Page

नंदीग्राम एक्स्प्रेस वणी वरून कधी धावणार; सर्वसामान्याना लागली प्रतीक्षा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी तालुकावासीयांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असलेली 'नंदीग्राम एक्स्प्रेस' बल्लारशहा ते मुंबई या रेल्वे मार्गावर 16 मार्च 2024 रोजी मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवसापासून ही रेल्वेसेवा बंद पडली आहे. विशेष म्हणजे उद्घाटनाच्या दिवशी सुरू झालेली रेल्वे नंदीग्राम नव्हती. केवळ लोकसभेची आचारसंहिता लागेल, या भीतीने अपूर्ण कामाचे लोकार्पण करण्याचा खटाटोप शासनाच्या वतीने करण्यात आला, असा आरोप प्रवासी करीत आहे.

वणी ते मुंबई ते रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. सर्वात प्रथम ही मागणी 26 मार्च 1962 ला रेल्वे बजेटच्या चर्चेत खासदार लोकनायक बापूजी अणे यांनी केली होती. यादरम्यान तब्बल 45 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही नंदीग्राम रेल्वे अखेर 21 मार्च 2007 पासून सुरू झाली होती. नागपूर, वर्धा, वणी, अदिलाबाद, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड, नाशिक यामार्गे ती मुंबईला जायची. मात्र 22 मार्च 2020 पासून कोरोनाच्या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून काही अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. त्यात राज्यात रेल्वे बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला. दि. 1 जुलै 2021 ला नंदीग्राम पूर्ववत सुरू झाली. परंतु ती अदिलाबाद-मुंबई-अदिलाबाद अशी सुरू झाली. दोन ते अडीच वर्षांनंतर बल्लारशहा, चंद्रपूर वणी व येथून मुंबई अशी रेल्वे सुरू होणार असल्याच्या बातम्या झळकल्या आणि इथेच गडबड झाली.

प्रकल्प पूर्ण झाला तर त्याच्या उद्घाटनाचा सोहळा कौतुकाचा असू शकतो. पण, अपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन करून काय साधले असा प्रश्न सर्वसामान्यातून उपस्थित केला जात आहे.