Page

पैनगंगा नदीपात्रात विवाहित महिलेची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

झरी जामणी : तालुक्यातील खातेरा येथील एका महिलेने पैनगंगा नदीपात्रात आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

समीक्षा कौस्तुभ खडसे (25) रा. खातेरा असे मृत पावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तिच्या मृत्यूचे कारण कळू शकले नाही. या दुःखद घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

समीक्षा हिच्या पश्चात पती, सासू,सासरे व केवळ दोन वर्षाचा चिमुकला मुलगा असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग;आरोपीला दोन वर्षाचा सक्षम कारावास

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्वयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. ही घटना 2019 रोजी घडली होती. या प्रकरणी पांढरकवडा सत्र न्यायालयाने अजित कुमार मिश्रा (मुळ रा. परेना ता.जि. शिवांग रा. बिहार) हमु भालर या आरोपीला दोषी ठरवून दोन वर्षाचा सक्षम करावासाची शिक्षा व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या बाबात अधिक माहिती अशी की, मागील पाच वर्षा अगोदर भालर वसाहत 30/09/2019 रोजी एका 14 वर्षाच्या अल्वयीन मुलीचा विनयभंग केला होता. वेकोली इंजिनियर अजित कुमार मिश्राने पिडीत मुलीला ट्युशन ला जात असताना तिच्याशी अश्लील संवाद साधत विनयभंग केल्याची घटना घडली होती. याबाबत पीडित मुलीने वडिलांना आपबीती सांगितली. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यानुसार कलम 354(A),(D)354, 341 ipc सह कलम12 पॉक्सो अंतर्गत आरोपी वर गुन्हा दाखल केला होता.

सदरील प्रकरणाचा तपास करून आरोपी विरुद्ध पांढरकवडा सत्र न्यायालयात प्रकरण सुरु होते. न्यायालयाने सबळ पुरावे व पीडितेच्या बयानावरून न्यायदंडाधिकारी यांनी सदरील खटल्याचा अंतिम निकाल देत आरोपी अजित कुमार मिश्रा यास दोषी ठरवून दोन वर्ष कठोर करावासाची शिक्षा सुनावली आणि एक लाख रुपये दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास अधिकारी ए पी आय सतीश चावरे यांच्या सह एल सी पथक यवतमाळ यांनी तपास करून सदरील आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील प्रशांत मानकर यांनी पीडितेची बाजू मांडली, कोर्ट परैवी अधिकारी आशिष टेकाडे यांनी काम पाहिले आहे.

नवरगाव येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मागील काही दिवसापासून मारेगाव तालुक्यात आत्महत्या च्या घटनेत वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून नवरगाव (धरण) येथील एका तरुणाने जुन्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज शनिवारी सकाळी 11.30 वाजता च्या दरम्यान उघडकीस आला आहे. 

शुभम करलुके (अंदाजे वय 32) असं त्याचे नावे आहे. घरी कोणीच नसल्याने डिश केबल च्या वायरने गळफास घेऊन त्याने आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेचा पंचनामा मारेगाव पोलीसांनी केला असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून तो मच्छी पकडण्याचा पारंपरिक व्यवसाय करत असल्याचे समजते.

शुभम याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.

FIR दाखल होताच पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला शोधलं

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : चक्क दुरुस्तीसाठी आणलेल्या कारच्या डिक्की मधून साडेसात तोळे सोन्याचा एकूण सात लाख रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत ठाण्यात तक्रार प्राप्त होताच वणी पोलिसांनी अवघ्या दोन तासात त्या प्रकरणातील संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दिनांक 30/05/2025 रोजी पोलीस ठाणे वणी येथे फिर्यादी रवींद्र रामदास राजूरकर रा. मोहदा (ता.वणी) यांनी तक्रार दिली की, ते मिर्झा वाशिंग सेंटर (गॅरेज) वणी या ठिकाणी त्यांची फोर व्हीलर गाडी दुरुस्तीसाठी आणली असता, त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून तीन तोळ्याची एक, अशा दोन बांगड्या आणि चपला कंठी हार वजन दीड तोडे असा एकूण साडेसात तोडे सोन्याचा मुद्देमाल चोरी गेला होता, सदर गुन्ह्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होताच,पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पो कॉ नंदकुमार, गणेश, गजानन, मुनेश्वर यांनी सदर गुन्यातील आरोपीचा शोध घेऊन आरोपीला पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याने त्याचे नाव शेख तनवीर शेख अजिज (वय 20) रा. रंगनाथ नगर, वणी असे सांगितले. त्यास गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी आधी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्यास पोलीस हिसका दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यातील मालमत्ता ज्या ठिकाणी लपवून ठेवली होती, ती हस्तगत करण्यात आली.यामध्ये तीन तोळ्याची एक अशा दोन बांगड्या, एक चपला कंठी हार वजन दीड तोडे,असे एकूण साडेसात तोडे वजनाचे अंदाजे किंमत 7 लाख रुपयाचा मुद्देमाल त्याच्या ताब्यातून घेतला.
सदरची कारवाई ही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल होताच अवघ्या दोन तासांमध्ये केलेली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच कौतुक होत आहे.

