Page

खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर अनंतात विलीन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे दिवंगत लोकप्रिय खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या पार्थिवावर आज वरोरा मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्ली येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना त्यांचे मंगळवारी दुःखद निधन झाले होते. शासनाच्या वतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर लोकसभेच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार मुकुल वासनीक व आमदार सर्वश्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन राऊत, सुनिल केदार, अनिल देशमुख, आशिष देशमुख, किशोर जोरगेवार आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आपल्या शोकभावना व्यक्त करताना पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचे युवा लोकनेते खासदार बाळू धानोरकर सर्वसामान्याच्या प्रश्नाला भिडणारे नेते होते. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे काम केले. आपसात चांगला संवाद असलेल्या या नेत्याचे अकाली निधन हे दु:खद व वेदनादायी असून यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे. ते आपल्याला सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. धानोरकर परिवाराच्या दु:खात आपण सहभागी असून त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना इश्वरचरणी करत असल्यांचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
दिवंगत खासदार धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी बाळु धानोरकर यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली असून चंद्रपुरच्या या ढाण्या वाघाला, दिलदार व्यक्तमत्व व लढवय्या नेत्याला मानाचा मुजरा करत असल्याच्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी संपूर्ण शासकीय इतमामात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज धानोरकर परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी दिवंगत खा. धानोरकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, तसेच सामाजिक व राजकीय पदाधिकारी नरेशबाबू पुगलिया, शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, रामु तिवारी, प्रकाश देवतळे, देवराव भोंगळे यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीकांनी पुष्पचक्र अर्पण केले. दरम्यान त्यांच्या अंतयात्रेला हजारोंच्या संख्यने नागरिक उपस्थित होते.


नगर परिषदेच्या चुकीच्या धोरणाचा युवासेनेच्या वतीने जाहीर निषेध


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : नगर पालिकेने वित्तीय वर्ष 2023 व 2024 मध्ये पाणिकरात 50 रुपये दरमाह वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा ठराव 23 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आला. आता वणीकरांना पाणीकरात 600 रुपये वार्षिक भुदंड सहन करावा लागणार आहे. परिणामी शहरातील दूषित पाणीपुरवठा व पाणीकरात केलेली वाढ तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी युवासेनेच्या वतीने मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली. 

शहरातील अनेक प्रभागात मागील वर्षी तीन दिवसातून पाणी एकदाच येते. म्हणजे महिण्याला फक्त 10 दिवस पाणी येते वर्षाच्या 365 दिवसात काही नागरीकांना 120 दिवसच पाणी मिळत आहे. मात्र, पाणी कर पुर्ण वर्षाचा भरावा लागत आहे. हा सदर नागरीकांवर अन्याय आहे.
परिणामी शहराच्या अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने जनतेच्या आरोग्याशी व जीवाशी न.प. ने जो खेळ सुरू आहे तो त्वरित थांबवावा याबाबत पाण्याचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्याचे पाणी तपासणी नमुने अहवाल पाठवून तपासणी करण्याची मागणी युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य शेंडे यांनी केली आली. "जर दररोज पाणीपुरवठा झाला तर वाढीव पाणी कर भरण्यास हरकत नव्हती, मात्र तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असेल तर एका वर्षात फक्त तीन महिण्याचाच कर लावणे गरजेचे आहे". परंतु नगर परिषद वर्षभराचा कर घेत आहे या चुकीच्या धोरणाचा युवासेना जाहीर निषेध करते व नगर परिषदेविरुद्ध असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेत आहे.

या आंदोलनात वणीकर जनता नगर परिषदेचा पाणीकर भरणार नाही. व रस्त्यावर उतरून नगर परिषदेच्या वाढीव कराचा निषेध करणार व युवासेना यासाठी पुढाकार घेऊन कुणीही वणीकर नगर परिषदेचा पाणीकर भरणार नसल्याचे पत्रकही जनतेत वाटप करून याबाबतची जगजागृती करणार आहे. जर नगर परिषदेचा कर्मचारी किंवा अधिकारी जनतेच्या घरी जाऊन पाणीकर भरण्याबाबत बळजबरी करीत असेल तर त्याच्यासोबत तोंडी वाद झाल्यास यास प्रशासन जबाबदार राहील असा दमही देण्यात आला आहे. यावेळी करण नागपुरे, प्रितम वांधरे, चेतन उलमाले यांची उपस्थिती होती.


कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात नेत असलेल्या 45 जनावरांची सुटका

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी अवैधरित्या जनावरांना पायदळ घेऊन जाणाऱ्या 45 बैलांची सुटका करण्यात मारेगाव पोलिसांना तथा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना यश आले असून, पाच जणांविरोधात मारेगाव पोलीसात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आली. ही घटना काल दि 30 में ला सायंकाळी साडे चार वाजता घडली असून रात्री पासून कार्यवाही सुरु आहे.

याबाबत माहिती अशी की, करणवाडी ते रोहपट मार्गाने अवैधरित्या गुरे कत्तलीसाठी पायदळी नेत असल्याची माहिती मिळाली, मारेगाव पोलीसांनी करणवाडी ते रोहपट रोडवर बैलाच्या कळपाची पाहणी करत असतांना जीवनज्योत दवाखान्याकडे जाणाऱ्या रोड समोर 5 इसम हे बैलाचा कळप घेऊन जाताना दिसले. त्याचवेळी बैलाचा कळप सावलीत थांबवून चौकशी करण्यात आली असतांना त्यांनी तेलंगणा राज्यात दिग्रस मार्गे जात असल्याची कबुली दिली. त्यात तब्बल 3-3 बैलाचा कळप,15 जोड्या असे एकूण 45 बैल आढळून आले. बैलांना निर्दयीपणे गळ्यात दोराने फास बांधून भर उन्हात पायदळ कत्तलीसाठी घेऊन जात होते. मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजता पोलिसांनी बैलांची सुटका करत त्यांना जीवनदान दिले आहे. व सुरक्षेच्या दृष्टीने गुरुगणेश गौशाळा येथे गुरांना पाठविण्यात आले. याप्रकरणी तस्लिम खां वहाब खां कुरेशी (44) वार्ड 12, मारेगाव, मुकुंदा कलप्पा जाधव (35) मारेगाव, सुनील शामराव गुंजेकर (24) वार्ड नं- 4, मारेगाव, शंकर संभा भोजेवार (41) रा. मारेगाव, उमेश जनार्दन चाफले (31) वार्ड नं-7, मारेगाव यांना अटक करण्यात आली असून त्यांचे जवळून जुन्या बांबू ची 5 काठ्या, सॅमसंग कंपनीचा मोबाईल किंमत 5000/- व बैल 45 नग अंदाजे किंमत 9,00,000/- रुपये असा एकूण 9,05,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखाचे पोहेकॉ सुनील खंडागळे यांच्या फिर्यादीवरुन मारेगाव पोलीसात पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मारेगाव पोलीस हेडकॉनस्टेबल चांदेकर तथा सुंकुरवार करीत आहे.

जाणून घ्या में महिन्याचा शेवटचा दिवस, राशीभविष्य : 31 मे बुधवार..!

जाणून घ्या या महिन्याचा शेवटचा दिवस, राशीभविष्य : 31 मे बुधवार..!


मेष :
मेष राशीच्या लोकांना इतरांच्या मदतीमुळे खूप आराम मिळेल. तुमच्या दिवसाचा बराचसा भाग धर्मादाय कार्यात जाईल. कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने काही बदल होऊ शकतात, ज्यामुळे सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. रात्री पत्नीची तब्येत बिघडल्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस कुटुंबियांसोबत आनंददायी जाईल. मात्र, दुपारपर्यंत तुम्हाला काही चांगली बातमीही मिळेल. तुमच्या घरी पाहुणे आल्याने तुमचा खर्च वाढू शकतो. रात्री काही शुभ कार्यात भाग घेतल्याने तुमचा सन्मान वाढेल.

मिथुन :
मिथुन राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी खूप चांगले राहील. या राशीच्या अनेक लोकांना मौल्यवान वस्तू मिळू शकतात. तुम्ही खूप व्यस्त असणार आहात. अनावश्यक खर्च टाळा. या क्षणी तुम्हाला पत्नीकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकते.

कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक बाबतीत खूप चांगला असणार आहे. तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. या काळात तुम्हाला व्यावसायिक योजनांना गती मिळेल. राज्य सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत देव दर्शनाचा लाभ मिळेल.

सिंह :
सिंह राशीच्या लोकांना राजकीय क्षेत्रात तुफान यश मिळेल. मुलाप्रती असलेली जबाबदारीही पार पडेल. स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाईल, रखडलेली कामेही पूर्ण होतील. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा काळ प्रियजनांचे दर्शन आणि हास्याच्या वातावरणात जाईल.

कन्या :
कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस उत्पन्नाच्या दृष्टीने खूप चांगला आहे. चांगल्या कामात पैसा खर्च झाल्यास मन प्रसन्न राहील. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर थोडे नाराज राहू शकतात. वैवाहिक जीवनात सुखद परिस्थिती निर्माण होईल.

तूळ :
आज तूळ राशीच्या लोकांसाठी स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जास्त धावपळ केल्यामुळे हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जर तुम्ही एखाद्या कामाच्या संदर्भात प्रवासाला जात असाल तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. आर्थिक बाजू भक्कम असल्याने धन, मान-सन्मान, कीर्ती वाढेल. थांबलेले काम सिद्ध होईल - प्रियजनांशी भेट होईल. तुम्ही तुमच्या बोलण्यावर संयम ठेवला नाही तर तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

धनु :
धनु राशीच्या लोकांना घरगुती वस्तूंवर पैसे खर्च करावे लागतील. सांसारिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. अधीनस्थ कर्मचारी किंवा नातेवाईकामुळे तणाव वाढू शकतो. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा, पैसे अडकू शकतात.

