधी इकडे तर कधी तिकडे प्रभारी पदावर रुजू होतात. नियमित वेळ देऊ शकत नाही. या परिस्थितीत लोकांची आणि विकासाची प्रलंबित कामे कशी मार्गी लागणार? त्यांनी मारेगाव नगरपंचायतला लागलेले प्रभारीचे ग्रहण सोडवावे, अशी मागणी होत आहे.