सदर ची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर याचे आदेशानुसार पोउपनि धीरज गुल्हाने,पोलीस कॉन्स्टेबल गणेश, नंदकुमार, मोनेश्वर, गजानन यांनी केली.
 

वणीत अकरा हजारांचा एमडी ड्रग्ज सह मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरात प्रतिबंधित असलेला तंबाखू, खर्रा चवीने चाखला जातो. आजही तलबगारांना खर्याविना राहावत नाही. ह्यात काही नवल जरी नसल तरी मात्र,वणी शहरात एम डी ड्रग्ज (मेफेड्रोन) मिळतोय, याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून ही वणीसाठी धोक्याची घंटा असल्याची समजली जात आहे.

शहरातील जत्रा रोड परिसरातून शुक्रवारी एका युवकांकडून एम डी ड्रग्ज मादक पदार्थ जप्त करण्यात आला आहे. क्षितिज अशोक इंगळे (वय 23) रा. रंगनाथ नगर, वणी असे ड्रग्ज बाळगणाऱ्या युवकाचं नाव आहे.त्याच्याकडून मेफेड्रोन 2 ग्राम 550 मिली पावडर मिळून आला. ज्याची किंमत 11 हजार 400 रुपये अशी असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. तसेच त्याच्या ताब्यातील एक मोटरसायकल, एक आयफोन, व ड्रग्ज असा 86 हजार 400 रुपयचा मुद्देमाल जप्त केला.

सदर आरोपी हा जत्रा रोड परिसरात ड्रग्ज विक्रीकरीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, त्यआधारे पोलीस त्या ठिकाणी गेले, त्याचा विचारपूस केली. त्याने अगोदर टाळाटाळ केली नंतर पंचांसमक्ष झडती घेतली असता आपोआप बोलका झाला आणि त्याने सर्व कबूल केले.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात सतिश चवरे, पोलीस निरीक्षक स्थागुशा यवतमाळ, गोपाल उंबरकर, पो.नि. पो.स्टे. वणी, सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, स्था.गु.शा. यवतमाळ पोउपनि धनंजय रत्नपारखी पो.स्टे. वणी पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार सुनिल खंडागडे, सुधीर पांडे, उल्हास कुरकुटे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सलमान शेख, नरेश राऊत सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व निलेश आडे, पो.स्टे. वणी यांनी संयुक्त यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ग्रामीण भागातील विकास कामाचा दर्जा घसरला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यात गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे. सदरील कामे नामधारी एजन्सीकडून होत असुन, प्रत्यक्षात राजकीय गुत्तेदार आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने होत असल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या कामाचा दर्जा तपासणारी यंत्रणा, अभियंता हे दुर्लक्ष करीत असल्याने विकास कामाच्या गुणवत्तेचा दर्जा तपासायचा कोणी, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. गाव पातळीवर होणारी विकास कामे स्थानिक ग्राम पंचायत या एजन्सी मार्फत केल्या जाते, लोकप्रतिनिधींनी विकास कामाचा पाठपुरावा करून ही कामे गुणवत्तापूर्वक करून घेणे अपेक्षित असते, परंतु या कामाचे गुत्तेदार लोकप्रतिनिधीच बनले असल्याने अनेक विकास कामात अनियमितता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तक्रारी असलेल्या विकास कामाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. आदिवासी बहुल मारेगाव तालुक्यात मूलभूल सुविधांचा अभाव आहे. रस्ते, विज, पाणी, नाली बांधकाम, स्मशान भूमीसह इतरही भौतिक मूलभूत सुविधेसाठी ग्रामीण भागातील जनता झगडत आहे. दरवर्षी या सुविधेसाठी सरकार करोडो रुपयाचा निधी देवूनही दुय्यम दर्जाच्या विकास कामामुळे गाव पातळीवरील समस्या सुटल्या नाहीत, हे वास्तव चित्र तालुकाभरात पाहावयास मिळते. तालुक्यात अधिकृत कंत्राटदार व एजन्सी नामधारीच असून त्यांच्या नावाने लोकप्रतिनिधी व ग्राम अधिकारी गुत्तेदारिने अनेक गावात विकास कामे करत असल्याने कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा दिसून येतो. त्यामुळे सहा महिने पुर्वी झालेल्या विकास कामाची वाट लागलेली दिसून येते. शासनाने ज्या अभियंतावर कामाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी सोपविली आहे. ते कामाच्या गुणवत्तेपेक्षा कशावर नजर ठेवून असतात, हा प्रश्न मात्र या ठिकाणी अनुत्तरीत आहे. ग्रामीण भागात होत असलेल्या विकास कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ठ दर्जाची दिसून येते, इस्टिमेट नुसार कामे होत नाही.थातुरमातुर कामे केली जातात. मात्र कामाच्या गुणवत्तेची तपासणीकरीता राजकीय दडपण आणि मायामोह या धोरणामुळे मूल्यमापन करणारे अभियंते आणि देयके काढणारे अधिकारी विकास कामाची पाहणी न करता वजन पाहून बिल मंजूर करून आपले संबंध जोपासत असल्याची चर्चा होताना एकावयास मिळते. त्यामुळे काम करणाऱ्या एजन्सी ला सगळ्यांची मर्जी सांभाळत विकास कामे करावी लागत असल्याने गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. दर्जाहीन कामामुळे गाव खेड्यातील दिवसागणीक समस्या वाढत आहेत. त्यामुळे गुण नियंत्रक विभागाकडून विकास कामाचा दर्जा तपासून दोषी कंत्राटदार, अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची गरज आहे.अशी मागणी मारेगाव तालुक्यातील जनतेतून केल्या जात आहे.

अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : साळ्याला पोहोचवून आपल्या गावी परत निघालेल्या दुचाकीस्वाराला एका अज्ञात वाहणाने समोरून जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मारेगाव यवतमाळ राज्य महामार्गावरील बोटोणी ते जळका दरम्यान असलेल्या डाम टेकडीजवळ आज शुक्रवारला सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.या घटनेने आवळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रदीप गुणवंत राऊत (अंदाजे वय 40) रा.आवळगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव आहेत.प्रदीप हा आज दिनांक 30 मे 2025 रोज शुक्रवारला सकाळी 6 वाजता आवळगाव येथून साळ्याला सोडण्यासाठी खंडणी येथे गेला होता.तेथील काम आटोपून तो बोटोणी-करंजी मार्गे स्वगावी आवळगाव येथे जाण्याकरिता निघाला. पण रस्त्यातच अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात डांबरी रस्त्यावर पडून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रस्त्याने ये - जा करणाऱ्या काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी प्रदीप याला तपासून मृत घोषित केले. मृतक प्रदीप याच्या पश्चात आई,पत्नी, दोन मुले असा आप्त परिवार आहे.सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

नाल्याची माती मिश्रित रेती न देता लाभार्थ्यांना वर्धा नदी घाटातील रेती द्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शासनाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना मोफत ५ ब्रॉस रेतीची योजना नाल्यावरून चालू केली असून त्या नाल्याच्या रेतीमध्ये संपूर्ण पणे माती मिश्रित रेती आहे. अशा आशयाचे निवेदन दि. 28 मे रोजी खनिज प्रतिष्ठान, यवतमाळ यांना देण्यात आले.  

यावेळी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, कार्याध्यक्ष तथा सरपंच रामचंद्र जवादे, उपसरपंच प्रशांत भंडारी आदींची उपस्थिती होती.
निवेदनात म्हटलं आहे की, नाल्याच्या रेतीमध्ये संपूर्णपणे माती मिश्रित आहे. हे सॅम्पल आणले आहे ते बघा, रेती योग्य आहे की नाही? आपल्या स्तरावर याची चौकशी किंवा टेस्टींग करून ती रेती घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावी की नाही? याबाबत योग्य निर्णय दयावा अशी संघटनेची मागणी आहे. पुढे असंही निवेदनात नमूद आहे की,वर्धा नदीचा घाट हा मारेगांव तालुक्याच्या गावावरून २० ते २५ किमी अंतरावर असून शासनाने दिलेल्या दापोरा नाल्याची रेती रू. ६०००/- ब्रॉस पडत असून ती नाल्याची रेती असल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना समाधानकारक नाही. त्यामुळे वर्धा नदीची रेती याच भावामध्ये उपलब्ध करून देण्यात यावी, अशी घरकुल लाभार्थी व सरपंच संघटनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी मागणी केली आहे.
मारेगांव तालुक्याच्या शेवट च्या टोकावरून वाहणारी वर्धा नदी असून नाल्याची रेती देत आहे व राळेगांव तालुक्यात वर्धा नदीची रेती शासन उपलब्ध करून देत आहे,हे दोनही तालुके यवतमाळ जिल्ह्यातच असून हा दुजाभाव कसा? असा सवाल केला असून वरिल सर्व बाबीची चौकशी करून मारेगांव तालुक्याला योग्य निर्णयाची अपेक्षा आहे. मात्र, असे न झाल्यास वर्धा नदीची रेती मिळवण्यासाठी सरपंच संघटना व तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही, असे अध्यक्ष अविनाश लांबट यांनी सांगितले आहे.