मकर :
मकर राशीच्या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे लाभ मिळतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यवसायात बदल करण्याचे नियोजन केले जात आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील. धार्मिक स्थळांच्या प्रवासाचे संदर्भ संध्याकाळी प्रचलित होतील आणि पुढे ढकलले जातील. वाहन वापरताना काळजी घ्या.

कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस भरपूर खर्च आणणार आहे. प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करण्यापूर्वी त्याबद्दलची सर्व माहिती नीट जाणून घ्या. संध्याकाळी पत्नीचे आरोग्य सुधारेल - तथापि, पूर्णपणे बरे होण्यास वेळ लागेल.

मीन :
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस वैवाहिक जीवनात आनंदाचा असणार आहे. तुम्हाला जवळ किंवा दूरचा प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायात वाढत्या प्रगतीमुळे खूप आनंद मिळेल. विद्यार्थ्यांची मानसिक बौद्धिक भार दूर होईल. संध्याकाळी फिरताना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुमचे मनही रिलॅक्स होईल.


मर्डर मिस्ट्री: तिचा अखेर खून'च केला गेला, आरोपीला ठोकल्या बेडया

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

वणी : शहरातील जैन ले-आऊट कृष्णअपार्टमेंट मध्ये बंद खोलीत एका पंचवीस वर्षीय तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सदर घटनेचा पंचनामा करून वणी पोलिसांनी आईच्या तक्रारी वरून तपासाची गती अतिशय नियोजनपूर्वक करित या प्रकरणातील एकाला 24 तासाच्या आत परजिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. 

मृतक प्रिया देवानंद बागेसर उर्फ आरोही वानखेडे रा. बोर्डा ता.वरोरा, जिल्हा चंद्रपूर असे तरुणीचे नाव असून ती वणी येथील कृष्णअपार्टमेंट मध्ये दोन महिन्यापासून राहत होती. सोमवारी (29 में) ला सकाळी दहा वाजता ती राहत असलेल्या खोलीतून स्थानिकांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी त्या रूम मालकाला सांगितले, त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले तेव्हा तरुणीचा अर्धनग्न व कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. सदर घटनेचा पंचनामा करित या प्रकरणातील "गुढ" काय हे शोधण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी युवतीचा मृतदेह आढळल्यानंतर तिचा खून झाल्याचे तिच्या शरीरावरील व्रण वरून स्पष्ट झाले. मात्र, मृतदेह अर्धनग्न स्थितीत आढळुन आल्याने घातपाताचीही शक्यता असून प्रकरण संशयास्पद असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला गेला होता.

या प्रकरणातील आरोपी विनोद रंगराव शितोळे रा. शिरोळी ता.वसमत जिल्हा हिंगोली येथून अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली. दरम्यान, खुनाचा कोणताही सुराग हाती लागला नसतांनाही अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करीत सापोनी माधव शिंदे यांनी आरोपीला जेरबंद केले. अवघ्या चोवीस तासांतच या गुलदस्त्यात असलेल्या घटनेचा उलगडा करीत आरोपीला जेरबंद केल्याने पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

सदरची कारवाई मा. डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधिक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप, अपर पोलिस अधिक्षक यवतमाळ, मा. गणेश किंद्रे उपविभागीय पोलिस अधिकारी वणी, यांच्या मागदर्शनाखाली पो.नि. श्री प्रदीप शिरस्कर, सपोनि माधव शिंदे, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि अशिष झिमटे, पोउपनि प्रविण हिरे, सफै कांबळे, पोह गजानन होडगीर, पोना अविनाश बनकर, पोना अमोल अन्नेरवार, पोना विजय वानखेडे, पोना इकबाल, पोशि सागर सिडाम, पोशि भानुदास हेपट, पोशि अकाश अवचारे, पोशि शुभम सोनुले व पोस्टे वणी यांनी केलेली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सुरू आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. मृतक तरूणीचे फेसबुक द्वारे विनोद यांचे सोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. तिचा प्रियकर विनोद यांनी तीचा घातपात करून गावी पळून गेल्याची माहिती मिळाली. आरोपीचे नावा व्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती नसताना व आरोपी हा बाहेर जिल्ह्यातील असल्याने वणी पोलिस स्टेशन मधिल कर्मचारी व अधिकारी यांनी बुध्दी कौशल्याचा वापर करून,आरोपीची माहिती काढून त्यास त्याचे मुळ गाव शिरोळी ता. वसमत जिल्हा. हिंगोली येथून चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालावली


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना अत्यंत दुखद घटना आहे. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे, आज 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर 31 मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. 

चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्का करणारा प्रवास केलाय.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.
2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले. लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला.

लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका , मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरलेत. अशातच शुक्रवार, दिनांक 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांची मंगळवार 30 मे रोजी पहाटे प्राणज्योत मालवली. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड पिता नारायण धानोरकर यांचे निधन झाले. आता पुन्हा अचानक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा; वांजरी मार्गांवरील झाडे जमीनदोस्त, वीज पुरवठा खंडीत

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : तालुक्यातील विविध भागांत सोमवारी रातपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह होत असलेल्या या पावसामुळे कुठे झाडे उन्मळून पडली आहेत तर कुठे विजेचे खांब जमीनदोस्त झाले आहेत. वांजरी मार्गांवरील भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झाडे रस्त्यावर पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे.

गेल्या एक महिन्यापासून वणी उपविभागातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पाऊस अधून मधून जोरदार हजेरी लावतोय. आज नांदेपेरा, मजरा,वांजरी यासह इतर भागात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील होता. त्यामुळे वणी नांदेपेरा मार्गांवरील ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. वादळी वाऱ्याचा सर्वात जास्त फटका वांजरी भागात फटका बसला असून येथील एका वीट फॅक्ट्ररी चे शेड उडून गेले आहे. मात्र, जीवितहानी कुठे झाल्याचे चित्र नसून. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

मोठी बातमी: खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर आपली अमीट छाप उमटविणारे व अगदी कमी कालावधीत सर्वोच्य राजकीय कामगिरी करणारे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचे आज दिनांक 30 मे रोज मंगळवार ला दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये रात्री 2.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

आज दिनांक 30/05/2023 ला मंगळवार ला त्यांचा मृतदेह एअर एम्बुलन्स न्यू नागपूर ला व नंतर वरोरा येथे आणण्यात येणार आहे व त्यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दुपारी 2.00 वाजेपासून ते 4.00 वाजेपर्यंत अंतिम दर्शनाकरिता ठेवण्यात येणार आहे अशी माहिती विशेष सूत्रांकडून मिळाली आहे.

त्यांच्या पश्चात आ.पत्नी, आई, भाऊ, दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे. या दुःखद घटनेने चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात शोककळा पसरली.

खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा राजकीय प्रवास 
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्का करणारा प्रवास होता.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली.

2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले.



वणी: फ्लॅट मध्ये तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत आढळून आला मृतदेह

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहरातील कृष्णअपार्टमेंट मध्ये एका बंद खोलीत संशयास्पद मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी 29 में रोजी सकाळी साडे नऊ च्या दरम्यान, उघडकीस आली. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. प्रिया देवानंद बागेश्वर (ता. वरोरा) जिल्हा चंद्रपूर असे मृतक तरुणीचे नाव आहे.

शहरापासून काही अंतरावर असलेल्या ब्राम्हणी रोड जवळ पेट्रोल पंप च्या मागे कृष्णअपार्टमेंट च्या खोलीत सदर मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. विशेष म्हणजे मृतक ही परजिल्ह्यातील असून तिच्या जवळ दोन आधार कार्ड आढळून आले, तरुणी रूम करून राहत असून ती चंद्रपूर येथील एका महाविद्यालयात शिकत होती अशी माहिती मृतकाच्या आई कडून पोलिसांना मिळाली, घटनास्थळी तिच्या डोक्याच्या मागून प्रहार असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले, शिवाय बंद दरवाजा,संशयास्पद स्थितीत मृतदेह असल्याने घातपाताचीही शक्यता नाकारता येत नाही.


मृतक पंचवीस वर्षीय तरुणी ही साई मंदीर, जवळ वरोरा येथील असून ती वणी शहरातील ब्राम्हणी रोड जवळ पेट्रोल पंप च्या मागे कृष्णअपार्टमेंट मध्ये राहत होती. ती राहत असलेल्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याने घरमालकांना स्थानिकांनी माहिती दिली, घर मालकांनी वणी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. बंद खोलीत अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला असून सदर तरुणीचा मृत्यू दोन तीन दिवसापूर्वी झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, मृतदेह अर्धनग्न स्थितीत आढळुन आल्याने घातपाताचीही शक्यता असून प्रकरण संशयास्पद आहे.

फिर्यादी घर मालक राकेश विजय डूबे (30) रा.गोकुल नगर वणी. यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी मर्ग दाखल करून तपासात घेतला. अधिक तपास व‍ पोलिस करीत आहेत.

आदिवासी भागातील जल, जंगल, जमीन कवितेच्या केंद्रस्थानी यावेत- मालती सेलमे


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : निसर्ग आणि मानव यांचा अन्योन्य संबंध आहे. आदिकाळात माणूस जंगलाच्या सानिध्यात राहिला आणि जंगलाच्या सोबतीनेच जगाला. सध्या या जंगल संस्कृतीपुढे वेगवेगळी आव्हाने उभी ठाकली आहेत. ही संस्कृती संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे थांबवायचे असेल तर आदिवासी भागातील जल, जंगल आणि जमीन कवितेच्या केंद्रस्थानी यायला हवीत असे उद्गार गडचिरोली येथील सुप्रसिद्ध कवयित्री मालती मडावी सेलमे यांनी काढले.

