Page

शासनाचे शंभर टक्के अनुदान आम्हाला द्या- अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी


   

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : माहे जुलै ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे. परंतु प्रती हेक्टरी अनुदान नावाने आमच्या खात्यात अजूनपावेतो पूर्ण मिळाली नाही. ते शंभर टक्के अनुदान आम्हाला मिळावे अशा आशयचे निवेदन तहसीलदार पुंडे यांना देण्यात आले.
यावेळी मागणी कर्ते प्रवीण बलकी, योगीराज बलकी, गणेश धोबे, किशोर खंडाळकर, राजू डावे,अविनाश बलकी,संजय बलकी,मनोज निखाडे,रविंद्र बोढे,हरी परचाके,सुभाष तिखट, प्रफुल जुनगरी,अनिकेत सोनेकर, दामोदर किनाके, रुपेश भरणे, यशवंत भरणे, राहुल किनाके, नितीन खंडाळकर, प्रशांत वाढई, वासुदेव परचाके, रविकांत वाढई यांची उपस्थिती होती. तालुक्यातील अतिवृष्टीबाधितांना सण 2022 या खरीप हंगामात माहे जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने व पूर बुडीने अक्षरशः शेती पाण्याखाली जावून मोठे नुकसान झाले. यासाठी शासनाने अनुदान देण्याचं घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार अशी आशा असतांना प्रशासन स्तरावर एकमेकांवर चालढकल करून काय कागदीघोडे नाचवले हे कळायला मार्ग नसून दिवाळी पूर्वी अनुदान खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली हे खरं असतांना मात्र, शंभर टक्के मदत न मिळता तटपुंजे अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी निवेदनातून आम्हाला शासनाचे शंभर टक्के मंजूर अनुदान देण्यात यावी अशी आग्रही मागणी केली, शिवाय सदर बाबीस दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

त्यामुळे आता निवेदनाची दखल घेतील का? दोषीवर कारवाई होईल का? याकडे लाखापूर, आकापूर व डोलडोंगरगांव सह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सुशिक्षित बेरोजगारांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन


सह्याद्री चौफेर | राहुल रामटेके

नागभिड : प्रथम एज्युकेशन फाउंडेशन तर्फे युथनेट प्रोग्राम अंतर्गत पळसगाव (खुर्द) येथे सुशिक्षित बेरोजगार 14 ते 35 वयोगटातील युवक युवतींना मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या ज्योती मडावी यांनी सदर शिबिरामध्ये युवक युतींना निशुल्क प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.

या शिबिरात ओवाळा, जनकापूर, पळसगाव, येथील युवक-युवती सहभागी झाले होते. या गावातील युवक युवतीनी येऊन आपले नाव नोंदणी करून त्यांचे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यांना कोर्सची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे टूल प्रदर्शनीला पळसगाव (खुर्द)चे सरपंच उपसरपंच तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी तिन गावाचे स्वयंसेवक उपस्थित होते तसेच या प्रशिक्षण शिबिराला प्रामुख्याने पळसगावचे सरपंच निरज सिद्धमसेट्टीवार, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, स्वयंसेवक शितल गणवीर, ग्रामपंचायत कर्मचारी हेमंत खोब्रागडे यांनी मोलाचे सहकार्य केले. या प्रशिक्षण शिबिरामुळे परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना निःशुल्क माहिती मिळत असल्यामुळे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : एसपीएम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते, ते शूरवीरांपेक्षा कमी नव्हते दोनशे वर्षाच्या गुलामगिरीत अडकलेल्या देशातील विविध राज्यांना एकत्र करून त्यांनी भारतात विलीन केले. या मोठ्या कामासाठी त्यांना लष्करी बळाची गरज भासली नाही हीच त्यांची सर्वात मोठी कीर्ती जी त्यांना सर्वांपासून वेगळी करते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री क्षीरसागर सर व उपप्राचार्य श्री तामगाडगे सर उपस्थित होते यावेळी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

सह्याद्री चौफेर | न्यूज 

ठाणे : राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.

फिफाच्या १७ वर्षाखालील महिला वर्ड कप स्पर्धेच्याच्या निमित्ताने आयोजित फुटबॉल फॉर स्कुल उपक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, फिफाचे अध्यक्ष जीयानी इंफॅन्टिनो, भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष कल्याण चौबे, महासचिव शाजी प्रभाकरन, फिफा फुटबॉल फॉर स्कूलच्या फातिमाता सीडबी, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते. भारतीय फुटबॉल फेडरेशन, केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या सहयोगाने नवी मुंबईतील नेरुळमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फुटबॉल फॉर स्कूल या उपक्रमासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालय व फिफा संघटनेमध्ये सामंजस्य करार यावेळी झाला. स्थानिक महापालिका शाळेतील विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

श्री. केसरकर म्हणाले की, फुटबॉल खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मदत होते. शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता वाढ होण्यासही मदत होते. राज्यातील शाळांमध्ये २५ लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांपर्यंत फुटबॉल पोचविण्यात येईल.
२५ लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल चे प्रशिक्षण देणार - धर्मेंद्र प्रधान
केंद्रीय मंत्री श्री. प्रधान म्हणाले की, खेळाचा समावेश मुख्य अभ्यासक्रमात व्हायला हवा यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. देशातील २५ लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

देशातील प्रत्येक गावागावात फुटबॉल खेळ पोहचविण्यात येणार आहे. यासाठी नवोदय विद्यालय संघटनेचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

फुटबॉल फॉर स्कूल उपक्रम :
शाळांसाठी फुटबॉल (फुटबॉल फॉर स्कूल) हा फिफा द्वारे युनेस्कोच्या सहकार्याने चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. ज्याचे उद्दिष्ट सुमारे ७०० दशलक्ष मुलांच्या शिक्षण, विकास आणि सक्षमीकरणासाठी योगदान देणे आहे. फुटबॉल हा खेळ अधिकाधिक मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेमध्ये फुटबॉल क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्र संघाचे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साधण्यासाठी फुटबॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्ये विकसित करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी....

