Page

मांडवी शिवारात पुन्हा वाघाचा थरार, दोघांवर हल्ला, बैलाने ठोकली 'धूम'

                      (संग्रहीत फोटो) 


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (ता.३१) : झरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मांडवी बीट येथे आज वाघाने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून दुसरा बालंबाल वाचला.

याबाबत सविस्तर माहिती नुसार सुधाकर रामभाऊ मेश्राम वय (३५),रामकृष्ण कानू टेकाम (२२) दोघे ही राहणार बेलमपल्ली हे दोघे शेतात कडब्याचे गंजी मारून बैलाला पाणी पाजायला जुनोनी शिवारातील चाटवण नाल्यावर गेले, असता दोन्ही बैले वाघाच्या वासाने धूम ठोकून पळून गेली. वाघाने बैलांकडले लक्ष या दोघांवर केंद्रित करून सदर वाघाने अचानक दोघांवर हल्ला चढविला, यामध्ये वाघाने सुधाकर याची मान तोंडाने पकडून दूर नेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वाघाने सुधाकरच्या मांड्या,पाय, पाेटर्या,हाता पायाला पकडून ठेवल्याने सुधाकर गंभीर जखमी झाला. रामकृष्ण याने वाघाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि वाघ त्याच्या मागे लागल्याने रामकृष्ण हा झाडावर चढला मात्र, वाघाने रामकृष्ण ला झाडावर चढू न देता त्याच्या पायाला पकडले व त्याला खाली आेढु लागला. त्यामुळे त्याची पायाची बोटे पूर्णपणे कुरतडले गेले, झाडाला पकडूनही वाघाच्या ताकती समोर रामकृष्ण ची ताकद कमी पडली आणि तो झाडावरून खाली पडला. जोराजोराने आवाज केल्याने जवळपास बैलगाडी घेऊन पाणी पाजणारे सहा ते सात शेतकरी मदतीला धावून आले, शेतकरी आरडाओरड केल्याने वाघ तेथून निघून गेला. मात्र तोपर्यंत सुधाकर ची अवस्था आणखी गंभीर झाली. रामकृष्ण ला पायाला मार लागला मात्र तो यामध्ये बालंबाल वाचला.  'दैव तारी त्याला कोण मारी' असा प्रत्यय त्या दोघांनाही आला. वेळ आली मात्र, काळ आला नव्हता त्यामुळे सुदैवाने दोघांचे प्राण वाचले. शिवारातच काम करत असलेला राजू मेश्राम आणि सुनील मेश्राम या दोघांनी त्या दोघांना बैलगाडीत बसवून मांडवीगावा पर्यंत आणले, वनविभागाला सुचित केले, वनविभागाची गाडी येऊन त्या दोघांना प्रथम पांढरकवडा येथे घेऊन गेले मात्र, पांढरकवडा येथून त्यांना जखम गंभीर असल्याने सरकारी रुग्णालय यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे. यापूर्वीसुद्धा वाघांनी दोघांवर हल्ला केला होता ते मांडवी येथीलच होते मांडवी परिसरात पाच वाघाचे वास्तव्य असून सुमारे एक ते दीड वर्षापासून पाच वाघ परिसरातील नागरिकांना दिसून येतात सद्यस्थितीत मशागतीची कामे सुरू असून शेतकरी शेतात वखरणी चे कामे करीत आहे.

आदर्श शिक्षक व नाभिक समाजाचा जेष्ठ कार्यकर्ता हिरावला

 

सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (ता.३१) : अख्ख आयुष्य समाजाला मार्गदर्शन करण्यात घालवलं. एक आदर्श शिक्षण म्हणून ते परिसरात ओडखले जात. निवृत्त होवून जेमतेम एक वर्ष होताच काळाने घात घातला आणि हृदय विकाराचा झटक्याने त्यांची ज्योत मात्र आज मावळली. त्यांचा जाण्याने नाभिक समाजात उणीव निर्माण झाली.

शेंडे सर हे एक आदर्श शिक्षक होते, हयात त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. कोरपना तालुकासह जिवती पहाडावरील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. आपण गरीबितून समोर आलो आपला समाज सुध्दा पुढे यावा या हेतूने नाभिक समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले.

 सामाजिक जीवनात सक्रिय असतांना त्यांचा अचानक जाण्याने नाभिक समाजाचा मार्गदर्शक हिरावला. जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली समस्त प्राथमिक शिक्षक समिती तफेँ वाहण्यात आली.

खा. छत्रपती संभाजीराजे यांनी नव्या पक्षाचा विचार न करता रिपाई डेमोक्रॅटिक सोबत मिळून नेतृत्व करावे - डॉ. राजन माकणीकर


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.३१) : छत्रपती शिवराय व राजर्षी शाहू महाराजांचा वारसा लाभलेले खा. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणा बाबत नवीन पक्ष स्थापनेचा विचार न करता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षा सोबत मिळून नेतृत्व करावे अशी इच्छा पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील खुल्या पत्रावरून पँथर चळवळीतील दिग्गजांनी म्हणजेच माजी आमदार दिवंगत टी.एम. कांबळे व भाई संगारे यांच्या पुढाकारातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाची स्थापना होऊन एक नवा झंझावात निर्माण केला होता. 

पक्षाचे पितृतुल्य नेतृत्व काळाआड गेल्यामुळे पक्ष काही अंशी विस्कळीत झाला असल्याचे इतरांना वाटत होते मात्र,पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी आपल्या युवा खांद्यावर जवाबदारी घेऊन पक्ष सावरला आहे. आज राज्यात पक्षाची ताकत वाढू लागली आहे.

