Page

आपल्या सगळ्यांचे प्रेम हाच माझा सत्कार - सत्कारमूर्ती श्री विलासराव ताजणे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
              
मारेगाव : व्यक्ती समाजात राहत असताना इतरांसोबत कसा वागतो हे महत्त्वाचे आहे. व्यक्तीच्या वागण्यावरच व्यक्तीचे समाजातील स्थान ठरल्या जाते. आज आपण सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे एकत्र येऊन मला जो निरोप देत आहात हे खरोखरच आपल्या सगळ्यांचे प्रेम आहेत असे भावनिक उद्गार मार्डी येथील मुख्याध्यापक श्री. विलास ताजणे यांनी काढले. ते निरोप समारंभ प्रसंगी केलेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री भास्करराव धानफुले होते तर, प्रमुख पाहुणे म्हणून मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे, पोलीस पाटील डॉक्टर प्रशांत पाटील, दिवाकरराव पंडिले, सौ. पद्मावती ताजणे, युवराज ताजणे, ज्येष्ठ शिक्षक अनंता शिवरकर, शिक्षक रमेश ढुमणे आणि अंकुश कांबळे उपस्थित होते.
           
मार्डी येथील आदर्श हायस्कुल येथून नियत वयोमानानुसार दि.30 नोव्हेंबरला श्री. विलास ताजणे निवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा आदर्श हायस्कुल तर्फे सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात पुढे बोलताना श्री. ताजणे सर म्हणाले की, माणूस किती जगतो यापेक्षा कसा जगतो हे अधिक महत्त्वाचे आहेत. आपली जडणघडण जर चांगली असली आणि संस्कार चांगले असले तर साहजिकच माणूस समोर चांगल्या प्रकारे घडू शकतो. माणसासमोर कितीही संकटे आली तरी त्या संकटाला न डगमगता आपण जर धैर्याने सामना केला तर जीवनात यश नक्कीच मिळते.

यावेळी कु. गौरी देवाळकर, कु. तेजस्वी भगत, कु. मिनल इरदंडे या विद्यार्थिनींनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष भास्करराव धानफुले यांनीही ताजणे सरांच्या जीवनकार्याचा परिचय करून देत त्यांनी किती आपुलकीने शाळेसाठी कार्य केले हे सांगताना त्यांची विद्यार्थ्यांविषयी तळमळ आणि धडपड कशी होती हे सुद्धा सांगितले. डॉक्टर प्रशांत पाटील यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

या प्रसंगी शिक्षकांमधून रमेश ढुमणे, अनंत शिवरकर, सुरेश नाखले, कु. नितु मेश्राम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत यांनी, प्रास्ताविक जगन भोंगळे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर दातारकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज गारगोटी पोड (इंदिराग्राम) येथे आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मौजा गारगोटी पोड (इंदिराग्राम) येथे भारतीय संविधान दिन व विदर्भ रॉबिनहूड शामादादा कोलाम यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी कोलाम समाज सांस्कृतिक कला महोत्सव आज ३० नोव्हेंबर २०२३ ला स्थानिक कोलाम समाज मंदिरात आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटक वणी विधानसभा क्षेत्राचे आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, तर अध्यक्षपदी भाजपा जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विशेष प्रमुख अतिथी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पावडे, माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, किसन मोर्चा चे शंकर लालसरे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, सह आदी उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून माजी आयुक्त उत्तम मानकर, माजी गटविकास अधिकारी मधुकर घसाडकर, कोलाम संघटना जिल्हाध्यक्ष राहुल आत्राम राहणार आहे.

सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे,आवाहन आदिवासी कोलाम संघटना अध्यक्ष सूर्यभान ढोबरे, युवा मोर्चाचे ता. अध्यक्ष गणेश झाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अविनाश लांबट, भाजपा उपाध्यक्ष जयवंत ठेपाले, जिल्हा सचिव प्रसाद ढवस, सुषमा ठेपाले, सुनीता जुमनाके, प्रवीण बोथले, सुधाकर बोबडे, दिलीप आत्राम, पवन ढवस, रवी टोंगे, सह आदींनी केले आहे.

मारेगाव नगरपंचायतला लागले प्रभारींचे ग्रहण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष म्हणा अथवा मारेगावचा भूमीपुत्र लोकप्रतिनिधी नाही, यामुळे म्हणा 'पण मारेगावकरांना कायम सापत्न वागणूक मिळाली आहे. मग सत्ता कोणाचीही असो, येथील लोकांचे प्रश्न, समस्या, अडचणी, विकासकामे याविषयी पक्ष कोणताही असला, सत्ता कोणाचीही असली तरी मारेगावला न्याय मिळत नाही, ही वास्तव परिस्थिती आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मारेगाव नगरपंचायत मध्ये मुख्याधिकाऱ्याचे प्रभारीराज सुरू आहे. कधी नायब तहसीलदार प्रभारी असतात, तर कधी इतर नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्याकडे प्रभार दिला जातो,  मारेगाव नगरपंचायतमध्ये प्रभारींची मालिकाच सुरू झाली आहे. एखाद्या प्रभारी अधिकाऱ्याची बदली झाली तरी पुन्हा येणारा प्रभारीच लादला जातो,हे या नगर पंचायतचे वैशिष्ट्य असल्याचे बोलल्या जातं.

घरकुल धारकांच्या प्रलंबीत समस्या, स्वच्छता, रस्ते, नाल्या इमारती असे सारेच प्रश्न प्रलंबित आहेत. मारेगाव नगर पंचायततील प्रभारींचे दुष्टचक्र कधी संपणार? असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथे प्रभारीच मुख्याधिकारी असल्याने आता तरी पूर्णवेळ अधिकारी मिळतील असे वाटत होते. परंतु पुन्हा एकदा प्रभारी मुख्याधिकारी मारेगावच्याच नायब तहसीलदाराला बसवले आहे. मुळ पदाचीच कामे होत नाहीत तर मारेगाव नगर पंचायतला कसा वेळ देणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
      
नगरपंचायत ही अशी संस्था आहे, जिथे लोकांची रोज कामे पडतात. मुख्याधिकारी कार्यालयात असल्याशिवाय ही कामे होत नाहीत. प्रभारी अधिकाऱ्यांना मूळ पदाचा कारभार हाकत पदभाराची कामे करावी लागतात. यामुळे ते कधी इकडे तर कधी तिकडे प्रभारी पदावर रुजू होतात. नियमित वेळ देऊ शकत नाही. या परिस्थितीत लोकांची आणि विकासाची प्रलंबित कामे कशी मार्गी लागणार? त्यांनी मारेगाव नगरपंचायतला लागलेले प्रभारीचे ग्रहण सोडवावे, अशी मागणी होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वणी तालुका कार्याध्यक्ष पदी खुशाल बासमवार यांची नियुक्ती

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : आज दि.29 नोव्हेंबर रोजी स्थानिक टिळक भवन यवतमाळ येथे यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली असता त्यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय नगराळे, यांच्या उपस्थितीत वणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खुशाल बासमवार यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त तालुका कार्याध्यक्ष खुशाल बासमवार यांना श्री देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबुत करण्यात आपला प्रामाणिक सहभाग व पक्षहित कार्य असावे, यासह एक उमदा तालुका कार्याध्यक्ष पार्टीला लाभल्याने पक्ष संघटन आणखीन वाढेल यात आता शंका नाही, असे मत व्यक्त करित त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
यावेळी जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण वैद्य, वणी शहर अध्यक्ष विनोद भाऊ ठेगणे, कामगार सेल अध्यक्ष अर्जुन भाऊ शिरसाठ, ओबीसी सेल अध्यक्ष गुणवंत भाऊ टोंगे, महिला तालुकाध्यक्ष ज्योतीताई कोकणे, महिला वणी शहर अध्यक्ष सौ. मेघाताई मसेवार, वणी तालुका उपाध्यक्ष सौ.भाग्यश्री नागमोते यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. खुशाल बासमवार यांच्या निवडीबाबत सर्व राजकीय स्तरावरून शुभेच्छा सह अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. 


राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. आज विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार,मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य,विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे संबंधित मान्यवर उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशन गुरुवार दि. ७ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ या कालावधीत पार पडणार आहे. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ (सुट्ट्यासह) प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, सुट्या (शनिवार व रविवार) ४ दिवस.

मारोती गौरकार यांचे सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राज्यातील येणाऱ्या पुढील काळात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, व पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकतात. या अनुषंगाने अनेक पक्ष, राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटना, आतापासूनच आपापल्या तयारीला लागले असून त्यात काँग्रेसही मागे नाहीत.

मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या सर्व निवडणूका करिता बूथ कमिटी नेमण्यात येत असून प्रत्येक बूथ वर किमान 10 सदस्य आणि त्या मधून एक अध्यक्ष व तर एक उपाध्यक्ष अशी निवड प्रदेश काँग्रेस व जिल्हा काँग्रेस यांच्या आदेशानुसार करण्यात येत आहे,अशी माहिती तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी दिली.

मारेगाव शहर तथा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सूचना केली आहे की, वरीलप्रमाणे आपण सर्वांनी कार्याला लागून सदर, मोहीम 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करायची आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार मी तालुका अध्यक्ष म्हणून आवाहन करतो आहे की, हे कार्य करित असताना काही अडचण आल्यास मला स्वतः संपर्क साधावा. मी आपल्या सेवेकरिता पूर्णतः तटस्थ आहे, असे श्री.गौरकार "सह्याद्री चौफेर" ला बोलताना सांगितले.

यावेळी आमच्या प्रतिनिधीने होऊ घातलेल्या पाच राज्यातील निवडणूकांच्या निकालाबाबत संवाद साधला असता मारोती गौरकार म्हणाले की,पाच पैकी तीन राज्यात काँग्रेसचे सरकार येइल असे विविध माध्यमातून सांगितले जात आहेत. हे निश्चित स्वागतार्ह असणार आहे. मात्र, हा भाजपाला मोठा झटका आहे, भाजप आता सर्वसामान्य जनतेच्या नजरेतून उतरली असून आता शेतकरी, सर्वसामान्य जनतेचं सरकार, काँग्रेस सरकार येणार आहे. हे मानावं लागणार आहे.

रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? 'इथे' करा तक्रार..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

बऱ्याचदा रेशन दुकानदार रेशन कार्डधारकांना धान्य देताना गडबड करतात. दुकानदार धान्य कमी देणे, धान्य कमी देऊन जास्त पैसे घेणे, नवीन रेशन कार्ड बनवून देण्यास टाळाटाळ करणे असे प्रताप करत असतात. त्यामुळे सामान्य नागरिक भरडला जातो. परंतू आता सामन्यांना दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे, जर रेशन कार्डवर स्वस्त धान्य मिळवत असताना कोणतीही समस्या उद्भवली, तर तुम्ही याबाबत थेट ऑनलाईन तक्रार करु शकता. 

नागरिकांना सार्वजनिक अन्नधान्य वितरण यंत्रणेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य स्वस्त दरात पुरवले जाते. मात्र काही रेशन दुकानदार ग्राहकांना वस्तू देण्यास टाळाटाळ करतात. काही वेळा धान्य ज्यादा दराने अन्य दुकानदारांना विकले जाते..

यासाठी सरकारकडून आता प्रत्येक राज्यानुसार रेशन तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही जर रेशन कार्डवर कमी धान्य मिळत असेल किंवा डीलर विरोधात तक्रार असेल, नवीन रेशनकार्डसाठी अडचण निर्माण करत असेल, किंवा अनावश्यक पैशांची मागणी करत असल्यास चिंता करायचे कारण नाही. तुम्ही सरकारच्या टोल-फ्री क्रमांकावर घरबसल्या ऑनलाईन तक्रार करु शकता. ज्या तक्रारीची दखल थेट तहसील कार्यालयाकडून घेतली जाऊन कार्यवाही होईल. तसेच सरकारच्या वेबसाईटवरही तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

इथे करा तक्रार...
महाराष्ट्रात रेशन कार्ड संबंधित तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक –1967/1800224950
रेशन संबंधित तक्रारीसाठी ऑनलाईन वेबसाईट – https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx


वीजवितरण कंपनीच्या तकलादू धोरणाविरोधात मनसेचा 'झटका मोर्चा' तहसील कार्यालयावर धडकला

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या गलथान कारभारविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव तालुक्याच्या वतीने पक्षनेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात आज मंगळवारला भर पावसात तहसील कार्यालयावर झटका मोर्चा काढण्यात आला. 
वीजवितरण कंपनीच्या ढेपाळलेल्या कारभाराचा कमालीचा मनस्ताप तालुक्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तर विजेच्या सतत च्या लपंडावाने शेतातील उभे पिके सुकल्या जात असून, सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट होवून शेतकरी आर्थिक दृष्ठ्या मागे पडत आहे. सातत्याने विजेच्या खंडीत पुरवठ्याने छोटे-मोठे व्यवसायिक, जनताही कमालीची त्रस्त झाली असून यास नियंत्रित करण्यासाठी मनसे कडून आज मंगळवार ला संबंधित विभागाला "हाय होल्टेज झटका" मोर्चा च्या माध्यमातून देण्यात आला आहे.
शहरातील मार्डी चौकातून निघालेल्या भव्य झटका मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांनी संबंधित विभागाला दरम्यान,चांगलेच धारेवर धरल्याचे निदर्शनास आले असून लेखी आश्वासनानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. जन सामान्य व शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रशासनाने हयगय केल्यास मनसे गप्प बसणार नाहीत. या वेळी मारेगाव तालुक्यातील तमाम जनता, शेतकरी, शेतमजूर व असंख्य मनसैनिक या भव्य मोर्चात सहभागी झाले होते.

