Page

अखेर राजुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवीन रुग्णवाहिकेचे करण्यात आले लोकार्पण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३० सप्टें.) : तालुक्यातील राजुर प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्य प्रशासना कडुन देण्यात आलेल्या नविन रुग्णवाहिकेचे अखेर लोकार्पन करण्यात आले. मागील दोन महिन्यांपासुन ही रुग्णवाहिका राजुर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना सेवा न देताच उभी होती. अखेर ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पन सोहळा आमदार संजीवरेड्ड़ी बोद्कूरवार यांच्या अध्यक्षतेत पार पडला. आमदारांनी रिबिन कापुन या रुग्णवाहिकचे लोकार्पन केले. राजुर प्राथमिक आरोग्य केंद्राला नविन रुग्णवाहिका मिळावी म्हणून आमदार संजीवरेड्ड़ी बोद्कूरवार व जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत यांनी विशेष प्रयत्न केले. या छोटेखानी सोहळ्यात प.स. सभापती संजय पिंपळशेंडे, सरपंच विद्याताई पेरकावार, बिडियो गायणार, उपसरपंच बल्की, माजी सरपंच प्रणिता असलम, टिएचओ शेंडे, डॉ. राहुल चिखलकर, आरोग्य कर्मचारी तथा ग्रामवासी उपस्थित होते. 

यवतमाळ जिल्ह्यात राजुर येथे सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतू या आरोग्य केंद्रात आद्यापही हव्या त्या सोई सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे हे आरोग्य केंद्र नेहमी दुर्लक्षित राहिलं आहे. पालकमंत्र्यांनी दोन महिने आधिच या रुग्णवाहिकेचे लोकार्पन केले होते. पण आज अधिकृतरित्या लोकार्पन सोहळा घेऊन ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत देण्यात आली. चक्क दोन महिने ही रुग्णवाहिका नुसतीच रुग्णालयात उभी राहिली. रुग्णवाहिके अभावी रुग्णांना रेफर करतांना मात्र रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. रुग्णांचे मोठे हाल झाले. पण अखेर लोकार्पनाचा मुहूर्त सापडला व रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध करुन देण्यात आली.

दाेन दिवशीय बैठकीत चंद्रपूरातील ऑटो रिक्षाचालक मालक संघाचे पदाधिकारी उपस्थित

 

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, ( ३०सप्टे.) : महाराष्ट्र ऑटो रिक्षाचालक-मालक जिल्हा चंद्रपूर तर्फे मुंबई पनवेल येथील स्वाभिमानी रिक्षा मंच या ठिकाणी दोन दिवशीय परिषद घेण्यात आली. या बैठकीला २८ जिल्ह्याचे ऑटो युनियनचे पदाधिकारी व रिक्षा चालक माेठ्या संख्येने उपस्थित होते. या शिवाय सदरहु बैठकीला चंद्रपूरचे संस्थापक व अध्यक्ष राजू भाऊ खांडेकर, जिल्हा अध्यक्ष मधुकर राऊत, खुशाल साखरकर, सुधाकर बिसने, शंकर थोरात आदीं पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते. या बैठकीत पाच महत्वाचे विषय चर्चेला घेण्यात आले.

कल्याणकारी बाेर्ड स्थापन करणे, परमिट बंद करणे, विधान परिषद मध्ये ऑटाे चालकांना प्रतिनिधीत्व मिळणे असे झाले नाही तर, मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. ऑटाे चालकांना शहर व गाव पातळीवर स्टँड पार्किंग उपलब्ध करुन देण्याबाबत उपराेक्त बैठकीत चर्चा करण्यात आली.

टाटा ट्रस्ट व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांच्या संयुक्ताने पार पडले


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३०सप्टें.) : टाटा ट्रस्ट कॅन्सर केअर प्रोग्राम व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचे वतीने आज आयोजित थर्मल अब्लेशन ट्रेनिंग मध्ये 50 डॉक्टर्स आणि स्टाँफ नर्स सहभागी झाले होते.
प्रशिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
थर्मल अब्लेशन हे उपकरण गर्भाशयाच्या कॅन्सर साठी वापरले जाते. यावेळी डॉ.राठोड यांनी हे उपकरण उपलब्ध करून दिल्या बद्दल टाटा ट्रस्टला धन्यवाद दिले .

यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. सारिका ठाकरे, डॉ. मनीषा घाटे, डॉ.रुजुता मुंदडा यांनी मार्गदर्शन केले. सदरहु प्रशिक्षणास बेंगलोरचे श्री हिल्बर्ट जे प्रशिक्षक म्हणून आले होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. मनीषा घाटे यांनी कर्करोग होण्याची कारणे व जोखीम वाढवणारे घटक लहानपणापासून शारीरिक संबंध कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचा अस्वीकार अनेक व्यक्तींशी शारीरिक संबंध वारंवार गर्भधारणा किंवा गर्भपात गर्भ निरोधक गोळ्यांचे अधिक काळपर्यंत सेवन धूम्रपान, रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, एच आयव्ही अथवा लैंगिक संबंधामुळे पसरणारे इतर रोग, ह्युमन पॅपिलोया विषाणू तसेच त्यावरील उपचार पद्धती डॉ. मनिषा घाटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

उशिरा दिसून येणाऱ्या लक्षणांमध्ये शरीर संबंधानंतर असामान्य रक्तस्राव होणे हे प्रमुख कारण होय. शिवाय भूक न लागणे, वजन कमी होणे, पायावर सूज येणे, पोटावर सूज असणे, लघवी किंवा शौचावाटे रक्तस्त्राव होणे इत्यादी लक्षणे सुद्धा उशिरा आढळतात. लवकर निदान होण्याकरिता सर्व महिलांनी वयाच्या ३५ व्या वर्षापासून आपल्या स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. हा कर्करोग नियंत्रणासाठी ह्युमन पॅपिलोमा लसीकरण हा एक मोठा टप्पा ठरू शकतो. साधारणत: वयाच्या ११ ते १२ व्या वर्षांपासून ही लस घेणे फायद्याचे ठरते. या लसीच्या तीन मात्रा दिल्या जातात असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रूजुता मुंदडा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टाटा ट्रस्टचे सुरज साळुंके यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार डॉ.आशिष बारब्दे यांनी मानले.

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
उमरखेड, (३० सप्टें.) : तालुक्यातील कृष्णापुर येथील अल्पभुधाक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळुन टेकडीवर जाऊन टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली.

अर्जुन रामचंद्र आडे (४३) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ढाणकी येथून जवळच असलेल्या उमरखेड तालुक्यातील कृष्णापुर येथील तरुण अल्पभूधारक शेतकरी अर्जुन आडे यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.

मृतक शेतकरी यांच्या वर विविध सहकारी सोसायटी ढाणकी यांचे कर्ज असल्याचे समजते. व त्याच कर्जाच्या परतफेडीची काळजी त्यांना असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या पश्चात आई पत्नी,दोन मुले व एक मुलगी असा कुटूंब आहे. 

ग्रामसभा घेण्यासाठी राजूर विकास संघर्ष समितीचे ग्रा पं ला निवेदन

सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे 
राजूर, (३० सप्टें.) : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे व वाढलेल्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लावले होते, परिणामी कुठेही गर्दी होऊ नये म्हणून ग्रामसभा घेण्यास आळा बसला होता. परंतु आता संक्रमण कमी झाल्यामुळे शासनाने लॉकडाऊन हटविले आहे.सध्या ग्रामसभा घेण्यास काहीच अडचण नसल्याने जनतेच्या समस्या, तक्रारी व मागण्या ग्रामसभेच्या माध्यमातून ऐकून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त ग्रामसभा घेण्यात यावी, यासाठी येथील राजूर विकास संघर्ष समितीचे वतीने राजूर ग्रा पं च्या सरपंच यांना निवेदन देण्यात आले.

ग्रामपंचायत अधिनियमानुसार वर्षातून किमान ४ ग्रामसभा होणे अनिवार्य आहे. लॉकडाऊन हटविल्यानंतर १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनी ग्रामसभा घेण्यात आली पाहिजे होती. परंतु ती घेण्यात आली नाही. ग्रामसभा ही लोकशाही प्रक्रियेची उच्चतम प्रक्रिया आहे. लोकशाहीमध्ये लोक म्हणजेच जनता ही सर्वतोपरी असते. जनतेला काय हवे, काय नको, त्याच्या समस्या काय आहेत?, त्यांच्या मागण्या काय आहेत? हे ग्रामसभेत ऐकून त्याचे निराकरण करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्तव्य असते आणि ग्रामसभेच्या माध्यमातून आपले म्हणने मांडणे हे जनतेचे अधिकार असते. त्यामुळे ग्रामसभा न होणे किंवा न घेणे हे जनतेच्या अधिकाराचे हनन आहे, त्यांना आपल्या अधिकारापासून वंचित करणे आहे.