शेगांव (बु) ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरी कवितेवर बोलू काही या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संवादक म्हणून प्रसिद्ध कवयित्री गीता रायपुरे देव्हारे यांनी भूमिका पार पाडली. अध्यक्षस्थान चंद्रपूरचे कवी प्रदीप देशमुख यांनी भुषविले. याप्रसंगी बदलापूर येथील प्रसिद्ध समीक्षक डॉ. संदीप भेले, कवितेच्या घराचे कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, खेमजई येथील उपसरपंच चंद्रहास मोरे, कवी विवेक पत्तीवार उपस्थित होते. कवितेविषयी गीता देव्हारे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मालती सेलमे म्हणाल्या, जंगलची संपत्ती गोळा करीत आम्ही वाढलो, झाडे, झुडपे, जंगल, वेली हे सर्वच आमच्या सगेसोयऱ्यांसारखेच आहेत. आमच्या भागात सोईसुविधा नसल्यामुळे खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आज आम्ही शहरात राहतो. नागरी जीवन व त्यातील धुसमट पाहून मन दुःखित होते. असे सांगून त्यांनी आदिवासी संस्कृतीची विविध वैशिष्टये सांगितली. या प्रसंगी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी निसर्गाचा वेध घेणाऱ्या विविध कविता सादर केल्या. 'ह्या हिरव्या पांदणवाटा ओढती माझे पाय', पावसा ये जरा जरा, संविधान गीत, रमाईचे महात्म्य सांगणारी कविता, बालमनाच्या वेध घेणाऱ्या कविता अशा अनेक कविता सादर करून मुलाखतीत रंगत आणली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे चंद्रहास मोरे म्हणाले, कवीने सामाजिक भान ठेवून कवितेतून प्रकट झाले पाहिजे, समाजाला सोडून कवितेचा विचार होऊ शकत नाही असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी कवितेच्या घरातील विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमोद नारायणे यांनी केले, तर आभार डॉ. संदीप भेले यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला विकास अधिकारी विद्याधर वैद्य, खेमजई येथील ग्रामपंचायत सदस्य धनराज गायकवाड, कवी राजू मांडवकर उपस्थित होते.

यशस्वितेसाठी कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, संकल्पनाकार किशोर पेटकर, सूर्यकांत पाटील, भारत रामटेके, माविम सहयोगीनी रंजू रामटेके, वनिता माकोडे, गीता फुलकर, सावित्री सीएमआरसी सचिव वंदना वाढई , सुधा भोज, मंदाताई वैद्य, प्रियंका नागदेवते, विकास ग्रुपचे अमोल दातारकर, धर्मराज लोडे तसेच सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


वयोवृध्द आई-वडिलांना सांभाळले नाही तर सरळ तुरुंगात जाल; जाणून घ्या काय म्हणतो कायदा...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आजच्या काळात वृद्ध आई-वडील घरात असणे हे त्यांच्या मुलांना अडचणीचे वाटते. त्यामुळे मुले त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी विसरत चालले आहेत. पण, जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडल्यास तुरूंगवारी करावी लागणार आहे.

दंड व शिक्षा
ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक साहाय्य मिळावे व त्यांचे पालनपोषण व्यवस्थित व्हावे, यासाठी 'फौजदारी प्रक्रिया संहिते'मध्ये याबाबत तरतूद करण्यात आली आहे. जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या पाल्यांना अथवा ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व संरक्षणाची जबाबदारी असलेल्या व्यक्तींना 'आई - वडील व ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व पालनपोषण अधिनियम २००७' च्या कलम २४ नुसार तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा ५००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

कायद्यातील तरतूद
जे ज्येष्ठ नागरिक स्वत:चे पलानपोषण करण्यास समर्थ नाही ते त्यांच्या मुलांकडून पोटगी मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. 'फौजदारी प्रक्रिया संहिते'च्या कलम १२५ नुसार ज्येष्ठांना त्यांच्या मुलांकडून स्वत:च्या पालनपोषणासाठी पोटगी मिळण्याचा कायदेशीर अधिकार आहे. पोटगीची ही रक्कम मुलांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. त्यांचे उत्पन्न व त्याच्या परिवाराचा खर्च विचारात घेऊन न्यायालय पोटगीची रक्कम ठरवीत असते.

हे करू शकतात पोटगीसाठी अर्ज
या कायद्याखाली स्वत: ज्येष्ठ नागरिक अथवा पालक, जर ते असमर्थ असतील तर त्यांनी अधिकार दिलेली व्यक्ती किंवा संस्था अर्ज करू शकते. अथवा न्यायाधिकरण स्वत: त्याची दखल घेऊ शकते. मुलगा किंवा नातेवाइकांनी न्यायालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या पालनपोषणासाठी ठरवून दिलेली रक्कम अदा केली नाही तर न्यायाधिकरण आपल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी स्वत: फौजदारी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करते.


नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या समोर कोळशाच्या काळा बाजारासह अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरु असलेल्या कोसारा, बोटोणी चोरट्या कोल बाजारासह मटका, अवैध दारू विक्री यातून महिण्याला लाखों रूपयाचा काळा घोडबाजार होत असून तस्करा कडून मुजोरी वाढल्यामुळे परिसरात शांतता व सुव्यवस्था ऐरणी वर आली आहे.

मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोसारा येथील वर्धा नदी जवळ तसेच बोटोणीच्या ढाब्याजवळ कोळसा माफियानी कोळशाचा चोर बाजार भरवीला आहे. शासन मान्य कोळसा खाणीतून हा कोळसा क्षमते पेक्षा अधिक ट्रक मध्ये भरून कोळसा चोर बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. येथून कोळशाची चोरी केली जात असून चोरून आणलेला कोळसा येथे खाली केल्या जात आहे. जमा झालेला कोळसा खाली ट्रक मध्ये लोड करून काळ्या बाजारात विकला जात आहे. चोर बाजारातुन खरेदी केलेल्या कोळशाची खुल्या बाजारात या कोळशाला 8 ते 9 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. त्यामुळे हा व्यवसाय दोनही ठिकाणी मोठया प्रमाणात फोफावला आहे.

यांचप्रमाणे अवैध दारू विक्री, मटका, भंगार चोरी, वाळूची तस्करी याचे प्रमाणही दर दिवशी उच्चांक गाठत असून कोसारा येथील चोर बाजारात 15-20 ट्रक रोज खाली होत आहे, तर बोटोणी च्या चोरबाजारात 25 ते 30 ट्रक रोज खाली होत आहे. बोटोणीतील कोळसा चोर बाजाराने आरोग्य धोक्यात आले आहे. कोसारा चोर बाजारात संबंधित लोकं मुकाट्याने हात ओले करित असल्याचे बोलल्या जात आहे.

कोसारा पाईन्टवरून व बोटोणी पाईन्ट मिळून लाखों रुपये दर दिवशी निव्वळ नफा या व्यवसायातून माफियाना मिळत असल्याची चर्चा आहे. चोरून आणलेल्या कोळशाच्या चोरट्या बाजारातून लाखों रुपयाचे दर दिवशीचे उत्पन्न असल्यामुळे चोरटे सामान्य माणसा सोबत मुजोरी करीत आहे. वेळीच या चोर बाजाराला आवळ न घातल्यास परिसरात शांतता व सुव्यवस्था ऐरणी वर आली आहे.

यापूर्वीचे एसडीपीओ अपयशी

यापूर्वीचे एसडीपीओ हा चोर बाजार बंद करण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, नव्याने रुजू झालेले वणी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे हे या अवैध व्यवसायाला आळा घालतील अशी सर्व सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

7 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन

या चोर बाजारात दर दिवशी 50-60 टन कोळशाचा अवैध अवैध व्यापार होत असताना आता पर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठया प्रमाणात फोफावला आहे. या बाबत वंचीत बहुजन आघाडी तालुका शाखा मारेगाव च्या वतीने निवेदन देण्यात आले होते. सात दिवसांत हा चोर बाजार बंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष झाल्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. त्या पुर्वी नव्याने रुजू झालेले एसडीपीओ यांनी दखल घेतल्यास कदाचित आंदोलनाची कार्यकर्त्याना काही गरज पडणार नाही. मात्र कोळंसा चोर बाजार बंद करण्याचे त्यांच्या समोरील आव्हान ते कसे पेलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्याच्या मुलीने JEE B मध्ये मारली बाजी.


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मुकटा येथील कु.प्रणाली विजय ढवस हिने JEE B arch परीक्षेत 99.73 टक्के टाईल घेऊन देशातुन 47 वा नंबर.प्राप्त करून गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.

कु.प्रणाली ही आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे 12 व्या वर्गात विज्ञान शाखेत मागच्या वर्षी शिकत होती.तीला 86.83 टक्के मार्क होते.तिचा कॉलेज मधुन 3 रा नंबर होता.तिचे 10 वी पर्यंतचे शिक्षण हिरालाल लोया विद्यालय वरोरा येथे झाले. 

तालुक्यातील मुकटा येथील शेतकऱ्यांच्या मुलीने JEE B arch परीक्षेत घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.आई-वडील शेतकरी असून त्यांचे कडे 7 एकर शेती आहे.घरात कुणीही जास्त प्रमाणात सुशिक्षित नसताना दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या प्रणाली चे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

प्रणाली हीचा भाऊ लोकेश विजय ढवस हा 8 व्या वर्गात वरोरा येथे शिक्षण घेत आहे.प्रणाली हे श्रेय आई वडीला सह आजी आजोबांना व कॉलेजचे प्राचार्य व प्राध्यापक यांना देत आहे.