सराईत आरोपीला वाढदिवस साजरा करणे आले अलंगट

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आता वाढदिवस साजरा करणे आले म्हणजे, पार्टी आली, केक आला, दारू आली जमलेच तर डीजे चा कर्कष आवाज. वाढदिवस प्रत्येकासाठी स्पेशल असतो, वाढदिवस साजरा करण्याची पद्धती वेगवेगळ्या असते. मात्र, एका सराईत आरोपीने वाढदिवसाला बंदूक पद्धत अवलंबल्याने सिधी जेलची हवा खावी लागली. म्हणजे वाढदिवस साजरा करणे त्याच्या चांगलेच अलंगट आले आहे. सराईत असलेल्या आरोपी कडून वणी पोलिसांनी 28 नोव्हेंबर चे पहाटे विदेशी बनावटीची रिव्हाल्वर जप्त केल्याची घटना पोलीस दप्तरी नोंद झाली.
प्राप्त माहितीनुसार राजुर-भांदेवाडा मार्गावरील मनोज कश्यप यांच्या शेतात डिजे लावून नाचगाणी करीत धिंगाणा घालीत वाढदिवसाची पार्टी सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांना मिळाली.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीच्या आधारे ठाणेदार अजित जाधव, सपोनि दत्ता पेंडकर आणि टीम सह पोलिस रात्री 2 वाजता घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, बर्थडे पार्टीतील तरूण व उमेश रॉय हा पोबारा करित असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले असता त्याच्या जवळ एक मॅगझिन पिस्टल आढळून आली. या वेळी पोलिसांनी दोन फायर केलेली खाली केस व पिस्टल जप्त केली. आरोपी उमेश किशोरचंद रॉय, प्रगती नगर कोलार पिंपरी (वणी), याचेवर कलम 3,7,25,27 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.
पोलीस रेकॉर्ड नुसार उमेश रॉय यांचेवर वणी पोलिस स्टेशन येथे खुन, अपहरण सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो खुनाच्या गुन्ह्यात 1 वर्षांची शिक्षा भोगून कारागृहातून सुटला. उमेश हा आपल्या जवळ अग्निशस्त्र बाळगत असल्याचे पोलिस अवगत होते.

सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, जनार्धन खंडेवार, सपोनि मारेगाव, सपोनि दत्ता पेंढकर, सफौ.सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, संतोष आढाव, अमोल अन्नेलवार, अविनाश बनकर, विशाल गेडाम, शाम राठोड, मो. वसीम, पुरुषोत्तम डडमल, गजानन कुळमेथे, निरंजन खिरडकर यांनी केली.

मोदी सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाविरोधात किसान सभेचे भर पावसात आंदोलन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून भांडवलदारांचे हित जपत देशातील कष्टकरी शेतकरी,शेतमजूर व कामगार विरोधी धोरणे राबवित भाजपचा मोदी सरकारने शेतकऱ्यांची शेती हिसकावून घेणारे व पर्यायी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे काळे कायदे केले तर दुसरीकडे कामगार हिताची 44 कामगार कायदे रद्द करून उद्योजकांना सर्व हक्क देणारे कामगार विरोधी 4 कामगार संहिता आणल्या. ह्याचा विरोध करीत मोदी सरकारला वठणीवर आणून शेतकरी व कामगार विरोधी धोरणापासून रोखण्यासाठी देशातील शेतकरी व कामगार संघटनांच्या संयुक्त मोर्चा द्वारे देशातील सर्व राज्यातील राजधानीत दि.26 नोव्हे. संविधान दिन ते 28 नोव्हें. महात्मा फुले स्मृती दिनानिमित्त आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने वणी येथेही मार्क्सवादी किसान सभेच्या वतीने दि. 28 नोव्हे. ला भर पावसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. 
या आंदोलनात 26 नोव्हे. संविधान दिन व 28 नोव्हे. महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिनाला होणाऱ्या शेतकरी,कामगारांच्या आंदोलनाला परवानगी नाकारणाऱ्या शासन व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध, शेतकरी शेतमजूर संपूर्ण कर्जमाफी, पीक विमा कंपन्यांनी संपूर्ण पीक नुकसान भरपाई द्यावी, वनाधिकार कायद्यान्वये सुधारित नियम 2012 प्रमाणे अपात्र केलेले दावे फेरतपासणी करून पात्र करावे, देवस्थान, गायरान व पडीत जमीन कासानाऱ्यांना मालकी हक्क द्यावे, बेघरांना घरे व मालकी हक्काने जमीन देण्याचा शासकीय आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, आदिवासींना प्रकल्प कार्यालयातून मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा, महागाईवर नियंत्रण व अन्न, औषधे व कृषी साधनांवरील जी एस टी रद्द करण्यात यावा, आरोग्याची व्यवस्था भक्कम करून विनामूल्य उपचार करावा, पेट्रोल, डिझेल व गॅस वरील उत्पादन शुल्क कमी करण्यात यावा, कामगार विरोधी 4 कामगार संहिता रद्द कराव्यात, शेती मालाला उत्पादन खर्चाचा दीड पट हमी भाव द्यावा, वन संरक्षण कायद्यातील दुरुस्त्या मागे घेण्यात याव्या, कायमस्वरूपी कामावरील कामगारांना सेवेत कायम करा व आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या, वीज दुरुस्ती कायदा व स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करा, कंत्राटी पद्दत बंद करून बेरोजगारांना कायम स्वरूपाची नोकऱ्या द्या आदी मागण्यांचा जोरदार भर पावसात घोषणा करीत संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. 
या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकरराव दानव यांनी केले. या आंदोलनात प्रामुख्याने कुमार मोहरमपुरी, ॲड.दिलीप परचाके, कवडू चांदेकर, संजय वालकोंडे, प्रकाश घोसले, मनोज काळे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांचे अभिवादन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : भारतीय संविधान दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ शहरातील संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविकेचे मुख्य वाचन इयत्ता चौथीमध्ये शिकणारी अनुजा आनंद देवतळे हिने केले. यावेळी पालकमंत्र्यांनी संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या रॅली प्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, तहसीलदार योगेश देशमुख, अनामी फाऊंडेशनचे सदस्य, अनुयायांची उपस्थिती होती.

'संविधान जागर रॅली'मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांची उपस्थिती
भारतीय संविधान दिनानिमित्त यवतमाळ शहरात संविधान जागर अर्थात वॉक फॉर संविधान रॅली काढण्यात आली. या रॅलीला पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुणे यांच्या निर्देशानुसार अनामी फाऊंडेशन आणि समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या विद्यमाने शहरातील संविधान चौक येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, तहसीलदार योगेश देशमुख, अनामी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

या रॅलीसाठी संविधान विचार मंच, सत्यशोधक मैत्री संघ, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, समता पर्व प्रतिष्ठान, स्मृती पर्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समिती, बानाई, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, भारतीय बौध्द महासभा, समता सैनिक दल, ऑफिसर्स फोरम, भीम टायगर सेना, ऑल इंडिया पॅन्थर सेना, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी असोसिएशन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, यवतमाळ यांनी परिश्रम घेतले.

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

यवतमाळ येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व संविधान प्रास्तविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी शुभेच्छा दिल्या.