वीज कोसळून शेतकऱ्याची म्हैस दगावली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील वेगाव (जुनी वस्ती) येथे दि. 28 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान वीज पडून एक म्हैस जागीच ठार झाल्याची घटना घडली.
अरुण नानाजी टोंगे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. गावाशेजारील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात म्हैस चरत होती. याचवेळी मेगर्जनेसह पाऊस सुरू झाला आणि अचानक वीज थेट चरत असलेल्या म्हशीवर पडली. ती जागीच मृत्यूमुखी पडली.
या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. आर्थिकदृष्ट्या आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी संकटाचा सामना करावा लागत आहे.या घटनेनंतर ग्रामस्थांनी संबंधित प्रशासन व पशुसंवर्धन विभागाला माहिती दिली आहे. शेतकरी टोंगे यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. शासनाने तत्काळ पंचनामा करून आर्थिक मदतीची घोषणा करावी, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

175 शेतकरी कुटुंब येत्या 9 जूनला करणार जल समाधी आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : कोळसा खाण बाधित उकणी गावाची पुनर्वसन प्रक्रिया शेवटच्या टप्यात असताना मात्र उकणी येथील 175 शेतकऱ्याची 600 एकर शेतजमीन घेण्यास वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड टाळाटाळ करीत आहे. 

गावाचा पुनर्वसन झाल्यास सर्व नागरिकांना गाव सोडावं लागणार आहे. अशातच त्या जमिनीवर ते वहिवाट करु शकणार नाही. कोळसा मंत्रालयसह वेस्टर्न कोलफिल्डच्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्र व्यवहार व निवेदने देऊन ही वेकोलि उर्वरित शेतजमीन संपादित करण्यास तयार नसल्याने उकणी येथील 175 शेतकरी कुटुंब येत्या 9 जूनला जल समाधी आंदोलन करणार आहेत. याबाबत निळजई कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीने मंगळवार 27 मे रोजी येथिल वसंत जिनिंग च्या हॉल मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ता संजय खाडे यांनी सांगितले की, वेकोलि वणी एरिया अंतर्गत निलजई ओपनकास्ट माईन्स करिता उकणी परिसरातील तब्बल 4 हजार एकर आतापर्यंत संपादित केली. तर उकणी गावातील खंड 1 मधील 600 एकर जमीन शिल्लक राहिली आहे. कोळसा खाणीतून निघणाऱ्या ओव्हर बर्डन मुळे उकणी गावाच्या चारही बाजूने मातीचे उंच ढिगारे लागले आहे. मातीच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन उकणी गावाचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित 600 एकर शेतजमीन वेकोलिने संपादित करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ग्राम पंचायत उकणी व प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या मार्फत उर्वरित शेतजमीन संपादित करण्यासाठी वेकोलि प्रशासन, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी खासदार हंसराज अहिर, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना अनेकदा निवेदन देऊन व चर्चा करुनही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी कुटुंबासह सोमवार 9 जून 2025 रोजी उकणी गावालगत वर्धा नदीवर पाण्याच्या टाकीजवळ जल समाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जलसमाधी आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासन व वेकोलि प्रशासनाला कळविण्यात आले आहे. अशी माहिती कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेला उकणी चे माजी सरपंच संजय खाडे, कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समिती चे अध्यक्ष सुरेश ढपकस, सचिव सचिन जुनारकर व शेतकरी उपस्थित होते.

गोंड गोवारींना संविधानीक हक्क द्या'आरक्षण संरक्षण समितीची मुख्यमंञ्यांकडे मागणी

सह्याद्री चौफर | ऑनलाईन

यवतमाळ : 26 मे रोज सोमवार ला आदिवासी गोंड गोवारी आरक्षण संरक्षण समिती चे अध्यक्ष माधव कोहळे यांच्या नेतृत्वात मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे माध्यमातून मा.ना.श्री.देवेंद्र फडणविस,मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले. 

मा.सर्वोच्च न्यायालयाचा सिविल अपिल क्र.4096/2020 चा अंतिम आदेश दि.18/12/2020 नुसार त्यात सांगितलेल्या अनुसुचित क्षेत्रातील व गोंड जमातीसोबत आप्तभाव दाखविणाऱ्या गोवारी जमातीला त्वरीत अनुसुचित जमातीचे गोंड गोवारी नावाने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळाली पाहीजे अशी निवेदनातुन मागणी करण्यात आली.

नुकतेच राज्य शासनाने स्पेशल लिव पिटिशन क्र.16513/2023 अंतर्गत बबन लसुंते केस मध्ये मा.सुप्रिम कोर्टात एक काउंटर ॲफिडिविट सादर करुन आपली गोंड गोवारी जमाती बद्दल ची भुमिका स्पष्ट केली आहे.यात जे गोवारी लोक गोंड जमाती सारखी संस्कृती जपते ते गोंड गोवारी सवलती साठी पाञ असल्याचे नमुद आहे व त्याचे 1950 पुर्वीचे कागदोपञी पुरावे अथवा नोंद गोवारी असली पाहीजे.त्यामुळे आम्ही या सवलतीसाठी पाञअसुन आम्हाला आमचे संविधानीक अधिकार त्वरीत मिळावे या आशयाची मागणी निवेदनातुन यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना केली.