जमिनीचे आरोग्य तपासुया... मातीचे भाग्य उजळूया

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी देश आणि वैयक्तिक पातळीवर आपण जमिनीत मोठ्या प्रमाणावर रसायनं, औषधं आणि यांत्रिकीकरणाचा वापर केला. यामुळे जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ तर झालीच, पण दुसरीकडे मातीचं आरोग्य ढासळत गेलं. जमिनीचा पोत बिघडत गेला आणि तिची सुपीकता कमी झाली. ज्या ज्या वेळेस आपण शेतकऱ्यांशी त्यांच्या उत्पन्नाबद्दल चर्चा करतो, त्या त्या वेळी एक उत्तर हमखास ऐकायला मिळतं. ते म्हणजे, पूर्वी ज्या शेतात एका एकराला १० ते १२ क्विंटल कापूस व्हायचा, तिथं आता ७ ते ८क्विंटलच कापूस होतो. पण, हे असं का झालं, तर यामागे एक प्रमुख कारण सांगितलं जातं ते म्हणजे जमिनीची उत्पादकता कमी होणे. त्यामुळे मग आता गरज निर्माण झालीय, ती जमिनीचं आरोग्य तपासायची. म्हणजे आपण ज्या जमिनीत पीक पिकवतो, तिथल्या मातीत कोणती मूलद्रव्ये किती प्रमाणात आहे, ते जाणून घेण्याची आणि त्यानुसार जमिनीतील मूलद्रव्यांचं प्रमाण संतुलित ठेवण्याची. सध्या खरीपाच्या कामांची सुरूवात शेत-शिवारांमध्ये झाली आहे, सध्या ‘शासन आपल्या दारी’ या मोहिमेच्या निमित्तानं आपण जमिनीचे आरोग्य म्हणजे काय? माती परीक्षणाद्वारे जमिनीची आरोग्य पत्रिका कशी काढायची? ती काढण्यासाठी मातीचे नमुने कसे घ्यायचे? या पत्रिकेचे फायदे काय आहेत? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जमिनीचं आरोग्य

जमिनीचं आरोग्य हे जमिनीत असणारे घटक आणि जमिनीचे गुणधर्म यावर अवलंबून असतं. जमिनीमध्ये असणारी खनिजद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायू हे चारही घटक पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं.जमिनीचं आरोग्य चांगलं असेल तरच ती चांगल्या प्रमाणात उत्पादन देते. नत्र, स्फुरद, पालाश की जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये आहेत. तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आहेत. याशिवाय जस्त, लोह, तांबे, मंगल, बोरॉन आणि मॉलेब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्येही जमिनीत असतात. या सगळ्या अन्नद्रव्यांचं जमिनीतील प्रमाण तपासणं यालाच माती परीक्षण असं म्हणतात. माती परीक्षण करण्यासाठी सगळ्यात पहिला टप्पा येतो तो मातीचा नमुना योग्य पद्धतीनं घेण्याचा.

मातीचा नमुना पद्धत

मातीचा नमुना वर्षभरात केव्हाही घेता येतो. पण, बहुतेकदा रब्बी पिकांच्या काढणीनंतर किंवा उन्हाळ्यात नमुना घेतल्यास परीक्षणाचा अहवाल पेरणीपर्यंत उपलब्ध होतो. पिकांच्या काढणीनंतर जमीन कोरडी असताना मातीचा नमुना घ्यावा. पिकांना खत टाकले असेल तर त्यानंतर लगेच मातीचा नमुना घेऊ नये. मातीचा नमुना घेताना शेताचं उतार, रंग, पोत, खोली यानुसार वर्गीकरण करावं. प्रत्येक भागातून एक स्वतंत्र नमुना घ्यावा. पाणथळ जागा, झाडाखालील जमीन, बांधाजवळील जागा, शेतातील गुरे बांधण्याची जागा, शेतातील बांधकामाजवळचा परिसर, अशा ठिकाणाहून मातीचा नमुना घेऊ नये. सपाट पृष्ठभागावर ३०३०३० सें.मी. लांबी, रुंदी व खोलीचा खड्डा तयार करावा. त्यात २ सें.मी. जाडीची माती खुरप्याच्या सहाय्यानं खरडून हातावर काढायची आणि प्लास्टिकच्या बादलीत घ्यावी. अशाप्रकारे प्रत्येक भागातून ५ ते १० नमुने प्रत्येक भागातून घ्यावे. नमुने घेतलेली माती एका कागदावर पसरावी. ती मिसळून घ्यावी. ढिगाचे चार भाग करून समोरासमोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग पुन्हा मिसळावे व पुन्हा चार भाग करावे. ही प्रक्रिया अर्धा किलोग्राम माती शिल्लक राहीपर्यंत करावी.

ही माती स्वच्छ कापडी पिशवीत भरावी. यासोबत एका कागदावर शेतकऱ्याचं नाव, पत्ता, गट किंवा सर्व्हे नंबर, जमिनीचा प्रकार, नमुना घेतल्याची तारीख, मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचं उत्पादन, पुढील हंगामात घ्यावयाचे पीक याची माहिती लिहावी आणि हा नमुना स्थानिक कृषी विभागाच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत घेऊन जावा.

प्रयोगशाळेत गेल्यानंतर…

मातीचा नमुना प्रयोगशाळेत नेल्यानंतर तिथं त्याची नोंदणी केली जाते. शेतकऱ्यानं नेमकं हा नमुना कोणत्या घटकांच्या तपासणीसाठी आणला आहे, ते सांगणं आवश्यक असतं. त्यानुसार यासाठीचं शुल्क आकारलं जातं. सर्वसाधारण मातीचा नमुना ज्यात सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद आणि पालाश यांची तपासणी करायची असेल तर ३५ रुपये शुल्क आकारले जाते. आणि ३० दिवसांत मातीची आरोग्य पत्रिका अर्थात अहवाल दिला जातो. विशेष मातीचा नमुना ज्यात सामू, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, मुक्त चुना आणि भौतिक गुणधर्माची तपासणी करायची असेल तर २७५ रुपये शुल्क आकारले जाते व ४५ आरोग्य पत्रिका दिली जाते. जमिनीतील सूक्ष्म मूलद्रव्ये जसं की लोह, जस्त, मंगल, तांबे यांची तपासणी करायची असेल तर २०० रुपये शुल्क आकारुन ३० दिवसांत आरोग्य पत्रिका दिली जाते. एकदा का कागदपत्रांची पूर्तता झाली की, मातीच्या नमुन्याला चाळणीद्वारे स्वच्छ केलं जातं आणि मग ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं जातं. इथं या नमुन्यातील वेगवेगळ्या घटकांची तपासणी केली जाते. त्यानुसार त्या घटकांचं मातीतील प्रमाण कमी आहे, जास्त आहे की पुरेसं आहे, हे संगणकावर नोंदवलं जातं. पुढे ही माहिती आरोग्य पत्रिकेवर नमूद केली जाते आणि ती पत्रिका शेतकऱ्याला सोपवली जाते.

जमिन आरोग्य पत्रिकेचे फायदे 

नंदुरबारचे जिल्हा अधिक्षक कषी अधिकारी राकेश वाणी सांगतात, माती परीक्षण केल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या जमिनीत कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे किंवा कोणते घटक जास्त प्रमाणात आहे याची माहिती मिळते. यामुळे खतांचं आणि सूक्ष्म मूलद्रव्यांचं नियोजनं करणं सोयीचं होतं. माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास रासायनिक खतांवरील अवाजवी खर्च टाळता येतो आणि त्याचे दुष्परिणामही टाळता येतात. माती परीक्षण अहवालानुसार खते दिल्यास ती योग्य, संतुलित आणि शिफारशित प्रमाणात दिली जातात. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारतं आणि तिची उत्पादकता वाढीस लागते. परिणामी, पिकांचं उत्पन्न वाढण्यास मदत होते. माती परीक्षण केल्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म टिकवून ठेवता येतात. क्षारपड, चोपण, आम्लयुक्त जमिनीवर माती परीक्षण अहवालानुसार उपाययोजना करता येतात.

जमीन आरोग्य पत्रिकेचं वाचन

जमिनीची आरोग्य पत्रिका तर मिळाली, पण ती वाचायची कशी, त्यानुसार जमिनीला खतं द्यायची कशी, हे शेतकऱ्यांना अनेकदा लक्षात येत नाही. तुम्हाला जी आरोग्य पत्रिका दिली जाते तिचे साधारत: दोन भाग पडतात. पहिल्या भागात शेतकऱ्याविषयीची माहिती जसं की नाव, गाव, मोबाईल क्रमांक दिलेला असतो. त्यानंतर नमुन्याचा तपशील यात नमुना घेतल्याची तारीख, शेताचं क्षेत्र इ. बाबी नमूद केलेल्या असतात. दुसऱ्या भागात मातीच्या परीक्षणातून समोर आलेले परिणाम नोंदवलेले असतात. यात जमिनीतील १२ अन्नद्रव्यांची नावे आणि त्यासमोर जमिनीतील त्यांचं प्रमाण नमूद केलेलं असतं. तुमच्या जमिनीच्या गट क्रमांकात ही अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत, याची वर्गवारी त्या त्या अन्नद्रव्यासमोर केलेली असते. खूप कमी, कमी, मध्यम, पुरेसं, उच्च, कमतरता अशा प्रकारे अन्नद्रव्यांची वर्गवारी केलेली असते. यानुसार मग आपल्या जमिनीतील मूलद्रव्याचं प्रमाण पाहून खताचा डोस किती वापरायचा, याची माहिती शेतकरी गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून घेऊ शकतात.

रणजितसिंह राजपूत
जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

वणी : बालकाचे प्राण वाचवण्याकरिता आधार माणुसकीचा सेवा भावी संस्थाच्या वतीने आर्थिक मदत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : महावितरणच्या गलथान कारभारामुळे लाठी येथील 8 वर्षीय बालक पियुष संभा माहुरे याला विजेचा स्पर्श झाल्यामुळे जखमी झाला.