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : तालुक्यातील शेत जमीन परिसरालगत आपली स्वताची जनावरे राखन करीत असताना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून, खुशाल कवडू शेट्टे (वय 50) वर्ष असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. तो उपरी येथील रहिवाशी असुन उपवनक्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल असल्याने या परिसरातील हजारो हेक्टर शेत जमीनी जंगल परिसरात असल्याने सोबतच या भागात मोठ्या प्रमाणात वाघाचा धामाकुळ असून वाघाची नेहमीची दहशत निर्माण होत आहे. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेच्या दिवशी शेतकरी खुशाल शेट्टे आपली जनावरे गाई; मशी चराईसाठी जंगल परिसरातील कक्ष क्र.198 लगत चराई करीत असताना या भागात दब्बा धरून बसलेल्या वाघाने मशी वर हल्ला केला.


मशीने इतरत्र धाव घेतली परिणामी गाई म्हशी राखणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने झडप घेतली. जखमी शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने वाघाने पळ काढला व लगतच सदर परिसरात काही महिला पुरुष सर्पनाकरिता गेले असता जखमी शेतकऱ्याची ओरड पाहून त्या ठिकाणी धाव घेत
 लगेचच जखमी शेतकऱ्याला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले. सदर जखमी शेतकऱ्याला शरीरावरती अनेक जखमा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भागात वाघाची मोठी दहशत निर्माण झाली असून भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या तर धान पिकाचा हंगाम हाती येत असताना सर्वत्र शेतकरी आपल्या शेतावर असतात त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ शेतकऱ्यांवर निर्माण झाली आहे या भागातील वन्यजीवांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेत उपक्षेत्र अंतर्गत उपरी येथील वनरक्षक यांनी जखमी शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

खळबळजनक: कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सापडला युवकाचा मृतदेह...

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार

सावली : सावली कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली.

सावली तालुक्यातील बोथली येथील रोहित अशोक दळांजे वय 20 वर्ष या युवकाने उंदीर मारण्याची औषध 27 तारखेला प्राशन केले असल्याचे घरच्या लोकांना माहित होताच त्याला बोथली वरुन ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचारासाठी आणण्यात आले होते.
मात्र सावली येथे प्राथमिक उपचार करून सामान्य रुग्णालय गडचिरोलीला रेफर करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं असता त्याला रेफर करण्याकरिता ऐम्बुलन्स ची व्यवस्था करण्यात आली. व त्याला त्याच्या घरच्यांनी ऐम्ब्युलन्स मध्ये बसवत असतांना त्याने आपल्या वडिलांच्या हाताला झटका मारून रुग्णालयाच्या परिसरातून फरार झाल्यामुळे सर्वत्र त्याचा शोधाशोध करण्यात आला.
शेवटी तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात 29/10 ला रात्रौ 10:30 वाजताच्या सुमारास रोहित चा मृतदेह आढळला असता वरील घटना पोलीस विभागाला माहीत होताच सावली पोलीसांनी उच्च स्तरिय तपासणी करिता मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सावली येते पाठवण्यात आले आहे.
पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.

चिंचाळा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : दि.३० ऑक्टोंबर २०२२ रविवारला सकाळी अंदाजे ७ वाजताचे सुमारास चिंचाळा येथे विष प्राशन करून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पंढरी गोविंदा नैताम (45) असे, मृत अल्पभुधारक शेतकऱ्याचे नाव आहे. त्याचे कडे दोन एकर कोरड वाहू शेत असल्याचे समजते. 
मृतकाच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार.

मनसेचा भव्य शेतकरी मेळावा, मेळाव्यात सहभागी होण्याचं अनंताभाऊ यांचे आवाहन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : जिल्ह्यासह वणी मारेगाव झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावली असून, मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना सुरु करण्यात आली आहे. दि.03 नोव्हेंबर 2022 ला सकाळी 11 वाजता वणी येथे वसंत जिनींग सभागृहात भव्य शेतकरी मेळावा होणार आहे.

वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली. सुरुवातीला पाऊस न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. त्यातच आता अतिवृष्टी झाल्यामुळे नदी नाल्याला पूर ओसंडून वाहू लागल्याने शेतकऱ्यांची हातची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर असमानी आणि सुलतानी अशी वारंवार संकटं ओढावली असतांना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे सरसावली आहे. नेते पुढारी निवडणूकीच्या कामात मस्त, विधानसभा क्षेत्रातील पुरपीडित नापिकीने त्रस्त असून शेतकऱ्यांच्या दारात "राजूभाऊ" फक्त हे चित्र अनेकांनी बोलून दाखवले.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून अशा परिस्थितीत बळीराजा खचला जावू नये, त्याचे मनोबल वाढले पाहिजे, यासाठी पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेअंतर्गत मोफत बियाणे व इतर साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात येणार असून भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जगाचा पोशिंदा संकटात असताना मदत तर दूरच पण प्रशासन त्याच्यापर्यंत पोहोचलेले देखील नाही. शेतकरी हतबल झाला आहे त्यामुळे त्याला उभारी देण्याकरिता ही योजना असून जिल्ह्यात पहिला टप्पा वणी विधानसभा क्षेत्रात राबवण्यात येत असल्याचेही उंबरकर म्हणाले.

सन्माननीय राजसाहेब ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेचा शेतकरी मार्गदर्शन मेळावा व बियाणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन मनसे तालुका उपाध्यक्ष अनंता भाऊ जुमळे यांनी केले. 

पोलीस भरतीला स्थगिती..! नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली...

सह्याद्री चौफेर | न्यूज 

यवतमाळ : राज्यभरात एक नोव्हेंबरपासून तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. 

आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यात आली आहे.
मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे जे तरुण पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय. 

त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

राशीभविष्य - दि. ३० ऑक्टोबर रविवार..



🔯 आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग कोणता असेल जाणून घ्या.

🐏 मेष : दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर चांगला लाभ मिळेल. मीडिया आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. जॉब संदर्भात काहीसा तणाव निर्माण होऊ शकतो. आजचा शुभ रंग - लाल आणि पांढरा.

🦬 वृषभ : आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्तम असणार आहे. व्यवसायात चांगला नफा होईल, रखडलेली कामे मार्गी लागतील. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील व्यक्तींची प्रमोशनच्या दिशेने वाटलाच सुरू होईल. आजचा शुभ रंग - निळा आणि हिरवा.

👩‍❤️‍👨 मिथुन : व्यापारात चमत्कारिक लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आपल्या व्यवहाराने कुटुंबीय आणि मित्र परिवारांचे मन जिंकाल. एखाद्या मित्र किंवा नातेवाईकाकडून गिफ्ट मिळू शकते. आजचा शुभ रंग - हिरवा.

🦀 कर्क : व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. लाल मिरची, मसूर डाळ आणि फुल हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा. दागिने खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आजचा शुभ रंग - गुलाबी.

🦁 सिंह : व्यापार जसा सुरू आहे तसाच सुरू राहू द्या मात्र, निष्काळजीपणा करू नका. व्यापारात चढ-उतार पहायला मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - नारंगी आणि पिवळा.

👩🏻 कन्या : व्यापारात चांगला लाभ होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची जोरदार चर्चा होईल. नोकरी आणि व्यवसायात चांगला लाभ होईल. आजचा शुभ रंग - निळा आणि नारंगी.
⚖️ तूळ : वाद-विवाद टाळा. आजचा दिवस धावपळीचा असू शकतो. रोजगाराची नवी संधी उपलब्ध होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. गरिबांना अन्न दान करा. नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - निळा आणि पांढरा.

🦂 वृश्चिक : व्यवसायात चांगला नफा होईल आणि रखडलेले काम मार्गी लागेल. वेळेवर काम पूर्म केल्याने कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अधिक प्रोत्साहन मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग - लाल आणि हिरवा.

🏹 धनु : व्यापाराच्या संबंधी प्रवासाचा योग निर्माण होईल. घरातील ज्येष्टांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबासाठी वेळ काढाल. शिक्षण क्षेत्रात तुमचं नाव होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.

🦌 मकर : पार्टनरशिपमध्ये असलेल्या व्यवसायात चांगला नफा होईल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडाल. आजचा शुभ रंग - लाल.

🧉कुंभ : व्यापाराच्या संदर्भात मोठा निर्णय घ्याल. नोकरी आणि अभ्यासात विद्यार्थी प्रगती करतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्रांसोबत पार्टीचा बेत आखाल. आजचा शुभ रंग - निळा आणि पिवळा.

🐟 मीन : अचानक धनलाभाची शक्यता आहे. आरोग्य सुदृढ राहील. नव्या नोकरीची संधी चालून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने चांगली प्रगती कराल. आजचा शुभ रंग - हिरवा आणि पिवळा.


मार्डी येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्या वतीने "कार्तिक एकादशी कार्यक्रम"

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : मार्डी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्या वतीने "कार्तिक एकादशी कार्यक्रम" आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले.

सदर कार्यक्रम शुक्रवार दि.4 नोव्हेंबर 2022 ला सकाळी 9. वा.अभिषेक व पूजन, सायंकाळी 7. वा.माऊली वारकरी भजन मंडळ कळंब द्वारा संगीतमय कार्यक्रम होणार असून गायक श्री. विठ्ठलजी ठाकरे, कु दिव्या शेंडे, कु. संध्या रोहणकर, कु. सिमरन उईके तबला वादक राजू कोवे, ढोलक वादक भारत घाटोळे यांचा समावेश आहे.
तसेच शनिवार दि.5 नोव्हेंबर ला सकाळी 11. वा.दहीहांडी व गोपाळकाला च्या कार्यक्रमाने सांगता होणार असून लगेचच दुपारी 12 ते 5 वाजे पर्यंत भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. परिसरातील सर्व भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक गणेश सीताराम जयस्वाल, परामानंद जयनारायण जयस्वाल, तथा अदलखीया परिवार यांनी केले. 

वसंत जिनिंगच्या निवडणूक मुहूर्तावर नारळ फोडून प्रचार पर्वाला सुरुवात

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : वसंत जिनिंगच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज शनिवारी वनोजा (देवी) येथील जनाबाई कासामाय देवस्थानात आशीर्वाद घेऊन परिवर्तन पॅनेलचे नारळ फोडण्यात आले.

या प्रचार मुहूर्तावर काँग्रेसचे नेते माजी आमदार वामनराव कासावर साहेब, कृषी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई खंडाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष वसंतरावजी आसुटकर, उमेदवार गजानन खापणे, रवींद्र धानोरकर, अशोक धोबे, जय आबड, घनश्यामजी पावडे, प्रमोदजी वासेकर, यावेळेस मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व संजीवनी प्रचाराचे नारळ फोडण्याकरिता उपस्थित होते. 
(प्रचार मुहूर्त मेढ रोवून मान्यवरांना संबोधित करतांना माजी आमदार)

सूत्रसंचालन यादवराव पांडे व आभार प्रदर्शन शंकरराव मडावी, युवक तालुकाध्यक्ष धनंजय आसुटकर, अंकुश माफूर विजुभाऊ धानोरकर, गंगाधर ठावरी, प्रफुल विकनकर,  सुधाकर धांडे, वसंताजी लांबट, गजानन अवताडे, अभिजीत ठाकरे, भाऊराव मेश्राम, मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनरावजी कासावर साहेब यांनी या परिवर्तन पॅनलच्या "विमान" या चिन्हा समोरील फुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे, आव्हान व मार्गदर्शन माजी आमदार वामनराव कासावार साहेब, नरेंद्र पाटील ठाकरे, वसंतराव आसुटकर, अरुणाताई खंडाळकर सर्व उमेदवारांनी प्रचाराच्या शुभप्रसंगी केले.

