Page

उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने कुमार अमोल सन्मानित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सवित्रीबाई फुले गुण गौरव समिती, मारेगाव च्या वतीने दिल्या जाणारा "विद्यार्थी गुण गौरव" आयोजित करण्यात आला. यात तालुकास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वृत्त प्रतिनिधी क्षेत्रातून यवतमाळ सत्ता चे तालुका प्रतिनिधी तथा सह्याद्री चौफेर चे मुख्य संपादक कुमारअमोल कुमरे यांना तहसीलदार उत्तम निलावाड साहेब व मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे यांच्या हस्ते ३१ जुलै रोजी शेतकरी सुविधा केंद्र येथील सभागृहात शाल व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कुमार अमोल कुमरे यांनी आपल्या अल्पवाधित वेळात किंबहुना डिजिटल युगात सह्याद्री चौफेर ई पेपर ची निर्मिती करून पत्रकारितेच्या कार्यकाळात विविध प्रश्नांना वाचा फोडून वणी विधानसभा क्षेत्रा सह मारेगाव तालुक्यापासून तर मुंबईपर्यंत बातम्या प्रकाशित करून जनसामान्यांना न्याय मिळवून दिला. 

सामाजिक पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्य व शोध पत्रकारितेत त्यांनी मागास, दुर्गम व आदिवासी बहुल तालुक्यात प्रश्नांना वाचा फोडली. कुमारअमोल कुमरे यांच्या पत्रकारितेतील या कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले गुण गौरव समितीने त्यांची सन २०२३-२४ च्या तालुकास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी निवड केली होती.

दीपक चौपाटी परिसरात गॅरेज'ला भीषण आग

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील चौपाटी परिसरातील 'किंग स्कुटर' गॅरेज'ला अचानक आग लागली, ही घटना काल मंगळवारी (ता. 30) ला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास घडली असून यात लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
शहरातील दीपक चौपाटी परिसरात किंग स्कुटरचे मोटारसायकल दुरुस्ती गॅरेजचे दुकान होते. त्या गॅरेज ला अचानक आग लागली. आगीने पुर्ण दुकानाला कवेत घेत पाहता पाहता रौद्र रूप धारण केले होते. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गॅरेज मालकाचे मोठे नुकसान झाले असुन संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे.
दरम्यान,नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप तरी अस्पष्ट असून या भीषण आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती.

रंगनाथ स्वामी मंदिर जवळ घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावेळी नागरिकांची घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती.

विजय बोथले यांची काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज शहरात काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी बैठकीत सर्वानुमते काँग्रेस कमिटी च्या तालुका उपाध्यक्षपदी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात व काँग्रेस जेष्ठ नेते नरेंद्र पाटिल ठाकरे यांच्या उपस्थितीत विजय बोथले यांची तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी विजय महादेव बोथले (कुंभा) यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून, पक्षात ते गेली पंधरा वर्षापासून सक्रिय व प्रामाणिकपणे काम करत असल्याने काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस जेष्ठ नेते नरेंद्र पा.ठाकरे व जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर यांनी त्यांच्या पक्षातील कामाची दखल घेत मारेगाव तालुका उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. 
यावेळी पद निवडीला उत्तर म्हणून, आपण रात्रंदिवस मेहनत करून पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करून पक्षाची सर्वधर्म समभाव ही भावना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम करून आपल्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू असे यावेळी बोलताना विजय बोथले यांनी सांगितले. 
ते या निवडीचे श्रेय माजी आमदार वामनराव कासावर, बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र पा. ठाकरे, जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई खंडाळकर, माजी सरपंच विजय घोटेकर, माजी पंचायत समिती सदस्य गजानन खापणे सह आदींना दिले.



