Page

आणखी एका शेतकऱ्यांची आत्महत्या; 28 ऑगस्ट रोजी घेतले होते विष


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यात आत्महत्यांची मालिका थांबता थांबेना, आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मात्र, मारेगाव प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने घेत नसल्याचे बोलल्या जात आहे.

मारेगाव तालुक्यातील दांडगाव येथील शेतकरी तरुण तोताराम मंगत चिंचोलकर (47) याने राहत्या घरात दि.28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता विषप्राशन केले. त्यांना वणी येथे दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले होते. त्यांचे वर तेथे उपचार सुरु असतांना काल मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेने चिंचोलकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

मागील महिन्याभऱ्यातील अतिवृष्टी आणि सततची नापिकी, डोक्यावर असलेले ओझे त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकलने फार तारेवरची कसरत सध्या शेतकऱ्यांना करावी लागत असल्याने तालुक्यात आत्महत्याचे प्रमाण वाढत असून शासन प्रशासन या गंभीर बाबीकडे पाहिजे तसे लक्ष घालत नसल्याचे बोलल्या जात आहे. 

तोताराम यांचे पाठीमागे पत्नी, आई-वडील, दोन मुली असा बराच आप्त परिवार आहे.