या 8 वर्षीय बालकाचा लातूर येथे दिनांक 6 मे पासून उपचार चालू आहे. पियुष यांच्या उपचाराकरिता त्यांच्या वडिलांकडे उपचारा करिता पैसे नसल्याची माहिती आधार माणुसकीचा सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष दिपकभाऊ मत्ते यांना मिळाली त्यामुळे "आधार माणुसकीचा सेवा भावी संस्था" वणीच्या वतीने आज माहुरे कुटुंबाला लाठी येथील निवासस्थानी येऊन 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आकाश सूर तर सचिव उपेश आवारी ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर,नत्थु बोधे,आशिष माहुरे हे उपस्थित होते.

जाणून घ्या आजचे राशभाविष्य : २८ में २०२३



                   राशीभविष्य : २८ मे रविवार..!

मेष :
मेष राशीच्या लोकांना प्रत्येक बाबतीत काळजीपूर्वक वागावे लागेल. तुमचा परीक्षेचा टप्पा सुरू आहे, तुम्ही तुमच्या कामात जास्त लक्ष दिलेले बरे. काही कारणास्तव तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. अनेक लोकांसाठी आजचा दिवस आळशीपणाचा असेल. किरकोळ तणाव हे तुमच्या समस्येचे कारण असू शकते.

वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांसाठी दिवस खूप व्यस्त असेल. संध्याकाळपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळेल आणि तुम्हाला फायदा होईल. व्यावसायिक बाबतीत सावध राहून आणि कोणताही निर्णय घेताना सावध राहून नुकसान कमी करू शकता. तुम्हाला गुंतवणुकीच्या दृष्टीने फायदा होईल. पैसे गुंतवू शकतात.

मिथुन :
मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस उर्जेने भरलेला असेल. दुपारपर्यंत काही चांगली बातमी मिळू शकते. आपण एखाद्या विशिष्ट प्रकरणात माहिती मिळवू शकता. विद्यार्थ्याने अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केल्यास त्याचा फायदा होईल. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात नवीन तंत्रांचा अवलंब करून नफा मिळू शकेल.

कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक बाबतीत भाग्यवान ठरू शकतो. केवळ एका युक्तीने काम केल्याने तुमचे काम मंद होऊ शकते. कोणतेही धोकादायक पाऊल उचलू नका. कुटुंबातील तुमचे विरोधक काही काळ डोके वर काढू शकणार नाहीत. तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मग सर्व काही ठीक होईल.

सिंह :
सिंह राशीच्या लोकांचा दिवस खूप चांगला जाईल. कोणतीही बाब किंवा नवीन कल्पना हृदयात येऊ शकते आणि ती अंगीकारणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नातेवाईकांच्या जुन्या तक्रारी दूर करण्याची वेळ. मित्रांसोबत राहणे फायदेशीर ठरू शकते. व्यवसायातील काम मनाप्रमाणे असेल तर आनंदाचे वातावरण राहील. कोणाशीही वाद घालणे टाळा.

कन्या :
कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस खूप व्यस्त असेल. मेंदूने केलेले काम फायदेशीर ठरेल आणि त्यामुळे तुमचे काम वेळेवर पूर्ण होऊन तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेल. जुन्या काळापासून सुरू असलेला तणावही कमी होईल. तुम्ही इतरांना मदत केलीत तर तुम्हाला मदत करणारेही येतील. आज तुम्ही जे काही काम प्रामाणिकपणे आणि मेहनतीने कराल ते फळ मिळेल.

तूळ :
तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस आर्थिक लाभाचा आहे. दिवसाच्या पहिल्या भागात फोन कॉल येऊ शकतात. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. ऑफिस सोबती देखील टीमवर्कमुळे खूश होतील. व्यवहार आणि व्यवसायातील प्रत्येक काम हिशोबानुसार करा. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रोमान्सच्या दृष्टीनेही दिवस चांगला आहे. तुमचा खर्चही थोडा जास्त असू शकतो.

वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस व्यस्त असेल आणि त्यांना दिवसाच्या पहिल्या भागात जास्त मेहनत करावी लागेल. संध्याकाळपर्यंत शांतता राहील. लाभाच्या अनेक संधी येतील. फिरण्याचीही संधी मिळेल. संध्याकाळीही अशीच संधी आहे. पक्षातील काही चांगल्या आणि प्रभावशाली लोकांशी भेट होईल आणि एखादे विशेष कार्य पूर्ण झाल्याने चिंता दूर होईल.

धनु :
धनु राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत वादात पडू नका. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला प्रवासासारखे वाटेल आणि या काळात तुम्हाला काही कामाची माहिती मिळू शकेल. तुम्ही कोणत्याही मोहिमेत जिंकू शकता. आर्थिक बाबतीत अनुभवी लोकांच्या सल्ल्याने फायदा होईल.

मकर :
मकर राशीच्या लोकांनी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करावी. तुमचे कोणाशीही मतभेद नाहीत हे ध्यानात ठेवा. नोकरीत तुमची स्थिती चांगली राहील. व्यवसायात चांगला फायदा होईल. वैवाहिक जीवनही यशस्वी होईल. दिवसभरात अनेक कामे करायची आहेत, पण महत्त्वाची कामे प्राधान्यक्रमानुसार पूर्ण करा.

कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांचा दिवस चांगला असून मेहनतीला यश मिळेल. समुहासोबत काम आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत काम केल्याने चांगले परिणाम मिळतील. संभाषणातून नवीन कल्पना येऊ शकते. मित्रासाठी भेटवस्तू खरेदी करताना खिशाची काळजी घ्या.

मीन :
मीन राशीच्या लोकांसाठी दिवस खूप संथ असेल. हळूहळू पुढे जाणे फायदेशीर ठरू शकते. प्रयत्न करत राहिल्यास रखडलेली कामेही पूर्ण होतील. सतर्क राहा आणि तुमच्या कामात सहभागी व्हा. तुम्ही संघर्षातून मुक्त होऊ शकता. अवाजवी खर्च करण्याऐवजी तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा कारण तुमचा खर्च जास्त असेल.


मी असुनही नसल्यासारखीच..., नवरा दुर्लक्ष करत असेल कर 'या' ५ टिप्स वाढवतील संसारात गोडवा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कधी कधी असं होतं की, समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं. मात्र, तो जाणूनबुजून काही गोष्टी सांगणं टाळतो.

'संसार म्हटलं की भांड्याला भांड लागणारच' हे शब्द आपण अनेक वेळा आपल्या आई-वडिलांच्या नातेवाईकांच्या तोंडून ऐकले असतील. कारण, त्यांना संसाराचा अनुभव असतो त्यांचे ते अनुभवाचे बोल असतात. मात्र, सध्याच्या जनरेशनमधील संसारांना लगेच तडा जातो, कित्येक वेळा किरकोळ भांडणं घटस्फोटापर्यंत जातात. नवरा मला वेळ देत नाही, समजून घेत नाही, ही अनेक विवाहित महिलांची तक्रार असते. परंतु अनेकदा ही कारणं खोटी असून शकतात, किंवा गैरसमजुतीतून आलेली असतात.

कारण, लग्नानंतर अनेक पुरुषांना कामाच्या व्यापामुळे इच्छा असून देखील आपल्या पत्नीला वेळ देणं जमतं नाही. त्यामुळे आपला नवरा आपल्याकडे दुर्लक्ष करतोय असं महिलांना वाटायला लागतं. अशा परिस्थितीत काही महिला आपल्या मनातील ही खदखद घरच्यांसमोर किंवा नवऱ्यासमोर बोलून दाखवतात, तर काही मुली या गोष्टी आपल्या मनात ठेवतात आणि तणावात जातात.

मात्र, नवरा लग्नानंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय, तुम्हाला वेळ देत नाही, असं तुम्हाला वाटतं असेल तर या गोष्टींचा सतत विचार करून तणावात न जाता, तुमचं नातं जिवंत कसं ठेवता येईल यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. तर चला जाणून घेऊया तुम्हा दोघांच्या सुखी संसारासाठी काय करावं लागेल.

वेळ द्या :
तुम्हाला तुमचा जोडीदार दुर्लक्ष करतोय, काही बोलत नाही असं वाटत असेल तर तुम्ही काही दिवस शांत रहा. त्याला थोडा वेळ द्या, कारण काही वेळ गेल्यानंतर त्याच्या काही अडचणी दूर झाल्या की, तो स्वतः त्याच्या मनातील गोष्टी तुम्हाला सांगायला सुरुवात करेल. पण त्यासाठी तुम्ही काही दिवस त्याला त्याची स्पेस द्यायला हवी.

शांत रहा :
कधी कधी असं होतं की, समोरच्या व्यक्तीला तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं. मात्र, तो जाणूनबुजून काही गोष्टी सांगणं टाळतो. कारणं तुम्हाला ती गोष्ट सांगण्यासाठी तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. त्याला जेव्हा योग्य वेळ आली आहे असं वाटेल तेव्हा तो मनातलं सर्व काही सांगेल त्यासाठी त्याला काही वेळ द्यायला हवा. त्यामुळे तुम्ही त्याला आपल्या मनातील काहीही सांगत नाही, असं म्हणत ओरडण्यापेक्षा शांत रहा आणि योग्य वेळेची वाट पाहा. असं केल्यामुळे त्याच्या मनातही तुमच्याबद्दलचा आदर वाढेल.

संवाद :
वैवाहिक जीवनात सुसंवाद असणं फार महत्वाचं आहे. संवादाने प्रत्येक गोष्टीवर उपाय सापडतो असं म्हणतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमचा नवरा तुमच्याकडे दुर्लक्ष करतोय असं तुम्हाला वाटेल. तेव्हा तुम्ही स्वतः त्याच्याशी संवाद साधा. तो दुर्लक्ष करतोय असा दोष देण्याऐवजी त्याला काही अडचणी आहेत का? हे जाणून घ्या.

नात्यातील प्रेम वाढवा :
जर तुमच्या नात्यातील ओढ कमी झाली असेल तर ती कोणत्याही प्रकारे पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण नात्यात ओलावा राहिला तरच प्रेम वाढेल आणि प्रेम वाढलं तर जोडीदार तुम्हाला कधीच इग्नोर करणार नाही.