खा. संभाजीराजे यांनी पक्षा सोबत येऊन नेतृत्व स्वीकारल्यास देशातील तमाम बहुजन एकत्र येऊन सत्ताकारणात आमुलाग्र बदल घडवतील व शिवराय फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.

मराठा आरक्षणाचा प्रश्न वरचेवर लांबणीवर जाणीवपूर्वक टाकला जात असून सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षण मिळू द्यायचे नाही आहे, असे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावरचा संघर्ष अटळ आहे. खा. संभाजी राजेंनी रिपाई डेमोक्रॅटिक पक्षा सोबत यावे आणि राजकारणात बदल घडवावा अशी इच्छा डॉ. माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे व्यक्त केली.

कर्तृत्वान कार्यकर्ता झाला सेवानिवृत्त

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वरोरा, (ता.३१) : समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अफाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे ‘आनंदवन’! याच आनंदवनातील श्री. रमेश रामाजी क्षीरसागर हे आनंदवन संस्थेत मूकबधिर शाळेत कनिष्ठ लिपिक म्हणून ३५ वर्षे कार्यरत होते. त्यांनी आनंदवन संस्थेत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उत्तम काम केले. या प्रवासामध्ये त्यांना स्व. बाबा आमटे यांच्या सहवासात २५ वर्षे काम करता आले. ते आज दिनांक ३१ मे २०२१ ला सेवानिवृत्त झाले. मात्र,खरे आयुष्य सेवा निवृत्ती नंतरच सुरू होते. 
श्री. क्षीरसागर यांचे सामाजिक कार्यासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते. 
निवृत्ती काळात त्यांच्या आयुष्यात आनंद आणि सुख समृद्धी कायम राहो.
तुम्हाला अखंड सेवेनंतर मिळालेल्या आजच्या या
सेवानिवृत्तीच्या दिनी महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) सामाज महासंघ सर्वभाषिक चंद्रपूर जिल्हा च्या वतीने हार्दिक शुभेच्छा..

शेतकरी संघटनेचा उत्कृष्ट कार्यकर्ता गमावला


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे 
कोरपना, (ता.३१) : शेतकरी संघटनेचा चंद्रपूर जिल्ह्यातील आणी मराठवाड्यातील मुलुख मैदानी तोफ म्हणून लोकप्रिय असलेले प्रभाकराव दिवे. संपूर्ण विदर्भात विदर्भवादी नेता स्वतंत्र भारत पक्ष स्वतः शेतकरी संघटनेचा कट्टर समर्थक माजी आमदार ॲड. वामनराव चटप. त्यांचा उजवा हात असून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा दोनदा मानद सचिव, दोनदा सदस्य राजुरा निर्वाचन क्षेत्रातून विधानसभे करिता ॲड. वामनराव चटप यांच्या च्या समर्थनार्थ स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटना समर्थित उमेदवार म्हणून उभा असलेला तत्कालीन स्वतंत्र भारत पक्ष तथा शेतकरी संघटनेचा जिल्हाप्रमुख प्रभाकर राव दिवे मागील १८ दिवस दिनांक १४ मे रोजी त्यांच्या कारचा अपघातात झाला होता. दिवे स्वत :चलवत होते. सदर १८ दिवस सुरू असलेली झुंज अखेर आज संपली. 

सविस्तर असे की,  आवारपूर येथून राजुरा येथे जात असताना अंबुजा सिमेंट कारखान्याजवळ त्यांच्या वाहनाची ट्रकला धडक बसल्याने त्यांच्या पायाला व मानेला गंभीर दुखापत झाली. पुढील उपचारार्थ त्यांना चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले प्रकृती बघता चंद्रपूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नागपूर येथे उपचारार्थ पाठविले यातच च्या मागच्या बाजूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे शेवटी आज त्यांची झुंजीत गतप्राण झाले. त्यामुळे राजुरा निर्वाचन क्षेत्र व संपूर्ण परिसरात दुखाचे सावट पसरले असून त्यांचे वरती आवारपूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी मुख्याध्यापिका शिवाजी विद्यालय अंतरगाव मुलगा सून भावंड असा मोठा आप्तपरिवार आहे.
प्रभाकर दिवे त्यांच्या जाण्याने शेतकरी संघटनेचा परिवार दुःखाने व्याकूळ झाला असून दिव्यांची निधनाने ही झालेली पोकळी नेहमी आठवणीत
राहील. त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे   भावपूर्ण आदरांजली..
.

तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.३१) : तालुक्यात कोरोनाचे संक्रमण अगदीच नियंत्रणात आले असून रुग्ण संख्याही पुरती आटोक्यात आली आहे. नविन रुग्ण आढळण्याचं प्रमाण अतिशय कमी झालं असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तालुका कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असून प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळं कोरोनाची साखळी तुटण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाची लाट आता ओसरू लागली असून नागरिकांना संसर्ग होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. मागील काही दिवसांत अत्यंत कमी रुग्ण आढळले असून आज एकही कोरोना बाधित रुग्ण न आढळल्याने तालुकावासीयांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. तर कोरोना पूर्णतः नियंत्रणात आल्याने प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला आहे. कोरोना नियंत्रणाकरिता प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमाचे फलित झाले आहे. आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसून ३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ९५ वर आले आहेत. आज आणखी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ९२ झाला आहे. 
प्रशासनाच्या योग्य उपाययोजनांमुळे कोरोनाची परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आली असून कोरोना तालुक्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. आज तपासणी अहवाल प्राप्त झाले नसून ८० व्यक्तींच्या आज रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये एकही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. १९६ तपासणी नमुन्यांचे अहवाल अजून प्राप्त होणे बाकी आहे. ९५ ऍक्टिव्ह पोझटीव्ह रुग्णांपैकी १७ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ६१ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहे. तर १७ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहे.