यावेळी निवेदन देतांना जिल्हाधिकारी कार्यालय तथा निवेदनावर स्वाक्षरी करण्यासाठी विश्राम गृह यवतमाळ येथे सर्वश्री दादाराव बोटरे,राजाभाऊ ठाकरे,सिताराम मंडलवार, चंद्रशेखर ठाकरे,जितेश राऊत,सतिश दुधकोहळे, कमलाकर नेवारे,सुभाष लसंते,धनराज खंडरे,महादेवराव नेवारे,राजेश नागोसे,संतोष बोटरे,प्रविण मोगरे,सचिन कोयरे,गोलू आडे,संतोष वाघाडे,भुषण ठाकरे,विजय नेवारे,राहुल नेवारे,अंचल भोयर,प्रशांत नेवारे इत्यादी अनेकजन हजर होते.

बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करा - मनसे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी तालुक्यात विनापरवाना व परराज्यातील बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कठोर कारवाई कर 'मकोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी वणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच तालुक्यात बोगस बियाणे विक्रीला पूर्णपणे बंदी घालण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करत आहेत. याच संधीचा गैरफायदा घेत काही कृषी केंद्र चालक परराज्यातील व विना परवाना असलेल्या बोगस बियाण्यांची विक्री करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असून त्यांच्या शेती उत्पादनावरही नकारात्मक परिणाम होत आहे. अनेकदा बोगस बियाण्यांमुळे पेरणी वाया जाते आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशाच काही बोगस बियाण्याची विक्री जिल्ह्यात होत असल्याने जिल्ह्यात मनसेकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला. यावर अंकुश मिळण्यासाठी मनसेने ठिकठिकाणी निवेदने व आंदोलने केली. तर दरवर्षी मनसेकडून यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येते. याच पार्श्वभूमीवर काल कृषी विभागाने धाड सत्र चालू करत राळेगाव, बाभुळगाव, मारेगाव या तालुक्यातील विविध कृषी केंद्रावर छापे टाकून बोगस बियाणे जप्त केले.  या प्रकारच्या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे, मनसेने याकडे गांभीर्याने लक्ष वेधले आहे. अशा कृषी केंद्र चालकांवर केवळ दंड आकारून किंवा सामान्य गुन्हे दाखल करून फायदा होणार नाही, असे मनसेचे म्हणणे आहे. या गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. यासाठी 'मकोका' कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे अशा संघटित गुन्हेगारांवर अंकुश ठेवता येईल.

मनसेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. कृषी विभागामार्फत तालुक्यातील कृषी केंद्रा मधून बोगस बियाणे तपासणी करण्यासाठी नमुने गोळा केले जाऊन ते तपासणीसाठी पाठविले जातात परंतु त्याचा कोणताच अहवाल प्राप्त होत नाही किंवा तो जाहीर केला जात नाही. त्यामुळे बोगस बियाणे उत्पादन व विक्रीस कृषी विभागाचा पाठिंबा असल्याचे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले. त्यामुळे याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली. बोगस बियाणे विक्री थांबवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय, शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने अधिक कडक तपासणी मोहीम राबवावी, अशी सूचनाही मनसेने केली आहे.
असे न झाल्यास व तालुक्यात बोगस बियाणे विक्री आढळ्यास यासाठी कृषी विभाग पूर्णतः जबाबदार असल्याचे ग्राह्य धरून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून जन हिताचा मुद्दा असल्याने न्यायालयात जन हित याचिका दाखल करणार असल्याची माहिती सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आली. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, व स्थानिक कृषी विभागाला पाठविण्यात आली. 

यावेळी मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शंकर पिंपळकर, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, रमेश पेचे, परशुराम खंडाळकर, दिलीप मस्के,विठ्ठल हेपट, प्रविण कळसकर, अतुल काकडे, मंगेश येटे, सूरज काकडे, धीरज बगवा, योगेश माथनकर, गणेश धांडे, कृष्णा कुकडेजा, गौरव धांडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहक भरती त्वरीत करा - राजु धावंजेवार

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक व वाहक भरती त्वरीत करण्यात यावी अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या वतीने राज्य परिवहन मंत्र्याकडे करण्यात आली आहे. 
महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षापासून चालक-वाहक भरती करण्यात आलेली नाही. सर्व आगारामध्ये चालक वाहकांची कमतरता आहे. महाराष्ट्रात सर्व आगारात लालपरी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. परंतु चालक वाहकांची कमतरता असल्यामुळे बऱ्याच फेऱ्या रद्द कराव्या लागतात. त्यामूळे प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. सद्याच्या परिस्थितीत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांकरीता सुरू असलेल्या बसेस बंद आहे. तसेच पुढच्या महिन्यात शाळा पूर्ववत सुरू होणार असल्यामुळे चालक व वाहक कमी पडणार आहे. 
संपूर्ण महाराष्ट्रात चालक- वाहक पुढच्या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहे. नबिन बसफेऱ्या प्रत्येक आगारात सुरू झाल्या परंतु चालक- वाहक नसल्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. करिता मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने आपणांस नम्र विनंती करण्यात येते की, महाराष्ट्रात चालक -वाहक भरती त्वरीत करण्यात यावी. अशाप्रकारचे निवेदन मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या नेतृत्वात परिवहन मंत्र्याकडे पाठविण्यात आले आहे.