लाडकी बहीण योजनेच्या तालुकास्तरीय समितीच्या अशासकीयपदी विशाल किन्हेकर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सध्या महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त चर्चेत असेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना ही योजना तळागळातील महिला पर्यंत पोहोचण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहे. 
योजनेची यशस्वीरीत्या अंमलबजावणी व्हावी यासाठी महिला व बालकल्याण विभागाने शासन निर्णयानुसार यवतमाळ जिल्ह्यातील तालुका स्तरीय समिती मधील अध्यक्ष व दोन शासकीय सदस्याची निवड करण्यात आली. यामध्ये विशाल किन्हेकर यांचा समावेश आहे. 
महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.
संदर्भीय शासन निर्णयानुसार, सदर योजनेच्या तालुका स्तरावरील देखरेख व सनियंत्रणासाठी, तालुकास्तरीय समितीमध्ये श्री. विशाल किन्हेकर यांची मारेगाव तालुका अशासकिय सदस्य म्हणून निवड करण्यात आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

राष्ट्रीय सैनिक संस्था वणी तालुका द्वारा वृक्षारोपण करून कारगिल शहीद वीरांना अभिवादन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : २६ जुलै २०२४ रोजी कारगिल विजय दिवसानिमित्त राष्ट्रीय सैनिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य सचिवालयाच्या वतीने राष्ट्रीय सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. कर्नल तेजेंद्रपाल त्यागी (वीरचक्र) व महासचिव हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांच्या मार्गदर्शनात अमरावती विभागीय उपाध्यक्ष मुस्कान सैय्यद यांच्या नेतृत्त्वात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करून येथील माजी शासकीय शाळेत मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करून कारगिल युद्धात शहीद वीरांना अभिवादन करण्यात आले.
कारगिलचा विजय ही भारताच्या इतिहासात सुवर्णा अक्षरांनी लिहिलेली कामगिरी आहे. यासाठी अनेक जवानांनी बलिदान दिले असून त्या सर्व शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी माजी शासकीय शाळेचे मा. प्राचार्य मुजफ्फर खान सर व शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सैनिक संस्था वाणी तालुकाध्यक्ष गणेश बुरंडे, साहिल लोखंडे, सुमित जुमनाके, ईशा जुनगरी, वैभव मडावी, श्रुती बोंडे, दुर्गा डाखरे, वितेश वंजारी आदी उपस्थित होते.

पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील पश्चिमेस असलेल्या बोटोणी जंगल भागात पट्टेदार वाघ काल सोमवार ला सकाळी मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेची विविधांगी चर्चा तालुकाभर ऐकिवात होती.

बोटोणी हा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या जंगल क्षेत्रात अधून मधून वाघाचा सह अन्य प्राण्यांचा वावर असतो. हा मृतक पट्टेदार वाघ “परिसरात ट्रॅप कॅमेरात तो कैद झाला. असं एका वृत्त वाहिनीत म्हटलं गेलं. या वाघाच्या मानेलगत जखम असल्याची माहिती वनविभाग सूत्रांकडून मिळाली वैगेरे वैगेरे...
मात्र, वाघाला जखम कशाने झाली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नसली तर वन्य प्राण्यात संघर्ष वैगेरे झाला का? असा सहजच प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे वाघाची जखम वाढत जावून त्यात जंतू पडले असावेत व नाल्याच्या पाण्यातून निघणे अवघड झाले असावे. त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा वाघ मृतावस्थेत चिंचोणी मारोती मंदिरा जवळ (जुने रिठ) असलेल्या नाल्या शेजारी वन विभागाच्या चौकीदारास निदर्शनास आला असे समजते. 
घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. वनविभागाने तत्काळ पावले उचलत मृत वाघाचा पंचनामा केला आहे. दरम्यान या अगोदर अन्य प्राणी व वाघांमध्ये भीषण झुंज झाली असावी का? याच झुंजीत या वाघांचा मृत्यू झाला असावा! असा प्राथमिक अंदाज चर्चेतून लावण्यात येत आहे.मात्र, नेमकं खरे काय हे तपास अहवालातून समोर येइलच.

मारेगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 मारेगाव : सावित्रीबाई फुले गुण गौरव समिती मारेगावच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत वैशिष्ट्यपुर्ण गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

सन २०२३-२४ या सत्रात १० वीच्या परिक्षेत ८० टक्के व १२ वी च्या परीक्षेत ६५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. शेतकरी सुविधा केंद्र मारेगाव येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट राहणार असुन, उद्घाटन वर्धमान फाउंडेशन वणीचे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को.ऑ.बँक संचालक विजय चोरडीया करणार आहे. 

