Page

हिंदी सक्ती रद्द, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वणीत जल्लोष साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : हिंदी भाषेचा निर्णय अखेर महायुती सरकारने रद्द केला आहे. वाढता विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच निदर्शने लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध दर्शवला होता. काल (ता.29) पत्रकार परिषदेत सरकारने निर्णय रद्द केल्याची घोषणा करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांनी आपल्या मावळ्यांसह रविवारी भर पावसात ढोल ताशा व फटाक्याच्या अतिशाबाजीत आनंदोत्सव साजरा केला.

गेल्या काही दिवसांत ठाकरे गट, मराठी संघटना आणि जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषतः ५ जुलै रोजी राज ठाकरे कडून हिंदी सक्तीविरोधी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याआधीच सरकारने यावर पुनर्विचार करत निर्णय रद्द केल्याची घोषणा केली.त्रिभाषा सूत्राबद्दल निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय रद्द करताच मनसैनिकामध्ये आनंदाची लाट उसळली. या निर्णयाचे भर पावसात वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांची अतिशबाजी करत मनसेकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांनी मराठी लढ्याला मोठं यश आल्याचे सांगितले. 

या जल्लोषात मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, मयुर गेडाम, अमोल मसेवार, मयुर घाटोळे, शंकर पिंपळकर, विलन बोदाडकर, अज्जू शेख, जितू शिरभाते, विठ्ठल हेपट, लक्की सोमकुंवर, हिरा गोहोकार, बंटी धानोरकर, राहुल देवनपल्लीवार, मयुर मेहता, कृष्णा कुकडेजा यासह मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होती.