Page

चायला घरात भला मोठा अजगर, सर्पमित्र आले धावून

सह्याद्री चौफेर | राजू डावे

वणी : तालुक्यातील उकणी येथे एका घरी भला मोठा अजगर असल्याचे निदर्शनास येताच सर्प मित्रांना बोलवून पाच मिनिटात पकडून अजगराला वनविभागाच्या उपस्थितीत सोडण्यात आले.
सर्पमित्र हरीश कापसे यांना रात्री 2 च्या सुमारास उकणी वरुण प्रवीण पचारे यांनी संपर्क साधून घरात मोठा अजगर साप दिसत आहे अशी माहिती दिली. तातडीने उकणी येथील सर्पमित्र सुरज पारशिवे व हरीश कापसे टीम यांनी पचारे यांच्या घरातील अजगराला पाच मिनिटात सुरक्षित पकडले व वनविभागाच्या उपस्थितीत सुरक्षितपणे सोडण्यात आले.
यावेळी सर्पमित्र टीम गणेश चौधरी, धनराज मतिरे, स्वप्नील गोवरदीपे, अभय मोडक, प्रफुल पिंपळशेडे, यांचे पचारे परिवारानी आभार मानत त्यांचे कौतुकही केले. 

कासारबेहळ येथे शिव महापुराण कथा संपन्न

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : तालुक्यातील कासारबेहळ येथे हनुमान मंदिरात शिव महापुराण कथाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण वातावरण शिवमय गजराने दुमदुमून गेले. अशा भक्तिमय वातावरणात हा कथा पारायण कार्यक्रम संपन्न झाला. 

शिव कथा समारोपप्रसंगी हभप उत्तमराव महाराज यांच्या मधुरवाणी तून शिव कथेचा महिमा भक्तांपर्यंत पोहोचवला.
कासारबेहळ येथे महिना भर चाललेल्या शिव महापुराण कथेचा काल शुक्रवार दि. 29 सप्टेंबर ला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता, गावातील महिला पुरुषांच्या उपस्थितीत गावातील मुख्य मार्गाने ग्रंथ दिंडी काढण्यात आली व कथेची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ गावातील सर्व भाविक भक्तांनी घेतला.

या कार्यक्रमाला अविनाश करे, अशोक पाटील, येसाजी पाटे, ज्ञानदेव मोहटे, नामदेव ठाकरे, भगवानराव करे, श्रावण लोंढे, प्रकाश कवाने, गजानन करे, यांच्या सह असंख्य भाविक उपस्थित होते.

माधव नगरातील घरफोडीच्या आरोपीना तात्काळ अटक करण्याची केली स्थानिकांनी मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 14 सप्टेंबरला मारेगाव शहरातील माधव नगरी येथे चोरट्यानी घरे फोडली होती. या प्रकरणाला 15 दिवस लोटून गेले, तरी अजून एकाही चोरट्याला अटक झालेली नाही. त्यामुळे या माधव नगरातील स्थानिकांनी मारेगाव येथील ठाणेदारांची भेट घेत चोरट्याना तत्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली.
       
शहरात दि.14 सप्टेंबरला धाडसी चोऱ्या झाल्या. एकाच रात्री तब्बल 17 घरे फोडत धाडसी चोरी झाली. ही जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि अद्भुत घटना होती. यात एकट्या माधव नगरातील तब्बल 10 घरे होती. यावेळी नागरिकांनी चोरीची रीतसर तक्रार दाखल केली होती. परंतु या घटनेला 15 दिवस लोटून गेली. मात्र अजूनपर्यंत चोरीचा कसलाही मागमूस न लागल्याने माधव नगरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनवर धडक देत पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांची भेट घेत त्यांच्याकडून घटनेच्या प्रगतीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी माधव नगर परिसरातील अनेक नागरिक ठाण्यावर धडकले होते.

निवेदन देताना हेमराज कळंबे, अनिता हेमराज कळंबे, विजय झाडे, नंदिनी झाडे, सुरेश आत्राम, सौ. दुर्गा आत्राम, मंगेश गवळी, सौ. सुचित्रा गवळी, सुंदरलाल आत्राम, सौ.रंजना सुंदरलाल आत्राम, संतोष ठाकरे, सौ. नंदा संतोष ठाकरे, सौ. सुनंदा राजु कोळेकर, राजु कोळेकर, बाबू काकडे, सौ प्रांजली बाळू काकडे,सुनिल भोयर, सौ. रंजना सुनिल भोयर, श्री. राजु तुकाराम डवरे, सौ संगिता राजु डवरे, प्रविण बदकी, चंद्रशेखर बोकडे, सौ उज्वला बोकडे, दिपक उरकुडे, गणेश कनाके, सौ रेखा गणेश कनाके, यासह असंख्य रहिवाशांची उपस्थिती होती. 


या प्रकरणातील चार संशयितांची नावे व नंबर वरिष्ठाना पाठवण्यात आली आहे, स्थानिकांनी फेरीवाल्याकडून सामान, वस्तू खरेदी करू नये, बाजारात जाऊन खरेदी करावे. काही संशय आल्यास पोलिसांना संपर्क साधावा.

-जनार्धन खंडेराव
ठाणेदार पोलीस स्टेशन,मारेगाव

शेतकऱ्यांना यलो मोझॅकच्या नुकसानीची भरपाई द्या - युवा मोर्चाची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात लष्करी अळी व यलो मोझॅक हा विषाणूजन्य रोग खूप झपाट्याने फैललेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हातातील नगदी पिक हातून निसटून जात असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे वतीने आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन सादर करण्यात आले.

मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकांवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव वाढला असून संपूर्ण सोयाबीन पिवळे पडून सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लावलेला खर्च निघेल की नाही अशी चिंता लागली आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरीव मदत देण्यात अशी मागणी भा यु मो जिल्हा सचिव तथा आत्मा समिती चे अध्यक्ष प्रसाद ढवस यांच्या नेतृत्वात आमदार बोदकुरवार यांना करण्यात आले आहे.

सदर निवेदनाची दखल घेऊन दोन ते तीन दिवसात तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही विनंती सह मागणी करण्यात आली, यावेळी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, संचालक, अविनाश लांबट, उपसरपंच प्रशांत भंडारी, पवन ढवस, आशिष खंडाळकर, आदींची उपस्थिती होती.

रांगणा येथे अमृत कलश यात्रा...


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : 'माझी माती माझा देश' अभियान अंतर्गत देशभरात अमृत कलश कार्यक्रम साजरा होत असताना रांगणा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज दि.30 सप्टेंबर 2023 रोजी अमृत कलश यात्रा कार्यक्रम संपन्न झाला.
    
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण गावामध्ये विद्यार्थी युवक व गावकऱ्यांची अमृत कलश घेऊन मिरवणूक काढण्यात आली तसेच धान्य व माती गोळा करण्यात आली. तसेच सार्वजनिक पटांगणावर स्वच्छतेबाबत शपथ घेण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश बोबडे यांनी उपास्थिताना स्वच्छतेबाबत व विविध प्रश्नावर मार्गदर्शन केले.
     
यावेळी गावातील सरपंच मा. प्रकाश बोबडे, उपसरपंच अ‍ॅड.दिलीप परचाके, शाळा समितीचे अध्यक्ष राजेश वांढरे, रामनाथ जरीले, रविकांत वांढरे, विजय दुर्गे, प्रशांत खिरटकार, अमृत खिरटकर, उमेश खापणे सर, दिवाकर वांढरे, गुणवंत वांढरे, राकेश बोधाणे, प्रकाश बोढे, शंकर बदकी, राजू शिवरकर, अरुण परचाके, प्रकाश बदकी, लक्ष्मण वांढरे, सिमा लोडे, मनीषा कुळमेथे, गीतांजली अतकरे मॅडम, अं.से.चंदे मॅडम व विध्यार्थी-विध्यार्थीनी व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते. या प्रसंगी विध्यार्ध्याना खाऊ वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश खापणे सर, यांनी केले. तर आभार प्रदर्शन शरद गोंडे सर,यांनी केले.