उपस्थित विद्यार्थ्यांना तहसीलदार उत्तम निलावाड, ठाणेदार शंकर पांचाळ,गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर,क्रुषी अधिकारी संदिप वाघमारे, तालुका वैद्यकीय अधिकारी अर्चना देठे, नगरपंचायत चे मुख्याधिकारी अरुण भगत, गटशिक्षणाधिकारी स्नेहदिप काटकर, महावितरण अभियंते शैलैंद्रकुमार पाटील,एकात्मीक महीला व बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपक कळमकर, सेंट्रल बँक व्यवस्थापक आरीफ शेख, मार्गदर्शन करणार आहे. विशेष अतिथी म्हणुन सेवानिवृत्त दुग्ध विकास विभाग कार्यालय अधिक्षक श्रीराम कुमरे तर स्वागताध्यक्ष म्हणून अ.भा.सं प. सचिव सुरेश लांडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन सरपंच तुळशिराम कुमरे,बांधकाम सभापती अंजुम शेख उपस्थीत राहणार आहे. 

३१ जुलै बुधवार ला, आयोजीत या सन्मान सोहळ्यात वर्ष भरात उत्तम सेवा करणाऱ्या लोकसेवक,व पदाधिकारी यांचा सुध्दा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामसेवक, तलाठी,पोलीस पाटील, पत्रकार, अंगणवाडी सेविका, समाज सेवक, यासह अनेकांचा समावेश असणार आहे. विद्यार्थी, पालक, तथा उपस्थीतासाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. आयोजीत कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक प्रतिभा तातेड यांनी केले आहे.

विजय चोरडिया यांनी खोब्रागडे कुटुंबीयांचे भेट घेऊन केले सांत्वन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 वणी : इमारतीला रंगकाम करताना बंडू तुकाराम खोब्रागडे (50) रा. रंगारी पुरा, वणी यांचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. ते मजुरीने रंगकाम काम करून आपला व परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. ते आपल्या कुटुंबाचे आधारवड होते. मात्र, अचानक बंडू यांचे अकस्मात निधन झाल्याने खोब्रागडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांना त्यांच्या मित्र परिवारांनी दिली,
लगेच चोरडिया यांनी आज सोमवार 29 जुलै ला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खोब्रागडे कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. व त्यांना आर्थिक मदत म्हणून 31 हजार रुपये रोख रक्कम परिवारास भेट दिली. तसेच त्यांनी यापुढे कोणतीही मदत लागल्यास मदत करणार असल्याचे खोब्रागडे कुटुंबीयांना सांगितले. यावेळी खोब्रागडे कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते, यावेळी राजू धावंजेवार प्रदेशाध्यक्ष मानवी हक्क सुरक्षा परिषद, विशाल दुधबडे संयोजक विश्व हिंदू परिषद, सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार, अशोक सिंग, संदीप बेसरकर बाळासाहेब खैरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

चिंचमंडळ येथील शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील दापोरा शिवारातील उपाश्या नाला ओलांडून जाताना एका शेतकऱ्याचा पाण्यात मृत्यू झाल्याची घटना घडली. मेघश्याम नारायण वासाडे रा. चिंचमंडळ (वय 58) असे पाण्यात बुडून मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही धक्कादायक घटना आज सोमवारला सकाळी 11 वाजताचे दरम्यान घडल्याने चिंचमंडळ येथे शोककळा पसरली आहे.

तालुक्यात मागील काही दिवसापासून संततधार पाऊस सुरु असतांना सर्वत्र नदी नाले तुडुंब भरून पूर वाहत आहे. अशातच मेघश्याम वासाडे हे आपले पशुधन घेवून शेतात जात होते. दापोरा समोरील उपाश्या पुलावरून शिवपांदन रस्त्याने शेतात जात असताना पाणी ओलांडून पशुधन घेवून ते पाण्यात बुडाले अशी माहिती मिळताच तहसीलदार उत्तम निलावाड व त्यांची टीम तसेच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन नाल्याच्या पाण्यात बुडालेल्या शेतकऱ्याचा शोध घेतला घटनास्थळीच तो इसम मृतावस्थेत सापडला. 