घरातील सामानाची नासधूस व मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : एका विवाहित महिलेसह मुलीलाही मारहाण केल्याची घटना 25 नोव्हेंबर, रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून त्या 40 वर्षीय तरुणांवर 27 नोव्हेंबर ला वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 
मिळालेल्या माहितीनुसार सदर विवाहित महिला ही गेल्या 6 वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त राहत आहे. असे असताना तिचे शहरालगत असलेल्या गावातील एका (40) वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पिडीत त्याच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याने किंबहुना त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला. यामुळे संतापलेल्या रोमियोने माझा नंबर का ब्लॉक केला? व माझ्याशी का बोलत नाही? म्हणून 25 नोव्हेंबर रोजीच्या रात्री 9 च्या दरम्यान, मद्य धुंदीत पिडितेच्या घरी जाऊन तिला मारहाण करून सामानाची नासधूस करित सामान अस्तव्यस्त केले.
दरम्यान, पिडितेच्या मुलीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिलाही मारहाण केली. व त्यांचे फोटो सोशल मिडिया व आप्तेष्टांना सार्वजनिक करण्याची धमकी दिली तसेच त्यांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. अखेर पिडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सोमवार 27 नोव्हेंबर ला वणी पोलिसांनी रियाज निजाम शेख रा. चिखलगाव याच्या विरुद्ध भादंवी कलम 323, 427, 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

जल मिशनने गावाचे सौंदर्यीकरण व स्वास्थ बिघडवले- मच्छिन्द्रा येथील नागरिकांची ओरड

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : अलिकडच्या वर्षांत सरकार जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि विशेषतः ग्रामीण नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी 'वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर' काम करत आहे. सर्वांसाठी घरे, प्रत्येक कुटुंबाला शौचालय, स्वयंपाकाचा गॅस, परवडणारी आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या विविध सरकारी योजनांमुळे लोकांच्या, विशेषत: खेड्यात राहणाऱ्या नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सर्वांसाठी, रस्ते, इ. आणि आता, लोकांची आकांक्षा त्यांच्या घरात आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्यायोग्य नळ पाण्याचा पुरवठा आहे, जेणेकरून ग्रामीण-शहरी भेद दूर होईल. ग्रामीण भागाच्या या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी जल जीवन मिशन ची घोषणा केली.

त्या अनुषंगाने तालुक्यात जल जीवन मिशन 2024 पर्यंत प्रत्‍येक ग्रामीण घरात नियमित आणि दीर्घकालीन आधारावर पुरेशा दाबाने विहित गुणवत्‍तेच्‍या पुरेशा प्रमाणात नळपाणी पुरवठ्याची काम सुरु आहेत तर काही ठिकाणी पूर्णत्वावर आहेत. मात्र, मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मच्छिन्द्रा येथील नळ योजनेने गावाचे सौंदर्यीकरण संपूर्ण धोक्यात आणले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सर्व वार्ड निहाय खोदकाम करून नळ योजना राबविण्यात आली, परंतु अर्धवट कामे आणि नाली वरील मातीचे ढिगारे जशी च्या तशीच असल्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन आरोग्यास बाधा होण्याच्या तक्रारी येथील काही नागरिक करित आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे आणखीनच ठिकठिकाणी चिखल, सांडपाणी साचून घसरपट्टी तयार झाल्याने अनेकांना आपले हातपाय मोडून जातील अशी भिती पायदळ जाताना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत 3,2 प्रभागातील जनतेनी वारंवार पदाधिकारी व कर्मचारी यांना सूचना, मागणी देखील करून सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष करित असल्याचा आरोपही त्यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना केला आहे.

सरकारी योजना लोकांच्या फायद्यासाठीच आहेत, परंतु त्या योजना स्थानिक पदाधिकारी योग्य पद्धतीने राबविण्यात अपयशी ठरत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधिताशी चिरीमिरी करून व काम थातूर-मातुर करण्याची परंपरा येथील कर्मचाऱ्यांना असल्याचे अप्रत्यक्षरित्या नागरिकांतून बोलल्या जात आहे. त्यामुळे जल मिशन योजने ने गावाचे सौंदर्यीकरण धुळीस मिळवल्याचे आता ओरड होत आहे. गावोगावी पाहता विकास कामे झपाट्याने सुरु आहेत, मात्र मच्छिन्द्रा ग्रामपंचायत याला अपवाद ठरत असून गावातील अनेक समस्या जैसे थे आहे. आरोग्यच्या दृष्टीने सांडपाणी, रस्त्यावरील चिखल, शुद्ध पिण्याचा आरो प्लॅन्ट, सभोवताली वाढलेला कचऱ्याची विल्हेवाट लावावी व विशेष म्हणजे नळ योजनेच्या कामाची गुणवत्ता तपासणी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे. 

अवकाळी पावसाची दोन दिवसापासून रिपरिप, तूर,कपाशी पिके धोक्यात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले असून कालपासून मारेगाव तालुक्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप सुरु आहे.

शनिवारी राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून यवतमाळ जिल्ह्याला 'यलो अलर्ट' दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यात मोठ्या पावसाचे वातावरण निर्माण झाले असून काल सोमवार आणि आज मंगळवार सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु झाली आहेत.

या पावसामुळे चना,गहू या पिकांना फायदा होत असला तरी तूर,कपाशी पिके धोक्यात आली असून किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाले, परिणामी कापसाला भाव नाही, व अस्मानी संकट जगू देत नसल्यामुळे शेतकरी राजा या अवकाळी पावसामुळे हवालदिल झाला आहे.

आज मारेगावात मनसेचा MSEB कंपनी विरोधात "झटका मोर्चा"


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आज मारेगाव येथे महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने "झटका मोर्चा" तहसील कार्यालयावर हजारों शेतकऱ्यांना घेऊन पक्ष नेते राजू उंबरकर हे सकाळी 11 वाजता धडकणार आहे.

तालुक्यातील सध्यस्थितीत शेतकऱ्यांची रब्बी हंगामची पिके उभे असून सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी वीज पुरवठा अत्यंत गरजेचा आहे. त्याच बरोबर हा पुरवठा सुरळीत होण्यासाठी या भागात ट्रान्सफार्मर, विजेचे खांब आणि वाहिन्या असणे महत्वाचे आहे. परंतु अशी कुठलीही परिस्थिती तालुक्यात नाही. 2018 पासून ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केले. त्यांची जोडणी अद्यापही झालेली नाही. याच बरोबर उच्चदाब आणि कमी दाबाच्या कारणाने अनेक ट्रान्सफार्मर जळालेले आहे. हे ट्रान्सफार्मर बदलून त्याऐवजी दुसरे ट्रान्सफार्मर बसवून देण्यासाठी शेतकरी वारंवार लेखी व मौखिक तक्रारी करतात. मात्र, यांना महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत असतात. याच समस्येला घेऊन तालुक्यांतील अनेक शेतकऱ्यांनी मनसेचे नेते राजु उंबरकर यांची भेट घेतली होती. आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. या मागणीला घेत आज 28 नोव्हेंबर रोजी मनसेच्या मारेगाव तालुक्याच्या वतीने झटका मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते राजु उंबरकर करतील.

 महावितरण कंपनीकडून बऱ्याच समस्या असल्याने या सर्व बाबीचे परिणाम कृषी फिडर आणि गावठाण फिडर वर होत असून यामुळे अघोषित भारनियमन शेतकऱ्यांवर आणि जनतेवर लादले जात आहे. शेतकऱ्यांसाठी विद्युत पुरवठा करणारी स्वतंत्र महाराष्ट्र कृषी वीज वितरण कंपनी स्थापन करू अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना किंमान 8 तास विज पुरवठा सुद्धा होत नाही. महाराष्ट्र कृषी पंप वीज धोरण 2020 नुसार शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला 8 तास वीजपुरवठा करणे बंधनकारक आहे. मात्र, येथील अधिकारी व कर्मचारी आपला मनमानी कारभार चालवत वाटेल तेव्हा पुरवठा चालू आणि बंद करत आहे. जितका वेळ पुरवठा बंद करण्यात येते त्यावेळीचा शिल्लक पुरवठा उर्वरित वेळेत देणे बंधनकारक आहे. कधी कधी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे विजेच्या जोडण्या उलट्या केल्या आहेत त्यामुळे मोटार पंप जळतात. असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ह्या सर्व बाबींमुळे शेतीतील सद्यस्थितीतील पिके जळून जात आहे. हीच परिस्थिती गावठाण फिडर वर सुद्धा आहे.