आता तर हद्दच झाली...तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि शिपाई भरती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

जिल्हाधिकारी जळगाव, सक्षम प्राधिकारी जळगाव उप विभागीय अधिकारी भूसावळ, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव आदी भागांमध्ये सहा महिन्यांकरीता सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पदांवर पदभरती केली जाणार आहे. याची जाहिरात समाज माध्यमांवर फिरत असून यानुसार आता सहा महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपिक- टंकलेखन, शिपाई या पदावर भरती केली जाणार आहे. तहसीलदारासारखे महत्त्वाचे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी प्रकाशित केली असल्याचे सोशल माध्यमात वायरल होत आहे. त्यानुसार तहसीलदार, कारकून किंवा मंडळ अधिकारी या पदांवर कंत्राटी भरती केली जाणार आहे. यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. तहसीलदार पदासाठी ४० हजार रुपये मानधन तर कारकून पदासाठी २५ हजार रुपये मानधन राहणार आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता आणि विविध नियम दिले आहेत. मात्र, शासनाने बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतल्यावर आधीच तरुणांमध्ये रोष असताना आता तहसीलदार पदच कंत्राटी भरले जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

-अनंता पाचपोहर
मार्डी, ता.मारेगाव जि.यवतमाळ.
संपर्क : 8010704509

सरकारची वाटचाल बदलली, वेळीच ओळखा - मारोती गौरकार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सुधारित संवाद सोशल मिडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. सोशल मिडिया ही एक सकारात्मक भूमिका निभावतं, ज्या द्वारे कोणतीही व्यक्ती,गट,संस्था आणि देश ई. आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या समृद्ध होऊ शकते. अशी बरीच विकास कामे सोशल मिडियाच्या माध्यमातून केली गेली, ज्यांनी लोकशाही समृद्ध करण्याचे काम केले आहे. 
मात्र हल्ली, या सोशल मिडियाचा वापर आगपाखड, टिका टिपणी करणे आणि राजकारण ह्यातच वेळ घातला जात असल्याचे काहींचे मत आहे. "नुसतं राजकारण करू नका सरकारची वाटचाल बदलली, सरकार कोणचेही असो जनतेच्या, व शेतकऱ्याच्या हिताचं असल पाहिजे. नुसते टिका टीपणी करून जमणार नाही, ह्यातच वेळ निघून गेल्यावर पुढे आपण आपल्या पिढीला काय उत्तर द्याल! असे मत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी मारेगाव तहसील कार्यालयाला सोयाबीन वर आलेल्या रोग संदर्भात निवेदन देताना 'सह्याद्री चौफेर' ला संवाद साधताना म्हणाले. पुढे असेही ते सांगतात की, सरकार म्हणजे जनता होय,यास वेळीस लगाम नाही लावला तर देशातल्या गरीब जनतेला जगणं मुश्किल होईल म्हणून टिका टिपणी बाजूला सारून सर्व एक व्हा, असे आवाहन सोशल माध्यमातून गौरकार यांनी केले.

मारोती गौरकार हे शेतकरी शेतमजूरासाठी संघर्षाची वाटचाल करणारे नेतृत्व मारेगाव तालुक्यात एकमेव करताना दिसून येत. कष्ट करणार्‍या जनतेच्या प्रत्येक लढ्यात गौरकार हे अग्रेसर असतात. त्यांच्या संघर्षातूनच अतिवृष्टी, पीकविमा, गरजूना किट वाटपाचा आग्रह या समाज हिताच्या उपाययोजना शासन दरबारी लावून धरतात. रस्त्यावरच्या लढाई लढणारा अत्यंत शांतप्रिय व आग्रही असणारं मारेगाव तालुक्यातील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. 

निवेदनातून सोयाबीन पिकांवर आलेल्या पिवळ्या मोझॅक रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अती पावसामुळे कपाशीचे सुद्धा नुकसान झाले आहे, त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई तत्काळ द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत चा बाजार समितीने ठराव सुद्धा घेतला असून तो तहसीलदार यांना सादर केल्याचे निवेदनात नमूद केले आहे, यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, संचालक, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

निशा कांबळेच्या आजारपणात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : तालुक्यातील सोईट (नविन) येथील निशा कांबळे (१२) ही मुलगी मागील काही दिवसांपासून आजारी आहे. सामाजिक बांधिलकीतून सहकार्य करीत निशा कांबळेच्या आजारपणात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे धावून आले. शिंदे यांनी स्वखर्चातून ऑक्सीजन मशीन उपलब्ध करुन निशाला जगण्याची नवी उमेद दिली.  
सोईट (नविन) येथील कांबळे कुटूंबांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. यामुळे निशाच्या उपचारात असंख्य अडचणी निर्माण होत आहे. तिच्या आजारपणात ऑक्सीजन मशीनची गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. निशाचे पालक तिच्या आजाराने फारच दुःखी झाले. रविंद्र शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी लेकीच्या आजाराची करून कहानी कथन करुन मदतीची अपेक्षा व्यक्त केली. रविंद्र शिंदे यांनी कुठलाही विलंब न करता तत्काळ निशाच्या आजारपणात ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून दिली. तसेच अधीक मदतीचे आश्वासन सुध्दा दिले.निशाच्या आजारपणात निस्वार्थी वृत्तीने मदत केल्याबद्दल निशाच्या पालकांनी रविंद्र शिंदे यांच्या प्रति कृत्यज्ञता व्यक्त केली.

जनसेवेत सदैव तत्पर : गरजूंनी संपर्क साधावा
रोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात आम्ही जनसेवेत सदैव तत्पर आहोत. गरजूंनी आरोग्य विषयक मदतीसाठी संपर्क साधावा. असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधान सभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केले आहे.

विसर्जनाकरिता गेलेल्या होतकरू युवकाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील भिमनगर येथील वास्तव्यास असलेल्या युवकाचा गुरूवारच्या रात्री चंद्रपूर येथे गेलेल्या अनंत चतुर्थी गणपती विसर्जन मिरवणूकीत बॅन्ड वाजवितांना दुर्देवी मृत्यू झाला. या होतकरू तरुणाचा अशा अकाली निधनाने शहरात शोककळा पसरली आहे.


सिध्दार्थ मरकवाडे (30) रा. भीमनगर ता. वणी असे, मृतक युवकाचे नाव आहे. सिध्दार्थ हा एका बॅन्ड पथकात बॅन्ड वाजविण्यासाठी चंद्रपूर येथे गेला होता. बॅन्ड वाजवित असताना अचानक त्याला भोवळ आली व तो निपचित खाली कोसळला असता त्याच्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी मृत घोषित केले.

सिध्दार्थ हा होतकरू युवक होता. तो फोटोग्राफी व्यवसाया सोबतच वणी नगरपरिषदेच्या घंटागाडी वर चालक म्हणून सुध्दा कार्य करीत होता. सिद्धार्थ याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.


