मारेगाव : शासनाच्या वतीने घराकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रास रेती योजना लागु केली असुन त्या योजनेची तात्काळ अंमलबजावणी करावी व इतरही गाव विकासाच्या कामासाठी व सामान्य जनतेच्या बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशा आशयचे निवेदन आज तहसील कार्यालय मारेगाव यांना सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आले.
मारेगाव तालुक्यात शासनाच्या वतीने मोठ्याप्रमाणात घरकुलाचे वाटप केले असुन अनेक विकास कामे मंजूरात आहे. मात्र, प्रशासनाने रेती योजनेची अंमलबजावणी केली नसल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांसह ईतरही बांधकाम रखडलेली आहे. या रेतीचा सामान्य मानसाच्या जिवनमानावर, गवंडी कामगारावर, तसेच घर बांधकाम मजुर व इतरही घटकावर काम न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. या सर्व बाबीचा विचार करून तालुका प्रशासनाने बांधकामासाठी रेती तत्काळ मिळावी अशी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे.
येत्या ४ दिवसात रेती धोरणाची अमंलबजावणी झाली नाही तर, संघटनेच्या वतीने नाइलाजास्तव आंदोलन करावे लागेल. यादरम्यान होणाऱ्या परीणामास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल, असा ईशारा तालुका प्रशासनाला निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी तालुक्यातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व घरकुल लाभार्थी तसेच सरपंच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ठिकाणी करण्यात येणार रेतीसाठी सत्याग्रह
सर्व सामान्यांना, लाभार्थ्यांना घेऊन पहीला रेती सत्याग्रह वर्धा नदी, त्यानंतर चिंचमंडळ येथील नाला व मच्छिंद्रा चा नालाच्या घाटावर करण्यात येईल व रेती मिळे पर्यंत तालुका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरु राहील,अशी माहिती सरपंच संघटनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी दिली आहे.