गावाशेजारील माणूस पाण्यात बुडाल्याने नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. शेतकरी अखेर सापडला अशी तूर्तास माहिती आहे. मात्र, पावसात अशावेळी नागरिकांनी पूर असलेले पुल, नदी नाले ओलांडून जाऊ नये असे आवाहन तहसीलदार उत्तर निलावाड यांनी यावेळी केले आहे. 

चक्काजाम आंदोलन तूर्तास मागे, रस्त्याच्या कामाला झाली सुरुवात...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मोहदा, केशवनगर, वेळाबाई फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सोमवारी (ता.२९) रोजी वेळाबाई फाट्यावर स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी चक्काजाम आंदोलन करणार होती. मात्र,संबंधित विभागाने कामाला सुरुवात झाली असून यासंदर्भात पत्र प्राप्त झाल्याने तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले असे सामाजिक कार्यकर्ते तथा मोहदा स्टोन क्रेशर धारक नवीन अग्रवाल यांनी माहिती दिली.
तालुक्यातील केशवनगर ते वेळाबाई फाटा ते आबई फाटा रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. येथील नागरिकांना नमूद रस्त्यावर प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तसेच नवीन अग्रवाल यांनी हा रस्ता व्हावा यासाठी पाठपुरावा संबंधित विभागाकडे २६ जुलै रोजी केला होता. त्यामुळे सदर रस्त्यावर करावी लागणारी तारेवरची कसरत आणि स्थानिकांना होणारा नाहक त्रास, ही बाब लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागा (PWD) ने आज (२८) पासून केशवनगर ते वेळाबाई फाटा ते आबई फाटा पर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. आणि सदर लांबी जुलै २०२४ च्या अर्थ संकल्पामध्ये मंजूर असून सदर काम निविदा स्तरावर आहे. व येत्या २० दिवसात नवीन कामाला सुरुवात होईल, त्यामुळे उदयाचे चक्का जाम आंदोलन स्थगित करावे असे पत्र वेळाबाई/मोहदा ग्रामपंचायतला प्राप्त झाले आहे. सरपंचा सौ.रंजना बांदूरकर (वेळाबाई), सरपंचा सौ.वर्षां राजूरकर (मोहदा) यांच्या सह गावाकऱ्यांच्या मागणीला यश आले आहे. 
सतत दुर्लक्ष करणाऱ्या विभागाला अखेर जाग आली असून आज रोजी कामाला सुरुवात झालेली आहे. याबाबत समाधान आहे, येजा करणाऱ्याकडूनही दिलासा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उद्या सोमवार (ता.२९) रोजी नियोजित "चक्काजाम आंदोलन" तूर्तास स्थगित करण्यात येत आहे, असे मोहदा येथील स्टोन क्रेशर धारक नवीन अग्रवाल वर उपसरपंच सचिन रासेकर यांनी सांगितले. आमची समस्या प्रशासन दरबारी पोहचवली यासाठी 'सह्याद्री चौफेर'चे वर प्रशासनाचे आभार...

 

हातावरची मेहंदी सुकण्यापूर्वीच तीने मृत्यूला कवटाळले

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लग्नानंतर मेहदीचा रंगही तिच्या हातातून उतरला नव्हता, आणि तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 4 वाजता वणी शहराल गतच्या लालगुडा परिसरात असलेल्या सबा कॉलनीत उघडकीस आली. देवयानी नीरज चट्टे (24) असे मृत विवाहिताचे नाव आहे. पोलिसांना मृतकाच्या खोलीतून 15 पानी सुसाईड नोटही सापडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या नीरज बबनराव चट्टे यांनी काही महिन्यांपूर्वी सबा कॉलनीत घर घेतले होते. ज्यामध्ये तो आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. लग्न 29 जून रोजी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील देवयानी मनोहर बावणे हिच्यासोबत वणी येथील जगन्नाथ महाराज देवस्थानात सामाजिक रितीरिवाजानुसार पार पडला. लग्नानंतर अवघ्या 4-5 दिवसांनी देवयानी आपल्या माहेरी गेली होती, असे सांगितले जाते. गुरुवारीच देवयानीचे आई-वडील, बहीण आणि भाटव्याने तिला वणी येथे तिच्या सासरच्या घरी आणून सोडले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी नीरज आणि आपल्या कामावर निघून गेला. त्यावेळी नीरजचे वडील आणि आजारी आई घरी होते. सासू आणि सासऱ्यांसोबत सकाळचे जेवण करून देवयानी वरच्या मजल्यावर तिच्या खोलीत गेली.

दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी नीरजच्या आईला वरच्या खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज येत असल्याचे सांगितले. सर्वांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता देवयानीची खोली आतून बंद होती. आरडाओरडा करूनही देवयानीने दार उघडले नाही तेव्हा शेजारच्या एका मुलाने लोखंडी सब्बलने दरवाजा उचकटून आत डोकावले तर देवयानी पंख्याला लटकलेली दिसली. घटनेची माहिती मिळताच देवयानीचा पती नीरज घरी पोहोचला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह पंख्यावरून उतरवून पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. 

घटनेची माहिती दिल्यानंतर मृत देवयानीचे आई-वडील व इतर नातेवाईकही रात्री वणीत पोहोचले. शनिवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत महिलेने सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

अंध आणि दृष्टीहीनासाठी काम करणं हेच खरे लोकप्रतिनिधित्व - अध्यक्ष विजय चोरडिया

 सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मनुष्याने स्वतःच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे. मात्र, समाजातील ईतर दुर्बल समाजाच्या व्यथांची जाणीव राखून त्यांच्या समस्या व मूलभूत सोयींकरिता सदैव प्रयत्नशील असावे. एक जबाबदार नागरिक म्हणून राजकीय,सामाजिक कार्य करित असताना समाजातील अंध आणि दृष्टीहीनासाठी दृष्टी देऊन त्यांच्या जगण्याला पंख देणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व किंबहुना सामाजिक उत्तरदायित्व होय,असे प्रतिपादन स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी केले. ते स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन, वणी तर्फे आयोजित जैताई मंदिर येथील मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप वर आरोग्य तपासणी शिबीरात बोलत होते.
आयोजित शिबिर कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. चौधरी, राहुल मुंजेकर (औषधी विभाग), बजरंग दलचे जिल्हा संयोजक विशाल दुधबळे, श्री.जोशी, श्री. मुन्ना तुगनायत, श्री. माधवजी सरपटवार हे उपस्थित होते. 
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी राजकारणात तर आहेच, पण शेवटी राजकारणात असले तरी जन सेवा, हे माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून मी सतत असे सामाजिक, जनहितार्थ उपक्रम राबवत असतो, त्यासाठी तुम्ही सहभागी होऊन यशस्वी करता हे मी माझं भाग्य समजतो, यासाठी तुम्हा मायबापांचे धन्यवाद...तुमचा आशीर्वाद सतत पाठीशी राहूद्या, असेच कार्य पुढेही सुरू राहील. अशी ग्वाही दिली.
शिबिरामध्ये जवळपास 900 रुग्णांनी लाभ घेतला असून यात बीपी, शुगर, हृदय, डोळे तपासून घेतले आहे. तसेच शेकडोच्या वर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठविण्यात आले. या मोफत शिबिराला यशस्वीरित्या चोरडिया हॉस्पिटल, वणी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी पार पाडले. यावेळी विजय चोरडिया मित्र परिवार तथा वणी विधानसभा क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परवा वेळाबाई फाट्यावर "चक्का जाम आंदोलन"