'केशवस्मृती' नवीन मुख्यालयाचे लोकार्पण थाटात संपन्न

सह्याद्री चौफेर | राजू डावे

वणी : शहरातील केशव नागरी सहकारी पतसंस्थेची स्वमालकीचे मुख्य कार्यालय "केशवस्मृती" या नवीन मुख्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग अध्यक्ष माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, रा. स्व. संघांचे अखिल भारतीय प्रमुख सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रशेखर खोंड आदी मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक चंद्रशेखर खोंड यांनी केली,सर्व सामान्य घटकापर्यंत पोहचण्याचं त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हणाले, यावेळी शाखा विस्तार करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आपल्या प्रास्ताविकेतून बोलताना सामाजिक हित जोपसणारी संस्था असल्याचे सांगितलं.
प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भाष्य केले, या प्रसंगी बोलताना पतसंस्थाना प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. लोकांचा विश्वास अधिकाधिक वाढत असल्याचेही ते म्हणाले. हंसराज अहिर यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. आपल्या भाषणात त्यांनी संस्थेचे भरभरून कौतुक केले, सुनील देशपांडे हे प्रकल्प पुरुष आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आमदार मदन येरावार यांचा निरोप वाचून दाखवण्यात आला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी संस्थेच्या कार्याचे अथोचित कौतुक केले, शेतकरी, युवक, बेरोजगार, व्यावसायिक यांना संस्थेकडून कशा पद्धतीने आर्थिक मदत मिळते तेही सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रात कार्य करण्याऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बचतीचे महत्व कळावे म्हणून विद्यार्थ्यांना गुल्लफ वाटप करण्यात आले. सुनील देशपांडे यांनी भगवान बुद्धांच्या विचार आपल्या भाषणातून मांडले, त्यांच्या अष्टांगिक मार्गांवर सविस्तर असे विवेचन केले.हे अष्टांगिक मार्ग व्यक्तिगत तथा संस्थात्मक क्षेत्रात कसे महत्वाचे आहे त्यावर मोलाचे मार्गदर्शन केले. दीकुंडवार यांनी सर्वांचे आभार मानले, रेणुका अणे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी या लोकार्पण सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते. 



वणी-मारेगाव महामार्गावर भीषण अपघात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : नुकतेच हाती आलेल्या माहितीनुसार आज (गुरुवारी) रात्री वणी-मारेगाव महामार्गावर भीषण स्वरूपाचा विचित्र अपघात झाला. या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस जखमी असल्याची माहिती आहे. मात्र, कॅबिन मध्ये फसलेल्या महिलेला बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून हमसफर ट्रॅव्हलची ट्रकला मागून भिडल्याचे समजते.

वणी -यवतमाळ महामार्गावर आज रात्री 9.15 च्या सुमारास यवतमाळ हून वणीकडे ट्रॅव्हल क्र.एम एच 27 ए 9994 हे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने उभ्या असलेल्या ट्रक ला मागून धडक दिल्याचे समजते, त्यामुळे हा भीषण अपघात झाला. ही घटना राज्य महामार्गांवरील गौराळा फाट्यावर 9.15 ला घडली असून या अपघातातील अपघात ग्रस्ताना बाहेर काढण्याचे काम सुरु असून अपघात स्थळी ऍम्ब्युलन्स, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते यांचे मदत कार्य सुरु आहेत.

सदर ट्रॅव्हल्स यवतमाळहून चंद्रपूर कडे देव दर्शनला जाणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल्स मध्ये अंदाजे सत्तर प्रवाशी असल्याचे कळते. मात्र,या भीषण अपघातातील मृतक संख्या अजूनही कळू शकली नाही. परंतु जखमीमध्ये वीस ते पंचवीस प्रवाशी असून काही सुखरूप तर ट्रॅव्हल्स मध्ये फसलेल्यांना महिलेला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, घटना स्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली. 

आरक्षण बचावासाठी निघणार मारेगावात आक्रोश मोर्चा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : धनगर समाज आदिवासी नसून त्यांना आदिवासीचे सर्व लाभ दिले जातील असा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या निर्णयाच्या विरोधात संतप्त लाट उसळली असून मिंदे सरकारचा निषेध करण्यासाठी राज्यभर आंदोलन, मोर्चा होत आहे. याचेच पडसाद मारेगाव तालुक्यात उमटले असून मारेगावात येत्या मंगळवारी भव्य 'आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष' आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी मारेगावात होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या सर्व आदिवासी बांधवानी लाखों च्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन आदिवासी बचाव कृती समिती च्या वतीने करण्यात आले आहे.

येत्या दि.3 ऑक्टोबर 2023 रोज मंगळवारला स्थानिक नगर पंचायत, कार्यालय मारेगाव येथे सकाळी 10 वाजता तालुक्यातील सर्व पक्षीय आदिवासी पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आदिवासी बचाव कृती समितीच्या वतीने आज करण्यात आले आहे.

अनुसूचित जमातीच्या (ST) आरक्षणाला धक्का लागल्यास सर्व समाज बांधव त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, हक्कासाठी धक्का दिला जाईल. असा सरकारला सूचक ईशारा या आक्रोश मोर्चातून दिला जाणार आहे. 

सर्व आदिवासी बांधवाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात आदिवासी भागात आपापल्या परीने रस्त्यावर उतरून,आक्रोश मोर्चाचे आयोजन करून सरकारचा निषेध करावा. मिंधे सरकारला आदिवासीनी आदिवासिंच्या विरोधात असणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.

- गीत घोष
प्रगतशील विचारवंत तथा अखिल भारतीय संविधानिक हक्क परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष

शासनाला गोरगरिबांचे कर्ज माफ करावेच लागणार-डॉ. माकणीकर

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : कर्जापोटी राज्यातील बहुतांश लोक कर्जबाजारी झाले असून आत्महत्तेचा मार्ग अवलंबवतात या आत्महत्या थांबवायच्या असतील, राज्यातील मानुस जगवायचा असेल तर शासनाला सरसकट कर्ज माफी करावी लागेल असा मनोदय एस.एम फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

कर्जबाजारीपणामुळे राज्यातील बहुतांश संसार मोडकळीस आलेत तर असंख्य संसार संपले आहेत. अश्या अवस्थेत सरकार नको ते उपक्रम राबवत आहे. नको त्या उत्सवाला आर्थिक खतपाणी घालण्यापेक्षा बळीराज्यासह सरसकट महाराष्ट्र राज्य कर्जमुक्त करावं. शासनावर दबाव गट निर्माण करूण महाराष्ट्र कर्जमुक्त अभियान राबवत असून बहुसंख्येने अभियानात सामील व्हावे असे संस्थेच्या सचिव कुमारी संध्याताई शेळके यांनी सांगितले.

कर्ज मिळवल्या नंतर कुणाला परतावा करण्यास विलंब होत असेल. किंवा हप्ते थकले असतील तर कर्ज भरण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. मात्र बँका कर्ज वसुली साठी कर्जदाराचा मानसिक छळ करतात हें आर बी आय च्या मार्गदर्शक नियमावलीच्या विरोधात आहे. खाजगी स्वरूपात नेमलेले वसुली कंपन्याचे प्रतिनिधी गैरवर्तन करतात. यावेळी तात्काल संबंधित बँक व्यवस्थापक व RBI ला लिखित स्वरूपात तक्रार करावी किंवा संस्थेच्या प्रतिनिधीला कळविण्यात यावे असेही कु. संध्याताई शेळके यांनी आवाहन केले आहे.