समुपदेशकाची मदत घ्या :
वरील सर्व उपाय करुनही जर तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचे बोलणं होत नसेल, तर अशा गोष्टी दुर्लक्ष करण्यापेक्षा चांगल्या समुपदेशकाची मदत घ्या आणि नात्यातील दुरावा दुर करण्याचा प्रयत्न करा.

धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणीत धारदार शस्त्र सोबत बाळगुन दहशत निर्माण करणे हे काही नवीन नाही असं म्हटलं तर वावगं नाही. या अगोदर सुद्धा धारदार शस्त्र सोबत बाळगत तरुणांनी वेगवेगळ्या परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच आज पुन्हा एका तरुणाने हातात तलवार घेऊन दहशत पसरवण्याऱ्याला येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

शहरातील एस.पी.एम. शाळेच्या मागील पटांगणात आज शनिवारी २७ मे रोजी ही कार्यवाही करण्यात आली. राहूल संजय डबडे (२१) रा.इंदिरा चौक, वणी. असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.

एस.पी.एम. (SPM) शाळेच्या मागे खुल्या मैदानात एक तरुण हातात धारधार तलवार घेऊन दहशत निर्माण करीत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता, गुन्हे शाखेचे पोउनि योगेश रंधे हे पथकासह दाखल होऊन मैदानावरील पडीक विरान इमारतीमध्ये बसलेल्या तरूणाला ताब्यात घेऊन त्याचे जवळील धारदार तलवार जप्त केली. त्याचेवर शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास वणी पोलिस करीत आहे.

खासदार बाळू धानोरकर यांना पितृशोक; श्री नारायण आत्माराम धानोरकर यांचे दीर्घ आजाराने निधन

 
सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर तथा भद्रावती नगरपरिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचे वडील नारायण आत्माराम धानोरकर यांचे आज शनिवारी २७ मे रोजी सायंकाळी ५.३० नागपूर येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. 

त्यांच्यावर नागपूर येथील अरिहंत हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. 

नारायण धानोरकर हे पेशाने शिक्षक होते. ते उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून भद्रावती येथील डिफेन्स जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यामागे दोन मुले खासदार बाळू धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुलगी सौ. अनिता बोबडे, स्नुषा आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह पत्नी वत्सला धानोरकर , नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

आज भद्रावती येथील घुटकाळा वार्डातील निवासस्थानी सायंकाळी ८ ते उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी पार्थिवदेह ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या रविवार दिनांक २८ मे रोजी सकाळी ९ वाजता भद्रावती येथील जैन मंदिर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : शेतीमधील कामे संपल्यावर शेत मजुरांकडे कोणतीही कामे उपलब्ध राहत नाही. अशा वेळी त्यांना रिकामे राहावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी येते. अशा बिकट प्रसंगी ग्रामीण मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चंद्रपुर जिल्ह्यात महत्तवाची भुमिका बजावत असून ग्रामीणांच्या उदरनिर्वाहास हातभार लावत आहे.

मनरेगा अंतर्गत वैयक्तीक व सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारची कामे हाती घेतल्या जाते, यामध्ये भूमिहीन शेतमजुर व अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर, शेततळे, मजगी, फळभाग, शेतबांध बंदीस्ती, बोळी खोलीकरण, नॉडेप, शौषखड्डे, गुरांचे गोठे, बॉयोगॉस, शेळी निवारा, कुकुटपालन शेड अशी विविध वैयक्तीक स्वरुपाची कामे व तसेच सार्वजनिक भौतिक सुविधांची मालमत्ता निर्माण करणारी कामे जसे गोडावुन, ग्रामपंचायत भवन, ग्रामसंघ भवन, शेत पांदन रस्ते, तलावतील गाळ काढणे, वृक्ष लागवड अशी अनेक कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेतली जातात. याकरिता ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कामाचे नियोजन अर्थिक वर्ष सुरु व्हायच्या आधीच करण्यात येते. सदर वार्षीक नियोजन आराखडा सर्वव्यापक व सर्वंकश बनविण्यावर जिल्हा परिषद चंद्रपूर प्रशासनांकडुन विशेष प्रयत्न केला जात आहे.
जास्तीत-जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे तसेच जिल्ह्यात नविन्यपुर्ण कामे करण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. यावर्षी ग्रामीण भागात खेळ प्रवृत्तीचा विकास करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील युवकांना सैनिक भरती, पोलीस भरती व इतर स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागात क्रिडांगण उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्रती तालुका पाच क्रिडांगणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देवुन एकूण ७५ कामे जिल्हयात एकाच वेळी मनरेगामधुन सुरु केली आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात एक गोडावुन व ग्रामसंघ भवन तयार करण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्याला मागील वर्षी केंद्र शासनाने ३५.२३ लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट दिले असतांना जिल्ह्याने ४९.६१ लक्ष मनुष्यदिवस निर्मिती केली होती. चालू वर्षाकरिता केंद्राने ३७.५८ लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचे उद्दिष्ट दिले असतांना जिल्हा परिषदेतर्फे ५० लक्ष मनुष्यदिवस निर्मितीचा प्रयत्न आहे.

मनरेगा कामांची नियोजनपूर्वक आखणी करून प्रभावी अंमलबजावणी केल्याने यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मजुरांनी हजेरी लावली आहे. मजूर उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्हा आज राज्यात द्वितीय स्थानांवर तर ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातंर्गत सर्व तालुक्यामधील नरेगाच्या विविध कामावर आज रोजी ७१ हजार ६४३ एवढे मजूर काम करीत आहे. एकंदरीत मजुरांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन आपल्या दारी हजर राहून प्रभावी उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येते. 

28 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान चंद्रपूर येथे मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
      
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मुकटा येथील एका 28 वर्षीय युवकाने विषारी द्रव्य प्राशन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्देवी घटना घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रफुल उत्तम तुराणकर (28) असे विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाने काल शुक्रवारी 26 मे च्या सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास विष प्राशन केले होते. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने चंद्रपूर येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले होते, कालपासून त्याच्यावर उपचार सुरु असताना आज उपचारादरम्यान सकाळी 6 वाजताचे दरम्यान, त्याने अखेरचा श्वास घेतला.
   
अविवाहित प्रफुल हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करीत होता.गेल्या काही दिवसापासून तो नुकताच मुकटा येथे आई वडीला कडे आला होता. मात्र, दरम्यान त्याची मानसिक स्थिती चिंताग्रस्त असल्याचे जाणवत असताना त्यानी आई वडिलांना शेअर केली नाही. काल दि. 26 मे ला पुणे येथे परत जाणार होता. त्यामुळे आई त्यांचेसाठी डब्बा बनवून द्यायच्या कामात व्यस्त होती. तर वडील जनावरांना चारापाणी करायला गेले असताना प्रफुलने घरी असलेली विषारी द्रव्य प्राशन केले. एवढ्यात त्याला उलटी झाली या उलटीतून वास आल्याचे आईच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वडिलांना बोलावून प्रफुलला चंद्रपूर येथील खाजगी दवाखाण्यात भरती केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याचा मृतदेह चंद्रपूर येथून मूकटा येथे जन्मगावी आणवून येथेच त्याचा अंतसंस्कार करण्यात आला आहे.
 प्रफुलच्या मागे आईवडील,दोन भाऊ आणि आप्तपरिवार आहे.

मोहदा येथे आमदारांच्या हस्ते विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यवतमाळ जल जीवन मिशन कार्यक्रम सन २०२२-२३ अंतर्गत मोहदा येथे (ता. वणी) नळ पाणी पुरवठा योजना करणे प्राकलित किंमत रु. ९९.२४५ लक्ष व आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत मंजूर किंमत १० लक्ष नारायण राजुरकर ते कृष्णानपूर पांदन रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे,आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले असून या कामाचे भूमिपूजन आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते करण्यात आले.
मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे नुतनीकरण आणि मजबुतीकरण करण्याचे ध्येय असताना यासोबतच मोहदा सह परिसरातील गावांच्या सर्व समस्या लवकरच सोडविल्या जातील अशी ग्वाही आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी मोहदा दरम्यान अर्थसंकल्पीय कामे अंतर्गत ९९.२४५ लक्ष तथा १० लक्ष निधी मंजूर झालेल्या रस्ता कामाच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पं स माजी सभापती श्री संजय पिंपळशेंडे, तर प्रमुख उपस्थिती श्री दिनकरराव पावडे, श्री गजाननराव विधाते, सौ. वर्षा रवींद्र राजुरकर (सरपंच) आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री. सचिन ज्ञानेश्वर रासेकर (उपसरपंच), श्री, गणेश बोन्डे, ग्रा. पं सदस्य, श्री गजानन शेलवडे, ग्रा पं सदस्य, सौ. अर्चना गेडाम, ग्रा. पं सदस्या, सौं सीमा ढूमने, ग्रा पं सदस्या, सौं बेबीताई उईके, सदस्या, सौं शोभा टेकाम, सदस्या, सौं सुवर्णा बोन्डे सदस्या,आदीसह या कार्यक्रमाला समस्त गावकरी, मोहदावासी उपस्थित होते. 




सभापती गौरीशंकर खुराणा यांचा पुसद अर्बन बँके तर्फे सत्कार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

 मारेगाव : मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त सभापती गौरीशंकर खुराणा यांचा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी बॅकेच्या वतीने पुसद येथील बँक कार्यालयात सत्कार करण्यात आला, यावेळी बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा उपस्थित होते.
     