गेल्या दीड वर्षांपासून ग्रामसभा न झाल्याने गावातील अनेक समस्या व मागण्या जनतेला मांडत्याच आल्या नाहीत, त्यामुळे येत्या २ ऑक्टोबर गांधी जयंतीला ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी राजूर विकास संघर्ष समितीचे कॉ. कुमार मोहरमपुरी, साजिद खान, जयंत कोयरे, राजेंद्र पुडके यांनी ग्रा पं ला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

प्रेमात पडलेल्या अल्पवयीन तरुणीला घरी बोलावून केला लैंगिक अत्याचार

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३० सप्टें.) : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला भुलथापा देत घरी बोलाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्थापीत करुन तिला गर्भवती करू पाहणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या वासनांध तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरकर ले-आउट येथे निवासस्थान असलेल्या व काही वर्षांपासून गुरुनगर येथे किरायाणे रहात असलेल्या विक्की किशोर पटुणा (20) याने एका अल्पवयीन मुलीशी आधी मैत्री व नंतर प्रेम संबंध निर्माण केले. तिला आमिशे प्रलोभने देत आपल्या जाळ्यात ओढले. ती अल्पवयीन मुलगी शहरातच असलेल्या एका समारंभात आपल्या परिवारासह आली होती. या तरुणाने समारंभातच तिच्याशी ओळख निर्माण करित जवळीक साधत तिला आपल्या जाळ्यात ओढले. तिला प्रेमाची ओढ निर्माण झाल्यानंतर त्याने तिला भुलथापा देऊन आपल्या घरी बोलावले. ती घरी येताच त्याने तिच्याशी जबरदस्ती शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. काही दिवसांनी मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर हे सत्य उघडकीस आले. मुलीच्या आई वडिलांनी तिला विश्वासात घेऊन या बाबत विचारले असता तीने विक्की पटुणा याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन भुलथापा देत आपल्या घरी बोलावुन जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याचे सांगितले. मुलीच्या आई वडिलांना हे ऐकुन चांगलाच धक्का बसला. त्यांनी मुलीला घेऊन तत्काळ पोलिस स्टेशन गाठले, व आरोपी विरुध्द लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच आरोपीला अटक करित त्याच्यावर भादवि च्या कलम 376 (3) व बालकांचे लैगिक अत्याचारा पासुन संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम 4, 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटाक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.

वणी ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या शिवसेनेच्या तेरवा पंधरवाडा ला जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (३० सप्टें.) : वणी ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभारा विरुद्ध शिवसेना शहर प्रमुख राजू तुरणकर यांनी सुरू केलेल्या शिवसेनेच्या पंधरवड्यात आंदोलनाला दि.३० सप्टेंबर ला यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक वारे यांनी भेट देऊन समस्या ऐकून घेतल्या.

यावेळी रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर मध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वारे, संजय देरकर, सुनील कातकडे, अजिंक्य शेंडे, बंटी ठाकूर व संपूर्ण मेडिकल अधिकारी व कर्मचारी यांच्या समक्ष पुढील उपाययोजने बाबत चर्चा करण्यात आली. रुग्णालयात चोवीस तास एक वैद्यकीय अधिकारी हजर राहणे, बंद असलेले सिझेरियन (प्रसूती) त्याकरिता आज भुलतज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली, रुग्णालयात पूर्णवेळ करिता स्त्री रोगतज्ञ अधिकारी उपलब्ध करण्याचा पाठपुरावा, रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कर्तव्याच्या वेळा निच्चीत करून दर्शनस्थळी फलक लावण्यात येणार आहे. अत्यावश्यक काळातील वैद्यकीय अधिकारी वगळता इतर वैद्यकीय अधिकारी दोन्ही वेळ दवाखान्यात उपलब्ध राहतील, यानंतर डॉ घरी आणी परिचारिकांनी फोनवर विचारून रुग्णांचे उपचार करणार नाही, अती गंभीर रुग्ण वगळता सर्रास रुग्ण रेफर करण्यात येणार नाही,
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रांजली विनोद बदखल चा प्रसूतीदरम्यान बालकाचा जीवितास झालेली गंभीर हानी या बाबत चौकशी समिती बसवून दोषींवर कारवाई करण्याचे ठरले.
प्रसूतीसाठी लागणाऱ्या औषधी साठा रुग्णास विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार आहे. आवश्यक असलेल्या लसी, औषध साठा उपलब्ध ठेवल्या जाईल, अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांचे हाल, रूग्णांना सतत रेफर करण्यात येत असल्यामुळे जाणारे प्राण याकडे लक्ष देऊन गोरगरीब जनतेला सेवा दिली जाईल, शासन निर्णयानुसार वणी करिता मंजूर झालेले १०० खाटांचे रुग्णालय कार्यान्वित करणे करिता त्वरित कारवाई करून बांधकाम सुरू करणे करिता पाठपुरावा केला जाईल अश्या विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना ताकीद देऊन सुव्यवस्था निर्माण करण्याची हमी दिली.
यावेळी संतोष कुचनकार, मनीष बतरा,हेमंत गौरकार, पियुष चव्हाण, सतीश कोंडे, गणेश जनेकर, किशोर थेरे, राहुल झट्टे, निखिल तुराणकर, जनार्धन थेटे, मंगल भोंगळे, अभि नागपुरे, वजीर खान, निजात शेख, शादाब अहेमद, शाहिद शेख, निजात शेख, ईत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

डॉ.सुलभेवार प्रभारी वैद्यकीय अधिक्षक यांचेवर कारवाई करा : अजिंक्य शेंडे

ग्रामीण रुग्णालयातील पाण्याच्या टाकीत अळ्या, महिला रुग्णांना प्रसूती दरम्यान औषधी बाहेरून विकत आणावयास लावणे, अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य या सर्व कारभाराला डॉ.सुलभेवार जवाबदार असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याची मागणी युवासेना उपजिल्हाधिकारी अजिंक्य शेंडे यांनी केली.

मारेगाव येथे लोकन्यायालयात २०५ प्रकरणे निकाली


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० सप्टें.) : येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात विविध स्वरूपाच्या प्रलंबित २०५ केसेस चा निपटारा करण्यात आला. यात ३९ लाख रुपायाच्यावर तडजोड राशी जमा झाली.
राष्ट्रीय लोकअदालात अंतर्गत येथील न्यायालयात अनेक लंबीत दिवाणी व फौजदारी केसेस चा आपसी तडजोडी ने निपटारा करण्यात आला. यात वादपूर्व २०५ प्रकरणे आणि दाखल आपसी तडजोड चे ४० प्रकरणे असे एकूण २०५ केसेस चा लोकअदालत मध्ये निपटारा करून ३९ लाख ७८ हजार ९९८ रुपये आपसी तडजोड राशी जमा झाली. यात पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश निलेश वासाडे तर सदस्य म्हणून एड. मेहमूद पठाण, सुमित हेपट यांनी कामकाज बघितले. लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी डोईजड, बी.पी. चव्हाण, आर.वैद्य, पी.वासाड, एस. टेबरें, शेबे, बुजाडे, राऊत यांनी परिश्रम घेतले. 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या विद्यार्थी तालुका प्रमुख पदी वासुदेव राठोड


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
किनवट, (३० सप्टें.) : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार व नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाऊ देशमुख मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या विद्यार्थी तालुका प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते व गोर केसुला ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव भाऊ राठोड यांची निवड करण्यात आली.

किनवट - माहूर विधानसभा प्रमुख सतिशभाऊ बोंतावार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

या वेळी किनवट - माहूर विधानसभा सचिव शिवचरण भाऊ राठोड, किनवट संपर्क प्रमुख पप्पु सातपूते, वसंत राठोड, मारोती शिरंडे उपस्थित होते. निवडीबदल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे ऑक्सीजन प्लांट ट्रेनिंग संपन्न


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
यवतमाळ, (३० सप्टें.) : कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर ऑक्सीजन प्लांट निगा व दुरुस्ती एन एस क्यू एफ लेव्हल चार चे प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे नुकतेच संपन्न झाले. भारत सरकार तर्फे एन एस डी या योजने च्या माध्यमातून वीस उमेदवाराची निवड करून त्यांना शिल्पनिदेशक जे. एस. वानखेडे व डी. आर. दारुंडे यांनी यशस्वी प्रशिक्षण दिले. 

सदर प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम २८ ला डॉ. मिलिंद कांबळे (वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज यवतमाळ) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑक्सिजनचे महत्त्व सर्वसामान्यांच्या लक्षात आले आहेच. आपण सर्वांनी बघितलेच आहे की, या कालावधीत ऑक्सिजन हा केवळ प्राणवायूच नसून प्राथमिक दृष्टया आजाराचे औषध ठरल्याचे आपल्या निदर्शनास येते. त्यामुळे ऑक्सीजन म्हणजे कोरोनावरचे औषधच आहे. असे मत वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद कांबळे यांनी प्रसंगी व्यक्त करतांना भविष्यामध्ये ऑक्सीजन प्लांट साठी आवश्यक असणारी निगा व दुरुस्ती करणारे प्रशिक्षणार्थी तयार करण्याच्या दृष्टीने सदर प्रशिक्षण अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळचे प्राचार्य प्रमोद भंडारे होते. प्रसंगी संस्थेचे गट निदेशक राजेंद्र मेश्राम व प्रदीप भांगे यांची सुद्धा उपस्थिती होती. यावेळी प्रशिक्षनार्थी उमेदवारांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वितरित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. ज्यात जयंत जाधव, राम नंदुरकर, कु. रेणू ठाकरे, प्रशांत चव्हाण, योगेश राठोड, मंगेश भोयर, फैजान खान, अभिजीत अष्टेकर, प्रणव बनसोड, रोशन जाधव, मयूर धामणकर, निखिल शेंडे, चेतन हाडके, सोपान गायकी, मिथुन जाधव, आकाश मेश्राम, शिवम इंगोले, आशिष मेश्राम, अभय तायडे, अमोल काळे, आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे संचालन सचिन पांडे आभार जे. एस. वानखेडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेतील कर्मचारी व सर्व शिल्प निर्देशक यांनी प्रयत्न केले.


मारेगाव येथे लोकन्यायालयात २०५ प्रकरणाचा निकाली


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० सप्टें.) : येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात विविध स्वरूपाच्या प्रलंबित २०५ केसेस चा निपटारा करण्यात आला. यात ३९ लाख रुपायाच्यावर तडजोड राशी जमा झाली.

राष्ट्रीय लोक अदालात अंतर्गत येथील न्यायालयात अनेक लंबीत दिवाणी व फौजदारी केसेस चा आपसी तडजोडी ने निपटारा करण्यात आला. यात वादपूर्व २०५ प्रकरणे आणि दाखल आपसी तडजोड चे ४० प्रकरणे असे एकूण २०५ केसेस चा "लोक अदालत" मध्ये निपटारा करून ३९ लाख ७८ हजार ९९८ रुपये आपसी तडजोड राशी जमा झाली. यात पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश निलेश वासाडे तर सदस्य म्हणून एड. मेहमूद पठाण, सुमित हेपट यांनी कामकाज बघितले.

लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी डोईजड, बी.पी. चव्हाण, आर.वैद्य, पी.वासाड, एस. टेबरें, शेबे, बुजाडे, राऊत यांनी परिश्रम घेतले.

करंजी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात नुकसानीची आमदार अशोक उईके यांनी केली पाहणी


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवढा, (३० सप्टें.) : राळेगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा.डॉ अशोक उईके यांनी दिनांक ३० सप्टेंबर गुरुवार ला करंजी परिसराचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता पिकांची झालेली नासाडी पाहून शेतकरी हवालदिल होण्याची भीती आमदार अशोक उईके यांनी व्यक्त केली.आपण महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्याकडे ओला दुष्काळ जाहीर करावा या संदर्भात भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडला आहे रुंझा.करंजी. परिसरातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांच्या पावसाने वैतागला आहे. कपाशीचे बोंड सडलेली आहे. सोयाबीनचे पीक गेलेले आहेत.ज्या पिकांवर शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसते तीच पिके उध्वस्त झाल्याने आता करावे काय हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिलेला आहे. हा परिसर राळेगाव मतदार संघाच्या आवाक्यात आहे.मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी ही जबाबदारी आहे.असे आमदार उईके म्हणाले त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी स्वतः हा शेतात जाऊन त्यांच्याशी हितगुज केली यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ही परिस्थिती पाहून उईके यांनी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याकडे ओल्या दुष्काळाची मागणी आपण करणार असल्याचे सांगितले. ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणे आजच्या काळात गरजेचे आहे. शेतकरी हा या देशाचा कणा आहे. आणि शेतकऱ्यांवरच जर मरणासन्न परिस्थिती आली तर तुम्हा आम्हाला जगणे कथन जाईल असे मत व्यक्त केले. मी तुमच्या सोबत आहो घाबरून जाऊ नका असा धीरही शेतकऱ्यांना आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी दिला शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पिकांच्या नुकसानीची पाहणी करतांना आमदार प्रा. डॉअशोक उईके याच्या सोबत पांढरकवडा तहसीलदार सुरेश कव्हळे, गटविकास अधिकारी चव्हाण, सभापती राजेश पसलावार, माजी सभापतीं पंकज तोडसाम, विनोद बोरतवार, विलास बनकर, महादेव ठाकरे, मोहन बंडेवार, मारोती ठाकरे,
बाळा मानकर, तुळशीराम चव्हाण सचिन मडावी आकाश राठोड, परिसरातील शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

पिसगांव आदिवासी सोसायटीवर गैरआदिवासी सचिवाची नियुक्ती ?


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (३० सप्टें.) : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून 'पेसा' अंतर्गत विविध योजना अंमलात आणला. बहुतांश गावपातळीवर समाजाची लोकसंख्येच्या आधारे ग्रामपंचायत,आदिवासी सहकारी संस्थेची निर्मितीही केली. यात मुख्य पदे आदिवासी समाजाच्या वाट्याला असतांना पिसगांव आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था अपवाद ठरत आहे. येथे सोसायटीच्या सचिव पदी आदिवासी समाजाला बगल देत गैरआदिवासी समाजाच्या व्यक्तीची थेट सचिव पदी नियुक्ती केल्याने समाजात संतापाची लाट उसळत आहे. परिणामी ही नियुक्त रद्द करण्यात येऊन आदिवासी घटकाला प्राधान्य देण्यात यावे यासाठी तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
     
आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या मारेगाव तालुक्यात बहुतांश ग्रामपंचायती व सहकारी संस्था पेसा अंतर्गत मोडते. अशातच तालुक्यातील पिसगाव ग्रामपंचायत ही पेसा अंतर्गत आहे. येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था असून, या संस्थे अंतर्गत परिसरातील किमान अकरा गावांचा समावेश आहे. पेसा अंतर्गत गावे असल्याने येथील ग्रामपंचायत, सहकारी संस्थेत आदिवासी घटकाला प्राधान्य देऊन मुख्य प्रवाहात आणण्याची शासनाकडून तसदी घेण्यात येते मात्र, पिसगांव येथे चक्क आदिवासी समाजाला डावलून आदिवासी सोसायटीत एका गैरआदिवासी संचालकाने आपल्या पुतण्यालाच प्राध्यान्य देत सचिव पदावर नियुक्त केल्याने समाजात संतापाची लाट उसळत आहे. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असून, आदिवासी प्रामुख्याने पेसा अंतर्गत गावातील ही नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी. अन्यथा उपोषणाच्या माध्यमातून आम्ही न्याय मागू अशी भूमिका लक्ष्मीबाई रामपुरे, सूर्यभान कोरझरे, भीमराव आत्राम, गजानन कोरझरे, बोनाबाई घाटे, विठोबा लोखंडे, पोतु बोंदरे, किसन लोखंडे, विठ्ठल मरापे, दिलीप जुमनाके यांच्या सह अनेक सभासदांनी तक्रार निवेदनातून घेतली आहे. 

वरोऱ्यात आयपीएल वर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक, बावणे ले-आऊटात कारवाई

                    (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (३० सप्टें.) : सटोऱ्यासाठी पर्वणी ठरत असलेल्या आयपीएल-२० क्रिकेट सामन्यांवर लाखोंचा सट्टा लावला जातो. क्रिकेट बेटिंगवर लगवाडी लावणारे व लगवाडी घेणारे मोबाइल द्वारे अतिशय गुप्तपणे हा क्रिकेट सट्टयाचा खेळ खेळत असतात. बुकी आपल्या प्यादयांना गुप्त जागी बसवुन त्यांच्या मार्फत हा क्रिकेट सट्टा ऑपरेट करतात. संशयाची पालही चुकचुकणार नाही, असे ठिकाण हे बुकी क्रिकेट सट्टा घेण्याकरीता बसवणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्याकरिता निवडतात. सध्या बुकिंनी लोकवस्तीमध्ये सट्टा घेणारे आपले कर्मचारी बसविले आहेत. लोकांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी घर व फ्लॅट रेंटवर घेऊन तेथे सर्व साहीत्यासह सट्टा घेणाऱ्यांना बसविले जाते. बावणे ले आऊट मधील काकडे यांचे घरी चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टा अड्यावर पोलिसांनी धाड टाकुन क्रिकेट सट्टा घेणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडुन 1 लाख 69 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

बावणे ले-आऊट मधील एका घरा मध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळवळा जात असल्याची गुप्त माहीती पोलिस पथकाला मिळाली. ऑनलाईन पध्दतीने हा क्रिकेट सट्टा घेतला जात असल्याचेही पोलिसांना कळले. पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता दोन व्यक्ती इंडियन प्रीमियर लीग (IPL20) च्या राजस्थान रॉयल व रॉयल चॉलेंज बंगलोर संघावार मोबाइल द्वारे सट्टा घेतांना आढळून आले. पोलिसांनी ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेणाऱ्या सिद्धार्थ राजेंद्र दुगड (23) रा. साई नगर वरोरा, उदय रवींद्र काकडे (33) रा. बावणे ले-आऊट यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या कडुन 1 लाख 69 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने गुन्हा करण्यात आला आहे. 

सदर कार्यवाही मा. आयुष नोपानिउपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात पोनि दिपक खोब्रागडे यांचे अधिपत्यात सपोनि राजकिरण मडावी, सपोनि राहुल किटे, पोउपनि किशोर मित्तरवार, पोहवा दिलीप सूर, नापोशी किशोर बोढे, पोशी सुरज मेश्राम, पोशी कपिल भंडारवार, पोशी प्रवीण निकोडे यांनी केली.

शेतकऱ्यांनो 2021-22 पिक विमा काढलाय, मग जाणून घ्या "ह्या" अत्यंत महत्वाच्या सूचना


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (३० सप्टें.) :
चालु 2021-22 वर्षात खरीप हंगामात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना देण्यात आल्या आहे.

ज्या शेतकऱ्यांचे चक्रीवादळ किंवा अतिपावसामुळे किंवा पुराच्या पाण्यामुळे पिक नुकसान झाले असल्यास, शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीस टोल फ्री क्रमांकावर फोन करून किंवा ई-मेल करून किंवा क्रॉप इन्शुरन्स ऍपचा वापर करून, किंवा विमा कंपनीच्या कार्यालयात लेखी स्वरूपात कळवावे.
नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत तक्रार करावी. नाहीतर तक्रार मान्य होत नाही. त्यामुळे नुकसानीचा दिनांक आपण वापरत असलेल्या तक्रारीच्या माध्यमानुसार अचूक टाकावा किंवा सांगावा.

केळापूर तालुक्यातील पांढरकवडा येथे रॉय कॉम्प्लेक्स राहुल भवन जवळ गाळा क्र. 65 येथे कंपनीचे कार्यालय सुरू आहे. याकरिता विमा कंपनी कडून तक्रार करण्यासाठी चार पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपली तक्रार नोंदवावी.

१) टोल फ्री नंबर :
 18001035499

२) ई-मेल ID- support@iffcotokio.co.in

३) ऍप वरून तक्रार करण्यासाठी लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

🟢दरम्यान, ऍप वापरून तक्रार देतांना विमा पावती नंबर टाकणे आवश्यक आहे. तक्रार नोंद झाल्यानंतर मोबाईल वर येणाऱ्या "डॉकेट आय डी" चा स्क्रीन शॉट आवर्जून काढून ठेवा. या आय डी वरून आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती पाहिजे तेंव्हा मोबाईल वर लगेच कळते. त्यामुळे ऍप चा वापर करून तक्रार करणे केंव्हाही फायदेशीर आहे. तसेच ऍप चा वापर करणे सोपे आहे.

ऍप वर माहिती भरताना पुढीलप्रमाणे भरता येईल :
• नुकसानीचे कारण - cyclone रेन (चक्रीवादळ) किंवा excess rainfall (अती पाऊस) यापैकी जे असेल ते नोंदवावे किंवा लिहावे.