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोविडविषयी जनजागृती करावी – पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नागपूर, (ता.३१) : कोरोनाची तिसरी लाट लहान मुले व बालकांसाठी घातक ठरू शकते असे संकेत वैद्यकीय तज्ज्ञांकडून मिळत आहे. त्यात म्युकरमायकोसिसचा वाढता प्रकोप पाहता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी आज दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सदस्य अवंतिका लेकुरवाळे, समीर उमप, दुधाराम सव्वालाखे, कैलास राऊत, अप्पर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.

 

वैयक्तिक स्वच्छता व कोविड अनुषंगिक जीवनशैली वर्तनासाठी शिक्षक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. माहिती-प्रबोधनाद्वारे ते नागरिकांना प्रोत्साहन देऊ शकतात. सध्या शाळा बंद असल्याने शिक्षकांना जागृतीचे काम देण्यात यावे. कोविड संबधीत कार्यात सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षकांव्यतिरिक्त उपलब्ध शिक्षकांना हे काम द्यावे. ज्या गावात शिक्षक शिकवतात त्याच गावात त्यांना प्रबोधनाचे काम देण्याची सूचना श्री. केदार यांनी यावेळी केली.

गेल्या बैठकीतील मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच पदाधिकाऱ्यांनी काही सूचना केल्या. त्यामध्ये तालुकानिहाय पेडिअट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याबाबतचा प्रगतीपर आढावा घेण्यात आला.

 

गेल्या बैठकीतील चर्चेप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन निधीतून या पेडिॲट्रिक कोविड केअर सेंटरचे काम करण्याचे प्रस्तावित होते. मात्र त्या निधी मिळण्यात काही अडचण येत असल्यास राष्ट्रीय आरोग्य मोहिमेतून करता येईल का ही बाब तपासून घेण्याचे त्यांनी सुचविले.

 

कोविड-19 अंतर्गत पदभरती जाहिरातीच्या कामाची त्यांनी विचारणा केली. वैद्यकीय तज्ज्ञ व अन्य पदांची जाहिरात दिली असून अद्याप अर्ज प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी सेलोकार यांनी सांगितले.

सध्या तालुकानिहाय दोन अधिकाऱ्यांमार्फत गावोगाव कोविड व म्युकरमायकोसिसबाबत जाणीव जागृती सुरू आहे. तसेच यु-ट्यूब लाईव्हद्वारे अंगणवाडी सेविका, आशांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभेजकर यांनी सांगितले. कोविड रुग्णसंख्येचा आलेख कमी होत असल्याचे आकड्यांवरून दिसत असले तरी सुरक्षा उपाय कटाक्षाने पाळावे लागतील असे ही ते म्हणाले.

 

प्रस्तावित पेडिॲट्रीक कोविड केअर सेंटर

भिवापूर तालुक्यात प्रा. आ. केंद्र सोमनाळा, हिंगणा तालुक्यात प्रा. आ. केंद्र टाकळघाट, रामटेक तालुक्यात प्रा. आ. केंद्र मनसर, नागपूर तालुक्यात प्रा. आ. केंद्र सालई गोधणी, काटोल तालुक्यात प्रा. आ. केंद्र येनवा, कळमेश्वर तालुक्यात प्रा. आ. केंद्र धापेवाडा, सावनेर तालुक्यात पाटणसावंगी, कुही तालुक्यात प्रा. आ. केंद्र तितूर, नरखेड तालुक्यात प्रा. आ. केंद्र भिष्णूर, कामठी तालुक्यात प्रा. आ. केंद्र भूगाव, मौदा तालुक्यात प्रा. आ. केंद्र धानला, पारशिवणी तालुक्यात प्रा. आ. केंद्र साटक, उमरेड तालुक्यात प्रा. आ. केंद्र पाचगाव

 

कोविड आढावा बैठकीनंतर महाराष्ट्र्र पशुविज्ञान विद्यापीठ (माफसू) मध्ये फुटाळा तलावातील पाणी पुर्ववत करण्याबाबत त्यांनी माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, महानगरपालीकेच्या अभियंता श्वेता बॅनर्जी व मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मनसेच्या माध्यमातून मिळाला शेतकऱ्यांना हक्काचा पांदण रस्ता

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
वणी, (ता.३१) : वणी तालुक्यातील लाठी येथील अनेक शेतकऱ्यांच्या वहीवाटीचा असलेला पांदण रस्त्याची दुरवस्था झाल्याने, हा पांदण रस्ता पावसाळ्याच्या आगोदर दुरुस्त करून द्यावा. या मागणीला घेऊन सदर संबंधित शेतकऱ्यांनी वेकोलि प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. मात्र, ह्या शेतकऱ्यांच्या मागणीला वेकोलि प्रशासनाने वारंवार धुडकावून लावले.

त्याअखेरीस ह्या शेतकऱ्याने राजूभाऊ उंबरकर यांच्याकडे संपर्क साधताच आज प्रश्नावर तोडगा काढत वेकोलि च्या संबंधित अधिकाऱ्यांशी राजूभाऊंनी संपर्क साधुन ह्या रस्त्याचे संपूर्ण काम करून घेतले.
पांदण रस्त्याच्या काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचे हसू उमटून आले.