गावातील वीज पुरवठा वाट्टेल तेव्हा बंद करून सर्वसामन्यांना नाहक त्रास महावितरण कंपनी देत आहे, याचा परिणाम गाव खेड्यातील गावकऱ्यांच्या दैनदिन जीवनावर होत आहे. पिठाच्या गिरण्या, पाण्याच्या बोरवेल, शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास, विद्युत उपकरण, मोबाईल चार्जिंग यासारख्या सुविधांवर होत आहे. महावितरणच्या या मुजोर आणि ढेपाळलेल्या कारभाराविरोधात आज मंगळवार ला सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तहसिल कार्यालयावर झटका मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेचे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात मार्डी चौक ते तहसिल कार्यालयावर हजारों शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चास तालुक्यातील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी हजर राहावे असे, आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांनी केले आहे.

वणी वरून गृहरक्षक दलाचे जवान तेलंगणा येथे रवाना

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : होऊ घातलेल्या तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुक असुन, येत्या 30 नोव्हेंबर रोजी येथील मतदान पार पडणार आहे.

आज सोमवार दि. 27 नोव्हेंबर ला दुपारी तेलंगणा येथील बंदोबस्त साठी तेलंगणा येथूनच आलेल्या महामंडळाच्या 3 बसेस ने महाराष्ट्राचे गृहरक्षक दलाचे जवान रवाना झाले असल्याची अशी माहिती आहे.

होऊ घातलेल्या तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र गृहरक्षक दलाचे जवान वणी मारेगाव, मुकुटबन, शिरपूर, पाटण येथून तेलंगणा कडे रवाना झाले आहेत. 

भाडे करार करायचाय? काळजी करू नका, घरबसल्या ऑनलाईन प्रकारे 'असा' करा भाडे करार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

हल्ली भाडेकरू ठेवताना घर मालक कराराशिवाय घर भाड्याने देत नाहीत. तसेच पोलीस प्रशासनाने भाडेकरूंसाठी ठेवलेल्या काही अटींमुळे अनेकदा भाडेकरू ही मिळत नसल्याच्या समस्या जाणवतात. मात्र या सगळ्यावर मुद्रांक शुल्क विभागाने मार्ग काढला आहे. त्यामुळे घर मालकांनाही मोठा दिलासा मिळला आहे. आता घरमालक आणि भाडेकरू यांच्यात ऑनलाइन भाडेकरार झाल्यानंतर घरमालकांना प्रत्यक्षात पोलिस ठाण्यांत जात माहिती देण्याची गरज नसणार आहे. तसेच, नोटरी अथवा ऑफलाईन कटकटी दुर झाल्या आहेत. 

राज्याच्या ऑनलाईन नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे भाडेकरार नोंदविल्यानंतर त्याची माहिती क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीम्सद्वारे पोलिसांना ऑनलाइन मिळत आहे. त्यामुळे पूर्वीसारखे शंभर किंवा पाचशे रुपयांच्या मुद्रांकावरील भाडेकरार आता कालबाह्य होताना दिसतायेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे नोंदवण्यात येणारे ऑनलाइन भाडेकरार कायदेशीर करण्यात आले आहेत. 

घर भाड्याने घेते/देते वेळी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं घरमालक आणि भाडेकरूसाठी आवश्यक असतं. रेंट अ‍ॅग्रीमेंट अर्थात भाडे करार हा त्यापैकीच एक भाग होय. रेंट अ‍ॅग्रीमेंट करण्यासाठी खूप धावपळ आणि मेहनत करावी लागते. यामुळे घरमालक आणि भाडेकरू अशा दोघांचाही वेळ आणि पैसा खर्च होतो. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता रेंट अ‍ॅग्रीमेंट अगदी घरबसल्या करता येणार आहे.

या प्रकारे करा ऑनलाईन भाडे करार :
● सर्व प्रथम यासाठी भाडेकरू/जमीनमालकांनी ई-फायलिंग वेबसाइट https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/ भेट देऊन प्रोफाइल तयार करावे लागेल. 
● प्रोफाईल तयार केल्यानंतर मालकाने मालमत्तेची संपूर्ण माहिती प्रविष्ट करावी. 
● यामध्ये वापरकर्त्याचे गाव, तहसील, मालमत्ता व्यावसायिक आहे की निवासी अशी सर्व माहिती द्यावी लागेल.


बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; वाढलेली धोकादायक झाडे, झूडुपे देताहेत अपघातास निमंत्रण

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : तालुक्यातील रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही वाढलेली झुडपे मृत्यूचे सापळे बनले असल्याने या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशी संताप व्यक्त करित आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वणी-नांदेपेरा-मार्डी मार्गांवरील बहुतांशी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपामुळे रस्ते अरुंद होत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करत असताना वाहनधारक तसेच नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या कसरतीत अनेकवेळा अपघात ही घडले आहेत तर काही जणांना जीवाला मुकावे लागले आहे. असे असतानाही या गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सध्या वातावरणात बदल होत असल्याने वळणावरील काही रस्त्यावर मोठी धोकादायक ही काटेरी झूडुप,झाडे समोरून येणाऱ्या वाहणाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे वळण घेतांना वाहनधारकांना धाकधूकीत वाहतूक करावी लागत असून नांदेपेरा - वनोजा देवी मार्गांवरील कडेला वाढलेली काटेरी झुडपे ही वाहनधारकांना अपघातास निमंत्रण देत आहेत. या गंभीर विषयाकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रवाश्यातून बोलले जात आहे. 

सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या संजय खाडे यांचा अभिनव उपक्रम

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

वणी : मागील कित्येक वर्षापासून समाजात आपली वेगळी छाप निर्माण करुण, समाजातील प्रत्तेक घटकापर्यंत पोहचून त्यांना आपल्या परिने जमेल ती मदत करण्याचा मानस रंगनाथ स्वामी अर्बन निधीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.

नुकतेच शहरातील गौशाळेला 51 हजाराची आर्थिक मदत, रंगनाथ स्वामी अर्बन निधीचे अध्यक्ष संजय खाडे यांनी केली होती, असाच समाज उपयोगी उपक्रम शहरातील नृसिंह व्यायाम शाळेत दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्री. रंगनाथ स्वामी अर्बन निधी वणीचे अध्यक्ष संजय खाडे व त्यांचे चिरंजीव धनंजय खाडे उपस्थित होते. यानिमित्ताने नृसिंह व्यायाम शाळेच्या लाठीकाठी व कबड्डी चमुनी पुष्पगुच्छ देऊन संजय खाडे व धनंजय खाडे यांचा सन्मान केला, याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना संजय खाडे म्हणाले, नृसिंह व्यायाम शाळा फार जुनी असून या संस्थेने अनेक उपक्रम राबवून नावलौकिक मिळवले आहे. व्यायाम शाळा ही आरोग्य हीच धन संपदा आहे. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ असते. तरच आपण सर्वच क्षेत्रात काम करू शकतो असे मत यावेळी संजय खाडे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी संजय खाडे यांच्या तर्फे नृसिंह व्यायाम शाळेला 21 हजार रुपयांची देणगी देण्यात आली. यावेळी नृसिंह व्यायाम शाळेचे अध्यक्ष प्रमोद इंगोले, सचिव पुरुषोत्तम आक्केवार, सहसचिव पांडुरंग ताटेवार, कोषाध्यक्ष रमेश उगले, संचालक दिलीप येमुलवार, रमेश शर्मा, विलास आसुटकर, सूर्यकांत मोरे, कन्हैया पारखी, नरसिंह भाई पटेल, इब्बू शेख, मुन्नाभाई शेख, राजकुमार मोरे, प्रेम मेश्राम, देवा राठोड, कुणाल ठोंबरे, यश काकडे, सुजल गाडगे, फैय्याज अली, सय्यद समीर, बंडू निंदेकर, वैष्णवी चामुलवार, कु.आयु उगले, अन्वी इंगोले, गौरी पिदूरकार, संकेत आक्केवार, सागर डोंगरे, समीर सय्यद, कु. छकुली वाढई, राज जमदाडे, डॅनिश पठाण, दुशांत आवारी, माई बोढे, श्रावणी आवारी, डिंपल बदखल, काजल गाडगे, शीतल आडे, बोढे, दोडके उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचे आभार सूर्यकांत मोरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नृसिंह व्यायाम शाळेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