पाथरीत बोगस बियाणे विक्रेत्यावर कारवाई

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील पाथरी येथे एका शेतात कृषी विभागाने कारवाई करीत 15 बोगस बियानाचे पॉकेट व दोन दुचाकी सह एकूण 2,38,515/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कृषी विभागाच्या या कारवाईने बोगस बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहेत. 

कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पाथरी येथील बंडू संभाजी पेचे यांच्या मालकीच्या शेतात बोगस बियाणे विक्रीकरिता असल्याचे समजले, यावरून कृषी विभागाने पाथरी येथील शेतात धाड टाकीत गॅलेक्सी हायपर कॉटन हायब्रीड सीड्स बोगस बियानाचे 15 पॉकेट व दोन मोटारसायकली अंदाजे किं. 2,38,515/- रुपयाचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. तीन पॉकेट बीज परीक्षणाकरिता नागपूर येथे पाठवण्यात आले. 

याप्रकरणी संशयित आरोपी सम्राट पेचे वर बियाणे अधीनियम 1968 चे कलम 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 नुसा लेबलमध्ये उत्पादक व त्याचे गुणवत्तेसाठी जबाबदार उत्पादकाचा उल्लेख नसल्याने सदर नियमांचे उल्लंघन केले आहे. (2) विना परवाना बियाणे साठवणुक व विक्री केल्याने बियाणे कायदा 1966 चे कलम 7 चे व (3) महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा (पुरवठा, वितरण, विक्री व किंमतीचे निश्चीतीकरण याचे विनीयमन) 2009 व 2010 चे उल्लघन केले आहे. 3) (Genetic Engineening Approval Committe) GEAC च्या मान्यतेचा उल्लेख नसल्याने पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 7,8,15 (1), 15(2), 16(1) अन्वये तरतुदीचे उल्लघन केले आहे, 

त्यामुळे बंदी असलेले बियाणे शेतकऱ्यांना अनधिकृतपणे विक्री करण्याचे उद्देशाने आणल्याने भा. न्या.सं. कायदा 2023 चे कलम 318(4), 3(5) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपी पसार झाले आहेत. सदरची कारवाई पंचायत समिती मारेगावचे कृषी अधिकारी संदीप वाघमारे, तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले, सहायक पोलीस निरीक्षक अजय वाढवे, स्था.गु. शा. चे सुधीर पांडे, सलमान शेख, रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांनी केली आहे.

संजय खाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साधेपणाने साजरा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शेतकरी व कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी मंदिर येथील वसंत जिनिंगच्या सभागृहात हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 80 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी सहभाग घेतला तर महिला उद्योजक्ता शिबिरात मोठ्या संख्येने बचत गट, स्वयंरोजगार करण्यास इच्छुक महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना मान्यवरांच्या हस्ते बी-बियाणे कीटचे वाटप करण्यात आले. अभिष्टचिंतन सोहळ्याचे अध्यक्ष विश्वास नांदेकर होते तर उद्घाटक विजय मुकेवार होते. एपीआय सीता वाघमारे, नरेंद्र ठाकरे इत्यादी मान्यवरांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली. मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर लगेच महिला उद्योजक शिबिराला सुरुवात झाली. शिबिरात नाबार्डचे जयंत सोनटक्के व गणेश आत्राम यांनी महिलांना बचत गटासाठी असलेले विविध लघूउद्योग, कर्जवाटप इत्यादींची माहिती दिली. या कार्यक्रमानंतर आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांना बी-बियाणे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होत्या. यासह ग्रामीण रुग्णालयात फळवाटप वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी लाईफलाईन नागपूरच्या टीमने सहकार्य केले. 

या सोहळ्याला प्रमोद वासेकर, पुरुषोत्तम आवारी, प्रशांत गोहोकार, राजाभाऊ पाथ्रडकर, वंदना आवारी, साधना गोहोकार, आशा टोंगे, अर्चना बोदाडकर, काजल शेख, विजया आगबत्तलवार, शारदा ठाकरे, रवि कोटावार, राजू अंकतवार, अशोक चिकटे, तेजराज बोढे, अनिल भोयर , सुनिल वारारकर, जयसिंग गोहोकार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाउंडेशनची चमू तसेच जय जगन्नाथ मल्टिस्टेट व श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे कर्मचारी वृंद यांनी परीश्रम घेतले.