आज सोमवारी चंद्रपूरात पाणीपुरवठा बंद

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
चंद्रपूर, (ता. ३०) : महानगर पालिकेच्या हद्दीत पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इरई धरणावरुन येणारी पाईपलाईन सिटीपीएसच्या कामामुळे क्षतिग्रस्त झाल्यामुळे सोमवारी (३१) चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद राहील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

सिटीपीएसच्या कामामुळे पाईपलाईन क्षतिग्रस्त झाल्याने रविवारी (ता. ३०) इरई धरणावरुन पाणीपुरवठा शहराच्या काही भागात होऊ शकला नाही. दुरुस्तीचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे.

त्यामुळे सोमवारी (ता. ३१) चंद्रपूर शहरात पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

शिवसैनिकांनी खैरगाव येथे हॅन्ड सॅनिटायजर केले वितरण

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (ता. ३०) : 'शिवसेना म्हणजे २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण' जनहितासाठी सतत लढणारी आणि पाठीशी उभी राहणारी एकमेव संघटना. सेवा, सुरक्षा, विकास या धोरणावर चालणाऱ्या शिवसेना पक्षातील जिल्हा प्रमुख तथा मा. माजी आमदार श्री. विश्वास भाऊ नांदेकर यांचे मार्गदर्शनाखाली मारेगाव तालुका प्रमुख तथा उपसभापती संजय आवारी यांच्यासह शिवसैनिकांनी खैरगांव (बुट्टी) येथील  नागरिकांना हॅन्ड सॅनिटायजर वाटप करण्यात आले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना संसर्ग विचारात घेवून जिल्हा प्रमुखांच्या सूचनेवरून तालुका प्रमुख तथा उपसभापती संजय आवारी यांनी उपाय योजना म्हणून ही लाट थोपवण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविला. ही कोविड दुसरी लाट करतोय आपण मात्र,संभाव्य तिसरी लाट एकजुटीने सामना करू असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

युवक व विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्चा

सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे 
बीड, (ता.३०) : मराठा समाजाला गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर मिळालेले आरक्षण राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रद्द झाल्याने मराठा समाजातील गोरगरीब, मोलमजुरी, करणाऱ्या मराठा समाज बांधवांचे तसेच विद्यार्थी व युवकांचे शैक्षणिक व आर्थिक (नोकरी) नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यातूनच मराठा समाजामध्ये सरकारच्या विरोधात एक असंतोषाची लाट पसरलेली आहे. 
मराठा समाज आरक्षणप्रश्नी अनेक वर्षांपासून सरकार दरबारी व कायदेशीर लढाई लढणारे, गोरगरीब, वाडी-वस्तीवरील समाजाला मुख्य प्रवाहात त्यांच्या विविध अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणारे आ. विनायकरावजी मेटे साहेब यांनी राज्यसरकारला वेळोवेळी जागे करण्याच्या प्रयत्न केला. परंत्तू सरकारच्या आडमुठे धोरणाचा व दिरंगाईचा फटका सर्वसामान्य कष्टकरी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या विरोधाभासी भूमिकेमुळे रद्द झालेले आरक्षण पुन्हा देण्यात यावे व अन्य काही मागण्यांसाठी मा.आ. विनायकारावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त मराठा समाजाच्या नेतृत्वाखाली दिनांक ५ जून रोजी बीड मध्ये होणाऱ्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसंग्राम युवक आघाडी शहराध्यक्ष प्रशांत डोरले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
मागील सरकारच्या काळात निघालेल्या ५८ क्रांती मूक मोर्चा व ४२ युवकांच्या बलिदानातून मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्यात आले होते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या वतीने या आरक्षणाची नीट मांडणी न होऊ शकल्याने २६ मार्च रोजी सर्वोच्य न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. या आरक्षणातून मिळणारे सर्वच लाभातून होतकरू, प्रामाणिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थी व युवकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. ओबीसी व मुस्लिम समाज हा मराठा समाजाला आपला मोठा भाऊ मानत असून मोठ्या भावांचे हेच शैक्षणिक नुकसान येत्या महाविद्यालयीन प्रवेशाच्या काळात होऊ नये, यासाठी बीड जिल्ह्यातून आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व समाज बांधवांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चात ओबीसी समाजातील युवक ही सहभागी होणार असल्याचे यावेळी प्रशांत डोरले यांनी कळवले आहे. यावेळी सुमित झाडीवाले, सलमान अली, अर्जुन यादव, प्रेम धायजे, ज्ञानेश्वर सालपे सह अन्य युवक उपस्थित होते.

रेड झोन वगळता राज्यातील जिल्हाबंदी उठणार?, मुख्यमंत्री आज रात्री साधणार जनतेशी संवाद


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

मुंबई, (ता. ३०) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री साडेआठ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादात मुख्यमंत्री राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करू शकतात. रेड झोनमध्ये असलेले राज्यातील १८ जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रातील जिल्हाबंदी उठवण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील लॉकडाऊन सरसकट उठवायचा नाही, बाबत एकमत झाले होते. राज्यातील कोरोना रुग्णांची सरासरी संख्या कमी होत असली तरी १८ जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत घट झाली आहे, त्या जिल्ह्यांत लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाण्याचे संकेत मंत्रिमंडळ बैठकीनंतर देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत.

राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, त्या जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी आहे. दुसऱ्या टप्प्यांत दैनंदिन गरजांशी संबंधित असलेली दुकाने उघडण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

राज्यात रेडझोनमध्ये असलेले १८ जिल्हे वगळता उर्वरित राज्यांतील जिल्हाबंदी उठवली जाऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे.

