राळेगाव : तालुक्यातील मंगी येथील नागरिकांनी राळेगाव विधासभेचे आमदार प्रा. अशोक उईके यांना गावातील विविध समस्यांचे निवारण करण्याबाबत निवेदन देण्यात आले. ते सध्या मतदार संघातील गावागावात भेट देत आहे, गावाकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहे. उईके यांनी मंगी येथेही सदिच्छा भेट दिली, यावेळी शुभम पायघन, स्वप्नील शिंदे, धीरज झाडे, पंढरी रोगे, प्रशांत खडसे, अभिषेक खडसे, नितेश रोगे यासह असंख्य गावकरी उपस्थित होते.
निवेदनात मंगी डिगडोह ते नागपूर हैद्राबाद महामार्ग ला जोडणारा रोड मागील 10/15 वर्षांपासून नादुरुस्त आहे, तो लवकरात लवकर दुरुस्त करावे, गावातील स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक समस्या येतात विशेषतः पाण्याची समस्या आहे त्या पूर्ण करणे, गावातील जि.प. शाळा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे, त्यासाठी आजतागायत शासनाची मदत मिळाली नाही, उलट गावाकऱ्यांनी लोकवर्गणीतून शाळेची डागडुग्गी केली. त्यासाठी आपण स्वतः पाहणी करून शक्य तेवढ्या लवकर पूर्तता करणे, तसेच महत्वाचे म्हणजे शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे ती अडचण तातडीने सोडवणे, वन्य प्राण्यांचा शेतात हैदोस घालून शेत मालाचे नुकसान होत आहे,आपण लोकप्रतिनिधी या मतदार संघांचे असल्यामुळे ह्या समस्यांचे निवारण करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनातून मागणी केली जात आहे.
पुढे निवेदनात असंही म्हटलं आहे की, आपल्या पक्षाच्या आणि आमदार साहेबांच्या प्रचारासाठी आम्ही झटलो परंतु आमच्या शेताचा माल शेतातून घरी आणण्यासाठी चांगला रस्ता नाही, आमच्या पिढ्यानं पिढ्या शेती करित आहे तरी देखील शेतात जाण्यासाठी धड रस्ता नाही, शेती साठी पाणी मिळत नाही, विजपूरवठा नाही, साहेब तुम्ही आमचे भाग्य विधाते आहात परंतु आपले गरीब जनतेकडे फारसे लक्ष नाही, आम्हाला न्याय द्यावा व निवेदनाची दखल घेऊन उपाय योजना कराव्यात अशी ग्रामवासियांकडून आग्रही मागणी करण्यात आली आहे.