पदवीधरांनो एका "क्लिक" वर नाव नोंद करा - मारोती गौरकार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : येत्या काही दिवसात पदवीधर मतदार संघाची निवडणूक होऊ घातलीय. यात केवळ पदवीधर असणाऱ्यांनाच मतदार करता येणार आहे. अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती या पाच जिल्ह्यातील पदवीधरांना मतदार करायचे आहे. शासनाने जुनी यादी रद्द केली असल्याने सर्वच पदवीधरांना नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. या करिता तालुका अध्यक्ष मारोती गौरकार काँग्रेस कमिटी मारेगाव यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील पदवीधरांना आवाहन करण्यात येत आहे की, आपले नाव पदवीधर मतदार संघात नोंदणी करावे. त्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdWIjvxgd1NB_-qeM8Sf-3LrQ9Fk33lysqSwDEz1N4zprAv-g/viewform या दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपलं नाव भरून 
घेण्यात यावे. आपलं नोंद करतांना पासपोर्ट फोटो, सही, पदवी मार्कशीट, आणि आधार कार्ड जवळ असणे आवश्यक असून मतदार नोंदणीसाठी 1 नोव्हेंबर 2019 अगोदर पदवी असणे महत्वाचे आहे. सदर माहिती ही गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

ग्रामीण व शहरी भागातील सर्व क्षेत्रातील पदवीधरांना नौकरी विषयक, शेती विषयक, उद्योग विषयक, शासनाच्या योजनांचा लाभ पोहचवण्याकरिता व सर्व पदवीधरांना दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांना न्याय देण्याकरिता पदवीधरांच्या सशक्तीकरणाकरिता संघटित होण्याची वेळ आली असून या अनुषंगाने एक होणं गरजेचे आहे. त्यासाठी आपली जबाबदारी टाळू नका आपल्या विभागातील पदवीधर मतदार संघांसाठी मतदार नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज क्र.18 भरा आणि आजच पदवीधर मतदार व्हा. अधिक माहितीकरिता 9881557165,95275 30631,9552914882 संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले. 

रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यत्वे परिवहन विभागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज व रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरी या दोन बाबींवर प्रकाश टाकण्यात आला.

बैठकीला नागपूर(शहर/ग्रामीण)प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण, भंडाऱ्याचे राजेंद्र वर्मा, चंद्रपूरचे किरण मोरे, गोंदियाचे राजवर्धन करपे, वर्धाचे समीर शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

 राज्यात परिवहन विभागातील प्रशासकीय कामकाज गतिमान, सुलभ व पारदर्शक करण्याच्या उद्देशाने बहुतांश सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. सदर ऑनलाईन सेवांबाबत सेवेचे लाभार्थी म्हणजेच अर्जदार यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद साध्य होतो की नाही यांची प्रत्यक्ष परिणामकारकता तपासण्याविषयी निर्देश, त्यासोबतच सेवा हमी कायद्याअंतर्गत 14 सेवांचा आढावा घेऊन कोणतेही अर्ज प्रलंबित राहणार नाही याविषयीच्या सूचना परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिल्या.
परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी मोटार वाहन कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी म्हणजे दंड वसुली व संख्यात्मक वाढ हे नसून अपघाताचे प्रमाण कमी करणे व रस्त्यावरील सुरक्षेबाबत गुणात्मक बदल घडवून आणणे याविषयी मार्गदर्शन केले. थोडक्यात विभागाच्या कामकाजाविषयी सर्वसामान्य जनतेला सकारात्मक वाटण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी असे निर्देश दिले.

चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भेटीदरम्यान परिवहन आयुक्त श्री. भिमनवार यांनी गडचिरोली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी अद्ययावत यंत्रणासह सुसज्ज अशा तपासणी वाहनाचे निरीक्षण केले. सदर वाहन विशेष केंद्रीय सहाय्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध केल्याबद्दल गडचिरोली चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयसिंह चव्हाण यांचे कौतुक केले.

सणा-सुदीच्या दिवसात जास्त गोड-तेलकट खाणं झालं ? असे करा शरीराचे डिटॉक्स

सह्याद्री चौफेर | न्यूज 

सणांच्या दिवसांत खूप जास्त तळलेले पदार्थ आणि खूप मिठाई खाल्याने बऱ्याच वेळेस आपल्याला अस्वस्थ वाटू लागतं. ऍसिडिटी, अपचन आणि ब्लोटिंगचा त्रासही होऊ शकतो. अशा वेळी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकतो.
लिंबू पाणी – शरीर डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन करावे. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे कार्य करते. याचे सेवन केल्याने ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात नियमितपणे लिंबू पाण्याचे सेवन करावे._
फळं – फळांमध्ये अनेक पोषक तत्वं असतात. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे मुबलक प्रमाणात असतात. तसेच त्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्मही असतात. तुम्ही सॅलॅड किंवा ज्यूसच्या स्वरूपात फळांचे सेवन करू शकता. अन्यथा ती स्वच्छ धुवून कच्चीही खाऊ शकता. फळं खाल्लायने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
दही – दह्यामध्ये चांगले बॅक्टेरिआ असतात. ते आतडे स्वस्थ व निरोगी राखण्याचे काम करतात. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही दह्यामुळे मदत होते. दह्याचे सेवन केल्याने ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
ग्रीन टी – ग्रीन टी मध्ये अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. ते शरीराचे फ्री- रेडिकल्सपासून होणारे नुकसान रोखतात व संरक्षण करतात. ग्रीन टी चे नियमित सेवन केल्यास आपले शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

ग्रंथपालन परीक्षेच्या फेर गुणमोजणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, राज्यात एकूण ७०.१३ टक्के निकाल लागला आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे. त्या विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालकांनी केले आहे.

सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा ग्रंथालय संचालनालयामार्फत घेण्यात येते. या परीक्षेची गुणपत्रिका http://www.dol.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १४ नोव्हेंबरनंतर मिळणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे, त्यांनी प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी १० रूपये याप्रमाणे शुल्क व अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाठवावेत. यानंतर प्राप्त अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असे ग्रंथालय संचालकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कळमना येथे विषारी द्रव्य प्राशन करून इसमाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | नितीन वनकर 

वणी : तालुक्यातील मौजा कळमना (बु) येथील ऐका 35 वर्षीय तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केले, त्यातच त्याचा मृत्यू झाला ही घटना दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी अंदाजे दुपारी 2 वाजताचे दरम्यान घडली.

गणेश हरिदास खंदरे रा. कळमना (बु) असे मृतकाचे नाव आहे. स्थानिक चौकशी केली असता घरगुती वादामुळे विष घेतल्याचे समजते. मृतक भूमिहीन असून त्याचे पाठीमागे पत्नी सुनीता, मुलगा निदान्त व मुलगी दुर्गा असा आप्त परिवार आहे. 

फुटपाथ स्कूलचे वडार वस्तीतील कार्य असामान्य - संदीप चिचाटे

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वर्धा : मोहित शैक्षणिक व सामाजिक संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या फुटपाथ स्कूलचे वडार वस्तीतील कार्य असामान्य असल्याचे मत लायन्स क्लब गांधी सिटी चे अध्यक्ष संदीप चिचाटे यांनी व्यक्त केले. मोहित शैक्षणिक व सामाजिक संस्था द्वारा चालविल्या जाणाऱ्या फुटपाथ स्कूलतर्फे वडार वस्तीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी फिनिक्स अकॅडमी वर्धा चे संचालक नितेश कराळे , सामाजिक कार्यकर्त्या शुभदा रुद्रकार, लायन्स क्लब गांधी सिटी चे अध्यक्ष संदीप चिचाटे , फुटपाथ स्कूलचे संचालक मोहित सहारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      
मोहित शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे फुटपाथ स्कूलच्या माध्यमातून वडार झोपडपट्टीत मुलांना निशुल्क शिक्षण दिले जात असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले जात आहे. मोहित सहारे यांनी केलेले हे कार्य समाजातील तरुणाईसाठी दीपस्तंभ असल्याचे मत नितेश् कराळे यांनी व्यक्त केले तर समाजिक कार्यकर्त्या शुभदा रुद्रकार यांनी उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी वडार वस्तीतील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय व खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी समूह गीते ,कविता सादर करत उपस्थिताची वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहित सहारे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अंकित बारंगे यांनी केले तर आभार वैष्णवी सहारे यांनी मानले. 
           
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जयश्री घाणकर ,अंकित बारंगे,प्रतीक पवार,जयश्री घाणकर,शीतल पिंपळे,शुभम झामरे, व मोहित सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.



समाज सेवेत तरुणाईने उस्फुर्त सहभागी व्हावे - संदीप चिचाटे


सह्याद्री चौफेर | न्यूज 

वर्धा : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटली तरी भुखमरी ,बेरोजगारी, कुपोषण, उपासमारी यासारख्या गंभीर प्रश्नांना आजही देशाला समोर जावे लागत आहे. कोरोना काळात हजारो मुले अनाथ झाले असून त्यांच्या जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.समाजाचे हे प्रश्न सोडविण्यासाठी तरुणाईने स्वयंस्फूर्तीने समोर यावे,असे आवाहन् लायन्स क्लब गांधी सिटीचे अध्यक्ष संदीप चिचाटे यांनी केले.

आरंभ बहूउद्देशिय संस्थेच्या वतीने सेवाश्रम येथे सुरु असलेल्या एक हात मदतीचा उपक्रमात लायन्स क्लब वर्धाने सक्रिय सहभाग नोंदविला. याप्रसंगी लायन्स क्लब गांधी सिटीचे संचालक अनिल नरेडी,अध्यक्ष संदीप चिचाटे,उपाध्यक्ष स्वाती चुटे,सचिव आशिष पोहाणे, दिलीप रोकडे,चंद्रकांत डगवार,प्रकाश खंडार,सेवाश्रम प्रमुख शिवाजी चौधरी,फूटपाथ स्कूलचे मोहित सहारे,भावना देशपांडे, नाट्यप्रतीक थेटर अकॅडमीचे प्रतिक सूर्यवंशी,नलिनी चिचाटे उपस्थित होते.
          
 सेवाश्रमात गेल्या अनेक वर्षांपासून अनाथ मुलांची संपूर्ण व्यवस्था निशुल्क केली जात असून तिथे आज अनेक वृद्ध , घटस्फोटीत व विधवा स्त्रिया जीवन जगत आहे.शिवाजी चौधरीने केलेले हे कार्य अद्वितीय असल्याचे मत अनिल नरेडी यांनी व्यक्त केले. त्याच्या सेवा कार्याचा लायन्स क्लब गांधी सिटी च्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
             
याप्रसंगी तरुण समाजसेविका भावना देशपांडे यांचा वाढ दिवस सेवाश्रमात साजरा करण्यात आला.तसेच दिलीप रोकडे,चंद्रकांत डगवार, संस्कृती पेटकर ,वृषाली बकाल यांनी प्रेरणा गीते सादर केली.दिवाळीच्या आरंभी एक हात मदतीच्या अंतर्गत एक दिवा मदतीचा उपक्रमाला वर्धेकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन लायन्स क्लब गांधी सिटीच्या वतीने करण्यात आले.
           