वणी रेल्वे साईडींग वरून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांचं जीवनचं काळवंडलं !

                       (संग्रहीत फोटो) 

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.३०) : वणी रेल्वे कोळसा साईडिंग परिसरातील नागरिकांकरिता काळा श्राप ठरली आहे. सायडिंग वरून उडणाऱ्या कोळशाच्या धूळामुळे नागरिकांचं आरोग्य तर धोक्यात आलच आहे, पण वेळोवेळी घराची साफसफाई व स्वच्छता करतांना महिलांच्या नाकी नव आले आहेत.

घरातील गॅलरी, खिडकी व फर्श वर सारखी काळी धूळ जमा होत असल्याने महिलांना नेहमी एका हातात झाडू व एका हातात पाण्याची बादली घेऊन घर स्वच्छता अभियान राबवावं लागत आहे. रेल्वे कोळसा साईडींग वरून उडणाऱ्या काळ्या धूळामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांचं जीवनचं काळवंडलं आहे. या कोळशाच्या धूळीमुळेही नागरिकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. फुफ्फुसांचे विकार झाले आहेत. या काळ्या धुळामुळे नागरिकांचं वयोमान कमी होऊ लागलं आहे. नागरिकांच्या घरातील वस्तूंना हात लावले तरी हात काळे होतात, एवढी धूळ उडत आहे. सकाळी उठल्यानंतर वॉश बेसिंग बघितले तर त्यावर पूर्ण काळा धूळ साचलेला असतो. नागरिकांनी सकाळी खेकारले तरी काळे ठसे बाहेर पडतात. तळपाय तर कितीही धुतले तरी काळे कुट्टच दिसतात. तळपाय नेहमी काळे होत असल्याने कित्येकांना वाईजर झाले आहेत. कोळसा साइडिंगवर सतत ट्रकांची ये-जा सुरु असते. तर दिवसातून किमान दोन वेळा तरी रॅक लोड होत असते. त्यामुळे दिवसभर धूळ उडत असतो.

कोळसा साइडिंगवर योग्यरीत्या पाण्याचा मारा न करणे ही पूर्वीचीच परंपरा राहिली आहे. साइडिंगवर पाणी मारण्याचं कंत्राट मिळालेला कोणताही कंत्राटदार योग्यरीत्या पाणी मारतांना दिसत नाही. पाण्याच्या खेप मारण्यातही घोळ केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पाण्याच्या खेप कमी व नोंद जास्त करण्यात येत असल्याची चर्चा साइडिंगवर ऐकायला मिळत आहे. पाण्याच्या खेपांची नोंद ठेवणाऱ्याला हाताशी धरून वाढीव खेपांच बिल बनवायचं, या कारनाम्यांमुळे कोळसा साइडिंग कधीच ओलीगच्च राहतांना दिसली नाही. त्यामुळे धुळीची समस्या आजही जैसे थे च आहे. प्रवासी रेल्वे सुरु झाल्यानंतर कोळशाची साइडिंग रहिवासी ठिकाणांपासून दूर नेली जाईल, अशी चर्चा खूप दिवस चालली. पण आजही आसपासच्या परिसरातील नागरिकांना उडणाऱ्या धुळीचा त्रास सहन करावाच लागत आहे. 
जवळपास ३० वर्षांपासून रेल्वे कॉलनीतील रहिवासी या कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त आहेत. रात्री बे रात्री होणारी कोळशाची लोडींग व ट्रकच्या आवाजांमुळे रहिवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
धुळीमुळे घर, आंगण, शरीर तर काळ होतच आहे, पण ट्रक व लोडरच्या आवाजामुळे झोपमोड होऊन रात्रही काळी होत आहे. रेल्वे साइडिंगच्या काही अंतरावरच गौरकार ले-आऊट व विठ्ठलवाडी परिसर आहे. या परिसरातील जनता कोळसा साइडिंग वरून उडणाऱ्या धुळामुळे कमालीची वैतागली आहे. रेल्वे कॉलनीतील नागरिक तर नाईलाजास्तव हा त्रास सहन करतच आहे. पण आता पॉश वस्त्यांनाही हा त्रास जाणवू लागला आहे. कित्येक जण या काळ्या धूळामुळे नेहमीच आजारी पडत आहे. गौरकार ले-आऊट व विठ्ठलवाडी परिसरातील घर, रस्ते, झाडी, वेली सर्वच कसं काळभोर दिसून येत आहे. हवा काळी, पाणी काळ, कपड्यांवरही काळा धूळ जमा होतो. काळ्या वातावरणात या परिसरातील नागरिकांना आणखी किती दिवस वावरावं लागेल, कोण जाणे.

पाण्याचं नुसतं कंत्राट बदलते, धूळ मात्र पूर्वी उडायचा तसा आजही उडतो. ना कोळशाच्या ढिगाऱ्यांवर पाण्याचा मारा करण्यात येतो, ना ट्रक जाणाऱ्या रस्त्यांवर बरोबर पाणी मारलं जातं. याकडे न वेकोली प्रशासनाचं लक्ष आहे, न स्थानिक प्रशासनाचं. नागरिक सहन करत आहे ना त्रास, सवयच झाली आहे त्यांना आता काळ्या धुळीत राहण्याची, हे वेकोली प्रशासनानं हेरून घेतलं आहे. या काळ्या धुळीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे, याची कुणालाही पर्वा राहिलेली नाही. पण आता नागरिकांची सहन शक्ती अगदीच टोकावर आली आहे. सतत उडणाऱ्या काळ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकही आता चिडले आहेत. वेकोली प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे त्यांचा संताप वाढू लागला असून साइडिंगवर धरणे आंदोलन करण्याकरिता ते एकवटू लागल्याचे परिसरात ऐकायला मिळत आहे.