• जर सोयाबीन पाण्यात उभे असेल तर standing crop असे दाखवावे किंवा नोंदवावे.

• जर सोयाबीन शेतात सोंगून सुडी न मारता पसर असेल तर cut & spread in bundles असे दाखवावे किंवा नोंदवावे.
🟢
• वर्ष 2021-22 असे लिहावे/नोंदवावे.


४) लेखी तक्रार : जर वरील तिन्ही पर्याय व्यवस्थित चालू नसतील तर, तालुका स्तरावर असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयात खालील कागदपत्रे सादर करावे.
 
१) विहित नमुन्यातील पीक नुकसान पूर्वसूचना अर्ज,
२) विमा पावती, 
३) विमा पावतीवर नोंदवल्या नुसार 7/12 व 8-अ
४) आधार कार्ड xerox व 
५) बँक पासबुक xerox
जोडुन पीक नुकसान तक्रार देऊन पोहोच (oc) आवर्जून घ्यावी. 
🟢तक्रार अर्जाचा नमुना विमा कंपनीच्या कार्यालयातुन माहिती करून घेऊन भरावा. अशी तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार पांढरकवढा यांनी दिली.

स्वर प्रीतीचे उपक्रम प्रशंसानीय - वंदनाताई चटप

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३०सप्टें.) : काल बुधवार दि.29 सप्टेंबरला "स्वर प्रीती कला अकादमी राजुरा" तर्फे स्वर प्रीतीच्या संस्थापक सदस्या स्व. पूजा सुनील देशपांडे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रथम पुण्यतिथीचा श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. या शिवाय वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे पारिताेषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सदरहु आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलंच्या जेष्ठ मागदर्शिका अधिवक्ता मेघा धाेटे यांची कन्या कु. ज्ञानदा रामकृष्ण धोटे हिने विद्यापीठ स्तरीय पुरस्कार प्राप्त केल्या बद्दल तिचा सहृदय सत्कार करण्यात आला. या वेळी स्वरूपा झंवर यांना देखिल सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला वंदनाताई चटप, दिलीप सदावर्ते (अध्यक्ष स्वरप्रिती कला अकादमी) अल्का सदावर्ते संयोजिका, विजय जांभूळकर जिल्हा (अध्यक्ष नफदो) रजनी शर्मा, वज्रमाला बतकमवार उपस्थित होते. अल्का सदावर्ते यांनी आपल्या प्रास्ताविकेतुन वर्षभर राबविण्यात आलेल्या स्पर्धांची व विविध उपक्रमांची माहिती दिली.
दिलीप सदावर्ते, विजय जांभुलकर,रजनी शर्मा यांची सुध्दा समयोचित भाषणे या वेळी झाली. कु.नेहा सुनिल देशपांडे हिने आपले भावनिक विचार व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी शबाना शेख मॅडम यांनी गणेश वंदना आणि "कहां तुम चले गये "ही गीत गाऊन कार्यक्रमात वेगळीच रंगत भरली. स्पर्धा प्रमुख अल्का सदावर्ते, नम्रता खोंड, विणा देशकर, वर्षा वैद्य,वैशाली भोयर यांनी आई, आयुष्य, मैत्री, व बाबा या विषयावर चारोळी स्पर्धा घेतली होती.
कार्यक्रमाचे संचालन राजश्री उपगनलावार यांनी सुरेखपणे केले .तर उपस्थितीतांचे आभार संदीप कोंडेकार आणि ऍड .मेघा धोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता छोटुलाल सोमलकर, शबाना शेख, माणिक उपलांचीवार, उमा देशपांडे, नंदिनी देशमुख, उज्वला जयपूरकर, सुनीता कुंभारे, वनमाला परसुटकर यांनी अथक परिश्रम घेतले.

आयपीएल क्रिकेट सट्टा अड्यावर पोलिसांची धाड

                     (संग्रहित फोटो)

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (३० सप्टें.) : सटोऱ्यांसाठी पर्वणी ठरत असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लखोंचा सट्टा लावला जातो. क्रिकेट बेटिंगवर लगवाडी लावणारे व लगवाडी घेणारे मोबाइल द्वारे अतिशय गुप्तपणे हा क्रिकेट सट्टयाचा खेळ खेळत असतात. बुकी आपल्या प्यादयांना गुप्त जागी बसवुन त्यांच्या मार्फत हा क्रिकेट सट्टा ऑपरेट करतात. संशयाची पालही चुकचुकणार नाही, असे ठिकाण हे बुकी क्रिकेट सट्टा घेण्याकरीता बसवणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्याकरिता निवडतात. सध्या बुकिंनी लोकवस्तीमध्ये सट्टा घेणारे आपले कर्मचारी बसविले आहेत. लोकांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी घर व फ्लॅट रेंटवर घेऊन तेथे सर्व साहीत्यासह सट्टा घेणाऱ्यांना बसविले जाते. मंगलम पार्कमधील आर. के. अपार्टमेन्ट मध्ये चालविण्यात येणाऱ्या क्रिकेट सट्टा अड्यावर काल रात्री पोलिसांनी धाड टाकुन क्रिकेट सट्टा घेणाऱ्या  दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडुन 1 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

आर. के अपार्टमेन्ट मधील एका फ्लॅटमध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळवळा जात असल्याची गुप्त माहिती एसडीपीओ पोलिस पथकाला मिळाली. ऑनलाईन पध्दतीने हा क्रिकेट सट्टा घेतला जात असल्याचेही पोलिसांना कळले. पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकली असता दोन व्यक्ती आयपीएल च्या रॉयल चॉलेंज बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल या सामन्यावर मोबाइल द्वारे सट्टा घेतांना आढळून आले. पोलिसांनी ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेनारया विजय पंजाब बदकी (24) रा. माळिपुरा, दिनेश तुळशीराम नागपूरे (35) रा. भोईपूरा यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या कडुन तीन लॉपटॉप किमत 70 हजार रुपये, तीन मोबाईल सेट किमत 45 हजार रुपये, सट्टयासाठी वापरले जाणारे ईतर साहित्य किमत 14 हजार 400 रुपये असा एकुण 1 लाख 29 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही आरोपींवर पोलिसांनी मदाका च्या कलम 4,5 नुसार गुन्हा दाखल केला.

सदर कार्यवाही जिल्हापोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ प्रदिप पाटिल यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डिबी पथक प्रमुख आनंदराव पिंगळे, पोऊपनि आरुण नाकतोडे, नापोकॉ विजय वानखेडे, ईकबाल शेख़, रवी इसनकर, संतोष कालवेलवार, प्रदिप ठाकरे, अशोक दरेकार यांनी केली.

रस्ता अपघातात एक ठार तर तिघे जखमी - चंद्रपूर अदिलाबाद मार्गावरील घटना !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३०सप्टें.) : चंद्रपूर ते अदिलाबाद या मार्गावर काल झालेल्या एका अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. तर याच घटनेत अन्य तिन जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त 
आहे. गडचांदूर नजिकची ही घटना असुन दाेन दुचाकीत हा अपघात घडला असुन यात रमाकांत उरकुडे यांची घटनास्थळीच प्राणज्याेत मालवली. रस्त्यावरील अताेनात पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचे बाेलल्या जाते. याच मार्गावर रस्त्याच्या दुर्दशामुळे अनेकांचे या पूर्वी (अपघातात) प्राण गेले आहे.
 
रस्त्यावरुन वाहने चालवितांना चालकांना अक्षरशः  तारेवरची कसरत करावी लागते. पण प्रशासन मात्र, या कडे लक्ष पुरवित नसल्याची खंत अनेकांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बाेलुन दाखविली आहे. 

ग्रामीण रुग्णालयात पाण्याच्या टाकीची अवस्था खराब


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
वणी, (३० संप्टें.) : वणी येथील ग्रामीण रुग्णालयात समस्यांचा डोंगर उभा असून, त्यात आणखी एक जीवघेणी बाब उघडकीस आली आहे.
संडास वॉशरूम मध्ये होणाऱ्या पाणी पुरवठा प्रत्यक्ष तपासणी करण्याची परवानगी घेवुन कर्मचाऱ्या सोबत तपासणी केली असता, भयंकर वास्तव्य चित्र समोर आले, अनेक वर्षांपासून पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या नाही. मृत किडे,अळ्या व भयंकर खराब अवस्थेत टाक्या दिसून आल्या, परिणामी रुग्णाच्या आरोग्यास खराब टाक्यातील पाणी आरोग्यास निमंत्रण देत, यावरून वादग्रस्त ठरलेले वणीच्या ग्रामीण रुग्णालयास येथील बेजबाबदार वैद्यकीय अधिकारी असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मारेगाव महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल ताजने यांचे निधन

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
वणी, (३० संप्टें.) : मारेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अनिल बाबाराव ताजने (५८) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वणी स्थित राहत्या घरी आज गुरुवारला पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मारेगाव येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात प्रारंभी पासून सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत असतांना त्यांना बढती मिळून त्यांनी मुख्याध्यापक पदाची यशस्वी सूत्रे सांभाळलीत. पुढील मार्च मध्ये ते सेवानिवृत्त होणार होते. मारेगाव तालुक्यातील पिसगाव येथील गिरजाबाई ताजने व वणी तालुक्यातील मंदर येथील शाळा संस्थेचे ते अध्यक्ष होते.
    
मागील दहा दिवसापूर्वी प्रकृती अस्वस्थाने त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत कमालीची सुधारणा झाल्यानंतर त्यांना चार दिवसांपूर्वीच डिस्चार्ज मिळाला होता. बुधवारला ते मारेगाव येथील शाळेत किमान दोन तास थांबून कामकाज केले. गुरुवारला पहाटे झोपेत असतांना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूने शैक्षणिक क्षेत्रातील प्रचंड नुकसान झाल्याच्या भावना व्यक्त होत आहे.

