Page

चंद्रपूर-वणी-आर्णी- लोकसभा निवडणूक तिरंगी लढत होण्याचे संकेत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : थेट आरोपांची खैरात एकमेकांवर डागणे हे नित्यचेच झाले. "ह्याची त्याने जिरवली, त्याची ह्यो जिरवतील"...ह्याच राजकारण त्याच्याही अलंगट येणार. पक्षाचे काही देणे घेणे नाही, पण काही असो तो माणूस खूप चांगला, ह्या भाबड्या पोलखोल गोष्टी निवडणूकीदरम्यान चर्चेचा विषय काही नवीन नाही. आता मात्र होऊ घातलेल्या लोकसभेत कोण बाजी मारेल? अशी पुन्हा चर्चा चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघात मनोरंजनात्मक रंगत आहे. सध्या सोशल मिडियावर काही पदाधिकारी मंडळी व कार्यकर्ते आपल्या उमेदवारांबाबत केलेल्या कामांचा विकासाचा प्रचार शेअर करताना दिसत आहे. मात्र, आजपासून ख-या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल. 

चंद्रपूर,वणी,आर्णी या लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. प्रचारात कोण आघाडी घेईल हे आज जरी सांगता येत नसले तरी सध्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या मतदार संघातील गावोगांवी मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या असल्याचे दृष्टीक्षेपात पडत आहे. परंतु आज तीन तारखेपासून प्रचाराला वेग येईल. चंद्रपूर-वणी-आर्णी या मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर व वंचितचे राजेश बेले निवडणूक रिंगणात उतरले असून या शिवाय काही अन्य उमेदवार या निवडणुकीत आपले नशिब अजमावू पाहत आहे,तेही प्रचारात ताकदणीशी उतरले. 

प्रत्येक उमेदवारांना आपल्या विजयाची आशा लागली जरी असली तरी महायुती, महाविकास आघाडी व वंचित च्या उमेदवारात अतितटीची लढत होईल असे काही राजकीय मंडळींचे म्हणणे आहे. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा तिरंगी लढत किंबहुना चांगलीच चूरशीची होणार आहे. आ.प्रतिभा धानोरकर यांना भावनिकतेचा फायदा होईल, असे काही राजकीय वर्तुळातून वर्तविले जात आहे. तर दुसरीकडे मंत्र्याचा विकास प्रचारात काही कमी नाहीत. तेही विजय मिळवूच अशी मोट बांधत आहे. 

परंतु भाऊ की ताई? किंवा आणखी कोणी तिसरा नवीन चेहरा उदयास येइल? याचा संभ्रम आहे. कारण मागील लोकसभा पाहता कोण कोणाला 'धक्का दिला' ही धाकधूक उमेदवारीवरून सुरुवातीला चर्चेत होती. परंतु याबाबत कोणीच रोखठोक मन की बात करित नसले तरी "आमचं ठरलं" म्हणून आभासी दुनियेचा आधार घेत प्रचार कार्य तूर्तास जोमात सुरु असल्याचे दिसून येत आहे. आपआपल्या उमेदवारासाठी मतदारांना साकडे घातले जात असून त्यांच्या विजयाजी माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघातील मतदारांनी कंबर कसली आहे. 

शहरात प्रचार गरम आहे, तर ग्रामीण भागात प्रचार थंडा दिसून येतो. मात्र,सध्या सोशल मीडियातून तुफान फटकेबाजी कहर करत आहे. परिणामी जस जसे दिवस जवळ येत आहे, तस तसे होऊ घातलेल्या तिरंगी लढतीची धडकी राजकीय नेत्यात वाढत असून मतदारात ही निवडणुक उत्सवासारखी आहे, एवढे मात्र निश्चित.

खाजगीकरण,उदारीकरण जागतिकीकरण या धोरणाचा फटका नागरिकांना बसला आहे. निवडून आलेला लोक प्रतिनिधी देश हितापेक्षा बेहिशोबी मालमत्ता गोळा करण्यात धन्यता मानत असून ईडीच्या धाकाने आपली निष्ठा धुळीत मिसळत असल्याचे उदाहरण ताजे आहेत. बेहिशोबी पैसा कामाविणे संविधानाच्या चौकटीत बसत नसतानाही संविधानालाच केराची टोपली दाखविली जात असल्याचा प्रकार मतदार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. सध्यातरी निवडणुका कडे मालमत्ता गोळा करण्याचे साधन म्हणून पाहिले जात आहे "माल लगाव माल लो" असा प्रकार सुरु झाल्यामुळे लोकशाही मध्ये सामाजिक कार्यकर्त्याना निवडणुकी मध्ये विजयाची संधी मिळत नाही.त्यामुळे निवडणुका कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल्यासाठी यंदा मतदार कोणती भूमिका घेईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.