तालुक्यात आज आढळले केवळ ९ कोरोना बाधित रुग्ण; शहरात ४ तर ग्रामीण भागात आढळले ५ रुग्ण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.३०) : तालुक्यातील कोरोना संक्रमणाचा वेग अत्यंत कमी झाला असून नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. तालुक्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एक वेळ कोरोना संक्रमणाचा हॉसस्पॉट ठरलेला वणी तालुका आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागला आहे. गंभीर वळणावर असलेली कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता प्रशासनाने अथक परिश्रम घेतले. योग्य नियोजन व प्रभावी उपाययोजना करण्याबरोबरच प्रशासनाने कोरोना निवारणाची धुराचं आपल्या हातात घेतली. आरोग्य यंत्रणेनेही खांदा लावून उत्तम सहकार्य केलं. कोरोनाच्या या लढ्यात यशस्वीतेकडे वाटचाल करतांना पोलीस प्रशासनाचंही योगदान महत्वपूर्ण राहिलं आहे. विनाकारण शहरात गर्दी करणाऱ्यांवर आवर घालण्यात पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच वेळेनंतर बाजारात कुणी फिरणार नाही, याचीही पोलिसांनी दक्षता घेतली. परिणामी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर रोख लागला. रुग्णसंख्याही आटोक्यात आली. आज तालुक्यात केवळ ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरात ४ तर ग्रामीण भागात ५ रुग्ण आढळले. तर २० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या कमी होऊन १२९ वर आली आहे. कोरोनाने आज आणखी ३ रुग्णांचा श्वास रोखला आहे. आज तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ९० वर पोहचला आहे. 
आज प्राप्त झालेल्या २६८ तपासणी नमुन्यांच्या अहवालामध्ये केवळ ९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज करण्यात आलेल्या ४८ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आलेला नाही. १३० तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे. १२९ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २९ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ७९ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहे. तर २१ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहे. 
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये परसोडा येथील ४, गुरुनगर २ तर उमरी, रवीनगर, जैन ले-आऊट येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

हब टाऊन / आकृती चे हरी नगर शिवाजी नगर झोपूयो जोगेश्वरी इथेही भ्रष्टाचाराचे थैमान


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई दि (३०) : आकृती निर्माण, आकृती सिटी म्हणजेच हब टाऊन विमल शहा व त्याचा मास्टर माईड महादलाल मुरजी कांजी पटेल यांनी भ्रष्टाचाराची मालिका राबवली असून लवकरच तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.

इमारत क्रमांक ४,५,६ अ, ६ब व ९ या इमारतीमध्ये विकासक व त्याचा महादलाल मुर्जी कांजी पटेल यांनी अंदाजे १२२ सदनिका पात्र मूळ झोपडी धारकांना न देता प्रकल्पात नसलेल्या लोकांना ताबा देऊन महा भयंकर कांड केले आहे.

सत्ता आणि संपत्तीच्या जीवावर विकासक विमल शहा आणि त्याचा महादलाल मुरजी पटेल शासनाच्या प्रकल्पातील गरिबांची घरे अशीच बळकावून शेकडोंना बेघर केले असून अश्या परप्रांतीयांना पळता भुई कमी पडेल असा पोलिसांचा ससेमिरा लावून यांना नागडे केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असा संकल्प डॉ. माकणीकर यांनी मनी बाळगला असल्याचे सांगितले.

अश्या शेकडो बेघर झालेल्या व महादलाल मुरजी ने विकासकांच्या माध्यमातून कमिटमेंट पूर्ण न केलेल्या वंचितांना एकत्र करून ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रकल्पात चोरी केली जात आहे, अश्यांना नागडे करणार असल्याचे डॉ माकणीकर म्हणाले.


आमदारकीचे लागलेले डोहाळे महादलाल मुरजी लवकरच जेलमध्ये पूर्ण करणार असून महाठग विमल शहाला सुद्धा काही दिवसातच जेलची हवा खावयास भाग पाडणार असल्याचे डॉ. माकणीकर म्हणाले.

पक्ष धर्म जात विरहित महादलाल मुरजी व विमल पासून त्रासलेले पीडित वंचित एकत्र येऊन मोर्चा उपोषण आंदोलन उभारणार असल्याचे मत डॉ. माकणीकर यांनी व्यक्त केले आहे.

महादलाल मुरजी व महाचोर विमल च्या विरोधात असलेल्या तक्रारी पुरावे रिपब्लिकन भवन येथे कॅप्टन श्रावण गायकवाड यांच्या कडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.

जीव गेला तरी बेहत्तर, मात्र: त्रस्त नागरिकांना त्यांच्या सदनिका व भाडे धनादेश मिळवून देणारच अशी ग्वाही देऊन आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासठी महादलाला कडून अफवेचे पेव उमटतील त्यामुळे अफवा व आमिषाला कोणीही बळी नये असा सल्लाही डॉ. माकणीकर यांनी दिला आहे.

