Page

चंद्रपूरात निघाला आक्राेश माेर्चा: जननायक बिरसा मुंडा स्मारकाच्या पुनर्स्थापनेसाठी आदिवासी बांधव उतरले आज रस्त्यावर !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : चंद्रपूरात निघाला आक्राेश माेर्चा जननायक बिरसा मुंडा स्मारकाच्या पुनर्स्थापनेसाठी आदिवासी बांधव उतरले आज रस्त्यावर ! 

चंद्रपूर, (३० ऑगस्ट) : आज दुपारी १.१५ वाजता आदिवासी बांधवांचा भव्य आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर थडकला. सदरहु मोर्चा शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पुजन करून स्मारकापासुन निघुन चंद्रपूर महानगरपालिकेवर पाेहचला.

महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत स्मारक उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेत अशोक तुमराम, जितेश कुळमेथे, किशोरभाऊ पोतनवार, प्रदिप गेडाम, नरेन गेडाम, जमुना तुमराम, रंजना किन्नाके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आयुक्तांसोबतच्या या चर्चेतुन अजुनही काही फलित हाती येण्याची अपेक्षा नाही अशी उदासवाणी भाषा काही कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केली आहे. 
हा आक्रोश मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मुख्य मार्गावरून पुढे निघत बस स्थानकासमोर १० मिनिटांसाठी मुख्य रस्त्यावर बसुन संपुर्ण रहदारी थांबवण्यात येऊन जाेरदार घोषणाबाजी करण्यांत आली. त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला असतांना पाेलिस प्रशासनातर्फे थांबवण्यांत आला. येथे मोर्चाचे जाहिर सभेत रूपांतर होऊन यात प्रामुख्याने नरेनजी गेडाम, अंकुशजी वाघमारे, जितेश कुळमेथे, रवी मेश्राम, हिराचंदजी बोरकुटे, प्रल्हादभाऊ कोटनाके व अशोक तुमराम यांची समयोचित भाषणे झालीत. यानंतर एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांनी स्मारक उभारणी संदर्भात उद्या मंगळवारी दोन वाजता बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या मोर्चात बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी जमुना तुमराम, प्रिती मडावी, वैशाली मडावी, मंगला बुरांडे, ताराबाई आत्राम, जितेश कुळमेथे, अशोक उईके, गोकुल मेश्राम, पुरूषोत्तम सोयाम, पराग खोब्रागडे, बाबा महेशकर व अशोक तुमराम यांनी अथक परिश्रम घेतले. या आक्राेश माेर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधव सहभागी झाले हाेते. दरम्यान आज प्रशासना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, मनपा कार्यालय ठिकाणी, व शहरातील काही मुख्य चाैकात पाेलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला हाेता.