श्री.अनिल ताजने यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, मूलगी मोना व मुलगा हेमंत असा आप्तपरिवार आहे. ताजने सर यांच्यावर वणी येथील स्मशानभूमीवर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

वरोडी सोसायटी तर्फे राजकुमार व अमन यांचा सत्कार

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
महागांव, (३० संप्टें.) : दि.२९ सप्टेंबर बुधवारला वरोडी सेवा सहकारी सोसायटी यांच्या तर्फे सुवर्णपदक पटकावणाऱ्या सेवानगर येथील राजकुमार भिकु जाधव व अमन आडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वरोडी सोसायटी अध्यक्ष नंदकुमार मस्के उपाध्यक्ष दत्ता माने, संचालक सुखदेव राठोड, किशोर नगारे, रामहरी पाटील आडकीने, मुन्ना राठोड, नामदेव काळे, सुनील शिरगिरे, रंगराव ठाकरे, परशराम राठोड, पांडुरंग पवार, निरंजन कवाने यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला. हरियाणा येथे आयोजित स्टुडन्ट ऑलिंपिक असोसिएशनच्या वतीने हरियाणा येथे आयोजित 22 वर्षीय वयोगटांमध्ये सुवर्ण पदक तर 17 वर्षीय गटामध्ये सिल्वर मेडल (कब्बड्डी) मिळवणाऱ्या युवकांचा  सत्कार करण्यात आला.

यामध्ये महागाव तालुक्यातील सेवानगर कासारबेळ येथील राजकुमार जाधव व अमन आडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व राजकुमार आणि अमनला पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्य प्रसंगी या सभेला उपस्थित असलेले कृषी विभागातील नंदकिशोर आडे यांनी नानाजी देशमुख कृषी विभागातील या भागात उत्तम काम केल्यामुळे त्यांचाही सत्कार या वेळी सोसायटी तर्फे करण्यात आला आहे.
या दरम्यान, पोकरा शेड नेट योजनेचे घेतलेले प्रगतशील शेतकरी रामहरी पाटील आडकीने यांनी लाभ घेतला तसा लाभ इतरही शेतकऱ्यांनी घ्यावे असे आव्हान आडे यांनी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर नगारे केले तर सचिव सुधाकर चिकने यांनी आभार मानले.


 

चंद्रपूर : मंडळ अधिकारी प्रशांत बैस व महादेव कन्नाकेंवर विभागीय चाैकशा प्रस्तावित - एसीबीच्या जाळ्यात अडकले हाेतेयं हे दाेन्ही मंडळ अधिकारी

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (३० संप्टें.) : महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ८ अन्वये चंद्रपूर जिल्ह्यातील बहुचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैस व महादेव कन्नाके यांचे वर नुकत्याच विभागीय चाैकशा प्रस्तावित झाल्या असल्याचे खात्रीलायक व्रूत्त प्राप्त झाले आहे. तसे अहवाल चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचे पत्रांच्या अनुषंगाने तहसीलदार भद्रावती व तहसीलदार मूल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतांना या दाेन्ही लाचखाेर मंडळ अधिका-यांनी त्यांचे शेतीविषयक फेरफार प्रमाणित करण्यांसाठी त्यांना लाचेची मागणी केली हाेती. त्यानंतर त्यांचे तक्रारींच्या अनुषंगाने चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी व पथकांनी चंद्रपूर जिल्ह्यातील या दाेन्ही लाचखाेर मंडळ अधिका-यांना कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता सापळा रचुन लाच घेतांना रंगेहात पकडले हाेते. जिल्ह्यातील बहुचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैस यांस भद्रावती तहसील कार्यालयात दीड हजार रुपयांची लाच घेतांना तर मूल तालुक्यातील बेंबाळ येथील मंडळ अधिकारी महादेव कन्नाके यांस तहसील कार्यालय परिसरातील बाहेरच्या एका पानटपरीवर भेजगांवचे विद्यमान सरपंच तथा काँग्रेसचे युवा नेता अखिलेश गांगरेड्डीवार यांचे कडुन (एका शेतजमीन फेरफार प्रकरणात) तीन हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले हाेते. विशेष म्हणजे हे दाेन्ही मंडळ अधिकारी याच वर्षात एसीबीच्या जाळ्यात लटकले हाेते. यांनी कास्तकारांना अक्षरशा वेठीस धरले हाेते.(शासकीय महसुल सेवेत असतांना) शासनाकडुन गलेलठ्ठ साठ ते सत्तर दरमाह वेतन घेत असतांना देखिल या दाेन महाभागांनी कास्तकांराना लाचेची मागणी करणे सुरु ठेवले हाेते. आता चंद्रपूर विभागीय चाैकशा प्रकरणात या लाचखाेर मंडळ अधिका-यांना बयान नाेंदविण्यासाठी तसेच प्रत्येक आराेपांचे लेखी उत्तर देण्यांसाठी प्रत्यक्षात हजर राहावे लागणार आहे. या प्रकरणातील महादेव कन्नाके हे अद्यापही निलंबित आहे तर प्रशांत बैस यांना कामावर घेण्यांत आले असल्याचे समजते.

वरोरा तालुक्यातील टाकळी येथे महिलेला घरात घुसुन जीवे मारण्याचा प्रयत्न, महिलेच्या अब्रूवरही घातला हात

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
वरोरा, (३० सप्टें.) : वरोरा तालुक्यातील टाकळी या गावातील एका महिलेच्या आब्रुवर हात टाकणाऱ्या आरोपीवर थातुर मातुर गुन्हे नोंदवुन त्याला वाचविण्याचा पोलिस जमादारा कडून पुरेपुर प्रयत्न केला जात असल्याचा आरोप तेथील ग्रामपंचायत कमेटी, तंटामुक्ती समिती गट ग्रामपंचायत खापरी व ग्रामस्थांनी वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केला आहे. महिलेचा पती घरी नसतांना तिच्या घरात घुसुन आरोपीने तिला व तिच्या मुलाला जबर मारहाण केली. एवढेच नही तर तिच्यावर आरोपीने जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला. पत्नी व मुलाच्या किंचाळया ऐकुन पती घराकडे धावत सुटला. त्याने पत्नी व मुलाला आरोपीच्या तावडीतून वाचण्याचा प्रयत्न केला. पण महिलेला जबर मार लागल्याने तिला आधी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात व नंतर चंद्रपुरला रेफर करावे लागले. ही घटना 21 सप्टेंबर ला सायंकाळी 7 वाजता च्या सुमारास घडली. हे गंभीर व माणूसकीला तडा पोहचविनारे प्रकरण घडूनही पोलिसांनी आरोपी विरुध्द गंभीर गुन्हे दाखल न करता आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. बिट जमादार हा आरोपीच्या नाते संबंधातला असून आर्थिक हितसंबंध जोपासत आरोपीला पाठीशी घालण्याचा या जमादारा कडुन प्रयत्न केला जात आहे. आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी महिलेच्या पतीवरच कलमा लावण्याचा महाप्रताप या जमादाराने केला असल्याने गाव वासियांमध्ये आच्छर्य व तेवढाच संतापही व्यक्त केल्या जात आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आरोपीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली असतांना देखील पोलिस या प्रकरणाला गांभीर्याने घेण्यास तयार नाही. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. गावकरी मदतीला धावून आल्याने आरोपीच्या खुनी हल्ल्यातून हे कुटुंब थोडक्यात बचावलं. नाही तर हे कुटुंबही आरोपीच्या अंधश्रद्धेचं बळी ठरलं असतं 

आरोपी हा अंधश्रध्दा जोपासणारा आहे. अंधश्रद्धेच्या अगदीच आहरी गेला आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा आहे. गावात जादूटोणा, भानामती केल्या जात असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. भोंदू बाबांना गावात आणुन या भोंदी बाबांकडुन अघोरी पुजा करुन गावकर्यांमध्ये भिती निर्माण करण्याचे प्रकार सुरु आहे. आरोपी हे देखील अंधश्रद्धेच्या आहारी गेले असल्याने भोंदूबाबाने आरोपीच्या डोक्यात मनिषा खारकर यांच्या विषयी संशयाचे बीज पेरणे सुरु केले. मनिषा खारकर यांच्या मुळेच तुमच्या घराचे नुकसान होत असल्याचे भोंदूबाबाने आरोपीच्या मनात रुजविल्याने मनिषाचा सूड घेण्याच्या उद्देशाने आरोपीने मनिषा खारकर यांच्यावर हल्ला चढवून त्यांच्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. पत्नी व मुलाचा किंचाळण्याचा आवज आल्याने दिपक खारकर याने घराकडे धाव घेतली. त्याने आरोपीच्या तावडीतून पत्नीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीला जबर मार लागल्याने आधी तिला उपजिल्हा रुग्णालयात व नंतर चंद्रपुर येथे रेफर केले. या गंभीर प्रकरणाची महिलेने पोलिस स्टेशनला तक्रार केली. पण जमदार रिश्तेदार निघाल्याने आरोपोची चांगलीच पाठराखण झाली. घटनेचं स्वरुपच या जमदारने बदलवुन टाकलं. पंचनामा करतांनाही अनेक कारणामे केले. प्रत्यक्षदर्शींची साक्ष न नोंदविता आरोपींच्या निकटवर्तीयांची साक्ष नोंदविल्या गेली. उलट महिलेच्या पतीवरच कलमा लावल्या गेल्या. जमादाराकडुन आरोपीला वाचविण्याचा पुरेपुर प्रयत्न केल्या गेला. आरोपीवर अब्रुवर हात टाकणे व हल्ला चढवुन जबर मारहाण करणे, हा गुन्हा न नोंदविता अगदीच किरकोळ कलमा लावण्यात आल्या. मनिषाचे बयाण न नोंदविता केवळ दिपक खारकर याचेच बयाण नोंदवुन त्याला जमानत मिळेल अशा कलमा लावण्यात आल्या. आता तो जमानतीवर सुटून तोर्यात वावरत आहे. साक्षीदारांना तंबी देत आहे. त्याच्यावर याआधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. जादूटोणा, भानामती यासारख्या अंधश्रध्दा पसरवुन भोंदूबाबा कडुन पुजा अर्चा करवुन घेणाऱ्या आरोपीवर अंधश्रध्दा निर्मुलन कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याचीही मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. आरोपीने अन्य साथीदारांना घेऊन महिलेच्या घरात घुसुन तिच्यावर हल्ला चढवला. तिची ईज्जत घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय निंदनीय असतांना देखील रिश्तेदरी निभावण्याकरीता हा जमादार कर्तव्याशी गद्दारी करुन आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करित आहे.     (पीडित महिला व मनसे पदाधिकारी यांची         पत्रकार परिषदेमधून कारवाईची मागणी              करताना)
या महिलेला न्याय न मिळाल्यास पोलिस यंत्रणेवर असलेल्या नागरिकांच्या विश्वासाला तडा गेल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा आरोपीवर उचित गुन्हे दाखल करुन त्याच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी ग्रामपंचायत कमेटी, तंटामुक्ती समिती गट ग्रामपंचायत खापरी व टाकळी गाव वासियांनी तसेच पिडीत महिलेले वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. हिच मागणी मनसेच्या पदाधीकार्यांनी सुद्धा केली आहे. पोलिसांनी आरोपीवर कडक कार्यवाही न केल्यास पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा टाकळी वासियांनी दिला आहे.