अंगणवाडी चा पोषण ट्रॅकर अॅप तात्काळ मराठीत उपलब्ध करा-मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
यवतमाळ, (ता.२८) : गेल्या एप्रिल महिन्यापासुन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱ्‍यांसाठी महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण आहारासाठी पोषण ट्रॅकर अॅप मोबाईल वर उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत सदर अॅप डाऊनलोड करुन अंगणवाडी विषयक माहिती शासनाला पाठविण्याचे आदेश काढलेले आहे. परंतु सदर अॅप हे इंग्रजी भाषेत असुन बहुतांश अंगणवाडी सेविका पाहिजे त्या प्रमाणात इंग्रजी भाषेशी परीचीत नसल्यामुळे सदर अॅपमध्ये माहिती पुर्णपणे भरु शकत नाही. त्या अनुषंगाने या अॅपमध्ये महाराष्ट्र राजभाषा आणि त्या अंतर्गत राजभाषा सुधारणा अधिनीयम २००५ नुसार मराठी मध्ये उपलब्ध करुन द्यावा जेणेकरुन शासनाला अंगणवाडी स्तरावरची माहिती पुरविण्यासाठी कमचाऱ्‍यांना सोईचे होईल. अशा स्वरूपाचे मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
 शासनाने पुरविलेल्या बहुतांश मोबाईलवर पोषण ट्रॅकर अॅप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना व्यक्तीगत मोबाईल मध्ये पोषण ट्रॅकर अॅप डाऊनलोड करावा लागत आहे. ज्याद्वारे भरण्यात आलेली माहिती ही शासनाच्या डॅशबोर्डवर जात नाही. सोबतच अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेल्या पोषण ट्रॅकर अॅपमध्ये इंग्रजी भाषेत माहिती भरता येत नसल्यामुळे त्रयस्थ व्यक्तीकडून माहिती भरुन घ्यावी तसेच आपण या संदर्भात कुठल्याही कामात कुचराई केल्यास आपल्याला सेवेतुन बडतर्थ करण्यात येईल. अशा स्वरुपाचा दबाव वजा धमकी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांकडून अंगणवाडी सेविकांना देण्यात येत आहे. याचाच परिणाम म्हणुन यवतमाळ जिल्ह्यात दोन अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या दबावापोटी आत्महत्या केली असल्याचा आरोप या प्रसंगी मनसेचे अनिल हमदापुरे यांनी केला. ह्या गंभीर विषयाची मा. राजसाहेब ठाकरे यांना माहिती देण्यात आली असून लवकरच यावर मा.मुख्यमंत्री यांच्याशी ते या विषयावर बोलणार आहेत. या प्रसंगी अंगणवाडी सेविकेंच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्या.त्रयस्थ व्यक्तीने इंग्रजीत भरलेली माहिती त्या अंगणवाडी सेविकाला वाचता येत नाही. या दरम्यान एखादी चुक झाल्यास जबाबदार अंगणवाडी सेविकाला धरण्यात येते. ग्रामिण भागात मोबाईलला नेटवर्क न मिळणे, मोबाईल चांगल्या प्रतिचा नसने यासह इतर समस्यांना अंगणवाडी सेविकांना तोंड द्याव लागत आहे. एकीकडे आपल्या कुटूंबाचा उदर निर्वाहाचा प्रश्न तर दुसरीकडे आपल्या रोजगारीचा प्रश्न अशा दुविधा मनस्थितीत महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका काम करीत आहे. याउपर शासनाचे वरीष्ठ अधिकारी जिल्हा पातळीच्या अधिकाऱ्‍यांवर दबाव तंत्र वापरतात आणि हे अधिकारी या सर्व सामान्य अंगणवाडी सेविकांवर वरीष्ठांचा दबाव असल्याचा धाक दाखवत त्या मोबाईलद्वारेच काम करण्यास भाग पाडतात. एबाविसे योजनेच्या अधिकाऱ्‍यांचे हे कृत्य बेकायदेशीर, नियमबाह्य व दांडगाईचे असुन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा नियमा अंतर्गत त्यांच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तसेच केंद्र शासनाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने इतर भाषेत प्राप्त होणाऱ्‍या माहिती बाबतचे दस्ताऐवज संबंधीत विभागाने मराठीतुन अनुवादीत करणे अपेक्षीत आहे. मराठी राजभाषेचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाच्या ११/७/१९८६ च्या शासकिय निर्णयान्वये लेखी ताकिद देणे, गोपनिय अहवाल नोंद करणे, ठपका ठेवणे व एका वर्षा करीता पुढील वेतनवाढ रोखणे इत्यादी कार्यवाही करण्याच्या सुचना असुन सुध्दा महाराष्ट्रामध्ये मराठी अॅपचा आग्रह धरणाऱ्‍या अंगणवाडी सेविकांवरच कार्यवाहीचा बडगा वरीष्ठ अधिकारी उगारतांना दिसत आहे.

                      (संग्रहीत फोटो)

मनसेने या प्रसंगी एबाविसे योजने अंतर्गत पोषण ट्रॅकर अॅप मराठी राजभाषेतुन उपलब्ध करुन द्यावे तसेच सुधारीत माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने संबंधीत पोर्टल तात्काळ मराठी भाषेत करावे. आणि शासनाने एबाविसे योजनेच्या ज्या अधिकाऱ्‍यांनी अंगणवाडी सेविकांवर दबाव टाकुन त्यांना मानसिक त्रास दिला त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करुन फौजदारी गुन्हे दाखल करावे. आणि या दबावापोटी आत्महत्या करणाऱ्‍या अंगणवाडी सेविकांच्या मृत्युस जबाबदार अधिकाऱ्‍यांवर सदोष मनुष्य वधाचे तात्काळ गुन्हे दाखल करावे. अशा स्वरुपाचा निवेदन वजा इशारा या महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने देण्यात येत आला संबंधित निवेदनावर येत्या ८ दिवसात कार्यवाही न झाल्यास मनसे च्या वतीने अंगणवाडी सेविकांच्या न्यायी हक्कासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आक्रमक आंदोलनाची भुमिका मनसेच्या वतीने घेण्यात येईल. अशा इशारा जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी या प्रसंगी दिला.या प्रसंगी प्रामुख्याने सादिक शेख, विकास पवार, सचिन येलगंधेवार, दिपक आडे, अभिजित नानवटकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 

अभिनेत्रीने ‘फ्रंटलाइन वर्कर’चे खोटे ओळखपत्र बनवून घेतली कोरोना प्रतिबंधक लस!