कार्यक्रमाचे संचालन साक्षी हिवरे हिने केले तर आभार कुमुदिनी मोहदूरे यांनी मानले.कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश देशपांडे,माधुरी देशपांडे,अमित पत्थे, माधव मोहरील,मोहन सायंकाळ,आदित्य दुधे, जानव्ही ठोंबरे, नीता जाधव, पूजा जाधव, अविनाश डोंगरे यांनी सहकार्य केले.

मोहदा ग्रामपंचायतकडून समस्त ग्रामवासियांना दिवाळी, भाऊबीज, गोवर्धन पूजेच्या शुभेच्छा..!


दिपावळीच्या शुभेच्छा!

सस्नेह नमस्कार,
दिपावळी महोत्सवी समस्त मोहदावासियांना दिवाळी पासून ते दिवाळी पाडवा,भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

शुभेच्छुक :- सरपंच, उपसरपंच व सदस्य पदाधिकारी 
ग्रामपंचायत कार्यालय मोहदा 

समस्त जनतेस बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा व भाऊबीजेच्या मंगलमय शुभेच्छा..!


दिपावळीच्या शुभेच्छा!

सस्नेह नमस्कार,
दिपावळीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

“विश्वास आणि प्रार्थना, प्रेम आणि प्रकाश,
शांती आणि शांतता यांनी भरलेला,
हा दिवस तुम्हाला आनंद आणि सर्व काही पलीकडे घेऊन येवो.

गोवर्धन पूजेचा हा विशेष दिवस तुम्हाला यश,
संपत्ती आणि प्रेम घेऊन येवो, भगवान कृष्ण तुम्हाला,
तुमच्या कुटुंबाला स्वर्गातून आशीर्वाद देवो. समस्त जनतेस  गोवर्धन पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!”

शुभेच्छुक :- धनंजय विनोदराव आसुटकर
तालुका अध्यक्ष : युवक काँग्रेस कमिटी, मारेगाव
तथा आनंदी कॉम्पुटर इन्स्टिट्यूट, संचालक, वणी

भाऊबीज व दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!


दिपावळीच्या शुभेच्छा!

सस्नेह नमस्कार,
गोवर्धन पूजा, दिपावळी पाडवा ते भाऊबीज पर्यंतच्या, साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…

भाऊबीज व दिवाळी सणाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

शुभेच्छुक :- संजय रामचंद्र खाडे 
अध्यक्ष : रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड, वणी
अध्यक्ष : रंगनाथ स्वामी फार्मस प्रोड्यूसर कंपनी, वणी
संचालक : वसंत जिनींग, वणी
माजी सरपंच, ग्रामपंचायत उकणी

शुभेच्छुक :- सौ. संगीता संजय खाडे
अध्यक्ष : श्री. लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या.वणी
अध्यक्ष : सहयोगी महिला बहुउद्देशीय संस्था, वणी
माजी सरपंच, ग्रामपंचायत उकणी

सुरमाज फाउंडेशनच्या वतीने आत्मनिर्भर महिलांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | न्यूज 

चोपडा : फेब्रुवारी 2022 मध्ये सूरमाज फाउंडेशन च्या वतीने स्किल इंडिया डेवलपमेंट फॉर वूमेन ही योजना सुरू करण्यात आली होती. ज्याअंतर्गत अनेक महिलांना टेलरिंग क्लासेससाठी फी देण्यात आली होती आणि आज 25 ऑक्टोबर 2022 यापैकी काही महिलांनी त्यांचा कोर्स उत्तम प्रकारे पूर्ण केला आहे आणि आता ते लोक आपले कुटुंबाची गरजा पूर्ण करू शकतात. म्हणूनच तिच्या कामाचा कौतुक करताना, सूरमाज फाऊंडेशनने महिलांचा सन्मान केला आणि इतर महिलांना उत्साहित केला की लवकरच त्यांनी आपला कोर्स पूर्ण करून आत्मनिर्भर व्हायला पाहिजे
कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुराण पाकने करण्यात आली तसेच संचालन डॉ.एम.डी.रगीब साहिब यांनी केले तर शिवलेले कपड्यांचा उघडण्यासाठी प्रशिक्षक शमीम तेली साहिबा यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अतिथी शेख मुजाहिद-ए-इस्लाम यांनी सांगितले की, आपणही महिलांना स्वयंभू बनवायला हवे. जे हाजी उस्मान शेख (अध्यक्ष सूरमज फाऊंडेशन) यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला, त्याच बरोबर कार्यक्रमात उपस्थित सर्व लोकांनी शिवलेल्या कपड्यांचे व कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुण्यांचे कौतुक केले आणि ठेकेदार आरिफ कॉन्ट्रॅक्टर साहेब, सामाजिक कार्यकर्ते आरिफ भाई अबुलैस शेख चे डॉक्टर मोहम्मद जुबेर शेख यांनी सूरमाज फाउंडेशनचे वतिने सर्वाचं आभार मानले.

नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सह्याद्री चौफेर | न्यूज 

गडचिरोली : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भामरागड (जि. गडचिरोली) तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व जनजागरण मेळाव्याप्रसंगी तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.

धोडराज येथील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यापूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी दुर्गम भागात आपण भेटी दिल्या. विकासाचे काम आता गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात होत असून रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे.

गत दोन वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तसेच कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरिक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलीस हा महत्त्वाचा घटक असून पोलिसांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन भक्कमपणे उभे आहे. तसेच आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम याबाबत सरकारने नियोजन केले आहे. पूर्वीचा गडचिरोली आणि आत्ताचा गडचिरोली यात आमुलाग्र बदल झालेला दिसत आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी येथे दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला ही बाब संपूर्ण पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाची आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळेच गडचिरोली पोलीस उत्कृष्ट काम करीत असून राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात मदत होत आहे.