नेहमी शेतकऱ्याचे हित जोपासणारे गौरिशंकर खुराणा हे झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीचे मताधिक्य घेऊन महाविकास आघाडीच्या शेतकरी एकता पॅनल मध्ये निवडून आले,त्यानंतर त्यांची सभापतीपदी बहुसंख्य संचालकानी त्यांना पाठिंबा देत अविरोध निवडून दिले. या घटनेचे पुसद अर्बन बँकेने दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार कार्यक्रमाच्या प्रसंगी गौरीशंकर खुराणा यांनी आपण शेतकरी हिताचे निर्णय घेऊ असे सांगीतले, यावेळी पुसद अर्बन बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा, संचालक ललित सेता, निळूभाऊ पाटील, सौ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सेवकर, सुरोसे व बॅक कर्मचारी उपस्थित होते .

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण व्हावी- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मनपा आयुक्तांना निर्देश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : पावसाळ्यापूर्वी चंद्रपूर शहरातील नालेसफाईची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले आहेत.

चंद्रपूर शहरातील मोठे व छोटे नाले आणि गटारीमध्ये पावसाचे पाणी तुंबल्यास ते नागरिकांच्या घरात साचून नागरिकांची गैरसोय होऊ शकते. ही बाब टाळण्यासाठी युद्धस्तरावर या सर्व नाल्यांची सफाई करणे, त्यातील गाळ काढणे, प्रसंगी नाल्यांचे रुंदीकरण करणे ही कामे करण्याचे निर्देश ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना दिलेत.

मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी जेसीबी यंत्राचा वापर करावा, नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये कोणत्याही परिस्थितीत शिरणार नाही यासाठी नाल्यांचा प्रवाह सुस्थितीत ठेवण्याची सूचनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बरेचदा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका असतो. विशेषत: नाल्यांच्या शेजारून गेलेल्या जलवाहिनींमध्ये गळती असल्यास हा धोका अधिक वाटतो. त्यातून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नाले, गटारी यांचे निर्जंतुकीकरण करावे. अशा सूचना पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा आयुक्त यांना दिले आहेत.

जिल्ह्यात बारावीचा निकाल 91.98 टक्के,मुलींनी मारली बाजी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परिक्षेचा निकाल आज गुरुवारी जाहिर करण्यात आला. या जिल्ह्याचा निकाल ९१.९८ टक्के इतका लागला आहे. या निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. तर जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधून महागांव तालुक्याने ९६.०९ टक्के निकाल लागुन जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.

यावर्षी १२ वीच्या परिक्षेला जिल्ह्यातून २९ हजार ९०७ नियमित विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. त्यापैकी २७ हजार ५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १५१२ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे. तर ८ हजार ५५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तसेच आहे. १३ हजार २०४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्याचा मान मिळाला आहे. शाखा निहाय निकालामध्ये विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.८४ टक्के निकाल लागला आहे. वाणिज्य शाखेचा ६८५ विद्यार्थीनी या परिक्षेत उत्तीर्ण झाल्या असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९४.०२ एवढी आहे. मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी ३.९८ टक्के ज्यादा आहे.

तालुका निहाय निकालामध्ये महागांव तालुक्याचा सर्वाधिक ९६.०९ टक्के निकाल लागला आहे. नेर तालुका ९५.९३ तर बाभुळगांव तालुक्याचा ९४.८५ टक्के निकाल लागला आहे. आर्णी तालुका ९४.२६, कळंब तालुका ९२.२१, घाटंजी ९१.६९ टक्के, दिग्रस ९१.३५ टक्के, झरी जामणी ९०.५६ टक्के, राळेगांव ९०.५६ टक्के, मारेगांव ८९.८९ टक्के, पांढरकवडा ८८.०६ तर वणी तालुक्याचा निकाल सर्वात कमी निकाल ९२.२८ टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ८६.९१ टक्के एवढा लागला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमातून ८७.५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यावर्षी जिल्ह्यातील १४ हजार २७५ विद्यार्थी १२ वीत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालांची टक्केवारी ९०.१० टक्के आहे. तर १३ हजार ८०.८७ टक्के लागला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात 95 तक्रारी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात मारेगाव येथे आज 95 तक्रारी प्राप्त झाल्या. तहसील कार्यालय तथा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय मारेगाव यांच्या संयुक्त विध्यमाने शहरातील बदकी भवन मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण माजी सभापती अरुणाताई खंडाळकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, मारेगावचे तहसीलदार विवेक पांडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपक कळमकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका व्यवस्थापक डाहुले मॅडम, पशुधन विकास अधिकारी डॉ मिश्रा, डॉ राठोड, विस्तार अधिकारी मुनेश्वर अनिल राऊत,सरक्षण अधिकारी रोशन राऊत,प्रामुख्याने उपस्थित होते.

या समाधान शिबिरात तालुक्यातील महिलांनी 95 समस्या मांडल्या यामध्ये घरकुल योजना, बालसंगोपन, शौचालय, शिक्षण, रोजगार, निराधार, रॅशन कार्ड, विहीर योजनाचा समावेश होता. 95 तक्रारी मधून 23 तक्रारीवर तात्काळ कारवाही करण्यात आली. महिलाच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना न्याय मिळावा,यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यामुळे मोठया संख्येने महिलांची या शिबिरात उपस्थिती होती.

आज दि.26 मे रोजी दुपारी 1 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराची सुरुवात झाली, 4 वाजता या शिबिराचा रीतसर समारोप करण्यात आला. प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपक कळमकर यांनी केले, सूत्रसंचालन गणेश चाव्हण, यांनी तर आभार रामटेके यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मा कनाके, कांचन वनकर, नंदा आत्राम, अंकिता भगत, प्रेमीला मलकापुरे, अनुसया थेरे, प्रभावती खाडे, आशा खामणकर, गिता कांबळे यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहकार्य केले. 

अभिषेक कनाके देतोय उन्हाळी सुट्ट्यातील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे विनामूल्य धडे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आजच्या विज्ञान युगात विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर चे ज्ञान मिळणे ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पहापळ येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन. टी. चौधरी सर ,पदवीधर शिक्षक श्री. संजय फुलबांधे सर, श्री. अमर पुनवटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान होण्यासाठी दिनांक 2 मे 2023 पासून नियमितपणे सकाळी 8 ते 10 या वेळात प्रशिक्षण वर्ग घेतल्या जात आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांची वर्ग 1ते 5 आणि वर्ग 6 ते 8 अशा दोन बॅच मध्ये विभागणी केलेली आहे . पहापळ येथील संगणक तज्ञ अभिषेक भैय्याजी कनाके हे नियमितपणे विद्यार्थ्यांचे निशुल्क कॉम्प्युटर चे क्लास घेतात.त्यात कॉम्प्युटरची ओळख, बेसिक ज्ञान आणि एक्सेल वर्ड, पेंटिंग यासारखे अनेक प्रोग्राम शिकवले जातात. शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच गावातील इतरही मुले या कॉम्पुटर क्लास ला उपस्थित राहत आहेत.

उन्हाळी सुट्ट्यात कॉम्प्युटर चे वर्ग सुरु केल्याने विद्यार्थ्यांत तसेच पालकांत आनंद निर्माण झाला आहे आणि त्यांचा यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कॉम्प्युटर क्लाससाठी विद्यार्थ्यांना नियमितपणे उपस्थित ठेवण्यासाठी पहापळ येथील सरपंच श्री. राहुल आत्राम,पेसा समिती चे अध्यक्ष श्री. भैय्याजी कनाके .शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. अमोल गुरनुले,उपाध्यक्ष सौ. शितल भोयर आणि इतर सर्व सदस्य त्याचप्रमाणे शाळेतील उपक्रमशील पदवीधर शिक्षिका सौ. वाघमारे मॅडम आणि गोंडे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

सुनेच्या आत्महत्याप्रकरणी पतीसह सासु-सासऱ्यावर गुन्हा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मारेगाव हे यवतमाळ जिल्ह्यातील एक गाव व तालुक्याचे ठिकाण आहे. ह्या तालुक्याची "आदिवासी बहुल  तालुका" म्हणून सुद्धा ओळख आहे. ह्याच तालुक्यात शेतकरी आत्महत्या, महिलावर अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वर्तमान पत्रातून आपण वाचत असतो. मागासवर्गीय असलेल्या ह्या तालुक्यात अशीच एक घटना घडली असून त्या नवविवाहितेने सासर च्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली. 

तालुक्यातील गोंडबुरांडा येथे २० मे विवाहितेने स्वतःच्या राहत्या घरी दोराच्या सहायाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात मारेगाव पोलिस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह सासु-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रीना सुनील मुसळे (रामपुरे) हिचा प्रेमविवाह २०२२ मध्ये सुनील मुसळे याच्याशी झाला होता. ती चार महिन्यांची गर्भवती होती. ती पती व सासूसासरे यांच्यासोबत गोंडबुरांडा येथे राहत होती. गेल्या २० मे रोजी सायंकाळी रीनाने आपल्या राहत्या घरी छताला दोरीने गळफास लावून
आपली जीवनयात्रा संपविली. कुटुंबीय सायंकाळी शेतातून घरी परत आले असता, त्यांना रीना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. सासरकडील मंडळींनी रीनाशी भांडण करून तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार रीनाच्या नातेवाइकांनी मारेगाव पोलिस ठाण्यात दिली.

त्यावरून संशयित आरोपी पती सुनील भाऊराव मुसळे (वय ३० वर्षे, सर्व रा. गोंडबुरांडा), सासरे भाऊराव मुसळे (वय ५२ वर्षे), सासू अंजना भाऊराव मुसळे (वय ४८ वर्षे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंडबुरांडा विवाहित आत्महत्या प्रकरण, या नंतर समाजातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाल्यास सहन केले जाणार नाही. वारंवार कोलाम समाजावर होणारे अन्याय थांबले पाहिजे. नाहीतर क्रांतिवीर शामादादांनी कोलाम यांनी १९८० च्या दशकात कोलाम समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विद्रोह केला होता, तीच भूमिका आम्हाला घ्यायला भाग पाडू नका.