वणीत "नागपूर कराराची होळी"

सह्याद्री चौफेर : राजू डावे 

वणी : विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी, मारेगाव, झरी उपविभागीय क्षेत्राच्या च्या वतिने, विदर्भावर अन्याय करणा-या नागपूर कराराची छ.शिवाजी महाराज चौक, वणी येथे होळी करण्यात आली.२८सप्टें.१९५३ साली नागपूर करार करुन,प.महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांनी विदर्भाला महाराष्ट्रात सामिल करुन,१ मे १९६० साली,विदर्भासह महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली.एकूण ११ कलमी असलेल्या या करारात काही महत्वपूर्ण तरतूदी करण्यात आल्यात की,त्यामूळे विदर्भाचा सर्वांगिन विकास होईल,त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात निर्माण होणा-या सरकारी नोक-या व इतर सुविधांमध्ये विदर्भाच्या जनतेला लोकसंख्येच्या आधारावर २३ टक्के वाटा मिळेल.असे अपेक्षित होते,परंतू विदर्भाला पाने पुसण्यात आलीत. सर्वच क्षेत्रात अनुशेष निर्माण झाला.या करारामूळे विदर्भाची फसगत करण्यात आली, त्यामूळे या कराराची होळी करण्यात आली. आता आम्हाला महाराष्ट्रात अजिबात राहायचे नाही,त्यासाठी आम्हाला आमचे विदर्भ राज्यच हवे.
      
राज्य निर्मितीसाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा विदर्भात असतांना,विदर्भाचे राज्य नाही. विजनिर्मिती,जलजंगल,खनिजे,सुपिक जमिन हे सर्व असतांना येथल्या तरुणाच्या हाताला काम नाही,त्यामूळे नक्सलवाद, बेरोजगारी,कुपोषण,शेतकरी आत्महत्या,प्रदुषन अनुशेष व इतरही समस्या निर्माण झाल्या.त्यामूळे विदर्भावर अन्याय करणा-या या नागपूर कराराची होळी करण्यात आली, यावेळी,प्रा.पुरुषोत्तम पाटील,रफिक रंगरेज,राहुल खारकर,प्रा.बाळासाहेब राजुरकर,मुख्या.नामदेवराव जेनेकर,संजय चिंचोलकर,संजय खाडे,राजू पिंपलकर,प्रविण खानझोडे,एड.रुपेश ठाकरे,अमित उपाध्ये,प्रमोद खुरसने,धीरज भोयर,अलकाताई मोवाडे,निलिमाताई काळे,अनिल गोवारदिपे,राकेश वराटे,देवराव पा.धांडे,दशरथ पाटील,होमदेव कनाके,देवा बोबडे, रामदास पा.पखाले,प्रभाकर उईके,मारोती मोवाडे,भाऊराव लखमापूरे,विठ्ठल हेकाडे,व्हि.बि.टोंगे यासह अनेक विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
       
समितीच्या वतीने३० सप्टे.२०२३ रोजी स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना स्मरण करुन आष्टी-आर्वि-तळेगाव-कौंडण्यपूर अशी पदयात्रा करुन, २ऑक्टो.२०२३ला, दु.१ वा."विदर्भ संकल्प महिला मेळावा"आयोजित करण्यात आलेला आहे,तरी जिल्ह्यातील कार्यकर्ते व विदर्भप्रेमी जनतेने जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.पुरुषोत्तम पाटील (यवतमाळ जिल्हाध्यक्ष),राहुल खारकर(विदर्भ सचिव), राजू पिंपळकर,(यवतमाळ जिल्हा समन्वय) प्रा बाळासाहेब राजूरकर,निलिमाताई काळे,अलकाताई मोवाडे,कलावती क्षिरसागर आदीनी केले.

भगतसिंग यांच्या विचारांची गरज...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

भारतामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड नंतर बारा वर्षाचा एक मुलगा, खेळण्या आणि पळण्याच्या वयात जालियनवाला बागेत जाऊन हुतात्मा वंदन करतो. हाच मुलगा वयाच्या 17 व्या वर्षी बलवंत नावाने एका प्रेस मध्ये अन्यायाविरुद्ध लेख लिहीत असतो. आई जेव्हा याच्या लग्नाचा हट्ट धरते, तेव्हा आईला उत्तर देतो. 'माझे जीवन मी उच्च आदर्शासाठी समर्पित केले आहे. पारतंत्र्य भारतामध्ये माझे लग्न झाले, तर मृत्यू हीच माझी विधवा असेल' तेच भगतसिंग वयाच्या 23 व्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळावे, समाजवादी व्यवस्था निर्माण व्हावी हे स्वप्न उराशी घेऊन आपल्या प्राणाचे बलिदान दिले. कुठून आली ही ताकद? काय विचार होते भगत सिंग यांचे ? कोणती व्यवस्था उभी करायची होती ? असे अनेक प्रश्न आजही आपल्याला पडतात.

आपल्या प्राणाचे बलिदान देऊन कित्येक क्रांतीकारकांनी भारताची ही भूमी पावन केली. त्याचा एक मोठा इतिहास आहे. त्या गौरवशाली इतिहासाची जाण भगतसिंग यांना होती. अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकाचे विचार भगतसिंग सोबत होते. भगतसिंग सांगतात "आम्ही गुरुगोविंद सिंग, शिवाजी महाराज, रियाजखान, गैरीबाल्डी, केमाल पाशा, वॉशिंग्टन, लाफहायते, लेनिन आम्ही यांच्यापासून आदर्श घेऊन त्यांच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवित लढत आहोत. यावरून आपल्याला दिसेल की भगतसिंग यांना अन्याय व शोषणाविरुद्ध लढण्याची ताकद या विचारातून मिळत होती .आज भगतसिंग यांचे बलिदान व शौर्य याला अनन्य साधारण महत्त्व आहे तरी त्यांची महानता ही त्यांच्या आदर्शवादी विचारत दडलेले दिसते .त्यांना अपेक्षित असणाऱ्या समाज व्यवस्थेत दिसते.या आदर्श उद्दिष्ट साठी भगतसिंग याची बलिदान दिले. भगतसिंग लिहितात,"देशात अमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे .ज्यांना ही गोष्ट उमजली आहे. त्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी समाजवादी सिद्धांतावर समाजाची पुनर्रचना करावी,जो पर्यंत असे केले जाणार नाही. तो पर्यंत माणसाचे माणसाकडून होणारे शोषण थांबले जाणार नाही व मानवतेची यातनेतून सुटका होणार नाही. माझ्या रक्ताच्या थेंबातून युवक पेटून उठेल त्यातून राजकीय क्रांती होईल समाजवादी आधारावर समाजाची पुनर्रचना होईल." ज्यामध्ये श्रीमंती-गरिबीचा फरक राहणार नाही. विषमता राहणार नाही. शोषण विरहित समाज निर्माण करता येईल . स्वातंत्र्यासोबतच भगतसिंग यांना या पद्धतीने समाजाची उभारणी करायची होती. आणि त्यांना युवकांकडून अपेक्षा आहे. भगतसिंग युवकांच्या संदर्भाने लिहितात. ते आजही किती प्रासंगिक आहे बघा. "नवयुवक देशाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांची बुद्धी पंगू बनवण्याचे प्रयत्न चालू आहे .भविष्यात त्याचे काय परिणाम होतील. आपण समजून घेणे गरजेचे, विद्यार्थ्यांचे मुख्य काम शिक्षण घेणे आहे. पण देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान आणि ती सुधारण्याचे उपाय विचार करण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रशिक्षणात समावेश असू नये का ? स्वागत करणे, हार तुरे देणे, भाषण ऐकणे म्हणजे व्यवहारिक राजकारण काय? तर मग आपल्यावर जो अन्याय करत आहे.व्हाईसरॉय व कमिशन यांचे स्वागत करणाऱ्याला काय म्हणायचे . राजकारणाची ही दुसरी बाजू नाही का? सरकार आणि देशाच्या व्यवस्थेची निगडित कोणती गोष्ट राजकारणाच्या आखाड्यातील गोष्ट मानली जात असेल राजकारणाची दुसरी बाजू नाही का ? विद्यार्थ्यांना जन्मापासून खुश-मस्करी करण्याचा धडा शिकवला जायला पाहिजे का ? आज भारताला देश सेवकांची गरज आहे .जे तन मन धनाने देशासाठी लढतील. युवक हाच देशाचे परिस्थिती बदलू शकतो व उद्याचे भविष्य घडवू शकतो.