तलावात बुडून इयत्ता आठवीत शिकणाऱ्या बालकाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगांव : तलावात बुडून एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी नऊ वाजता घडली. चौदा वर्षाचा मुलगा, राकेश मोहन आत्राम रा.कुटकी (ता. हिंगणघाट, जि वर्धा) असं त्या तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. 

माहितीनुसार मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील पाझर तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला. तो कुटकी येथून शाळेच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी मारेगाव तालुक्यातील अर्जुनी येथील आजोबांकडे (रामदास मडावी) आला होता. 

आज रविवारी बैलाला पाणी पाजण्यासाठी तो गेला होता, बैल पाणी पीत असतांना एका म्हैस ने बैलास धडक देत राकेशच्या हातातील कासरे सुटले व राकेश हा पाण्यात पडला. काठावरील खोल खड्यात इयत्ता आठव्या वर्गात शिकणाऱ्या बालकाचा दुर्देवी अंत झाला. या हृदयद्रावक घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 

अरविंद बोबडे यांचे निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : काँग्रेस समर्थक तथा भूतपूर्व कॅसिअर निलजई उपक्षेत्र अरविंद बोबडे यांचे आज रविवारी सकाळी नागपूर जात असताना वरोरा येथे हृदय विकाराचा झटका आल्याने वाटेतच निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 65 वर्षाचे होते. ते लालगुडा मधील भूमि पार्क फ्लॅट मध्ये राहत होते. लगेचच त्यांचे पार्थिव वणी येथे आणण्यात आले. एक दोन दिवसापासून त्यांना अस्वस्थता वाटत होते. त्यामुळे ते आज नागपूर ला जात असताना त्याचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा (हमु.श्रीलंका), एक मुलगी (हमु.अस्ट्रेलिया) असा आप्त परिवार आहे. 


लाठी येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : लाठी येथील तुकडोजी महाराज सभागृहात दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.२५/५/२०२५ रोज शनिवार ला मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन गुरुदेव सेवा मंडळ लाठी येथील युवकांनी केले.
     

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास खोके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य ॲड राहुल खारकर,ग्रामपंचायत सदस्य रिना लाडे,पोलिस पाटील संजीवनी खिरटकर,ग्रामपंचायत अधिकारी मंगेश खोके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धर्मा डोहे,हरिदास वाघाडे,रमेश खिरटकर,सुरेश माहूरे,महादेव माहूरे यांची उपस्थिती होती.सत्कार सोहळ्याची सुरुवात तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतपर भाषणात आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    
या सोहळ्यात दहावी व बारावी परीक्षेत शालेय तसेच विभागीय पातळीवर विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.त्याचसोबत 15 ऑगस्ट 2025 रोजी राज्यपाला पुरस्काराने गावातील पोलिस पाटील संजीवनी खिरटकर यांचा सत्कार करण्यात आला होता त्यामुळे त्यांचा सुद्धा या कार्यक्रमा निमित्त गावातील गुरुदेव सेवा मंडळ लाठी यांनी सत्कार केला. त्याचसोबत गावातील विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये समीक्षा खारकर,गौरी डोहे, मानसी मांडवकर, लाभेश दोरखंडे, अक्षता खोके आदींचा समावेश होता.
 

पालकवर्गानेही कार्यक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.प्रदीप माहूरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री.नंदू माहूरे यांनी केले.या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, हा उपक्रम पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्धार प्रभाकर वाघाडे,आशिष माहूरे,संदीप गोवारदिपे, निलेश करडे,ईश्वर माहूरे,मंगेश मोते,यासह गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय?

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मे महिना : उन्हाळा की पावसाळा?
मे महिना म्हणजे उन्हाळ्याचा कडाका, आंब्याचा हंगाम आणि शाळा - महाविद्यालयांच्या सुट्ट्या. पण यंदा मे 2025 मध्ये महाराष्ट्रात पावसाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पुणे, मुंबई, कोकण, मराठवाडा आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पावसामुळे सर्वत्र पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.

मे महिन्यात पावसाचे कारणे : 

• अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे समुद्रातील वाफेने भरलेली हवा वर उचलली गेली आणि त्यामुळे मुसळधार पाऊस झाला. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे depression मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

• पश्चिमी विक्षोभ (Western Disturbances)
भूमध्यसागरातून येणारे थंड वारे उत्तर भारतात येऊन उष्ण हवेला वर ढकलतात. यामुळे आर्द्रता वाढते आणि पाऊस पडतो. यंदा हे विक्षोभ महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत.

• ला नीना (La Niña) प्रभाव
ला नीना परिस्थिती सक्रिय झाल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढते. यंदा ही परिस्थिती सक्रिय असल्यामुळे मे महिन्यातच जास्त पाऊस पडत आहे.