-राहुल आत्राम
जिल्हा अध्यक्ष, कोलाम संघटना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १६० तक्रारींचे निराकरण

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात चेंबूर एम पश्चिम वॉर्ड येथे आज १२४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १६० तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले आहे. उर्वरीत तक्रारी देखील वेळेत निराकरण करून समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तसेच बँका आणि महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलमध्ये शासनाच्या विविध विभागांकडून महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती महिलांना देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) हा उपक्रम ३१ मे २०२३ पर्यंत दुपारी ३ ते 5.30 या वेळेत सुरू राहणार आहे. या उपक्रमात महिलांना तक्रारीसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये ऑनलाईन अर्जही करता येणार आहे. अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी https://forms.gle/7GzCSACLYsj38amq9 या लिंकवर जाऊन माहिती भरता येवू शकते.

एस.पी.एम कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, तर कला शाखेचा निकाल 55 टक्के

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : नुकताच 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात एस पी एम कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा 100 टक्के निकाल लागला तर कला शाखेचा निकाल 54.83 टक्के लागला.

यात विज्ञान शाखेतील एकूण 168 पैकी 168 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर कला शाखेतील एकूण 93 पैकी 51 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आयुष वसंत ठाकरे हा 510 गुण (85 टक्के) घेऊन विज्ञान शाखेतून प्रथम आला.कु प्रांजली अविनाश परसावार हिला 497 गुण (82.83 टक्के) घेऊन दुसरी आली, तर झेम परवेज शेख हा 471 (78.50 टक्के) घेऊन तिसरा आला.

कला शाखेतून कु नंदिनी ऋषी रायपुरे ही 469 (78.17 टक्के) गुण घेऊन कला शाखेतून प्रथम आली, तर कु सानिया गणेश उईके 458 (76.3 टक्के) गुण घेऊन दुसरी आली,तर कु नंदिनी रवींद्र वांढरे 367 (61.17 टक्के) गुण घेऊन तिसरी आली.

या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे उपाध्यक्ष श्री रमेश बोहरा सचिव श्री लक्ष्मण भेदी सहसचिव श्री अशोक सोनटक्के प्राचार्य श्री क्षीरसागर सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पाणी अडवले, उडवले, फिरवले आणि मगच जिरवले तर?


सह्याद्री चौफेर | प्रदीप गावंडे 

पुणे : महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांना दररोज लागणारे पिण्याचे आणि वापरण्याचे पाणी रात्री १२ ते ६ या वेळेत नदीतून, विहिरीतून उपसावे आणि सकाळी दिवसा गावाला वितरित करावे.

असेच नगर पंचायत, नगर पालिका, महानगरपालिका, शाळा, कॉलेज, शासकिय कार्यालयाने, औद्योगिक कंपन्यांनी, हौसिंग सोसायटीतील लोकांनी अशाच प्रकारे पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचे नियोजन करावे. रात्री वीज निर्मिती होवून वाया जाते म्हणुन असे करणे आवश्यकच आहे.

यातून शासनाचे १२५००० कोटी रुपये वाचतील.

यातूनच पुढे पूर नियंत्रण आणि दुष्काळ निवारण सहज साध्य करता येईल. आपल्या महाराष्ट्रात जून मध्ये पाऊस सुरु होतो. ८ ते १५ दिवसात संपुर्ण महाराष्ट्र व्यापून टाकतो. त्याच काळात शेतीचे पंप, एसी, कूलर, फॅन बंदच असतात. म्हणजे विजेचा तुटवडा नसतोच. याच विजेचा वापर करून "अडवलेले पाणी उडवून आणि फिरवून जिरवले तर फायदा होइल की नाही? जिथे पूर येतो तेथील पाणी जिथे दुष्काळ पडतो तिथे फिरवले तर जिरेलच ना!

पाणी फिरवायची अजुन एक संकल्पना पाहू. बऱ्याच धरणातून धरण भरल्यावर पाणी नदीत सोडले जाते. त्यामूळे खालील गावात पुरामुळे दाणादाण उडते. हेच अतिरीक्त पाण्यातील काही भाग आधीच महिनाभर कॅनॉल वाटे दूरवर फिरवून पुरावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल काय?

महाराष्ट्रात २८६०० ग्रामपंचायत आहेत. एका ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा पंप ५ एचपी पकडला तरी २८६००५=१४३००० HP वीज वापर रात्रीवर जाईल.
कल्पना करा की याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतीचे एकूण वीज पंप किती HP चे असतील? अंदाजे १० पट असावेत असे गृहीत धरले तरी १४३०००० HP होईल.

कल्पना करा की महाराष्ट्रातील औद्योगिक कंपन्यांचे एकूण वीज पंप किती HP चे असतील?

वीज निर्मिती सतत होत असते. परंतु विजेचा वापर एक सारखा नसतो. रात्री वीज वापर अतिशय अत्यल्प असतो. म्हणुन सरकार काही ठिकाणी दिवसा भारनियमन करते अन् रात्री शेतकऱ्यांना वीज पुरवठा करते. वीज वापराची ही परिस्थिती कायम अशीच राहील.

त्यावर मात करण्यासाठी सरकार रात्रीच्या विजेचा पुनर्वापर करण्यासाठी "पंप स्टोरेज" योजना अंगीकारते. इन्व्हर्टर सारखी "पंप स्टरेज योजना काम करत असते. महाराष्ट्रात आधीच काही ठिकाणी योजना चालू आहेत. काही ठिकाणी प्लॅनिंग चालू आहे. त्यासाठी लाखो कोटी रुपये वाया जातील. सरकारी खर्च वाचवणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे.

कशी असते पंप स्टोरेज योजना समजावून घेवू. जिथे पंप स्टोरेज योजना असते तिथे एका धरणाच्या खाली दूसरे धरण असते. वरच्या धरणातून पाणी बाहेर पडते तेव्हा वीज निर्मिती करून खालच्या धरणात साठवले जाते. आणि रात्री वाया जाणारी अतिरिक्त वीज उपलब्ध असल्याने ती वीज वापरून तेच पाणी वरच्या धरणात पंप केले जाते. ही प्रक्रिया रोज चालू असते. दिवसा पाणी वीज निर्मिती करून खालच्या धरणात साठते आणि रात्री वाया जाणारी अतिरिक्त वीज वापर करून तेच पाणी वरच्या धरणात आणले जाते. जसे आपल्या घरातील इन्व्हर्टर काम करतो.

महत्वाची गम्मत म्हणजे या पंप स्टोरेज योजनेतून विजेचा ४५% नाश होतो. परंतु १००% नाश होण्यापेक्षा ४५% नाश बरा म्हणून पंप स्टोरेज योजनेचे गणित मांडले जाते.
तर अब्जावधी पैसे खर्च करून पाणी वर खाली करत बसण्यापेक्षा आपणच पिण्यासाठी, शेतीसाठी, वापरासाठी रात्री पाणी वर नेवून ठेवले आणि दिवसा लागेल तसे वापरले तर आपलेच पैसे वाचतील कारण सरकार पण आपलेच आहे आणि त्यातून विजेचा शुन्य टक्के नाश होतो. आहे की नाही मज्जा.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेऊन शासनाने राज्यातील धरणांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील धरणांधील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यात आली आहे.

यंदा अल निनोमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच महाराष्ट्रातील जलसाठ्यांमध्ये अजूनही अंदाजे ४४ कोटी घनमीटर गाळ आहे. संपूर्ण राज्यात आणि विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण जिल्हे आणि महत्त्वाकांक्षी जिल्हयांमध्ये ही योजना राबविणे प्रस्तावित आहे. तसेच या आधीच्या योजनेत शासनाकडून फक्त इंधन खर्च देण्यात येत होता. मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरविण्यासाठीचा वाहतूक तसेच पसरविण्याचा खर्च शेतकरी स्वतः करीत होते. "गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार" या योजनेचे महत्व पाहता ती जोमाने राबविणे आवश्यक आहे. त्यामुळे यावेळेस शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देणे देण्यात येणार आहे. तसेच अल्प व अत्यल्पभूधारक शेतक-यांना सुध्दा या योजनेचा पुरेपुर लाभ घेता यावा करिता अशा शेतक-यांना अनुदान देण्यात येणार आहे

कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरीता सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या आहेत. राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत या कार्यक्रमांचे सनियंत्रण करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरीता सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या आहेत. राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांमार्फत या कार्यक्रमांचे सनियंत्रण करण्यात येणार आहे.

योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे जी.ओ. टॅगिंग, योजनेची संगणक प्रणालीवर माहिती संकलित करण्यात येईल. संनियंत्रण व मूल्यमापन या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचे स्वतंत्रपणे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्यात येणार आहे. केवळ गाळ उपसा करण्यास परवानगी राहणार असून वाळू उत्खननास पूर्णत: बंदी असणार आहे. गाळ साचलेल्या धरणालगत किंवा तलावालगत क्षेत्रातील शेतकरी अथवा अशासकीय संस्था गाळ स्वखर्चाने काढून त्यांच्या शेतात वाहून नेण्याची कार्यवाही करणार असल्याची सूचना संबंधित यंत्रणेला करतील. यासाठी इतर कुठलीही परवानगी लागणार नाही. गाळ उत्खनन करतेवेळी शेतकरी किंवा अशासकीय संस्थेकडून गाळाव्यतिरिक्त मुरुम किंवा वाळूचे उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. वाहून नेण्यात येणारा गाळ संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात वापरणे बंधनकारक असून अशा गौण खनिजाची विक्री किंवा इतर कोणत्याही प्रयोजनासाठी वापर करता येणार नाही.

ख-या अर्थाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान हा उपक्रम शेतक-यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. शेतीचा पोत सुधारण्यासाठी हा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरून शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

-जिल्हा माहिती कार्यालय
नागपूर