वणी बाजार समिती मार्फत सि.सि.आय. ची कापूस खरेदी सुरु

सह्याद्री चौफेर । राजू डावे 

वणी : कृषि उत्पन्न बाजार समिती, वणी मार्फत हंगाम २०२३- २४ करीता किमान आधारभुत दराने (एमी दर) दिनांक २२/११/२०२३ पासून सि.सि.आय ची कापूस खरेदी अकोला विभागात प्रथम वणी बाजार समितीचे मुख्य आवारात सुरु करण्यात आलेली आहे.
सदर कापूस खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सन्माननिय सभापती अँड विनायकराव ऐकरे, उपसभापती विजय गारपाटे, सचिन कुळमेथे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था वणी, हेमंत ठाकरे सी.सी. आय वणी चे केंद्र प्रमुख व सदस्य सर्वश्री दिलीप बोढाले, मोहन वरारकर प्रभाकर बोहे, वेणुदास काळे, हेमंत गौरकार, चंद्रकात हिकरे, सतिश बडघरे, रविंद्र कोगरे, प्रमोद सोनटक्के याचे शुभहस्ते करण्यात आला प्रथम शेतकरी हर्षद दिलीप बोढाले, रा पुनवट यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
शुभारंभाचे दिवशी अंदाजे ७८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला असून कापसाला प्रति क्विंटल रुपये ७०२०/- हा भाव देण्यात आलेला आहे. शुभारंभ प्रसंगी सी सी आय शिदोला चे केंद्र प्रमुख श्री पंकज ठाकरे, राळेगावचे केंद्र प्रमुख अमित कोहळे, भद्रावतीचे केंद्र प्रमुख विजय आकोटकर, खैरीचे केंद्र प्रमुख प्रमोद पाटील, पांढरकवडयाचे केंद्र प्रमुख हर्षल शिंदे, बाजार समितीचे सचिव श्री अशोक झाडे श्री शैलेश मडावी, सहकार अधिकारी, सहा. निबंधक, सह. स. वणी, लेखापाल रमेश पुरी. आरीफखा रऊफखाँ, निरीक्षक तथा सर्व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी बंधु यानी आपला कापूस किमान आधारभुत दराने विक्री करीता आणत असतांना सोबत अदयावत पिकपेरा
असलेला सातबारा व आधार कार्ड (बँक पासबुक व मोबाईल नंबर लिंक असलेल) आणणे अनिवार्य आहे. तरी सर्व शेतकरी बधुंनी सि.सि. आय ला हमी भावाने कापूस विक्री करणेकरीता दिनांक २२/११/२०२३ पासून बाजार समितीचे मुख्य आवारात आणावा असे बाजार समिती तर्फे आव्हान करण्यात येत आहे.

कुसुम चंद्रशेखर तोडसाम: एक प्रेरणादायी शिक्षका


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज 26 नोव्हेंबर 2023 रोजी, कुसुम चंद्रशेखर तोडसाम यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली. कुसुम एक प्रभावशाली शिक्षिका होत्या ज्यांनी 33 वर्षे तरुण मनांना शिकवले.
11 ऑगस्ट 1966 रोजी जन्मलेल्या कुसुमची शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी त्यांच्या सहाय्यक शिक्षिकेच्या भूमिकेतून स्पष्टपणे दिसून आली. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्ये शिकवण्यासाठी आपले सर्वस्व दिले. त्यांची शिकवण आणि मार्गदर्शन अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात अमिट छाप सोडली.

कुसुमचा प्रभाव केवळ त्यांच्या विद्यार्थ्यांवरच मर्यादित नव्हता. तर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांवर आणि त्यांच्या समुदायावरही सकारात्मक प्रभाव पाडला. त्या एक प्रेरणादायक व्यक्ती होत्या ज्यांना प्रत्येकामध्ये चांगले पाहण्याची क्षमता होती.
कुसुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने 26 नोव्हेंबर 2022 रोजी निधन झाले. त्यांचे निधन हे त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या समुदायासाठी मोठे नुकसान आहे.
कुसुम यांचे वारसा त्यांच्या विद्यार्थ्यांमधील त्यांच्या प्रभावातून आणि त्यांनी निर्माण केलेल्या मूल्यांमधून दिसून येतो. त्या एक आदरणीय शिक्षक होत्या ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या सभोवतालच्या जगावर सकारात्मक परिणाम केला.

मागील मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराला दिला काँग्रेसने न्याय..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वसंत जिनिंग संचालक मंडळाच्या बैठकीत काल एकमुखी निर्णय घेण्यात आल्यानंतर यवतमाळ जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून वसंत जिनिंग पदी अंकुश रुपाजी माफूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मागील मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये काँग्रेसच्या पराभूत झालेल्या उमेदवाराला काँग्रेसने न्याय देत वसंत जिनिंग मध्ये यवतमाळ जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून संचालक पदी निवड करण्यात आली. अंकुश माफूर हे भालेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, बोरी (खू) ग्रामपंचायतचे सदस्य आहे. तर ते मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची सर्वानुमते निवड जाहीर होताच त्यांच्यावर संपूर्ण मारेगाव तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
श्री. माफूर यांनी आपल्या निवडीचे श्रेय काँग्रेस नेते वामनराव कासावार बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र पाटील ठाकरे यांना दिले. तर सर्व वसंत जिनिंगचे संचालक मंडळ व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तथा मित्र परिवार यांचे आभार मानले.


वणी शहरात दोन दिवसीय आदिवासी पर्व उत्साहात साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील आदिवासी सोशल फोरमच्या वतीने स्थानिक वसंत जिनिंग सभागृहात आदिवासी पर्व मोठ्या उत्साहात पार पडला.

या पर्वाचे उद्घाटन आदिवासी प्रशिक्षण व संशोधन परिषद पुणेचे माजी आयुक्त नरेंद्र पोयाम यांनी केले. अध्यक्षस्थानी साहित्यिक उत्तम गेडाम होते. यावेळी पुष्पा आत्राम, लेतू जुनगरे, पैकू आत्राम यांची भाषणे झाली. प्रास्ताविक रामदास गेडाम यांनी केले. संचालन श्रीकृष्ण मडावी व बेबी मेश्राम यांनी केले.