"जगाच्या इतिहासाचे पाणी उघडून पहा युवकांच्या रक्ताने लिहिलेले संदेश तुम्हाला पानो पाणी दिसेल, जगाच्या क्रांत्या व परिवर्तनाची वर्णने बघा त्यात तुम्हाला असेच युवक भेटतील" आजची परिस्थिती काय ? भगतसिंगाला अपेक्षित असणारा युवक दिसतो का ? आज आपल्याला व्हाट्सअप यूनिवर्सिटी वरून नॉलेज घेत त्याचा प्रचार करताना दिसतो. देशाचा व आपलं हीत काय, आपली समस्या कोणती हे न ओळखता भिडच्या प्रचाराला बळी पडत,बिन पगारी फुल अधिकारी म्हणून कार्य करताना दिसतो. राजकारणाच्या नावावर प्रस्थापितांना शुभेच्छा देताना व स्वागत करताना आढळतो आणि ज्यांना वैचारिक जाण आहे ते आपल्या आयुष्याच्या चौकटीत खुश आहे. यांचा समाज आणि देशाशी संबंध नाही. ही आज वास्तविकता आहे, तरी सुद्धा आजही भगतसिंगांचे विचार मांडणारे युवक जिवंत आहेत. जे भगतसिंगाच्या स्वप्नातील समाज निर्माण करण्यासाठी झटत आहेत. अन्याय विरुद्ध लढत आहेत. स्वतः आणि समाजाची जाण जिवंत ठेवून कोणत्याही स्तरावर असतील तरी आपल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रात समाज हिताच्या दृष्टीने योगदान देत आहेत. म्हणून हा समाज आज जिवंत आहेत. 
भगतसिंह यांच्या स्वप्नातील समाज व्यवस्था (समाजवादी) तर दूरच उलट बेरोजगारी गगनाला भिडली. महागाई वाढली, युवा बेरोजगार आहे . शेतकरी कामगार त्रस्त झाले. मोजक्या लोकांच्या हातात अमाप संपत्ती जमा होवून राहिली .अमीरी आणि गरिबीची दरी वाढली . प्रत्येक सरकारी क्षेत्रात खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर चालू झाले. शोषण व्यवस्थेचे खांब दिवसेंदिवस मजबूत होऊन राहिले. यामध्ये सामान्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण मिळणं कठीण झालाय. भगतसिंग यांच्या समाजवादी व्यवस्थेच्या विरोधात भांडवली व्यवस्था उभी ठाकली. आता बदल कसा शक्य आहे ? कोण पुढे येणार ? जेव्हा जेव्हा विदारक परिस्थिती आली तेव्हा युवकांनी च पुढे पाऊल टाकीत समाज परिवर्तन केल्याचे उदारणे आहे. म्हणून भगतसिंग यांना युवकांकडून अपेक्षा आहे संविधानाच्या चौकटीत राहून भगतसिंग यांच्या स्वप्नातील समाजवादी व्यवस्था आणण्यासाठी संघर्ष करणे आता अपरिहार्य झाले. समाज परिवर्तनाचा समान कार्यक्रम ठरून संघर्ष करावा लागेल.

भगतसिंग याच धगधगत जीवन आम्हालाही लढण्याची ताकद देऊन जात. समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करीत असताना, अचानक आपल्याला निराशा आली किंवा आपला मार्ग भटकत आहे. लढायचं कशासाठी ? अशी एक वेळ येते तेव्हा भगतसिंगाचे जीवन लढण्याची आणि त्यागाची प्रेरणा देत असते. भगतसिंग यांचे विचार आणि प्रेरणा सदैव आपल्या आयुष्यात चिरकाल टिकून राहावेत .

भगतसिंग तू झिंदा है, हर एक लहू के कतरे मे....
याद है भगता तेरी आंधी, आग लगी है सिनेमे...

 - संदीप गोहोकार
मो: 7350006276

कामाची बातमी! 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार व्यवहारातून बाद...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून बाद होणार आहेत. त्याऐवजी तेवढ्याच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून मिळणार आहेत. त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसणार असून, सर्वसामान्यांना स्टॅम्प पेपरसाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. याबाबत महसूल विभागाने प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

भारतात स्टॅम्प पेपरचे दोन प्रकार आहेत. न्यायिक स्टॅम्प पेपर आणि गैरन्यायिक स्टॅम्प पेपर. कायदेशीर किंवा आर्थिक दस्तऐवजांच्या अंमलबजावणीसाठी स्टॅम्प पेपर वापरला जातो. ते अधिकृत मुद्रांक विक्रेते किंवा सरकार मान्यताप्राप्त बँकांमध्ये मिळतात. स्टॅम्प पेपरवर मुद्रांक शुल्क भरले जाते. स्टॅम्प पेपरचे मूल्य व्यवहाराच्या मूल्यावर अवलंबून असते. त्यानुसार योग्य स्टॅम्प पेपर वापरला जातो.

तेलगीने बनावट स्टॅम्प पेपर तयार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला होता. त्यातून धडा घेत महसूल विभागाच्या अखत्यारित येणार्‍या मुद्रांक व शुल्क नोंदणी विभागाने 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारातून रद्द करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

प्रिंटिंग, सुरक्षा, वाहतुकीचा खर्च वाचणार

नाशिक येथे सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये स्टॅम्प पेपरची छपाई केली जाते. परंतु, 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारातून बाद केल्यानंतर छपाईचा खर्च, कागदाच्या खर्चाबरोबरच सुरक्षेवरील ताण कमी होणार असून, वाहतुकीचा खर्चदेखील वाचणार आहे. विशेष म्हणजे, बँकेतील फ्रॅकिंग सुविधेमुळे बोगस स्टॅम्प पेपरला आळा बसणार आहे.


दुकानात पाट्या मराठीत लावा ; सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्याकडून स्वागत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले. या आदेशाचे वणी विधानसभा क्षेत्रात मनसैनिकांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. त्या आदेशाचे स्वागत व कोर्टाचे आभार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून मानले आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश जारी केले होते. त्यास फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने न्यायालयात आव्हान दिले होते. दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात हा आदेश अतार्किक आहे. राज्य सरकार भाषेच्या बाबत दुकानदारांवर मोठ्या आर्थिक भुर्दडाची सक्ती लादू शकत नाही, असा युक्तिवाद याचिकादारांनी केला होता.
या निकालाविरुद्ध व्यापारी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी करताना मराठी पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरपर्यंत स्थगित केली. आता दसरा, दिवाळीपूर्वी दुकानांवर मराठी नामोल्लेख असलेल्या पाट्या लावून व्यावसायिक उलाढाल वाढविण्याची हीच वेळ आहे, असा सल्ला देत सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्याचा सोमवारी सुनावणीवेळी न्यायालयाने व्यापाऱ्यांना फटकारत आदेश दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त केले. सर्व व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करून सहकार्य करावे असे ते 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाल्याने राज्यासह यवतमाळ जिल्ह्यात मनसैनिकाकडून ठिकठिकाणी आनंद साजरा होत आहे.