 

2 ऑक्टोबर ला पोलीस स्टेशन वरोरा येथे भव्य रक्तदान शिबीर व रोग निदान शिबीर

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (२९ सप्टें.) : जागतिक रक्तदान दिन व महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून सदभावना एकता मंच व पोलिस उपविभागिय कार्यालय तथा पोलिस स्टेशन वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर ला पोलिस स्टेशन वरोरा ईथे सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे व रोग निदान शिबीराचेआयोजन करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी वरोरा मा. सुभाष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व नव्यानेच रुजू झालेले पोलिस उपविभागीय अधिकारी मा. आयुष नोपानी आय. पी. एस. यांच्या हस्ते उदघाटन संपन्न होणार आहे.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.अनंत हजारे, तहसिलदार मॅडम रोशन मकवाणी, मुख्याधिकारी न.प. गजानन भोयर, संवर्ग विकास अधिकारी पं.स. राजेश राठोड, ठाणेदार दिपक खोब्रागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड व वैद्यकीय अधिकारी राठोड हे उपस्थित रहाणार असून मोठ्या संख्येत रक्तपुरवठा करण्याची संपूर्ण तयारी सदभावना एकता मंच व पोलिस विभाग विभाग वरोरा च्या टिम ने पूर्ण केलेलि आहे. आयोजकांनी वरोरा व परिसरातील समस्त युवक, युवती, पुरुष व महिला यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे व या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचे आव्हान केलेले आहे.

मुदखेड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत करण्याची काँग्रेसची मागणी



सह्याद्री न्यूज | अमोल टेकले 
मुदखेड, (२९ सप्टें.) : आज मुदखेड तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सतत झालेल्या पाच दिवसाच्या अतिवृष्टीमुळे शेतीचे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयाची सरसगट मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आली.

यावेळी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धवराव पाटील पवार, शहराध्यक्ष माधव पाटील कदम, नगरसेवक उत्तमराव चव्हाण, इम्रानसेठ मच्छेवाले, नितीन चौदंते, रमेश बोडके, चांदु चमकुरे, बजरंग खोडके, मुजिब पठाण, चांदु बोकेफोड, कुनाल चौदते, रावसाहेब चौदंते, कैलास चंद्रे, नागोराव भांगे, आनंदराव पा.पवार, बंदि अली खान पठाण, करीम खान साब, राजू बोकेफोड, अविनाश हाटकर, बालाजी सूर्यवंशी, बबलू शेठ, संभाजी भांगे, शुभम कल्याणे, आकाश मुंगल, उत्तमराव जनजवळे, व्‍यंकटी पवार, भुजाजी पवार, रंगराव पा. पवार उपस्थित होते.

पंचायत समिती पांढरकवडा रोह्याया घोटाळ्यात चौकशीचा आला वैग


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२९ सप्टें.) : पांढरकवडा पंचायत समिती मधील रोह्याचा कामात ५४ कोटीचा भ्रष्टाचार करण्यात आल्याची तक्रार खुद्द माजी सभापती सौ. इंदुताई मिसेवार व काही सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमुन चौकशी करण्यात आल्यानंतर भ्रष्टाचार उघडकीस सुध्दा आला होता. पं.स. चा एका तत्कालीन पदाधिकारी या रोहयो भ्रष्टाचाराचा मास्टर माईंड असल्याची चर्चा आहे. चौकशी समितीने केलेल्या चौकशीमध्ये तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यासह एक डझन पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवकांना दोषी ठरविण्यात आले होते. शिवाय काही राजकीय ठेकेदारांची सुध्दा नावे चौकशी समितीने रेकॉर्डवर घेतली होती. केंद्र व राज्य शासनाकडुन आलेल्या निधीतुन कामे केलेल्या ठिकाणी पुन्हा रोहयोची कामे दाखवुन लाखो रुपयांची देयके कामे न करताच संबधित ग्रामसेवक, अभियंत्याच्या सहकार्यान राजकीय ठेकेदारांनी उचल केली होती. चौकशीत भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पं.स.च्या तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यासह अनेकांना निलंबित करण्यात आले होते. शिवाय काहींवर रिकहरी सुध्दा काढण्यात आली. मात्र सदर प्रकरणातील मुख्य दोषी असलेल्या राजकीय ठेकेदारांवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नव्हती.

गेल्या एक दिड वर्षापासुन प्रकरण थंड बस्त्यात असतांनाच काल २७ रोजी अचानकपणे
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी येथे धडक देवुन माजी सभापतीचे बयाण नोंदविले. शिवाय पं.स. कार्यालयात जावुन गटविकास अधिकाऱ्याकडे विविध कागदपत्राची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीने पुन्हा एकदा जोर पकडल्याचे दिसुन येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पांढरकवडा येथे भेट देवुन तक्रार कर्त्यांची जबानी तथा कागद पत्राची जुळवा जुळव सुरु केल्याने या प्रकरणातील दोषी राजकीय ठेकेदारांचे धाबे दणाणल्याचे दिसुन येत आहे. प्राप्त माहिती नुसार ईतर तक्रार कर्त्यांचे सुध्दा आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी बयान नोंदविणार आहे.

झाडीपट्टीत "अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परीषदेची स्थापना



सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वडसा, (२९ सप्टें.) : दि.२६ सप्टेंबर ला झाडीपट्टीतील रंगकर्मींची सभा आमगाव येथे जेष्ठ  कलावंत डॉ.परशुराम खुने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत झाडीपट्टीतील शेकडो रंगकर्मी उपस्थित होते.  समस्त कलावंतांच्या वतीने कलावतांच्या हितासाठी "अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत परिषद" ची स्थापना करण्यात आली.

यात अध्यक्ष म्हणून शेखर पटले, तर सचिव पदासाठी मुकेश गेडाम यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारीणीत परिषदेचे ऊपाध्यक्ष म्हणून किरपाल सयाम, प्रियंका गायधने, किशोर भाग्यवंत, देवा कावळे सहसचीव म्हणून ज्ञानेश्वरी कापगते, वासुकुमार मेश्राम, सुनील कुकुडकर, दुधाराम कावळे तर सदस्य म्हणून शेरु खान, विनोद काळे, प्रतिभा साखरे, शंभुदेव मुरकुटे, ऊत्तम ऊके, लालचंद पुंगाटे, कोषाध्यक्ष शंतनु कुळमेथे यांची निवड करण्यात आली..
सदर परिषदेचे सल्लागार-मार्गदर्शक म्हणून झाडीपट्टीचे जेष्ठ कलावंत डॉ.परशुराम खुने, अंबादास कामडी, प्रा.डॉ.दिनकर चौधरी, डॉ.प्रवीण  सहारे यांची निवड करण्यात आली.

प्रसिद्धी प्रमुख राहुल पेंढारकर, मंगल मशाखेत्री, होमदेव कोसमशीले हे काम सांभाळतील.
सभेचे संचालन राहुल पेंढारकर, प्रास्ताविक देवा कावळे तर, आभार किरपाल सयाम यांनी मानले.
निवड प्रक्रीया प्रमुख म्हणून प्रा.डॉ.दिनकर चौधरी, तर सहप्रमुख म्हणून डॉ.प्रवीण सहारे यांनी ऊत्तम नियोजन करुन अविरोध निवडप्रक्रीया पार पाडली.
अखिल झाडीपट्टी नाट्य परिषद ही झाडीपट्टीतील कलावंतांच्या पाठीशी ऊभी राहुन झाडीपट्टीच्या विकासासाठी नक्कीच कटीबद्ध असेल, असे परिषदेच्या वतीने उपस्थित रंगकर्मींना विश्वास देण्यात आला.
निवड केलेल्या कार्यकारीणी मंडळास झाडीपट्टीतील अनेक रगकर्मींनी पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

पांढरकवडाच्या आर्यन वाघमारे नवोदय परीक्षेत मारली बाजी


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२९ सप्टें.) : पांढरकवडा येथील ईरा इंग्लिश मिडीयम स्कूल मधील शिक्षण घेत असलेला आर्यन नितीन कुमार वाघमारे यांनी वर्ग ६ च्या प्रवेशासाठी नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पात्र परिक्षेत यशस्वी झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांची जणु mpsc असलेली ही कठिण स्पर्धा परिक्षा चाणाक्ष आर्यनने यशस्वी पार केली.