• हवामान बदल (Climate Change)
ग्लोबल वॉर्मिंग, वृक्षतोड आणि प्रदूषणामुळे हवामानाचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे पावसाचे वेळापत्रक बदलत आहे आणि अनियमित पावसाचे प्रमाण वाढले आहे.

• अर्बन हीट आयलंड इफेक्ट (Urban Heat Island Effect)
शहरांतील काँक्रिटच्या इमारती आणि रस्त्यांमुळे उष्णता वाढते. ही उष्णता वाफेत रूपांतरित होऊन पावसाचे प्रमाण वाढवते. तसेच, पावसाचे पाणी निचरा न होण्यामुळे पूरस्थिती निर्माण होते.

हवामान खात्याचे अलर्ट
रेड अलर्ट: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी. 
ऑरेंज अलर्ट: छत्रपती संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि जिल्ह्यांसाठी. 
यलो अलर्ट: विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी. 

नागरिकांनी घ्यावयाची काळजी :
• रेड अलर्ट असताना घराबाहेर पडणे टाळा.
• ऑरेंज अलर्टमध्ये गरज असल्यासच प्रवास करा.
• यलो अलर्टमध्ये सावधगिरी बाळगा.
• पावसाच्या बातम्यांकडे लक्ष ठेवा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

निसर्गासाठी एक पाऊल पुढे :
पावसाचे बदलते स्वरूप आणि हवामान बदल लक्षात घेता, आपण निसर्गासाठी काही सकारात्मक पावले उचलूया:

एक तरी झाड लावा :
• वृक्षारोपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. 
• प्लास्टिकचा वापर कमी करा:
• प्लास्टिकमुळे नाल्यांचे तोंड बंद होऊन पूरस्थिती निर्माण होते. 
• पाण्याचा अपव्यय टाळा:
• पाण्याचा योग्य वापर करून जलसंधारण करा..

त्वरा करा...अवघे काही दिवस: उन्हाळी धमाका, स्पेशल महोत्सव

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : ऑनलाईन खरेदी मध्ये विशेष सूट, डिस्काउंट, आणि इतर आकर्षक योजना उपलब्ध असतात. परंतु अशा आकर्षक आणि असमाधानकारक योजणांना बळी न पडता वणी शहरामधील जैताई मंदिर, साई मंदिर चौक, यवतमाळ रोडवर असलेल्या ऑफलाईन सेल'ला अवघ्या काही दिवसातच ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून आणखीन प्रतिसाद मिळतच आहे. त्याच कारही तसंच आहे म्हणायला हरकत नाहीये.
या ठिकाणी थेट "खादी कॉटन महोत्सव सेल" आपल्या सेवेत लागला आहे.नवीन स्टॉक, उत्तम क्वालिटी असे ओळखल्या जाणाऱ्या या खादी कॉटन महोत्सवात आतापर्यंत भरपूर व्हेरायटी ग्राहकांनी पर्चेस केली आहे. 
या ठिकाणी, विशेषतः भारतीय उद्योगाला चालना मिळावी म्हणून कपडे' किंबहुना 'थेट मार्केट' उभारून, कमी किमतीत चांगले खादी कॉटन चे कपडे उपलब्ध करून देण्याचे या सेल चे कार्यकारी अधिकारी सतीश पाटील यांचा मानस असल्याचे ते म्हणाले. 
आता पावसाळा तोंडावर आणि या महोत्सव सेल ला काहीच दिवस उरलेत. त्यामुळे स्वस्त किमतीत चांगले कपडे, तुम्ही खादी कॉटन कपड्यांची खरेदी याठिकाणी उपलब्ध असलेल्या स्पेशल ऑफर चा फायदा घेऊ शकता. 

शहरातील रस्ते झाले बिकट, दुरुस्तीची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरातील रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष न करता याकडे जातीने लक्ष देऊन रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी व उर्वरित कामे पावसाळा लागण्यपूर्वी तातडीने काम सुरु करावे, अशा आशयचे निवेदन प्रहार पक्षाचे उपजिल्हाप्रमुख मोबीन शेख यांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, पावसाळा तोंडावर आलेला असताना अजून पर्यंत शहरातील टिळक चौक ते इंदिरा चौक तसेच साई मंदिर ते नांदेपेरा रोड या रस्त्याचे काम अजून पूर्ण झाले नाही. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशी व सामान्य नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावर शाळा महाविद्यालय मोठ्या प्रमाणात असून विद्यार्थ्यांचे आवागमन मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्याच्या दुरावस्थामुळे दुचाकी स्वारांना तारेवरची कसरत करून मार्गक्रमन करावे लागतेय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे कामे पूर्ण करण्यात यावी. अशी प्रहारचे उपजिल्हा प्रमुख मोबीन शेख यांनी मागणी केली आहे. 
या गंभीर प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर रघुवीर कारेकर,जयंत उईके यांच्या स्वाक्षरी आहेत.