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील मोहदा, केशवनगर ते वेळाबाई फाटा, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा अशी मागणी येथील गावकऱ्यांनी 12 जुलै रोजी निवेदनातून केली होती. मात्र, संबंधित विभागाने दुर्लक्ष करत केराची टोपली दाखवल्याने आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत प्रशासनाच्या विरोधात सोमवार दि.29 जुलै'ला "चक्का जाम आंदोलन" करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांना पुन्हा देण्यात आले. 
मोहदा,केशवनगर ते वेळाबाई फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत अनेकदा निवेदन दिली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे याप्रकरणी आता मोहदा,केशवनगर, वेळाबाई व या परिसरातील सर्व गावकरी आक्रमक झाली आहे. त्यांनी वेळाबाई फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.
मा.जिल्हाधिकारी, विद्यमान आमदार वणी, पोलीस स्टेशन शिरपूर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, सार्वजनिक बांधकाम विभाग, वणी यांना माहितीस्तव निवेदन सादर करण्यात आले असून आम्ही रस्त्यावर उतरून "चक्का जाम आंदोलन" करू असा पुन्हा ईशारा देण्यात आला आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनाची जबाबदारी असेही निवेदनात नमूद केलं आहे. यावेळी तीनही गावातील प्रमुख पदाधिकारी वर ग्रामस्थ उपस्थित होते.
वणी तालुक्यातील मोहदा,केशवनगर ते वेळाबाई मार्गाची अवस्था अतिशय वाईट आहे. गाडी व पायदळ चालणे सुद्धा कठीण झालेले आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत असून दैनंदिन कामकाजाला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर वेळाबाई बस स्टॉप समोर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.असे आमच्या प्रतिनिधीला निवेदनकर्त्यांनी सांगितले.

सरकारी कर्मचाऱ्यांना आता व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम वापरण्यास मनाई..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉटसअप आणि टेलेग्राम ही दोन संपर्कासाठीची अ‍ॅप्स वापरता येणार नाही. यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी कामासाठी फक्त 'संदेश इन्स्टंट मेसेजिंग' अ‍ॅपच वापरावे लागणार आहे.

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) द्वारे विकसित करण्यात आलेल्या 'संदेश' अ‍ॅपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी, विविध - राज्य शासनांमधील 200 हून अधिक शासकीय संस्था करत आहेत. 350 हून अधिक ई-गव्हर्नन्स अ‍ॅप्लिकेशन्समध्ये संदेश सूचना आणि ओटीपी पाठवण्यासाठी केला जात आहे.

का घेण्यात आला निर्णय?
संस्थेच्या स्तरावर प्रोफाइल तपशिलाची दृश्यमानता (Visibility) लपवण्याची सुविधा आहे. संदेश सुरक्षितपणे पाठवणे आणि प्राप्त करणे, सुरक्षितपणे स्टोअर करणे, ओटीपी पाठवणे व वितरित न झालेला डेटा सुरक्षित ठेवणे यासाठी शासन व शासकीय कार्यालये यांच्या गरजेनुसार अनुकूलित करण्याची सुविधा आहे. एनक्रिप्टेड मेसेज आणि फाइल्स पाठवण्यासाठी egov ॲप्लिकेशन्ससह सेवा आधारित एकीकरण यात आहे. अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधाही यात आहे.

केंद्रद्वारे विकसित करण्यात आलेल्या 'संदेश' अ‍ॅपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना इतर सोशल मीडिया अ‍ॅप वापरण्याची सवय झाल्यामुळे त्यांना या आदेशामुळे थोड्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 


वाटाघाटीसाठी काँग्रेसने नेमली समन्वय समिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात लोकसभेला काँग्रेस पक्षाला तब्बल १३ जागांवर विजय मिळाला. २०१९ मधील १ जागेवरून काँग्रेसने यावेळी १३ जागा मिळविल्या त्यामुळे पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यात नाना पटोले यांना यश मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वात लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या निवडणुका महाविकास आघाडीतून लढविल्या जाणार आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात वाटाघाटी होणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने समन्वयासाठी १० जणांची समिती नेमली आहे. यात मुंबईसाठी या समितीत ३ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने १० सदस्यांची समिती गठीत केली. यामध्ये राज्यातील जागावाटपासाठी ७ जणांची तर मुंबईसाठी तिघांना स्थान देण्यात आले. 