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (ता.२९) : लसीचा तुटवडा असल्यामुळे अनेक पात्र नागरिकांना लसीपासून वंचित रहावे लागत असतानाच तामिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री मीरा चोप्रा हिने नोंदणी न करताच नियम डावलून लसीचा डोस घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या अभिनेत्रीचे कोविड केअर सेंटरमध्ये फ्रंटलाइन वर्कर असल्याचे खोटे ओळखपत्र बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. या अभिनेत्रीचे फ्रंटलाइन वर्करचे ओळखपत्र कोणी बनवले? तिला लस कोणी आणि कशी दिली? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

ठाणे येथील पार्किंग प्लाझा के ठाणे महानगरपालिकेचे कोविड रुग्णालय आहे. या कोविड रुग्णालयात कर्मचारी पुरवठा करण्याचे कंत्राट ओमसाई आरोग्य केअर प्रा.लि. या कंपनीला देण्यात आले आहे. अभिनेत्री मीरा चोप्राला याच ओम साईने ती या रुग्णालयात सुपरवायझर असल्याचे ओळखपत्र दिले. याच ओळखपत्राच्या आधारे अभिनेत्री मीरा चोप्राने पार्किंग प्लाझा येथील लसीकरण केंद्रावर लसीचा पहिला डोस घेतल्याचे उघड झाले आहे.

मीरा चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लसीचा पहिला डोस घेतल्याचा फोटो टाकला आहे. मीरा चोप्राने लसीचा पहिला डोस घेतल्याचे फोटो टाकल्यानंतर तिला ही लस कशी आणि कोणी दिली? यावर चर्चा सुरू झाली आणि मीरा चोप्राचा कारनामा उघडकीस आला. २८ मे रोजी तिला डोस देण्यात आला. विशेष म्हणजे मीरा चोप्राने लस घेतानाच्या फोटोबरोबरच तिने बनवलेले सुपरवायझरचे खोटे ओळखपत्रही पोस्ट केले. वाद वाढू लागल्याचे दिसताच तिने इंस्टाग्राम आणि ट्विटरवरील फोटो डिलिट करून टाकले आहेत.

लस घेण्यापुरतेच ओळखपत्र?: भाजपचे ठाणे- कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे मीरा चोप्राचे फ्रंटलाइन वर्करचे खोटे ओळखपत्र पोहोचले. तिच्या इंस्टाग्रामवरील फोटोचा स्क्रीनशॉट आणि ओळखपत्राचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला. ठाणे महापालिकेने कोविड हॉस्पिटलमध्ये कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट दिलेल्या ओम साई आरोग्य केअर कंपनीने चक्क तामिळ, तेलगू आणि हिंदी चित्रपटातील अभिनेत्री मीरा चोप्राला कामावर ठेवलंय. मीराला सुपरवायझर म्हणून काम करण्याचे कंत्राटदार किती पैसे देतोय? की लस घेण्यापुरते आयकार्ड दिले गेले? असा सवाल डावखरे यांनी केला आहे.

शहरात आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही, ग्रामीण भागात आढळला केवळ एकच रुग्ण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२९) : तालुक्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरु झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला पायबंद लागला असून प्रशासनाने घेतलेले परिश्रम फळाला आले आहेत. प्रशासनाने कोरोनाच्या चिघळलेल्या परिस्थितीकडे जातीने लक्ष घालून संसर्गाच्या वाढत्या वेगाला आवर घातला आहे. प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता वेगवेगळे प्रयोग केले. निरनिराळ्या उपाययोजना केल्या, पण तरीही कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात येत नसल्याचे पाहून प्रशासनाने नियोजनाचा फार्मुलाच बदलला. आधी कोरोना विषयक नियमांची सक्ती करण्यात आली. कडक निर्बंध लावण्यात आले. शहरात नागरिकांची गर्दी उसळणार नाही याची दक्षता घेण्यात आली. नागरिकांच्या शहर भ्रमणावर आवर घालण्यात आला. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या ऑनस्पॉट कोरोना चाचण्या करण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. प्रशासकीय यंत्रणा स्वतः रस्त्यावर उतरली. प्रशासनाने स्वतः मोर्चा सांभाळत कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आता कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण अगदीच कमी झालं असून तालुक्यात आज केवळ १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तर २४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णही कमी होऊन १४३ वर आले आहेत. आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ८७ झाला आहे. 
तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णसंख्येचा चढता आलेख अगदीच धीमा झाला आहे. आज एकही तपासणी अहवाल प्राप्त झाला नसून आज करण्यात आलेल्या ८७ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये १ व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. ३४९ तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे. १४३ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३० रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ८१ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहे. तर ३२ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहे. आज पॉझिटिव्ह आलेला एकमेव रुग्ण हा राजूर येथील आहे. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे कोरोनाची साखळी तुटण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसांत कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्याची प्रशासनाने रूपरेषा आखली आहे.