प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तत्पूर्वी धोडराज येथील पोलीस मदत केंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इरपे दोगे पल्लो, माळी गुमा मासा, शांती कुतु मज्जू, चैते चैतू पल्लो यांना साडीवाटप, राजे चैतु पुंगाटी, जैनी वड्डे, इंदरसाय गावडे यांना ब्लॅंकेट वाटप, रेश्मा सैनू मिच्छा हिला शिलाई मशीन, परी दिनेश पुंगाटी, मोहन वड्डे या बालकांना स्कूल बॅग तर बबलू देवाजी सिडाम, सोमजी विना पुंगाटी यांना फवारणी संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विनीत पद्मावार यांनी तर आभार पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांनी मानले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस जवान तसेच त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली.

पत्रकारितेचा उगम मुळातच मानवी स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून झाला आहे - गीत घोष



सह्याद्री चौफेर | नितीन वनकर 

राळेगाव : जगातील लोकांच्या हक्कासाठी आवाज उचलने हेच वृतपत्राचे काम असून पत्रकारितेचा उगम मुळातच मानवी स्वातंत्र्याच्या संकल्पनेतून झाला आहे असे उदगार साप्ताहिक राळेगाव समाचारच्या दीपोत्सव दिवाळी अंकाचे उद्घाटक म्हणून उदघाटन करित असतांना प्रगतशील साहित्य व विचारवंत मा. गीत घोष यांनी काढले. ते साप्ताहिक राळेगांव समाचार दिपअंक प्रकाशन सोहळ्याचे उदघाटक म्हणून यावेळी बोलत होते.

साप्ताहिक राळेगांव समाचार कार्यालय, इंदिरा नगर तहसील समोर, राळेगांव पारपडलेल्या यार सोहळ्याचे अध्यक्ष मा.ना. माजी शिक्षणमंत्री म.राज्य वसंतरावजी पुरके साहेब होते ,उदघाटक मा.गीत घोष हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून मा. प्रा.आशिष कांबळे अमरावती हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा.रविंद्र शेराम, नगराध्यक्ष न.पंचायत, राळेगांव, श्रीमत उषाताई भोयर जि.प.सदस्या, यवतमाळ, मा.चित्तरंजन कोल्हे ता.अध्यक्ष पा.ज.पा.तथा जि.प. सदस्य, मा.प्रशांत तायडे, सभापती पंचायत समिती, राळेगांव, मा.अरविंद वाढोणकर,जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल जिल्हा कांग्रेस कमिटी, यवतमाळ, मा.जानराव गीरी, उपनगराध्यक्ष नगरपंचायत राळेगांव, मा.अड.प्रफुल चौहान, जिल्हा महामंत्री भाजपा, यवतमाळ, मा.अड. फिडेल बायदाणी, जेष्ठ विधिज्ञ, राळेगांव, मा. अरविंद फुटाणे, ता.अध्यक्ष भाराका,राळेगांव, मा.शंकर वरघट, जिल्हा उपाध्यक्ष मनसे, यवतमाळ, मा.विनोद काकडे, तालुका प्रमुख शिवसेना, राळेगांव, मा. राजेश काळे,तालुका अध्यक्ष पत्रकार संघटना, राळेगांव, मा.नंदकुमार गांधी, सभापती, वसंत जिनिंग, राळेगांव, मा.मिलींद इंगोले, अध्यक्ष खरेदी विक्री संघ, राळेगांव, मा.सचिन हुरकुंडे, अध्यक्ष ग्रामविकास सोसायटी, राळेगांव, मा. कुदनभाऊ कांबळे, नगरसेवक, नगर पंचायत, राळेगांव, सौ.कमरूनिस्सा हमिदभाई पठाण, नगरसेविका नगर पंचायत,राळेगांव, सौ.पुष्पाताई विजय कन्नाके, नगरसेविका, नगर पंचायत, राळेगांव ह्या उपस्थित होत्या.
(साप्ताहिक राळेगाव समाचारच्या दीपोत्सव दिवाळी अंकाचे उद्घाटक प्रसंगी उपस्थित मान्यवर)

पुढे बोलताना घोष म्हणाले की, हा आहे रे आणि नाही रे या दोन विचालधारेतील संघर्ष असून तो संघर्ष कमी होण्याऐवजी अधिक तिव्र होतांना दिसते आहे. लोकांचे संविधानिक हक्क सोडवण्याऐवजी कुंठित केले जात आहे, लोकांचा आवाज दाबल्या जात आहे. लोकांच्या बाजूने आवज उठवणाऱ्या पत्रकार विचारवंतांना जेल मध्ये डांबले जात असूश देशातील सत्ता तानाशाहीचे रुप धारण करुन देशातील कष्टकरी, शेतकरी व नागरिकांना देशोधडीला लावत आहे आणि वृतपत्राने राजकीय स्वरुप धारण करुन लोकांच्या बाजूने बोलने, लिहणे बंद केले आहे त्यामुळे आपल्या देशाची आज ही अवस्था आहे.या अवस्थेतून बाहेर पडाये असेल तर वृतपत्र आणि पत्रकारांनी निर्भिडपणे लोकांच्या बाजूने लिहायला लागले पाहिजे आणि लोकांनी देखील आम्ही भारताते नागरिक म्हणून सत्तेला प्रश्न विचारायला रस्त्यावर उतरले पाहिजे कारण ज्या देशातील जनता मुखी तो देश भांडवलशाहीच्या पारतंत्र्यात जगावे लागते,असेही ते म्हणाले. प्रमुख वक्ते प्रा.आशिष कांबळे यांनी देखील आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून ह्या व्यवस्थेचा खरपून समाचार घेत पत्रकारांनी लोकांच्या हक्कासाठी लढले पाहिजे असे आव्हान त्यांनी केले.