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी हे नेते पुढाकार घेणार आहेत. यामध्ये जुन्या व वरिष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांत महाविकास आघाडीत प्रदेश जागा वाटपांच्या चर्चेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नितीन राऊत यांना स्थान देण्यात आले तर मुंबईच्या जागा वाटपासाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश करण्यात आला.

२८ जुलैला महाराष्ट्र शेतकरी परीषद यवतमाळ येथे

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : ‘ रोज रोज मरण- रोज पेटते सरण- निगरगट्ट धोरण- अजुन किती करणार सहन? ’ असा सवाल उपस्थित करीत शहरातील वडगाव रोडवरील सहकार सभागृहात रविवार २८ जुलै रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० दरम्यान अनेक शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 
या शेतकरी परिषदेला शेतकरी नेते विजय जावंधिया, रघुनाथ पाटील, वामनराव चटप, अमर हबीब, प्रकाश पोहरे, ज्ञानेश वाकुडकर यांची उपस्थिती राहणार असुन ‘ कृषी बाजारात हस्तक्षेपाने भाव पाडणे, शेतकरी आत्महत्या आणि त्यावर उपाय’ या विषयावर परिषदेच्या प्रथम सत्रात सकाळी ९ ते १२.३० या कालावधीत विजय जावंधिया, रघुनाथ पाटील व वामनराव चटप यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. 
परिषदेच्या दुसर्‍या सत्रात दुपारी १.३० ते ४.३० या कालावधीत ‘ निष्फळ आंदोलने, प्रतिसादशुन्य धोरणकर्ते म्हणून लढा व आयुधांचा पुनर्शोध’ या विषयावर अमर हबीब, प्रकाश पोहरे, ज्ञानेश वाकडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या परिषदे दरम्यान शेतजागलच्या ‘ किसान कृतज्ञता कोषातून’ आत्महत्याग्रस्त विधवा भगिणींना अर्थसहाय्य वाटप करण्यात येणार असुन विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे. तसेच शेतकरी सनदचे प्रकाशन करण्यात येणार आहे. 
या परिषदेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशनाचे संयोजक व शेतजागल विश्वस्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुुरूषोत्तम गावंडे, प्रा. किशोर बुटले, प्रा. यादवराव ठाकरे, शुभम मुंडवाईक आदींनी केले आहे.

वणी येथे एकल नृत्य स्पर्धेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : कोणतीही कला असो... साहित्य, विज्ञान असो की शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील कोणतीही शाखा... गुरूंचं बोट धरल्याशिवाय या ज्ञानविवरात लीलया संचार करणे शक्य नाही. आपल्या आयुष्याचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या या गरूंप्रति कृतज्ञता म्हणजेच गुरुपोर्णिमा! कलेचं आराध्य दैवत नटराज पूजन. यानिमित्ताने "संस्कार भारती" विविध क्षेत्रातील गुरुतुल्य व्यक्तींना सन्मानीत करित असते. 
हे औचित्य साधून संस्कार भारती, सागर झेप बहुद्देशीय संस्था तथा स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन, वणी द्वारा आयोजित गुरुपौर्णिमा निमित्त गुरू पूजन व नटराज पूजन तसेच मुर्ती कलावंत सत्कार यानिमित्ताने भक्ती गीतांवर आधारीत 'एकल नृत्य' स्पर्धेचे आयोजन दि. २८ जुलै २०२४ ला सकाळी ११.३० वाजता श्री विनायक हॉल, छोरिया ले-आऊट, गणेशपुर,(वणी) येथे करण्यात आले आहे. 
या स्पर्धेमध्ये अ-गट ६ ते १४, ब-गट १४ ते वरील असणाऱ्यांना भाग घेता येणार असून प्रथम बक्षीस रोख ३०००, द्वितीय बक्षीस रोख २००० तर तृतीय बक्षीस रोख १००० असे देण्यात येणार आहे. त्यामुळे या भक्ती गीतावर आधारित स्पर्धेचा लाभ घ्यावा असे, आवाहन संस्कार भारती समितीच्या अध्यक्षा श्रीमती रजनीजी पोयाम, सचिव सागर मुने व स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशनचे विजयबाबू चोरडिया यांनी केले आहे. 

