सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. मदन येरावार, आ. अशोक उईके, संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रपूर लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर,राजेंद्र महाडोळे, राम लाखीया, आदी भाजपा नेते मंचावर उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वणी येथे आयोजित बुथ कार्यकर्ता व शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला मंगळवारी संबोधित केले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंबईहून चंद्रपूरला परतल्यावर कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताने मी भारावून गेलो, असेही ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले. वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालयात आयोजित या संमेलनाला वणी विधानसभेतील तीन हजार प्रमुख कार्यकर्ते, व आघाडी प्रमुख उपस्थित होते.
कॉंग्रेस पक्षाच्या कार्यप्रणालीवर टिका करताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कॉंग्रेस हा पक्ष देशभक्तीच्या रुपात आलेला ‘ मायावी राक्षस ’ असून सोशल मिडीयाच्या माध्यमातून मतदारांना प्रलोभने दाखवण्यासही तो कमी करणार नाही. काँग्रेस च्या काळातच निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन पहिल्यांदा वापरली गेली होती, हे कॉंग्रेस विसरले असल्याचे सांगत त्यांनी कॉंग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी निवडून एनडीएचाच उमेदवार येईल आणि एकदा निवडून आल्यानंतर कॉंग्रेसच्या वाट्याला हा मतदारसंघ जाऊ देणार नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
कोणत्याही निवडणूक जिंकण्यासाठी बुथ कार्यकर्त्यांचा वाटा महत्वाचा असून त्यांनी मा. श्री. मोदी यांचे कार्य जनतेपर्यंत पोहाचवावे, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करावा, शेतकरी व महिला हितासाठी कार्य करावे, असे आवाहन बुथ कार्यकर्त्यांना उद्देशून मा. श्री. मुनगंटीवार यांनी केले. यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.