या प्रसंगी मा.वनीश घोसले, सरपंच ग्रामपंचायत पळसकुंड,मा. विजय धानोरकर, उपसरपंच, गट ग्रामपंचायत वाटखेड यांचा सत्कार घेण्यात आला.
या सोहळ्याचे प्रास्ताविक मा.फिरोज लाखाणी संपादक साप्ताहिक राळेगांव समाचार यांनी केले तर संचालन- मझीनी बायदाणी यांनी केले. हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी समीर लाखाणी, शकील लाखाणी आणि साप्ताहिक राळेगांव समाचार परिवारातील, वितरक,वार्ताहर यांनी अथक परिश्रम घेतले.

वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सह्याद्री चौफेर | न्यूज 

नागपूर : राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. येत्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ७५ हजार युवकांना नोकरी देणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे केली.

येथील अजनी परिसरात सेंटर रेल्वे कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक ऋचा खरे, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते.
केंद्र शासनामार्फत पुढील १८ महिन्यात १० लाख तरुणांना विविध शासकीय विभागामध्ये नोकरी दिली जाणार आहे. दीपोत्सवाच्या पर्वावर हा रोजगार मेळावा देशभरातील विविध ठिकाणी आयोजित केला होता. याच कार्यक्रमात नागपूर येथे आज २१३ युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यासह केंद्र शासनाच्या विविध जवळपास ३८ विभागांमध्ये ही नियुक्ती होणार आहे. आज एकाच दिवशी देशभरात ७५ हजार युवकांना नियुक्ती पत्र दिले गेले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनानंतर देशातील विविध भागात मान्यवरांच्या हस्ते युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्रात 10 लक्ष नोकरी भरतीचे लक्ष ठेवले आहे. राज्य शासनालाही अशावेळी मैदानात उतरावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आपल्या नेतृत्वातील राज्य सरकारची तरुणांना नोकरी देणे ही प्राथमिकता असणार आहे. त्यामुळे वर्षभरात 75 हजार युवकांना सरकारी नोकरी दिली जाईल. त्याची सुरुवात लवकरच १८ हजार युवकांची पोलीस दलामध्ये तसेच १० हजार युवकांची ग्रामविकास विभागातील भरतीद्वारे केली जाईल, असे घोषित केले.
राज्यातील खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी आहे. खासगी क्षेत्रातील व्यावसायिकांना ज्या पद्धतीचे कौशल्य हवे आहे, त्या पद्धतीच्या कौशल्य निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे. खासगी क्षेत्रातील नोकऱ्या मोठ्या संख्येने मिळाव्यात. यासाठी नोकरी देणारे व नोकरी हवे असणारे यांचे प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघ निहाय रोजगार मेळावे आयोजित करणार असल्याचे सांगितले.

यावेळी केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाच्या विशेष निमंत्रणावरून कार्यक्रमात सहभागी झालेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही संबोधित केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठविण्याची घोषणा केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. केंद्राप्रमाणे राज्य शासनाने हे धाडसी पाऊल उचलल्यामूळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांना संधी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व शासकीय नोकऱ्यांमध्ये भरती ही प्रक्रिया यापुढे गतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक ऋचा खरे यांनी केले.

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्‍याबाबत उणे प्राधिकार पत्रे काढण्‍याची सुविधा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मुंबई : वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसानग्रस्‍त व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शासनस्तरावर या योजनेत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करुन दिल्याने अनुदान उपलब्ध होण्याची वाट न पाहता आता अशा प्रकरणात तात्काळ दावा मंजूर करता येणार आहे. संबंधित नुकसानग्रस्‍त व्‍यक्‍तीस किंवा त्‍याच्‍या कायदेशीर वारसास नुकसान भरपाई प्रदान होईल याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त व्यक्ती आणि त्‍याबाबत लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी देण्‍यात आलेल्‍या निवेदनांच्‍या अनुषंगाने तसेच येणारा दिवाळी सणाचा कालावधी लक्षात घेऊन सर्व प्रलंबित प्रकरणांमध्‍ये तात्‍काळ नुकसान भरपाई प्रदान करण्‍याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी व्‍यक्‍तीशः लक्ष घालावे. क्षेत्रीय स्‍तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्‍यावा व संबंधित नुकसानग्रस्‍त व्‍यक्‍तीस किंवा त्‍याच्‍या कायदेशीर वारसास दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई प्रदान होईल याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात शासन स्‍तरावरून मंजूर व प्राप्‍त रूपये ४० कोटी अनुदान सर्व वनवृत्‍तांना त्‍यांनी वेळोवेळी केलेल्‍या मागणीच्‍या अनुषंगाने वितरीत करण्‍यात आले होते. सदर वितरीत अनुदान पूर्णतः खर्च झाले असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे संबंधित नुकसानग्रस्‍त व्‍यक्‍ती तसेच इतर ग्रामस्‍थांमध्‍ये वन्‍यजीव व शासनाप्रती असंतोष निर्माण होऊ नये तसेच वनविभागामार्फत वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्‍याबाबत राबविण्‍यात येणाऱ्या योजनेद्वारे संबंधित नुकसानग्रस्‍त व्‍यक्‍तीस किंवा त्‍याच्‍या कायदेशीर वारसास नुकसानभरपाई प्रदान केली जाते. या प्रकरणी स्वत: वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष घालून शासनस्‍तरावरून या योजनेत उणे (-) प्राधिकार पत्रे काढण्‍याची सुविधा अर्थसंकल्‍पीय वितरण प्रणालीवर उपलब्‍ध करून दिल्‍यामुळे वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसान झालेल्‍या व्‍यक्‍तीस किंवा त्‍याच्‍या कायदेशीर वारसास अनुदान उपलब्‍ध होण्‍याची वाट न पाहता तात्‍काळ दावा मंजूर करून नुकसान भरपाई देण्‍यात येत आहे.