यावेळी अविष्कार चांदेकर, अगस्त कुळसंगे, संस्कृती केळकर, योगेश्वरी डोणेकर, सुवर्णा उईके यांचा सत्कार करण्यात आला. आभार बी. डी. आत्राम यांनी मानले. दोन दिवसीय चर्चा सत्रातील पाहुण्यांचे स्वागत रमेश मडावी यांनी केले. चर्चासत्रात गीत घोष, अॅड. प्रमोद घोडाम, अॅड. राजेंद्र मरस्कोल्हे, डॉ. संगीता भल्लावी, सेवानिवृत्त एसीपी साखरकर या विचारवंतांनी भारतीय संविधान व आदिवासी समूह, स्वातंत्र्योत्तर स्वसमाज परिवर्तनासाठी आंदोलने व आदिवासी स्त्रियांच्या समस्या या विषयावर विचार व्यक्त केले.

संचालन वसंत चांदेकर, छाया उईके, माया मरस्कोल्हे यांनी केले. तर आभार मेघा राजगडकर यांनी मानले. यशस्वितेसाठी अशोक राजगडकर, संतोष चांदेकर, माया मरस्कोल्हे, रजनी पोयाम, अशोक नागभिडकर, आशा कोवे, सुभाष चांदेकर, संगीता तोडसाम, अजय राजगडकर, प्रशांत डोनेकर, महेश आत्राम, अरविंद तिराणकर, कैलास मेश्राम, दीनानाथ आत्राम, भगवान आत्राम, रमेश गेडाम यांनी परिश्रम घेतले.


मॅरेथॉन स्पर्धेत क्रिश मिस्त्री व निलिमा निकोडे यांनी पटकाविले पहिले बक्षीस

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : युवा सेना (ऊबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ला सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थावर) भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे अजिंक्य शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा वाजागाजा व फिजुलचा खर्च न करता युवकांसाठी उपयुक्त असा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.

या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुला - मुलींचे दोन गट पाडण्यात आले होते. यावेळी मुलांच्या गटातून क्रिश सतिंदर मिस्त्री याने पहिलं बक्षीस पटकावले आहे तर दुसरे ओम कैलास ढवळे तर तिसरे बक्षीस आकाश श्रावण ठमके यांनी पटकाविले तर मुलींच्या गटातून पहिलं बक्षीस निलिमा विठ्ठल निकोडे, दुसरे कोमल गणपत गौरकार तर तिसरे बक्षीस दिपाली गजानन पावडे या मुलींनी पटकाविले आहे. तर उर्वरित स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली.

या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवा सेनेचे (उबाठा) उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे हे होते तर उद्घाटक म्हणून शिवसेना नेते संजय देरकर तर राजु तुराणकर, राजु वाघमारे, समिर लेनगुळे, दिलीप मालेकर, संजय देठे, संतोष बेलेकर, वैभव ठाकरे, अफरोज सर, प्रविण खानझोडे, महेश पहापळे, सोपान लाड, गणेश आसुटकर यांची उपस्थिती होती.

यावेळी मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल बोर्डे, चेतन उलमाले, ऋषिकेश काकडे,अनुभव गावंडे, मिलिंद बावने यांनी परिश्रम घेतले.

चलो यवतमाळ : उद्या जिल्हास्तरीय ओबीसींचा महामोर्चा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : यवतमाळ जिल्हास्तरीय आरक्षण समर्थनार्थ ओबीसी च्या विविध मागण्या करीता रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी ओबीसी महामोर्चाचे आयोजन येथील आझाद मैदान, यवतमाळ येथे करण्यात आले आहे.

मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवून त्यांचे ओबीसीकरण करण्याचं घाट सरकारने घातला असून हा घाट उधळून लावण्यासाठी सर्वत्र आंदोलन, मोर्चा होत आहे. याच अनुषंगाने या ओबीसी महामोर्चा मध्ये समस्त जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ओबीसी आरक्षण परिषद यवतमाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ओबीसी आरक्षण परिषदच्या प्रमुख मागण्या 

१) जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
२) मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवून त्यांचे ओबीसीकरण करू नये.
३) सरकारी नौकरीतील कंत्राटी तत्वावर पदभरती बाबतचा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा.
४) सरकारी, शाळा-कॉलेज-दवाखाने-इतर संस्थाचे खाजगीकरण बाबतचा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा.
५) ओबीसींना प्रत्येक तालुक्यात वसतीगृह तात्काळ सुरू करण्यात यावे.
६) व्यवसायिक व इतर शिक्षणामध्ये १००% स्कॉलरशिप लागू करण्यात यावी.
७) ओबीसी जनगणनेनुसार शेतकरी, शेत मजुरांच्या विकासाकरीता बजेटमध्ये अनुदानाची आर्थीक तरतुद करण्यात यावी.
८) सरकारी निमसरकाऱ्यांमध्ये बहुजन समाजाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे जुनी पॅन्शन योजना २००५ पासून बंद केली ती तात्काळ सुरू करण्यात यावी.
९) ओबीसींचा सरकारी नौकऱ्यातील अनुशेष (बॅकलॉक) जाहीर करून तात्काळ पदभरती करण्यात यावी.
१०) ओबीसींची क्रीमीलेअरची घटना विरोधी अट रद्द करण्यात यावी.
११) OBC कर्मचाऱ्यांना SC/ST प्रमाणे पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे.
१२) सारथी/बार्टीच्या धरतीवर महाज्योती या स्वायत्त संस्थेस निधी उपलब्ध करूण देण्यात यावा.
१३) विद्यार्थ्यांकरीता प्रत्येक शहरात व तालुक्यात स्वतंत्र वाचनालय तथा अभ्यासिका तयार करण्यात यावी.
१४) शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव देण्यात यावा.
१५) ओबीसी शेतकऱ्यांना एससी/एसटी प्रमाणे शेतीपुरक लागणारे साहित्य देण्यात यावे.

वरील मागण्या मंजूर करण्यासाठी यवतमाळ येथे जिल्हास्तरीय ओबीसी महामोर्चा चे आयोजन करण्यात आले. संपुर्ण जिल्ह्यातील समस्त ओबीसी बांधवांनी या महामोर्चा मध्ये सहकुटुंब सहभागी व्हावे असे, आवाहन प्रदिप भाऊ वादाफळे अध्यक्ष ओबिसी आरक्षण परिषद, अॅड. राजेंद्र महाडोळे, सतीश भोयर, शैलेश श गुल्हाणे, नरेंद्र गद्रे, प्रा. प्रकाश फेंडर, रमेश ठाकरे, साहेबराव जुनघरे, प्रकाश जानकर, अशोकराव तिखे, डॉ. विजय फावलकर, डॉ. देवेन्द्र मुलुंडे, डॉ. सागर झोपाटे, अॅड. अरुण मेहत्रे, जितेंद्र ब्राम्हणकर, प्रा. ईकवाल भुरा, अरूण नक्षणे, किशोर साखरकर, साहेबराव राठोड, डॉ. दिलीप धावडे, सौ. अंजलीताई फेंडर, सौ. अॅड. सिमाताई तेलंगे (लोखंडे), श्रीमती सविताताई हजारे, सौ. योगिताताई पंडीत, सौ. अवंतीताई सातपुते, यांच्या सह ओबीसी आरक्षण परिषद च्या वतीने करण्यात आले आहे.