केंद्र सरकारने सर्वांसाठी शेतीचे धोरण घोषित करून शेतीची अतिक्रमणे नियमानुकुल आदेश द्यावे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

भंडारा : राज्यात दलीत आदिवासी समाजाच्या लोकांनी महसूल व वन जमिनीवर शेती साठी अतिक्रमण केले आहे. वन जमिनींवरील अतिक्रमण नियमानुकुल करणे करिता केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्काची मान्यता अधिनियम 2006 च्या कायदा घोषित केला त्यानुसार वन हक्क समिती मार्फत वन हक्क दावे दाखल करण्याची तरतूद करण्यात आली असुन रीतसर दावे दाखल करण्यात येतात आणि सदर दावा मंजूर करण्याकरिता जिल्हा स्तरीय समिती कडे जातो तेंव्हा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 नियम 2008 सुधारित नियम 2012 अन्वये वन हक्क पात्र करणे करिता 13 डिसेंबर 2005 पूर्वीचा पुरावा आवश्यक आहे. 

वन जमीन धारकांच्या कब्जा सन 2005 पूर्वीचा आहे परंतु त्याची महसूल व वन विभाग कडून नोंद न घेतल्यामुळे दावे अपात्र ठरविण्यात येतात जर दावे अपात्र ठरविण्यात आले तर वन विभागांकडून जमिनी ताब्यात घेण्यासाठी कारवाई करण्यात येते जर तसे झाले तर हजारो शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही,म्हणून बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीशकुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मानवी हक्क सुरक्षा दलाचे प्रदेश अध्यक्ष अशोक तिडके यांच्या नेतृत्वात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कडे जिल्हा अधिकारी कार्यालय भंडारा यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले असून 
निवेदनाची दखल न घेतल्यास जंतर मंतर मैदान दिल्ली येथे बिगर सातबारा शेतकऱ्यांचे राज्यस्तरीय सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे. 

यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष प्रफुल कुमार इंगोले सहित मानवी हक्क सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय कार्य अध्यक्षा डॉ रेखा रनबावले उपस्थित होत्या.

अविश्वास ठराव फेटाळला


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : दिनांक 22 जुलै 2024 रोजी ग्रामपंचायत उपसरपंच श्री रोशन वामन कांबळे व इतर 3 एकुण 4 जणांनी सरपंच सौ. जयाताई अतुल ढाले यांचे विरुद्ध अविश्वास दाखल करणाऱ्या प्रस्तावाची नोटीस तहसील कार्यालय मारेगांव येथे उपस्थित राहून सादर केली होती. 
त्या अनुषंगाने आज दिनांक 26 जुलै 2024 रोजी दुपारी ठिक 2.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय केगाव (बोदाड) तालुका मारेगांव येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. सदर विशेष सभेत एकूण 7 ग्राम पंचायत सदस्या पैकी 6 सदस्य उपस्थित होते. आणि एक सदस्य गैरहजर होता. उपस्थित सहा सदस्या पैकी सरपंच यांच्याविरुद्ध चार सदस्यांनी हात वर करून मते नोंदविले आणि सरपंचांच्या बाजूने दोन सदस्यांनी हात वर करून मते नोंदविले. 
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील नियम 35 (3) नुसार ग्रामपंचायत मध्ये मत देण्याचा अधिकार असणाऱ्या एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश म्हणजेच ६ पेक्षा कमी मते अविश्वास ठरावाच्या बाजूने मिळालेली असल्यामुळे आज रोजी अविश्वास ठराव नामंजूर करण्यात/फेटाळण्यात आलेला आहे. 
सभेच्या अध्यक्षस्थानी उत्तम निलावाड तहसीलदार मारेगाव हे उपस्थित होते तर त्यांना सहकार्य करण्यासाठी सचिव कु. जयश्री पाटील ग्रामपंचायत केगाव ह्या उपस्थित होत्या. सभेच्या ठिकाणी मंडळ अधिकारी अमोल गुघाणे, अरविंद पिंपळकर आणि तलाठी संजय शिंदे हे उपस्थित होते.