Page

"कुणी उपाशी झोपलं नाही पाहिजे" या ध्येयाने झपाटलेल्या शेतकरी तरुणाची सुरु आहे धडपड


सह्याद्री न्यूज | संजय वाकचौरे 
अकोले, (ता.४) : "कुणी उपाशी झोपलं नाही पाहिजे" या ध्येयाने झपाटलेल्या शेतकरी तरुणाची सुरु असलेली धडपड याची सर्वत्र चर्चा होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या अकोले तालुक्यातील देवठाण या गावातील तरुण शेतकरी जालिंदर चंद्रभान बोडके असे त्यांचे नाव आहेत. 
हा तरुण स्वतः च्या शेतात स्वतः राबणारा एक युवा शेतकरी आहे. कोरोना काळात आपल्या गावात कुणी उपाशी तर झोपत नसेल ना असा प्रश्न त्यांच्या मनात सतत भेडसावत असल्याने 
त्यांने लगेच गावातील एका वाडीला जाऊन भेट दिली. तेथील लोकांकडे चौकशी केली असता, त्याला १६ लोकांची आर्थिक स्थिती खूपच नाजूक असून त्यांचे जेवणाचे हाल आहेत हे समजते. बोडके यांनी लगेच घरी येऊन आपल्या आई वडिलांना आणि पत्नीला या परिस्थितीने गांजलेल्या लोकांची माहिती सांगितली आणि आपल्याला या लोकांना उपाशी झोपू द्यायचे नाही, असा त्याने ठाम निर्णय सांगितला. 
मुलाच्या शब्दाला मान देत बोडके कुटुंब स्वतः लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. त्यांनी 
काही वेळातच या १६ लोकांसाठी स्वयंपाक तयार केला आणि लगेच हा स्वयंपाक सायंकाळी ५ वाजल्याच्या दरम्यान स्वतः मोटार सायकल वरून त्या गरजू लोकांपर्यंत पोहोच करण्यात आला. यावेळी 
स्वतः त्या लोकांना विनम्रपणे जेवण वाढून, खाऊ घालण्यात आले. त्यानंतर 
'आणखी कुणी गरजू असतील तर सांगा' असे नम्रपणे विचारले गेले. या अन्नदानाने सगळे गावकरी सुखावला असून भरल्या पोटाने हे गरजू माणसांनी या शेतकरी तरुणाला आशीर्वाद दिला. 
त्यांचे समाधान पाहून हा तरुण शेतकरी घरी परतला मात्र, आपण काही दिवस अगोदरच हा उपक्रम सुरू करायला पाहिजे होता.' असे असे त्याला वाटत होते. तो इथेच थांबला नसून त्याचे आजही हे गरजूना अन्नदानाचे कार्य नित्य सुरु आहेत.
आढळा नदीकाठी आणि आढळा धरणाकाठी असलेलं देवठाण गाव आर्थिदृष्टया संपन्न, राजकीयदृष्ट्या जागरूक, प्रगत कृषी असलेलं गाव. मात्र, या गावात काही मजूर वर्गही राहतात. काही मजूर स्थलांतरित झाले आहेत. त्यांचे म्हातारे आईवडील मात्र इथेच थांबले.
त्यामुळे ते वृद्धावस्थेत मजबूर झाले. तर काही निराधार वृद्ध आहेत. या गरजू लोकांसाठी स्वखर्चाने,स्वतःच्या घरात अन्न शिजवून, स्वतः ते अन्न लोकांपर्यंत पोहचवणारा हा जालिंदर चंद्रभान बोडके हा बजाज कंपनीची साधी मोटार सायकल वापरत असून तो पत्र्याच्या घरात राहणारा एक सामान्य शेतकरी आहे. 'आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो' या भावनेने समाजात वावरणारा हा तरुण " कुणी उपाशी झोपलं नाही पाहिजे" या विचाराने आपली शेती सांभाळत हा अन्नयज्ञ चालवत आहे.
त्याच्या कार्याची सर्वत्र चर्चा होत असून तो आशीर्वादा चा धनी ठरत आहेत.

या उपक्रमात गरजू माणसांची संख्या थोडी वाढण्याची शक्यता आहे. शक्य तितका जास्तीत जास्त काळ हा उपक्रम सुरू ठेवणार आहेत.
तुमची काय अपेक्षा आहे ? असं विचारल्यावर जालिंदर म्हणाले की, 'स्वतः साठी काहीच मागणं नाही. कुणी उपाशी झोपलं नाही पाहिजे यासाठी देवानं माझे दोन्ही हात आणखी बळकट केले पाहिजेत.'
हे बोलताना शरीराने काटक आणि रंगाने सावळा असणारा हा तरुण शेतकरी आम्हाला सावळा विठ्ठलच वाटला!
तर जालिंदर बोडकेंची सुविद्य पत्नी सौ.ज्योती या न थकता, आनंदाने सर्व स्वयंपाक दररोज न चुकता करत आहेत. 

संपर्कासाठी
श्री.जालिंदर चंद्रभान बोडके, देवठाण
मोबाईल नंबर - 9284510627