पोलिस पाटील यांच्यासाठी आनंदाची बातमी; मानधनात आता होणार भरघोस वाढ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. संघटनेच्या वतीने मंत्रालय स्तरावर संबंधित मंत्री तथा सचिव यांच्याशी सातत्य ठेवून नियमित निवेदन, भेटी व चर्चेच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या पूर्वत्त्वास नेण्याचे सूतोवाच केल्याने पोलिस पाटील यांना 15 हजार रुपयांपर्यंत मानधन होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष महादेवराव नागरगोजे यांनी सांगितले.

स्थानिक विश्रामगृह शेगाव येथे आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. स्थानिक विश्रामगृह येथे बुलडाणा जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारणी समितीची आढावा बैठक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सभेचे प्रास्ताविक प्रसिद्धीप्रमुख संतोष मोरे पाटील किन्ही महादेव यांनी केले. ग्रामस्तरावर काम करणाऱ्या पोलीस पाटील यांच्या मागण्यासंदर्भात संघटना प्रयत्नशील असून शासनाने सुद्धा मानधन वाढीसाठी अनुकूलता दर्शविली.

येणारा काळ पोलीस पाटील यांचेसाठी आशादायी असून, पोलीस पाटील यांनी आपल्या कामाप्रती जागरूक असावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी विषयी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी विस्तृत विवेचन करून पोलिस पाटील यांना नियमित भेडसावणाऱ्या समस्यांबाबत राज्याध्यक्षांना अवगत केले. 


चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन मंदिर, किल्ल्यांच्या कायापालट होणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 57 कोटी 96 लक्ष 95 हजार 375 रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील 14 पुरातत्व स्थळांचा विकास होणार आहे. यासंदर्भात श्री. मुनगंटीवार यांनी नुकताच नियोजन सभागृह येथे आढावा घेतला.

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सहाय्यक संचालक अमोल गोटे, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे, संध्या गुरनुले आदी उपस्थित होते.

चंद्रपूरला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यांनी तेराव्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिर, प्राचीन गडकिल्ले व वास्तु आहेत. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आता त्यांचे रूप पालटणार आहे.

बैठकीत बोलताना श्री. मुनगंटीवार म्हणाले, पुरातत्व स्थळांचा विकास करताना कामाची गुणवत्ता, दर्जा आणि कामाची गती यावर स्थानिक नागरिकांनी लक्ष ठेवावे. पुरातत्व विभागाने प्रत्येक ठिकाणी पाच ते सहा नागरीकांची टीम तयार करावी. लोकसहभागातूनच या स्थळांचा विकास होईल, याबाबत नियोजन करावे. प्रत्येक ठिकाणी कामांची माहिती देणारा एक फलक तर संबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारा दुसरा फलक लावावा. यात ‘क्यूआर कोड’चा समावेश असावा.

सिध्देश्वर मंदिराचा ‘ब’वर्ग दर्जा करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा. माणिकगड किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार करणे, चंद्रपूर महानगर पालिकेअंतर्गत असणाऱ्या तीन बारवचे काम उत्तम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुरातत्व विभागाला दिल्या.

अर्थमंत्री असताना भरीव तरतूद

राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास करण्याचे काम पुरातत्व विभागाकडे असते. सुरुवातीला या विभागाचे बजेट प्रतिवर्ष केवळ 22 कोटी रुपये होते. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात या विभागासाठी 500 कोटी रुपये मंजूर केले.

गाईड प्रशिक्षण संस्था होणार

राज्यातील ऐतिहासिक वारसा बघण्यासोबतच त्याची माहितीही नागरीकांना मिळाली पाहिजे. नागरीकांपर्यंत योग्य व अचूक माहिती जावी, यासाठी राज्यात गाईड प्रशिक्षण संस्था उभारण्याचे नियोजन आहे.

कायापालट होणारी स्थळं

सोमेश्वर मंदिर (राजुरा), महादेव मंदिर (बाबुपेठ, ता. चंद्रपूर), विष्णु मंदिर (माणिकगड, ता. जिवती), सिद्धेश्वर मंदिर (देव्हाडा, ता. राजुरा), माणिकगड किल्ला टप्पा 1(ता. जिवती), माणिकगड किल्ला टप्पा 2, भवानी मंदिर (भटाळा, ता. वरोरा), ऋषी तलाव (लेणी) (भटाळा, ता. वरोरा), महादेव मंदिर (भटाळा, ता. वरोरा), शंकर मंदिर (भिसी, ता. चिमूर), गरुडस्तंभ (चंद्रपूर), खंडक्या बल्लारशाह समाधी (ता. बल्लारपूर), चंद्रपूर शहर व्यवस्थापन आराखडा (चंद्रपूर) आणि पापामिया टेकडी (ता. चंद्रपूर).

राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज येथे दिली.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) च्यावतीने वांद्रे-कुर्ला संकुल मध्ये देशातील सर्वात मोठे ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्सो’ चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मंत्री श्री.सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नारडेकोचे अध्यक्ष संदीप रुणवाल, सचिव अभय चांडक,, माजी अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, राजन बंदलकन, अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, सचिन खेडेकर आदी उपस्थित होते.



मंत्री श्री.सावे म्हणाले की, अन्न, पाणी, निवारा ही सर्वांची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. मुंबई महानगर परिसरात जागेची मर्यादा असल्याने आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन सारख्या योजना राबवत आहोत. या शिवाय मुंबईत, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, सी लिंक प्रकल्प, कोस्टल रोड, धारावी पुनर्विकास प्रकल्प इत्यादीसारखे मोठे इन्फ्रा प्रकल्प सुरू आहेत. मुंबईला सर्वात विकसित शहर बनवत आहोत.

मुंबई आणि राज्यात अधिकाधिक घरे निर्माण करण्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न नव्या गृहनिर्माण धोरणात सोडवले जातील, असे मंत्री श्री. सावे यांनी नमूद केले. नवीन धोरणासाठी विकासकांनी सूचना कराव्यात, त्यांचा नव्या धोरणात समावेश केला जाईल.

"म्हाडाच्या 4 हजार घरांसाठी दोन लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. हे घरांची मागणी दर्शवते. भविष्यात, आम्ही गृहनिर्माण क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणुकीची अपेक्षा करतो." म्हाडाच्या माध्यमातून बीडीडी चाळ पुनर्विकास, गिरणी कामगारांसाठी घरे, म्हाडाच्या इमारतीचा पुनर्विकास, आणि उपकर आणि उपकर नसलेल्या इमारती इत्यादी प्रमुख प्रकल्प घेतले आहेत.

शहरात जवळपास 13 हजार उपकर प्राप्त इमारती आहेत. त्यांचा पुनर्विकास करण्याची गरज आहे. येत्या काही दिवसांत जवळपास 75 हजार गिरणी कामगारांना घरे द्यावयाची आहेत, असे मंत्री श्री. सावे यांनी स्पष्ट केले. विविध विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ही संघटना सरकारला सहकार्य करत आहेत.

उद्या महसूल मंत्री विखे पाटील यवतमाळात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील 25 नोव्हेंबर रोजी यवतमाळात येत आहेत. सकाळी 9:30 वाजता ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'प्रेरणास्थळ' येथे प्रार्थना सभा आयोजित केली आहे. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. प्रेरणास्थळावरील या कार्यक्रमानंतर सकाळी 11:30 वाजता ते नागपूरकडे रवाना होतील.