तो आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य श्री देशपांडे सर, वर्गशिक्षिका कु. शेरीज मॅडम, आपले आई वडिल व भाऊ साहिल यास दिले. पुढे आणखी स्पर्धा परिक्षेव्दारे प्रशासकीय सेवेत येवून देशसेवा करण्याचा त्याचा मानस आहे. त्याचे जिद्द, ध्येय, बघून ईरा इंग्लिश मिडीयम स्कूल सर्व शिक्षक व शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षा करण्यात येत आहे.

ट्रॅक्टरने घात केला, अल्पवयीन वैष्णीवचा जिव गेला; मूल तालूक्यातील घटना🟪


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२९सप्टें.) : जिल्ह्याच्या मुल तालुक्या अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील पिपरी दिक्षित येथील एका टँक्टरच्या विचित्र अपघात एका अल्पवयीन तरुणींचा हकनाक जिव गेल्याची दुखद घटना आज घडली या बाबत असे कळते की पिपरी दिक्षित येथील शितल खुशाबराव देवतळे यांचा मालकीचा ट्रैक्टर क्रमांक एम एच ३४बिएफ १६६४ हा गावातील एका वर्दळीच्या मार्गावर ठेवण्यांत आला हाेता त्या वेळी या ट्रँक्टर जवळ ट्रँक्टरचा चालक हजर नव्हता. कुणी ट्रँक्टर जवळ नसतांनी गावातील काही मुले मुली त्या ट्रँक्टर खेळु लागली हाेती अश्यातच रस्त्यावर उभे असलेले ट्रँक्टर मागे येवू लागले. त्यातच मुले मुली आपला अमुल्य जिव वाचविण्यांच्या प्रयत्नात इकडे तिकडे सैरावैरा पळु लागली पण तिथे असलेली वैष्णवी मनाेज ढाेंगे नावाची ही नव वर्षीय अल्पवयीन मुलगीआपला प्राण वाचविण्यात या वेळी अपयशी ठरली. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यांत येत आहे. विशेष म्हणजे अवैध रेती वाहतुक प्रकरणात सदरहु ट्रैक्टर मालकावर महसुल विभागाने अनेकदा दंडात्मक कारवाया केल्या असल्याचे गावात बाेलल्या जाते.

लाच घेणारा लिपिक लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२९सप्टें.) : लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे याची पुरेपूर जाणीव असतांना देखिल एका मेडीकल फार्मवर स्वाक्षरी करण्यांसाठी चक्क पन्नास हजार रुपयांची लाच मागणा-या चंद्रपूरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन यशस्विरित्या (काल मंगळवारी) जाळ्यात अडकविले आहे. या घटनेमुळे चंद्रपूरात चांगलीच खळबळ उडाली असुन, अगदी क्षुल्लक कारणांसाठी एवढी  माेठी रक्कम मागणे ही एक आश्चर्य कारक बाब असल्याची चर्चा सर्व सामान्य जनतेतुन ऐकावयास मिळाली. या पूर्वी सुध्दा अश्या लाचखाेरांवर चंद्रपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिका-यांनी व त्यांचे पथकांनी यशस्विरित्या कारवाया केल्या आहे. हे येथे विशेष उल्लेखनिय आहे.

उपरोक्त प्रकरणामुळे वैद्यकीय महाविद्यालय परत एकदा चांगलेच चर्चेत आले आहे. सध्या या घटनेची गावभर चर्चा सुरु आहे.

उच्च शिक्षित तरुणीने प्रेमास नकार देताच "त्याने "केली तिची व्हाट्सअप व फेसबूकच्या माध्यमांतुन नाहक बदनामी !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२९सप्टें.) : एका उच्च शिक्षित तरुणीस प्रथम मैत्रिचे मधुर व गाेड संबंध जाेडुन नंतर बळजबरीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून बघणां-या ग्रामीण भागातील एका युवकास चंद्रपूर जिल्ह्यातील पडाेली पाेलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या संबंधात पिडीत युवतीने उपराेक्त तरुणाच्या विरुध्दात पाेलिस स्टेशनला ताेंडी तक्रार केल्या नंतर पाेलिसांनी कुठलाही विलंब न लावता तात्काळ आराेपी साजन उर्फ सूरज सातपुते यास ताब्यात घेतले आहे. सदरहु घटनेतील आराेपीचे वास्तव्य पडाेली नजिकच्या नागाळा येथील असल्याचे चाैकशी अंती कळले. घटनेतील आराेपी हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असुन, ताे सध्या ग्राम पंचायत नागाळ्याचा उपसरपंच असल्याचे समजते.

प्राप्त झालेल्या माहिती नुसार असे समजते की, स्थानिक डाँ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना पिडीत तरुणींची साजन उर्फ सुरजची ओळख झाली .नंतर मैत्रि संबंधातुन दिवसांगणिक त्यांची आेळख अधिक वाढत गेली .याच संधीचा फायदा घेत तरुणांने काही दिवसांने पिडीत तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात आेढण्यांचा प्रयत्न केला परंतु सुशिक्षित परिवारातील या तरुणीने चक्क त्याचे प्रेमाला नकार दिला .तेव्हा या युवकांने तिला विविध प्रकारच्या धमक्या देवून तिच्यावर दबाव टाकण्यांचा प्रयत्न केला .ताे एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिला व्हाँटसअप व फेसबूकच्या माध्यमांतुन नाहक बदनाम करण्यांचा प्रयत्न देखिल केला. शेवटी तिने ही बाब परिवारातील सदस्यांना सांगितली नंतर तिने पडाेली पाेलिस स्टेशन गाठुन त्याचे विरुध्द तक्रार दाखल केली.

पडाेलीचे कर्तव्य दक्ष पाेलिस अधिकारी काेंडावार यांनी या प्रकरणात चाैकशी करुन आराेपीस अटक केली व आराेपीवर विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले. दरम्यान, पाेलिसांनी त्याचा माेबाईल जप्त केला आहे. अश्या घटना टाळण्यांसाठी समाजातील तरुणींनी मनात कुठलीही भिती न ठेवता हिंमतीने पुढे आले पाहिजे असे आवाहन पडाेलीचे पाेलिस निरीक्षक महेश काेंडावार यांनी केले आहे.

कृषिदुताकडून ई-पिक पाहणी अप्लिकेशनची नोंदणी व फायदे संदर्भात मार्गदर्शन

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
नरखेड, (२९ सप्टें.) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय, कोंघारा, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम (रावे) 2021-22 अंतर्गत विद्यार्थी शुभम सुरेशराव आगरकर याच्या पुढाकाराने तसेच महसूल विभाग आणि कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ई-पीक पाहणी अप्लिकेशन नरखेड तालुक्यातील भिष्णूर या गावात अप्लिकेशनची नोंदणी आणि उपयोग, फायदे, याबाबात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

यामध्ये ई- पीक पाहणी अॅप्लिकेशनच्या नोंदणीपासून तर पीक पेरा कसा नोंदवावा,पिकांची अचूक नोंदणी कशी करावी, त्याचे भविष्यात होणारे फायदे, छायाचित्र काढणे, इत्यादीबद्दल कृषिदूताने मार्गदर्शन केले. या माहिती कार्यक्रमादरम्यान भिष्णूर गावातील संदीप आगरकर, सुनील वरुडकर, आदी लोकांचे सहकार्य लाभले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे, प्रा. शुभम शिरपूरकर, प्रा. दत्ता जाधव, प्रा. हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. स्नेहल आत्राम, प्रा.पल्लवी येरगुडे, प्रा. काजल माने,प्रा. कृतिका इंझाळकर आदि शिक्षकांचे या विद्यार्थ्याला मार्गदर्शन लाभले.

धनंजय आसूटकर राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने (2021) सन्मानित

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२९ सप्टें.) : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई द्वारा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांना,लोकांची समाजाची सेवा करणार्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये निराधार,राशनची कामे,विधवांना आर्थिक सहाय्य असेल,गावातील रस्ते,पुलाचा प्रश्नांची राजमानवधिकार आयोगाकडे केलेली तक्रार असेल यासाठी रस्त्यावर येऊन उपोषणापर्यंत मजल मारणारे तसेच आपण 'ज्या समाजात जन्मलो त्याचे काहीतरी देणे बाकी असते' हा मानवतेचा संदेश घेऊन कोरोनाच्या अतिबिकट अशा परिस्थितीत मुलांना मोफत शिकवणी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन इत्यादी कामे करणारा हा युवक म्हणजे राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२१ चा प्राप्त करणारा युवक सन्मा.धनंजय विनोद आसुटकर हा लहानशा खेडेगावातून आपल्या तमाम युवा वर्गाला आदर्श ठरणारच आहे. ग्राउंड लेव्हल वर काम करण्याची डोळस प्रवृत्ती,समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन व जात,धर्म,पंथ, संप्रदाय हे सगळे बाजूला सारून मानवाची भूमिका जपणारी भावना प्रत्यक्षात कृतीत यायला पाहिजे. हा दृष्टीकोन विचारात घ्यावा. हा या पुरस्कारा मागचा उद्देश समजून हा पुरस्कार समाजाप्रती मला काम करण्याची प्रेरणा देईलच. "सह्याद्री न्यूज" नेटवर्क परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा..!!

८ जणांकडून घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रयत्न

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
वरोरा, (२९ सप्टें.) : वरोरा तालुक्यातील टाकळी येथील मनीषा दीपक खारकर ह्या घरी एकटी असतांना काही समाजकंटक रवी खारकर, प्रवीण खारकर, वसंत खारकर, मनोहर खारकर, किसन खारकर, अक्षय खारकर, दशरथ खारकर आणि राहुल खारकर यांनी कट रचून जबरदस्तीने घरात घुसून मारहाण करून सदर महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असे, आयोजित पत्रकार परिषदेत मनसेच्या सुनीता गायकवाड, वर्षा भोंगे, आणि पीडितांनी आरोप करीत त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
या पत्रकार परिषदेत राहुल नेताजी खारकर, विठ्ठल खारकर, नितेश गाडगे, सचिन गुप्ता व महेश गरपल्लीवार हे उपस्थित होते.