अंमलदार अनुराधा वासाडेंच्या समयसूचकतेने आगीवर नियंत्रण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : साई मंदिर चौकात एका चायनीज स्टॉल ला अचानक आग लागली. त्या स्टॉल ला लागलेले अन्य दुकान आगीच्या कवेत येऊ नये, याठीकाणी कर्तव्यावर असलेल्या स्वतः प्रयत्न करणाऱ्या वाहतूक अंमलदार यांच्या समयसूचकतेने पुढील अनर्थ टळला. क्षणाचाही विलंब न लावता अगीवर नियंत्रण मिळविले. ही घटना दिं.26 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

शहरातील साई चौकात वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी येथील वाहतूक नियमन करणे करिता कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अंमलदार मपोशी अनुराधा वासाडे (ब.नं. 477) ह्या आपले कर्तव्य बजावत होत्या, अशातच येथील एका चायनीजच्या स्टॉलला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. सदर स्टॉल च्या आजूबाजूला 2 बँक, साई मंदिर, हॉटेल, जैताई मंदिर व इतर छोटे-मोठे भरपूर दुकाने व गजबजला परिसर असल्याने सदर आगीने रौद्र रूप धारण केले असते तर, आजूबाजूच्या दुकानाची हानी होऊन मोठे नुकसान झाले असते. अंमलदार अनुराधा वासाडे ह्यानी तत्काळ धैर्य दाखवून बाजूलाच असलेल्या स्टेट बँकेतील उपलब्ध अग्निशामक यंत्रच्या सहाय्याने त्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले.  

दरम्यान,स्टॉल दुकानदाराच्या हाताला किरकोळ इजा झाली. यात, स्टॉल संपूर्ण जळाले. परंतु मपोशी अनुराधा वासाडे यांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. तीने दाखवलेल्या समयसूचकता व धैर्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. 

सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळ; सुट्ट्यांची मजाच मज्जा !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना यंदा 24 सार्वजनिक सुट्ट्या शासनाने अधिसुचित केल्या होत्या. मात्र यंदा गुरुवार (दि.28) रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे सण एकाच दिवशी येत आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लीम समाजात शांतता रहावी म्हणून ईद-ए-मिलाद सणाची सुट्टी शुक्रवार (दि.29) रोजी जाहीर केली आहे. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार रोजी सलग दोन दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे. त्यानंतर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने  गुरुवारपासूनच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुट्ट्यांची चंगळ असणार आहे.

अधिसुचनेत म्हटले आहे की, राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार (दि. 28) रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तथापि यावर्षी गुरुवार, (दि.28) रोजी हिंदु धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणूक काढण्यात येते व नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदु बांधवांची मोठी गर्दी जमा होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार ऐवजी शुक्रवार, (दि. 29) रोजी जाहीर करण्यात येत असल्याची सामान्य प्रशासन विभागाने अधिसुचना काढली आहे.

त्यामुळे गुरुवार पासून रविवारच्या साप्ताहिक सुट्टीपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्या असणार आहेत. मधला शनिवार सोडला तर तीन दिवस कर्मचाऱ्यांना या आठवड्यात शेवटी सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे सुट्ट्याची मज्जा सरकारी कर्मचाऱ्यांना करता येणार आहे.

मार्डीत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न


सह्याद्री चौफेर | अनंता पाचपोहर 

मार्डी : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व वणी विधानसभाचे विकासपुरुष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अभिष्टचिंतननिमित्त सेवा पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत वणी उपविभागीय क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने 27 सप्टेंबर ला मार्डी येथील स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजे पर्यंत करण्यात आले.
सदर शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभाचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार उत्तम निलावाड, भाजपाचे संजय पिंपळशेंडे, ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे,भाजप चे ज्येष्ठ नेते दिनकर पावडे,  ठाणेदार जनार्दन खंडेराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देठे मॅडम, डॉ.कोडापे, सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच सुधाकर डाहुले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते धानफुले सर, कृ. उ. बा. समितीचे संचालक अविनाश लांबट यांची यावेळी  उपस्थिती होती. 
याप्रसंगी सेवा पंधरवाडाची भूमिका आमदार बोदकुरवार यांनी विषद केली. शेकडो नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेत शुगर, बिपी, एचबी, सिकलसेल, गरोदर माता तपासणी, टीबी, कुष्ठरोग, लिव्हर, किडनी, स्त्री रोग सह डेंगू, मलेरियाची तपासणी करवून घेतली. शिबिराचे प्रास्ताविक डॉ.कोडापे यांनी केले.
दरम्यान, शिबिरा करिता भाजप पदाधिकारी बोबडे गुरुजी, मंगेश देशपांडे, प्रसाद ढवस, पवन ढवस, गणेश झाडे, शशिकांत आंबटकर, मारोती तुराणकर, प्रवीण बोथले, सुरेश लांडे, शेखर काळे, यांनी पुढाकार घेतला.

या शिबिराला प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी येथील डॉ.जुनगरी, डॉ.शेख, वाय.आर.सलामे, आर.डी. रिंगणे, पी.बी.कुरकुटे, पी.बी.पानघाटे, एस.डी.आत्राम, आर. के.मेश्राम, एम.ए.ताजने, बी.डी. आत्राम, पी.ए.अस्वले, एस.के. वानखेडे, एम,डब्ल्यू.कोकुडे, एस.एस. गलाट, एस.एल.चरडे, एस.एम.वर्धे, पी.जी.निकुरे, एम.एम.पाचभाई, जीवन तिरणकर, नितेश आत्राम, अक्षय करसे, रूपा जुमनाके, अस्मिता धोपटे आणि आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले. 

जातिय सलोखा शिबिर आयोजित करा - रुस्तम शेख यांची मागणी

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

कळंब : माहे सप्टेंबर, ऑक्टो या महिन्यायत इद- ए-मिलाद,गणेश उत्सव, दुर्गा उत्सव इ.उत्सव साजरे होणार आहे. या प्रसंगी ग्रामीण व शहरी भागातील हिंदु मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सर्व सण साजरे करावे. 

या माध्यमातुन हिंदु मुस्लीम समाजामध्ये बंधुत्व, समतेची भावना निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता बळकट व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी तसेच वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत असलेला आदर्श समाज निर्माण व्हावा. या उद्देशाने तालुकास्तरीय जातीय सलोखा शिबिर आयोजित करण्यात यावे. 

या मागणीच्या संदर्भात राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रुस्तम शेख यांनी ठाणेदार पोलीस स्टेशन कळंब व तहसिलदार कळंब यांना निवेदन दिले.
या प्रसंगी निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश भवरे उपस्थित होते.

आज केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या 'केशवस्मृती' नवीन मुख्यालयाचे लोकार्पण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील केशव नागरी सहकारी पतसंस्थेची स्वमालकीचे मुख्य कार्यालय "केशवस्मृती" या मुख्यालयाची वास्तु जुने श्रीकृष्ण भवन जवळील डॉ. तुगनायत यांच्या दवाखान्यासमोर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून या मुख्यालयाचा लोकार्पण सोहळा आज बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२३ ला दुपारी ४. वाजता उत्साहात पार पडणार आहे.

केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे गगनभेदी प्रगतीबाबत या निमित्ताने सांगावं वाटतं की पतसंस्थेचे वट वृक्षाचं बीज मोहरीहुन लहान असतं, त्याला मायेने पाणी घालावं लागतं, जबाबदारीने जोपासावं लागतं तेव्हाच त्याचा वटवृक्ष होऊ शकतो. २७ मार्च १९९२ साली 'केशव नागरी' या पतसंस्थेचं बीज रोवलं गेलं आणि या कालावधीत वणी शहरासोबतच संपूर्ण यवतमाळ जिल्हा कार्यक्षेत्र करून संस्थेच्या वणी, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा व यवतमाळ येथे शाखा कार्यरत आहे व तसेच उमरखेड शाखा प्रस्तावित असून लगतच्या जिल्ह्यात लवकरच नविन शाखा उघडण्याचा संस्थेचा मानस आहे. 
पतसंस्थेची प्रगतीकडे वाटचाल होत असतांना कार्यविस्तार अधिक सुनियोजित पद्धतीने व्हावा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्व सोयी, सुविधाने सुसज्ज अशी 'केशवस्मृती' या नावाने संस्थेची मुख्य कार्यालयाची वास्तू सेवेसाठी पूर्णत्वास आलेली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मा.सुनिलजी देशपांडे अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख रा. स्व. संघ यांच्या शुभहस्ते होणार आहे तर, कार्यक्रमाचे अध्यक्ष केशव नागरी सह पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर खोंड हे असणार आहे.

कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून श्री. विवेकजी जुगादे प्रदेश महामंत्री सहकार भारती महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख उपस्थिती म्हणुन श्री हंसराज अहिर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री, माजी राज्यमंत्री तथा यवतमाळ विधानसभा क्षेत्राचे आमदार- मदन येरावार, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, तालुका संघ चालक बंडुपंत भागवत, नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सह.संस्था यवतमाळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केशव नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, सचिव अनिल आक्केवार, संचालक गजानन अघळते, सतिश कुल्दीवार, अनिल रईच, अरुण कावडकर, किसनलाल खुंगर, प्रदिप राशतवार, विलास लाखे, सुधिर डांगरे, सौ कविता इंगोले, सौ. कल्पना गुंडावार, तज्ञ संचालक गणपत अतकारे, विनय कोंडावार व मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार यांनी केले आहे.


सुरज जाधव यांची सी आर पी एफ दलात निवड


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगांव तालुक्यातील मौजे वाघदरा (वसंत नगर) येथिल रहिवासी सुरज जाधव यांनी एका गांव खेड्यातुन, आपल्या हालाखीच्या परिस्थितीला मात देत मेहनतीच्या जोरावर केंद्रीय पोलिस दलात (C.R.P.F.) निवड झाली.

सुरजची (C.R.P.F.) दलात निवड झाली याचा आनंद पाहता श्री गुरुदेव सेवा मंडळ वंसतनगर तथा समस्त ग्रामवासी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्र वंदनेने त्याला सलामी देण्यात आली.

या छोटेखानी कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य श्री. विश्वनाथ पोतुजी आत्राम, गणपत महाराज, माजी सदस्य श्री. दिलीप आत्राम, श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. उमेश चव्हाण, देविदास आत्राम, रतन जाधव, उपाध्यक्ष श्री. गजानन टेकाम इत्यादी गावकरी व प्रतिष्ठित नागरिक या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

मोदी आवास घरकुल योजना


सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

“सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येत आहेत.

शासनामार्फत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनाचा लाभ देण्यासाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदीम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व धनगर आवास योजना आहेत. तथापि, इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्याकरीता अशा प्रकारची कोणतीही योजना अस्तित्वात नव्हती त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील घरकुलास पात्र लाभार्थी वंचित राहत होते.

यामुळे राज्य शासनाने सन 2023-2024 या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करतांना राज्यात इतर मागास वर्गासाठी 3 वर्षांत 10 लाख घरे पूर्ण करण्यासाठी 'मोदी आवास घरकुल योजना' सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षांत 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

अशी आहे योजना

राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटीक सिस्टिमद्वारे रद्द झालेले पात्र लाभार्थी, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

वरील नमूद मधून उपलब्ध झालेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र लाभार्थींना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी 1 लाख 20 हजार अर्थसहाय्य देण्यात येईल. लाभार्थींना किमान 269 चौ. फूट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक असेल.

इतर मागास प्रवर्गातील निवड झालेल्या लाभार्थींना प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत निवड करण्यात येवून लाभार्थ्यांची छाननी तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांचे मार्फत करुन घरकुलाचे प्रस्ताव जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत निकषानुसार लाभार्थींना निवड केली जाईल.

अशी असेल लाभार्थी पात्रता

• लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.

• लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्ष असावे.

• लाथार्थ्यांचे वार्षिंक उत्पन्न रु.1 लाख 20 हजार पेक्षा जास्त नसावे.

• लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटूंबियाच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.

• लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्यांचे स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.

• लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.

• एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन्हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.

• लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट नसावा.

आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र, ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, आधारकार्ड, स्वेच्छेने दिलेल्या आधारकार्डची प्रत, रेशनकार्ड, निवडणुक ओळखपत्र, विद्युत बिल, मनरेगा जॉब कार्ड लाभार्थींच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.

प्राधान्यक्षेत्र लाभार्थींची यादी करतांना ग्रामसभेने घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा, परितक्त्या महिला, कुटूंब प्रमुख, पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी, जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान (आग व इतर तोडफोड) झालेली व्यक्ती, नैसर्गिक आपत्तीबाधीत व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती उद्दिष्टाच्या किमान 5 टक्के उद्दिष्ट दिव्यांगाकरीता राखीव ठेवणे आवयश्क आहे. इतर पात्र कुटुंबे यांना ग्रामसभेने प्राधान्य क्षेत्र देण्यात येणार आहे. घराच्या बांधकामाच्या प्रगतीनुसार राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाकडून ठरवून दिलेले बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे निधी लाभार्थींच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.

घरकुल योजनेंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ, दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरीता प्रति घरकुल 1.30 लक्ष व सर्वसाधारण क्षेत्राकरीता प्रति घरकुल 1.20 लक्ष अर्थसहाय्य देय राहील. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण योजनेप्रमाणे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेले अनुदान 90/95 दिवस अकुशल मजुरीच्या स्वरुपात अभिसरणाद्वारे अनुज्ञेय राहील. तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देय असलेले 12 हजार प्रोत्साहनपर अनुदानास देखील लाभार्थी पात्र असेल. इतर मागास प्रवर्गातील ज्या पात्र लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकामाकरिता स्वत:ची जागा उपलब्ध नाही. असे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याकरीता सदर लाभार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतर्गत 500 चौ.फुट जागेपर्यत 50 हजार पर्यंत अनुदान देय राहील. तसेच इतर मागास प्रवर्गा व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील पात्र लाभार्थी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतंर्गत प्रचलित असलेल्या तरतुदीनुसार लाभ मिळण्यास पात्र असेल.

-संदीप गावीत,
उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, धुळे

दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविण्यासाठी कटिबद्ध – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र शासनाने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. अनेक आंदोलनातून हे मंत्रालय स्थापन करता आले, याचा अभिमान आहे. केवळ पाच महिन्यात दिव्यांग बांधवांच्या दारी हे मंत्रालय आले असून दिव्यांगांच्या चेह-यावर आनंद झळकविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांनी दिली.

शकुंतला लॉन येथे दिव्यांग कल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित 'दिव्यांगांच्या दारी अभियानात' मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

दिव्यांगांचे अनेक प्रश्न आणि दु:ख आहे, असे सांगून श्री. कडू म्हणाले, या कार्यक्रमाचे जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. मात्र ऐवढ्यावरच न थांबता जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे. दिव्यांगांच्या घरापर्यंत योजना कशा पोहाेचविता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे श्री. कडू म्हणाले, घरकूल, अंत्योदय, शौचालय या योजनांसोबतच येत्या दोन-तीन महिन्यात दिव्यांगांसाठी चांगल्या योजना आणल्या जातील. ग्रामीण स्तरावर काम करणारे ग्रामसेवक, कोतवाल, तलाठी, कृषी सहायक, रोजगार सहायक आदींनी या योजनांबाबत दिव्यांग बांधवांना अवगत करावे. केवळ शासन निर्णय म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून काम करा. दिव्यांग तसेच निराधारांना 1500 रुपये महिना दिला जातो. मात्र कधीकधी चार-चार महिने पैसे मिळत नाही, त्यामुळे महिन्याच्या 5 तारखेपर्यंत संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा करावी, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने विशेष अभियान राबविले आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉन्सन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदनही यावेळी बच्चू कडू यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉन्सन म्हणाले, विविध योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे यासाठी दिव्यांगांना फिरावे लागते. सर्व लाभ एकत्र देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसंख्येच्या सरासरी तीन ते पाच टक्के दिव्यांग असतात. आपल्या जिल्ह्यात दिव्यांगांची नोंदणी कमी आहे, त्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते. मात्र जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम राबवून दिव्यांगाची नोंदणी केली जाईल. दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. राज्यात हा अभिनव प्रयोग फक्त चंद्रपूर जिल्ह्यानेच केला असल्याचे श्री. जॉन्सन यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. सुभाष पवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 13 हजार दिव्यांगांची नोंदणी आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका प्रशासन, सामाजिक न्याय, समाजकल्याण विभाग तसेच विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी अनेक योजना राबविल्या जातात व लाभसुध्दा दिला जातो. जिल्ह्यात दिव्यांगांसाठी 12 शाळा असून त्यात 650 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. तसेच येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्र कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थी सिध्दार्थ टिपले यांना झेरॉक्स मशीन, सुनील गांगरेड्डीवार यांना मोटरपंप, फरान शेख, अर्णव अलोणे यांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग उद्योजकांचा सत्कारसुध्दा करण्यात आला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगासाठी असलेल्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच येथे लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची बच्चू कडू यांनी पाहणी केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ब्रेल लिपीचे जनक ग्रॅहम बेल आणि डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आनंदवन वरोरा येथील संधी निकेतन अपंगांची शाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, कपिलनाथ कलोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, सहाय्यक पांडूरंग माचेवाड यांच्यासह दिव्यांग प्रतिनिधी नीलेश पाझारे व इतर बांधव उपस्थित होते.

तलाठी भरतीत डबल परिक्षा शुल्क जमा झाल्यास शुल्क परत मिळवण्यासाठी यादीतील उमेदवारांनी असा करावा अर्ज !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र. ४५/२०२३ दि. २६/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर परिक्षेकरिता एकुण १०,४१,७१३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.

काही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करताना दोन किंवा अधिक वेळा परिक्षा शुल्क जमा करणेत आलेले आहे. डबल परिक्षा शुल्क जमा केलेल्या उमेदवारांपेकी २३,३७९ उमेदवारांचे परिक्षा शुल्क हे परत करण्यात आलेले आहे. परंतू १,२१९ उमेदवार यांचे नाव व बैंक खात्यावरील नाव हे विसंगत होत असल्याने अद्यापपर्यंत त्यांचे दुबार झालेले परिक्षा शुल्क उमेदवारांना परत करता आले नाही. 
तरी ज्या उमेदवारांना दुबार परिक्षा शुल्क परत करणेचे आहे त्यांची यादी या सोबत जोडली असून यादीतील उमेदवार यांनी खालीलप्रमाणे तपशिल talathi.recruitment2023@gmail.com या ई- मेल आयडीवर तातडीने सादर करावा.

१.उमेदवारांचे नाव
२.बँकेचे नाव :        
३.बँक खाते क्र.       
४.बँकेचा IFSC Code
५.रजिस्ट्रेशन नं. (तलाठी अर्ज नोंदणी क्रमांक) 
६.मोबाईल नं. 
७.ई-मेल आयडी


आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं काम लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यकाळात झालं, व होतही आहे. विकासात्मक धोरण जोपासून वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणारा त्यांचा कार्यकाळ राहिला आहे. विकसनशील व जनहितार्थ कामे हाती घेऊन त्यांनी ती पूर्णत्वास आणली. शहराबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासालाही त्यांनी तेवढीच प्राथमिकता दिली. असे विकासासाठी झटणारे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव सह विविध माध्यमातून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देण्यात आल्या. विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वणी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शारीरिक व्याधी व गंभीर आजारांचं निदान लागावं म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात आली. 
रक्ताची वाढती गरज लक्षात घेता रक्तपेढीत रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध रहावा, हा दृष्टिकोन जोपासून आमदारांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार 25 सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. स्थानिक बाजोरिया लॉन येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात जवळपास दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी रक्तदात्यांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. रक्तदात्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व एक मोठी बॅग भेट स्वरूपात देण्यात आली. रक्तदात्यांना देण्यात आलेल्या बॅगवर 55 हा दोन पंचवार्षिक विजयाच्या यशस्वी वाटचालीचा कार्यकाळ अंक स्वरूपात ठळकपणे दिसत होता. या शिबिरादरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. 
यावेळी आमदार बोदकुरवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या सेवा पंधरवाडा कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात आलेल्या शिबिराच्या यशस्वीतेकरिता भाजपच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यात भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. 

परप्रांतीय व्यक्तीचे अपहरण: पैशाच्या मागणीसह प्राणघातक हल्ला, ५ आरोपी कोठडीत

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : चक्क वाहन चालकाचे अपहरण करून त्याच्या मालकाकडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. आरोपींनी किडनॅप व्यक्तीला वरोरा टोलनाक्याजवळ काही वेळाने सोडून दिल्याची घटना रविवार, 24 सप्टेंबर रोजी दुपारी घडली. त्यानंतर चालकाने पोलिसांत तक्रार केली.शिरपूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत रात्री उशिरापर्यंत अपहरण करणाऱ्या 5 आरोपींना अटक केली. रहमतब शहाबुद्दीन अन्सारी, (24) रा. झारखंड, असे तक्रारदाराचे नाव आहे. 
प्रशांत बबन सत्रमवार (वय 40, रा. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती), अनिल परसराम भवरे (49), रा.रायसा (ता.घाटंजी), दत्तात्रय रघुनाथ कांबळे (48), रा. पटपांगारा(ता. घाटंजी), अनिकेत दशरथ भालेराव (24), रा. रायसा (ता. घाटंजी), विनोद आनंद गेडाम (31) गोंड मोहल्ला चंद्रपूर जिल्हा, याला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमहताब शहाबुद्दीन अन्सारी (24, रा. झारखंड) हा चालक ट्रक ट्रेलर क्रमांक एमएच-16 सीव्ही-3208 ने पोकलॅन मशीन घेऊन अहमदनगरहून मोहदा येथे आला होता. मोहदा येथील गिट्टी क्रशर मालकाला पोकलेन मशीन देण्यात आली, त्यानंतर तो त्याच्या ट्रेलरने गावाकडे परत जात होता. दरम्यान, त्यांना वेळाबाई चौकाजवळ चार ते पाच जणांनी अडवून मारहाण करून त्यांचे अपहरण केले.
सर्व स्तरावरून शिरपूर पोलीसांची प्रशंसा...

अपहरणानंतर आरोपीने ट्रेलर मालकाकडे मोबाईलवरून मोठ्या रकमेची मागणी केली आणि पैसे न देता वाहन सोडून जाण्याची धमकी दिली. यावेळी वाहन वरोरा रस्त्यावरून जात होते. वरोरा रोडवरील शेंबळ टोला नाका येथे येताच आरोपींनी वाहन चालकाला सोडून तेथून पळ काढला, त्यानंतर घाबरलेल्या ट्रेलर चालकाने शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय राठोड यांना आपली आपबीती सांगितली. घटनेची गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल करून तपास यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. रविवारी रात्री उशिरापर्यंत आरोपींना पाटणबोरी आणि भद्रावती येथून ताब्यात घेण्यात आले. वरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर ठाणेदार संजय राठोड व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कारवाईने सर्व स्तरावरून शिरपूर पोलीसांची प्रशंसा होत आहे.