मारामारी दरम्यान, गावातील काही लोकांनी बाईला दुचाकी वर वरोरा पोलीस ठाण्यात आणले, तिच्या  पतीला सुद्धा आणले, त्यानंतर आमची चौकशी केली नाही आणि शासकीय रुग्णालयात डोक्यावर 10 टाके घातले आणि हातावर 2 टाके घातले व चंद्रपूर पाठवले.
या गंभीर घटनेची पोलीस प्रशासनाकडून किरकोळ वेदना नोंदवली गेली. रात्री 2:10 वाजता त्यांना वार्ड क्र. 17 आणि पतीला वार्ड क्र. 7 मध्ये भर्ती केले. तीन दिवस रक्तस्त्राव सुरू असतांनाही पोलिसांनी चौकशी न करता आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. जमादार गाडगे यांनी ही गंभीर घटना  टाकळीमध्ये घडली असतांना, खापरीमध्ये घटना घडली असे सांगितले. हे प्रकरण पोलीस अधीक्षकांना कळवल्याची माहिती मिळताच त्यांनी आरोपींना जामीनही दिला. त्यामुळे जमादार, डॉक्टर यांच्या चौकशीची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

राजूऱ्याच्या ज्ञानदा धाेटेने मानले "सह्याद्री न्यूज" नेटवर्कचे आभार

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (दि.२८सप्टें.) : माझ्या यशाला सह्याद्री न्यूज नेटवर्कने सर्वत्र बातमीच्या स्वरूपात महाराष्ट्र भर पोहचविले व माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. केवळ आपल्यामुळे हे शक्य झाले.

माझ्या आईबाबाचे कार्य, वाचनाची आवड, सर्वाना मदत करण्याची सवय हे सर्व मी लहानपणापासून बघत आले आहे. आणि याचा माझ्या जडणघडणीवर बराच सकारात्मक परिणाम झाला आहे.

आपल्या प्रोत्साहनामुळे मला आणखी जोमाने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळेल यात शंका नाही. "सह्याद्री न्यूज" नेटवर्क सह मी सहजं सुचलं वरील सर्व सखी आणि सदस्याचे मी मनापासून आभार मानते.. !

पांढरकवडा तालुका ओलादुष्काळ जाहीर करा


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२८ सप्टें.) : पावसाळ्यात अति पावसामुळे तालुक्यात शेतकऱ्यांचे दैणादीन अवस्था झाली आहे. शेतात लागलेला माल हातात येणे अवघड झाले आहे. कापूस सोयाबीन ही नगदी पिकांची अति पावसामुळे वाट लागलेली दिसून येत आहे. शेतीला लावलेली रक्कम निघणे कठीण झाले आहे. ओल्या दुष्काळामूळे बळीराजा चिंतेत पडला आहे.

बळीराजा शेतीसाठी बँकेतुन व सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आता शासन ''मायबाप'' समजून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. नाहीतर शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्ती ठरेल. शेतकरी देशाचा कणा आहे. तो कणा मोडला गेला तर देशाचा आर्थिक विकास कोलमोडायला वेळ लागणार नाही.कोरोना काळात देश आर्थिक संकटात होता भारताचा GDP हा अतिशय खालावला होता.

भारत देशाचा बळीराजा हा देशाची लाज राखला. आज तो बळीराजा निसर्गाच्या प्रकोपामुळे संकटात आहे. त्याला आज एक मदतीचा हात देणे तितकेच महत्वाचे आहे.

वांजरी शिवारात वाघाने केला बैलावर हल्ला


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
पांढरकवडा, (२७ सप्टें.) : वांजरी शिवारात दिवसेंदिवस जनावरांवर हल्ल्याच प्रमाणात वाढलेलं आहे. जंगलालगत व माळा लगत असलेल्या शेतकऱ्यांना शेतात येणे जाणे अतिशय कठीण झाले.अशा वातावरणात शेतात जाणे कठीण झाले आहे. जणांवरांवर हल्ले महिन्याला आठवड्याला होत आहे. ती वेळ माणसावर येऊ नये. या करिता वनविभागाने तात्काळ योग्य ते पाऊल उचलणे तितकेच महत्वाचे आहे. श्री.बाबुराव ढवा आत्राम रा.वांजरी या शेतकऱ्यांच्या बैलावर वाघाने प्राणघातक हल्ला केला परंतु जिवाच्या आकांताने बैल घरी पळून आला आणि जीव वाचला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांने तात्काळ शेतकऱ्यांच्या घरी धाव घेतले. जणांवरांवर तात्काळ खाजगी उपचार करण्यात आले. सदर हल्ल्याचे प्रकरण या पुढे घडू नये. याकरिता, वनविभागाने आपल्या टीम द्वारे गावात येऊन लोकांना जनजागृती करणे व विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.

वांजरी शिवारात जंगलालगत असलेल्या शेतात भीतीचे वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकरिता शेतकऱ्यांना वॉलकंपाउंडची गरज आहे. ती वनविभागाने त्वरित करून देण्याची मागणी वांजरी ग्रामस्थ करत आहे.

शोषण व अत्याचाराचे विरोधात आवाज उचलने म्हणजे भगतसिंग यांच्या विचारांशी जवळीक होय


सह्याद्री न्यूज | जयंत कोयरे 
राजूर, (२८ सप्टें.) : "भारत व पाकिस्तानात शहीद ए आजम भगतसिंग यांना ओळखत नाही असा व्यक्ती क्वचितच सापडणे होय, परंतु त्यांच्या विचारांना समजून घेणे व त्यांच्या विचारावर कृती करणारा मात्र बोटावर मोजण्या इतपत मिळतील. अन्याय अत्याचाराचे विरोधात आवाज उचलणे व अत्याचार होणारच नाही अशी व्यवस्था आणण्यासाठी तसे प्रयत्न करणे ह्यामध्ये फरक आहे, असे असले तरीही शोषण व अत्याचाराचे विरोधात आवाज बुलंद करून त्यासाठी लढा उभारणे हे शहीद भगतसिंग यांच्या विचाराशी जवळीकता होय", असे मत आज भगतसिंग यांच्या ११४ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी झालेल्या येथील कार्यक्रमात वक्त्यांनी व्यक्त केलेल्या विचारातून सूर प्रकटला.

येथील शहीद भगतसिंग चौकातील त्यांच्या प्रतिमेला येथील जिजाई कम्प्युटर इन्स्टिट्यूट चे संचालक जयंत कोयरे व सामाजिक कार्यकर्ते अश्फाक अली यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. 

यावेळेस महेश लिपटे सर, पोलीस पाटील सरोज मून, माकपचे कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, कवी-गायक राजेंद्र पुडके, राजूर विकास संघर्ष समितीचे साजिद खान, जयंत कोयरे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून मो. असलम, समीर बेग उपस्थित होते. कार्यक्रमात प्रामुख्याने निलेश भगत, जब्बार, स्वप्नील डवरे, प्रकाश दाते हजर होते.

पावसाने घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबियांना आ.किशोर जोरगेवारांची आर्थिक मदत

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२८ सप्टें.) : तीन दिवसांपासून चंद्रपूरात सोसाट्याचा वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अश्याच राष्टवादी नगर येथील नुकसानग्रस्त कुटुंबियांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा वंदना हातगावकर व आदिवासी समाजाच्या महीला शहर अध्यक्षा वैशाली मेश्राम यांची उपस्थिती होती.
       
तीन दिवसांपासून चंद्रपूरात वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेकांच्या घरांना शती पोहचली आहे. अनेकांच्या घरावरील टिना उडाल्या असून मातीच्या भिंती कोसळल्या आहेत. याच पावसाचा फटका राष्ट्रवादी नगर येथील रहिवासी शकुंतला नत्थूजी रघाताटे, जोत्सना गणेश कुळसंगे, निर्मला जाधव, त्रिवेणी लक्ष्मण जुमनाके यांच्या घरांना बसला असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांना मिळताच त्यांनी सदरहु कुटूंबियांना आर्थिक मदत करण्याचा सूचना यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केल्यात त्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पिढीत कुटूंबियांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे. तसेच शासनाकडून मिळणारी मदतही लवकर मिळावी याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

बाेगस रासायनिक खते विक्री करणाऱ्या शंकरपूरच्या राजू वैद्यवर कारवाई करा - प्रहारची मागणी !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२८सप्टें.) : चंद्रपूर जिल्हा अंतर्गत येत असलेल्या चिमूर तालुक्यातील शंकरपूरच्या राजू वैद्य यांनी बाेगस रासायनिक खताची विक्री केल्यामुळे याचेवर कायदेशीर कारवाई करण्यांची मागणी आज मंगळवार दि.२८ सप्टेंबरला प्रहारच्या एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे कडे एका लेखी निवेदनातुन केली आहे.

वैद्य यांनी दत्त कृषि केन्द्र या नावाने शंकरपूर नगरीत आपले दुकान थाटले असुन, अनेक शेतक-यांनी त्यांचे कृषि केन्द्रातुन डिएपी ही रासायनिक खते विकत घेतली आहे. परंतु पिकांवर कुठलाच परिणाम दिसुन न आल्यामुळे कमलाकर ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्हा कृषि अधिकारी यांचे कडे रितसर तक्रार नाेंदविली. संबंधित खताचे नमूने तपासणीसाठी पंजाबराव देशमुख कृषि महाविद्यालय नागपुर व शेतकरी माती परिक्षण शंकरपुर यांचे कडे पाठविले असता अहवालात स्पष्ट पणे नमुद केले आहे की, यात रासानिक घटकांचा समावेश शुन्य आहे. या बाबीकडे जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी तातडीने लक्ष पुरवून संबंधित दुकान मालकावर कायदेशीर कारवाई करावी.

कारवाई न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षा कडुन लवकरच आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा सादर केलेल्या निवेदनातुन महेश हजारे, शेरखान पठाण,अफराेज अली व अशिद मेश्राम, यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतांना आज प्रत्यक्षात शेतकरी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात माेठ्या संख्येने हजर हाेते.